Saturday, December 5, 2020

गंमत कोरोनाची

गंमत कोरोनाची ...

कोरोनापासून चार हात लांब रहाण्यासाठी म्हणुन प्रत्येकजण काळजी घेतच असतो. पण तरीही तो कुठून चोरपावलांनी चंचूप्रवेश करेल याचा भरवसा नसतो. 

दि १४ नोव्हेंबर, शनिवारी दिवाळी .. लक्ष्मीपूजन होत. ते झालं आणि गेल्या १०-१२ दिवसात अभ्यासामुळे प्रणव (चिरंजीव) कुठे बाहेर पडला नव्हता त्यामुळे दोघा मित्रांना दिवाळी शुभेच्छांसाठी भेटून १५-२० मिनिटात परत आला. सोशल डिस्टंसिंग कटाक्षाने पाळल होत.

दुसरे दिवशी रविवार .. माझ्या पुतणीचा पहिला दिवाळसण होता. मी व सौ शुभदा फडके हाॅल येथे जेवण्याच्या कार्यक्रम आटोपून घरी परत आलो. येथेही सोशल डिस्टंसिंगचे पालन केले होते. 

सोमवार पाडवा .. दिवाळीचा शेवटचा दिवस. सौ शुभदाला बारीक ताप आला, थंडी वाजत होती, अंगही दुखत होत. डाॅक्टरना फोन झाला औषध सुरु केलं. बुधवारी प्रणव त्याच मार्गावर होता. शंका मनात आलीच होती त्यामुळे सगळी काळजी घरातही घेणं सुरुच होत. 

दि २३ नोव्हेंबर, सोमवारी रीतसर क्लिनिकला भेट दिली. गेली २८-३० वर्षे एकच डाॅक्टर व एकच पॅथी होमिओपॅथी ! प्रणवला काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागल्या त्यात कोविडची करण्याचा सल्ला होता. दि. २४ नोव्हेंबर, मंगळवारी त्याचा निकाल कोविड पाॅझिटिव्ह आला. दिवसातून दोन वेळा आॅक्सिमीटर, थर्मामीटर व एकदा रक्तदाब यांची नोंद ठेवण सुरु झाल....

२४ नोव्हेंबर ला संध्याकाळी रिपोर्टिंगसाठी पुन: डाॅक्टरना फोन ... "आमच्या दोघांच्याही कोविड टेस्ट करुन घेऊ का ?"...  "गरज नाही .. तुम्हीपण पाॅझिटिव्ह असणार हे गृहित धरुन औषधे दिली आहेत...." इति डाॅक्टर ! घरात काही आयुर्वेदिक औषधे तीन महिन्यांपूर्वी जावइबुवा कोविड पाॅझिटिव्ह निघाल्यामुळे आणलेली होतीच. तीपण सुरु केली. चार पाच दिवसातच प्रणव व सौ शुभदाची ताप येणे, सर्दी, अंग दुखणे, स्टमक अपसेट वगैरे लक्षणे आटोक्यात आली. 

मला कोणताच त्रास नव्हता पण मी खबरदारी म्हणून बॅडमिंटन ८ दिवस बंद ठेवल होत व घरात किचन फ्रंट सांभाळत होतो.... आज ते दोघेही पूर्णतया ठणठणीत बरे आहेत. 

क्लिनिकली डिक्लेयर्ड पाॅझिटिव्ह असल्यामुळे चॅलेंज करण्याचा प्रश्नच नव्हता. १०-१२ दिवस घराबाहेरही न पडलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला कुठून ? अन्य प्रत्येक गोष्टीसाठी सतत बाहेर पडणारा मी टकाटक कसा ? 

(याचे संभाव्य कारण मला ठाऊक आहे ते म्हणजे गेली ११ वर्षे सातत्याने सुरु असलेली हर्बालाईफ ची सर्वोत्कृष्ट न्यूट्रीशन व व्यायाम यामुळे असलेली मजबूत इम्युनिटी)

मग निष्कर्ष काय काढावा ? चाचणी खोटी ? कि वैयक्तिक इम्यूनिटी प्राॅब्लेम ? कि हर्ड इम्युनिटी ? कि संसर्ग करणारा विषाणू कमकूवत झाला ? 

म्हणून मन म्हणतय कि गंमत आहे कोरोनाची ! पण काळजी घ्यायला हवीच .. लस येवो अगर न येवो ! उत्तम पौष्टिक आहार भरपूर व्यायाम याला पर्याय नाही कारण फिट असण्याबरोबरच हेल्दी असणेही महत्त्वाचे !

बिंदुमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmai.com

Sunday, October 18, 2020

इदं न मम

https://drive.google.com/file/d/1PFOHak_XVpwnZesU5jfYzOAi-Z4JJ1wG/view?usp=drivesdk

*इदं न मम !*

परमश्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या आरंभी माझा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर मनात असा विचार डोकावला कि एखादे विस्तृत लेखनही करावे. आजच्या पिढीने किंबहुना ज्यांनी पंतांना पाहिले नाही, ऐकले नाही त्यांना पंताचा व्यक्तिपरिचय, कार्यपरिचय व त्यांचे चिंतन याची झलक मिळावी हा त्या लेखनामागील मुख्य आशय असावा. आणि त्या चौकटीत राहून हे लिखाण करण्याचा अल्प प्रयत्न मी केला. श्रद्धेय पंतांवर इतकी पुस्तके, लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यात आणखी एकाची भर नको म्हणून मुद्दामच ही पुस्तिका इ-स्वरुपात ठेवली असून ती तशीच प्रकाशित केली आहे. वर दिलेल्या लिंकवर तसेच मोबाइलवरही ती सहज वाचता येईल असा विश्वास आहे. आपण ती अवश्य वाचावी व इतरांनाही पाठवावी. धन्यवाद ! 

*©बिंदुमाधव भुरे, पुणे.* 
*१४ ऑक्टोबर, २०२०*

Sunday, September 13, 2020

भावना आणि कर्तव्य

भावना आणि कर्तव्य

जवळ जवळ १८ तासांचा प्रवास संपवून अविनाश मुंबईत विमानतळावर उतरणार होता. लँडिंगची अनाउन्समेंट झाली तसा तो अधिरतेने खिडकीबाहेर पाहू लागला. धावणाऱ्या पांढऱ्या शुभ्र ढगांच्या आड खाली दिसणारी रांगोळीच्या ठिबक्यांसारखी छोटी छोटी घरे व हिरवी गार शेते मागे पडत होती तसा ठिबक्यांच्या दाटीत हिरवा गालिचा लुप्त होत चालला होता. ठिबके मोठे होत होते, बहुमजली ईमारती दिसू लागल्या होत्या. विमानाच्या पायऱ्या उतरुन मायभुमीवर त्याने पाऊल ठेवल तस एक क्षणभर जागेवर उभे रहात त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. "अपने मिट्टीकी खुशबू" कशाला म्हणतात ते आज तो अनुभवत होता. आजूबाजूचे व मागून येणारे प्रवासी बघत होते पण त्याला परवा नव्हती. त्याच्या चेहऱ्यावरील मंद स्मित खूप काही सांगून जात होत.

 

कधी एकदा घरी पोहोचतो असे त्याला झाले होते. बेल्टवरून आलेले लगेज त्याने उचलले आणि विमानतळाबाहेर आला. बुक केलेली कँब समोर आली तसे त्याने घाईने सामान डिकीत टाकले. आताआणखी तीन तासांनी घरी असेन या विचाराने तो सुखावला होता. या दोन वर्षांच्या काळात त्याचा आई वडिलांशी नियमित संपर्क होता. पण गेल्या दोन महिन्यात आईशी मात्र त्याच बोलण झाल नव्हत त्यामुळेच कधी एकदा घरी पोहोचतो अस त्याला झाल होत.

 

एका महत्वाच्या प्रोजेक्टवर कंपनीने त्याला दोन वर्षांपूर्वी युएसला पाठवले होते. प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास कंपनीला मोठी व्यावसायिक झेप घेण शक्य होणार होत आणि देशासाठीही ती अभिमानाची बाब ठरणार होती. त्यामुळे कोणाला पाठवायचे हा प्रश्न पुढे आला तेव्हा बोर्ड मिटिंगमधे अविनाशचेच नाव एकमुखाने पुढे आले होते. अविनाशनेही कंपनीचा विश्वास सार्थ ठरवला होता. तो भारतात पोहोचण्या आधीच अनेक नव्या ऑफर्सचे इमेल कंपनीला येणे सुरु झाल होत.

 

अविनाश लहानपणापासून हुषार होताच पण विशेष म्हणजे मोठे झाल्यावर काय व्हायच, काय करायच हे त्याने नववीत असतांनाच ठरवले होते. स्मार्ट फोनच्या आहारी गेलेल्या समवयस्क मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनीही त्याचा आदर्श ठेवावा, इतरांना सांगावा इतका तो परफेक्ट होता. सचिनच्या बँटमधून निघणारा स्ट्रेट ड्राइव्हचा नेत्रदीपक फटका जसा कॉपी बुक स्टाईल असतो, अमीरखान जसा मि. परफेक्शनिस्ट असतो तसच अविनाशच त्याच्या करियरबाबदच्या विचारांच होत. म्हणूनच संगणक तज्ञ अविनाश आज एका आघाडीच्या कंपनीत उच्च पदावर होता. 

 

युएसमधील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी त्याला गलेलठ्ठ पगार देतांना कायमचे नागरिकत्व मिळवून देण्याची तयारी दर्शवली होती. पण आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग या देशाच्या प्रगतीसाठीच करायचा हा त्याचा तात्विक, वैचारिक चौकटीतला द्रुढनिश्चय होता. आई वडिलांच्या उतारवयात जेव्हा त्यांना आधारासाठी आपली खरी गरज असते तेव्हा करियरचा मुखवटा पुढे करुन आपला स्वार्थ, प्रगती साधण्यासाठी त्यांना कधीही सोडून जायच नाही हा त्याचा असाच आणखी एक तात्विक ठाम निर्णय ! त्याच्या आई वडिलांना त्याच्या अशा विचारांचा, अशा निर्णयांचा अभिमान वाटत असला तरी "प्रसंगी एकटे राहू पण तू आवशक्यता असेल तेव्हा  आमची काळजी न करता तू नवनविन जबाबदाऱ्या स्वीकारणे टाळू नकोस" असे त्याला वेळोवेळी त्यांनी स्पष्ट केले होते. 

 

सलग तीन दिवस मिटींग वर मिटींग सुरु होत्या. युएस प्रोजेक्टची जबाबदारी अविनाशवर येणार हे पहिल्या दिवशीच जवळजवळ नक्की झाल होत. प्रोजेक्टचे डिटेल्स निश्चित करण्यासाठी अविनाशने मिटींग तीन दिवस लांबवली असे वरकरणी दिसत असले तर या तीन दिवसात अविनाश आई वडिलांना एकटे सोडून जाण्यासाठीची स्वतःच्या मनाची तयारी करत होता. आज निर्णयावर कंपनीने शिक्कामोर्तब केल होत. पासपोर्ट, व्हिसा व अन्य तयारीसाठी १५ दिवसांचा अवधी होता. घरी गेल्यावर जेवतांना आजच आई वडिलांच्या कानावर घालायला हव. आपल्या मनाला निर्णय घेतांना तीन दिवस किती त्रास झाला हे लक्षात घेता आई वडिलांना आज सांगितल म्हणजे १५ दिवसांनंतर निरोप देतांना त्यांच्या मनाची तयारी झालेली असेल. या विचारांनी त्याला क्षणभर गलबलून आले. 

 

जेवणाच्या टेबलवर तिघेही बसले होते. काय हव नको पाहून आई नंतर बसली. अविनाशचे जेवतांना आज असलेल अबोलपण लक्षात येण्यासारखे होते त्यामुळे ते दोघेही एकमेकांकडे पहात होते तर कशी व कुठून सुरवात करायची या विचारात अविनाश घास तोंडात टाकत होता. "आज ऑफिसमधे फार काम होत का रे ? थकलेला दिसतोस खूप आज !" बाबांनी शांततेचा भंग करुन कोंडी दूर केली. "गेल्या दोन दिवसांपासून बघते आहे मी. एक आठ दिवस रजा घेऊन विश्रांती घे जरा म्हणजे बर वाटेल" आईच्या ममतेने बाबांच्या बोलण्याची री पुढे ओढली. “आई, थोडी खिचडी वाढ अजून” अविनाश आपल्याच विचारात होता. गेल्या अनेक दिवसांपासून आईच्या तब्येतीची कुरबुर सुरु होती. अविनाश म्हणालाही होता कि “एकदा डॉक्टरांना दाखव, काही टेस्ट करायच्या असतील तर करून घे."  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टेस्ट झाल्या, रिपोर्ट आले होते. आज अविनाशच्या कानावर सगळ काही घालायचं हे दोघांनीही ठरविले होते. पण अविनाशच्या या स्थितीत एका नवीन चिंतेची भर जेवतांना टाकायचे धाडस दोघांनाही झाले नाही.

 

जेवणे आटोपून तिघेही हॉल मध्ये बसले असता अविनाश मनाचा निर्धार करून बोलता झाला. “बाबा, कंपनीचा एक खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे व तो मीच हँडल करावा असा कंपनीचा निर्णय झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याच्याच मिटींग्ज सुरु होत्या. मी हा प्रोजेक्ट दुसऱ्या कोणीतरी घ्यावा म्हणून खूप प्रयत्न केले. पण मनातून मलाही हे पूर्णपणे माहित होते कि माझ्याशिवाय हे दुसरे कोणी हँडल करू शकणार नाही.” इतक बोलून होताच अविनाशला निम्म मानसिक दडपण कमी झाल्यासारखे वाटून गेले. “अरे, मग चांगले आहे कि ! नवीन जबाबदाऱ्या, नवीन आव्हाने यांना सामोरे जायला तर तुला आवडतेच ना ? तुझ्या हुशारीचा ज्ञानाचा कंपनीला व देशाला उपयोग होतो आहे ही तर अभिमानाची गोष्ट आहे.” बाबा लहानपणी एखादी गोष्ट समजावून सांगतांना पाठीवरून मायेने हात फिरवायचे तसा आभास अविनाशला खूप वर्षांनी पुन: आज झाला. 


संभाषण सुरु होते आणि आई मूक श्रोता होती. “बाबा, तुम्ही म्हणता आहात ते अगदी बरोबर आहे, मला पटतेही आहे. पण, यासाठी मला यूएसला जावे लागणार आहे व तेही तब्बल दोन वर्षांकरिता !” या वाक्यानिशी आईचा चेहरा एकदम उतरला, डोळे पाणावले व ती एक टक अविनाशकडे पाहू लागली. “कालावधी वाढूही शकतो आणि तुम्हाला इतक्या मोठ्या कालावधीसाठी एकटे सोडून जाण्याचे धाडस अजून होत नाहीये माझ !” अविनाशचा आवाजतला कातर स्वर दोघांनाही जाणवला.

 

“कधी निघायचं आहे ?” आईने धीर एकवटून प्रश्न केला. “साधारण १५ दिवस ते तीन आठवडे आहेत अजून !” या अविनाशच्या उत्तरावर आई म्हणाली “काय काय तयारी करायची आहे सांग. मला जमेल तसे रोज थोडे थोडे करत जाईन. हल्ली मला खूप थकवा येतो रे ! ती असली असती तर मला काही बघायला लागले नसते आणि दुसरे लग्न कर म्हणणे आम्ही कधीच थांबवलंय.” नकळत आईच्या मनातली वेदना आज खूप दिवसांनी पुन: एकदा बाहेर पडली होती. जेमतेम दोन वर्षांचा लग्नाचा सहवास. काही चूक नसतांना एका ट्रकने अवनीला उडविले होते. तिच्या अपघाती मृत्यूचे दु:ख अविनाश विसरू शकत नव्हता. अवनीच्या दोन वर्षांच्या सहवासातील सुखद आठवणी त्याला पुसायच्या नव्हत्या. आपल्या विचारांवर व निर्णयांवर ठाम रहाण्याचा अविनाशचा स्वभाव आई वडिलांना माहित होता त्यामुळे त्यांनी काही दिवसांनी दुसऱ्या लग्नाचे टूमणे लावणे बंद केले होते.

 

निघण्याची तयारी सुरु होती. अविनाशने एक लँपटॉप आणला होता. त्याचा स्काईप कँमेरा वापरून एकमेकांशी कसे बोलायचे ते या १५ दिवसात दोघांनाही त्याने शिकवून ठेवले. युएसला गेल्यानंतर दर शुक्रवारी व सोमवारी एकमेकांशी बोलायचे असे त्यांनी एकमताने ठरवून टाकले होते. जाण्याचा दिवस उजाडला. अविनाशने दोघांनाही नमस्कार केला. आईने हातावर दही ठेवले व खालच्या आवाजात म्हणाली, “विमानतळावर येऊन काय करायच ? नाहीतरी आतपर्यंत येऊ देत नाहीत ! त्यापेक्षा इथेच तोंडभरून पाहू दे.” अविनाशने डाव्या हातानी आईला जवळ घेतले व म्हणाला “अग, असे काय करतेस, स्काईपवरुन आपण भेटणार आहोत, बोलणार आहोत आपण. फक्त तुझा मायेचा स्पर्श व तुझ्या हातचे जेवण मिस करणार बघ मी दोन वर्ष ! पण आल्यावर त्याची भरपाई करणार आहे बर का मी पुरेपूर !” चेहऱ्यावर उसने हास्य आणत अविनाश गाडीत बसला व गाडी दिसेनाशी होईपर्यंत आई बाबा हात हलवून निरोप देत होते.

 

कँब पुण्याकडे भरधाव वेगाने निघाली असतांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या कंपनीच्या निर्णयापासून ते घर सोडेपर्यंतच्या सगळ्या आठवणी अविनाशच्या बंद डोळ्यासमोर क्रमाक्रमाने येत होत्या. यूएसला गेल्यानंतर पहिला एक महिना स्काईपवर गप्पा मारतांना अडचणी आल्या पण नंतर मात्र आई बाबांना सराव झाल्याचे त्याने अनुभवले होते. मात्र गेल्या दीड महिन्यात स्काईपवर केवळ दोनच वेळा बोलणे झाले व तेही फक्त बाबा बोलले होते. एकदा आई दवाखान्यात गेली आहे म्हणाले तर दुसऱ्या वेळी म्हणाली कि ती झोपली आहे व हे बोलता बोलता काहीतरी बिघाड होऊन स्काईप बंद पडला होता. बहुतेक स्काईपला किंवा कॉम्प्युटरला काही प्रॉब्लेम आला असावा या समजुतीने अविनाशने थोडे दुर्लक्ष केले.  आणि दुसरे म्हणजे प्रोजेक्ट ठरल्यावेळेपेक्षा १५ दिवस आधेच पूर्ण होत होता. त्यामुळे आता प्रत्यक्षच भेटूनच सरप्राईज देऊ असा त्याने विचार केला.

 

साहेब, मॉलला थांबायच का ?” कँब ड्रायव्हरने विचारले तशी अविनाशची तंद्री भंग पावली. “नको अरे, डायरेक्ट जाऊ आपण. पण तुला चहाची तल्लफ असेल तर थांबूया रे बाबा. माझ्यासाठी तुझी तल्लफ नको मारूस !” अविनाश म्हणाला तसे ड्रायव्हर नुसताच हसला. कँब घराच्या दारासमोर उभी होती. अविनाशने सामान घेतले व दारावरची बेल दोनवेळा दाबली. मी जेव्हा जेव्हा बाहेरून येईन तेव्हा अशी दोन वेळा बेल वाजवत जाईन असे अविनाशने सांगितलेले होते. गेल्या दोन वर्षात मात्र आई बाबांची अशी डबल बेल ऐकायची सवय मोडली असणार आणि ही बेल ऐकून त्यांना मी आल्याचा भास होईल, दार उघडून मला प्रत्यक्ष बघतील तेव्हा .... “ नुसत्या कल्पनेने अविनाशच्या चेहऱ्यावर मंद स्मित आले.

 

बाबांनी दार उघडले आणि त्याला पाहताच “अविनाश” असे म्हणून त्याला मिठीच मारली. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत अविनाशने त्यांना नमस्कार केला. बँगा घेऊन तो आत आला तसा त्याने टेबलवर आईचा हार घातलेला फोटो पहिला आणि त्याच्या हातातून बँगा खाली गळून पडल्या. त्याने रडवेल्या आवाजात विचारले “बाबा, हे काय ? कधी झाल ?” “तीन आठवडे झाले अवि. जाईपर्यंत तुझी सारखी आठवण काढत होती. मी म्हटले तिला कि स्काईपवरून आपण बोलू त्याच्याशी, सगळे काही सांगू त्याला. पण नको म्हणायची ! त्याला कळले तर सगळे सोडून येईल तो. इतकी मोठी जबाबदारी आणि काम संपत आले असतांना कशाला थोडक्यासाठी त्याला डिस्टर्ब करताय. तिच्या या हट्टाला न जुमानता मी त्या दिवशी स्काईपवर तुला सगळे काही सांगणार होतो पण तिने काहीतरी बटणे दाबून स्काईप बंद करून टाकला व मला शपथ घातली. तेव्हापासून तो लँपटॉप बंद करुन ठेवलाय.”

बाबा सगळ काही सांगत होते अन अविनाश स्तब्ध होऊन ऐकत होता. “अविनाश, अरे ज्या दिवशी तु यूएसला जाण्याचा निर्णय आम्हाला सांगितलास ना त्याच दिवशी तिचे रिपोर्ट्स आले होते. जेवतांना तुला कसे सांगायचे याचा विचार करत आम्ही एकमेकांकडे पाहत होतो. तूच आम्हाला खूप टेन्शनमध्ये असल्यासारखा वाटत असल्यामुळे तिने ठरविले कि तुला दोन तीन दिवसानंतर सांगू. पण तुझे युएस चे जाणे तू सांगितल्यानंतर दुसरे दिवशी तिने मला बजावले कि माझ्या या आजाराविषयी अविनाशला एक अक्षरही कळता कामा नये. आपण त्याला अनेकदा सांगितले आहे ना कि प्रसंगी एकटे राहू पण तू आवशक्यता असेल तर आमची काळजी न करता नवनविन जबाबदाऱ्या स्वीकारणे टाळू नकोस म्हणून ! मग आता त्याच्या पायात खोडा नाही घालायचा आपण ! त्याला जाऊ दे, भरारी घेऊ दे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिचा निश्चय पक्का होता. तुझीच आई ती, प्रत्यक निर्णयावर ठाम राहणारी.”

 

कंपनीचे नाव व देशाची प्रतिष्ठा उंचावण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आज ऑफिसमध्ये अविनाशचा विशेष सत्कार होत होता. सत्कारानंतर बोलतांना अविनाशने या यशाचे सारे श्रेय आईला बहाल केले. तिच्या आजाराबद्दल कळले असते तर कदाचित हा प्रोजेक्ट अर्धवट सोडून मी परतलो असतो, कदाचित करार मोडल्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक दंड बसला असता, देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असता. पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ही तिची शिकवण ! कदाचित् माझ्याकडून या शिकवणीला तडा गेला असता म्हणून तिने मला काहीच कळू दिले नाही पण ती मात्र शेवटच्या श्वासापर्यंत ही शिकवण जगली. अविनाश बोलत होता, कंपनीचा सगळा स्टाफ भावूक होऊन हे सगळे ऐकत होता. पहिल्या रांगेत बसलेल्या बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान, आनंद याचे संमिश्र भाव होते अन डोळ्यात अश्रू !

 

 © बिंदुमाधव भुरे, पुणे  
२ नोव्हेंबर, २०१८
९४२३००७७६१/८६९८७५९९९०
bnbhure@rediffmail.com

Friday, June 26, 2020

खंडित वारीचे वारकरी











खंडित वारीचे वारकरी

 

दिवे घाट ... पुण्याहून पंढरपुरच्या दिशेने जाणारा माऊलींच्या पालखीचा मार्ग ! पुणे सासवड या सुमारे ३० किमी मधल्या टप्प्यात दिवेघाटाच्या चढाची सुरवात करण्यापूर्वी मस्त वाफाळलेल्या चहाचा कार्यक्रम पार पडतो. टाळमृदंगाच्या ठेका धरायला लावणाऱ्या व ग्यानबा तुकारामच्या जयघोषात आमचीही पाऊले चालू लागतात.  हजारो वारकऱ्यांचे जथ्थे तहान भूक विसरुन माऊलींच्या ओढीने नामगजरात तल्लीन होऊन चालत असतात.  घाटात ठराविक अंतरांवर असणाऱ्या विविध वाहिन्यांच्या ओबी व्हँन्सपाण्याचे टँकर्स व वैद्यकीय पथके ! उजव्या हाताला घाटडोंगर तर डाव्या बाजूला घाटातून दिसणारे भव्य विस्तारलेल पुणे. मान्सूनची कृपा असेल तर वातावरण प्रसन्न आल्हाददायक असणार. दूरवर डोंगरावर उतरलेले ढग जणू माऊलींच्या स्वागताला आले असावेत. चढण चढतांना थकलेल्या जीवाला पावसाचा एखादा शिडकावाथंडगार वाऱ्याची झुळूक पुनः प्रसन्न व ताजेतवान करुन जाते.

        

आज आम्ही सहा वारकरी जेव्हा दिवेघाटाकडे पाहत होतो तेव्हा माझ्या  मनातल्या झरोक्यातून आठवणीचा कवडसा हलकेच डोकावत होता व या सगळ्या आठवणी पुनः ताज्या करत होता. कोरोनाने यंदा वारी रद्द झाली होती. त्यामुळे वारीच्या मार्गावर आपला पदस्पर्श यावर्षी होऊ शकणार नाही ही भावना मन अस्वस्थ करत होती. वारीचा दिवस उलटून गेला तसतशी अस्वस्थता वाढत होती आणि whatsapp वर ती प्रकटही होत होती. आणि अचानक काही मोजक्या समुद्रियन वारकऱ्यांंच्या सोबतीने एक प्रातिनिधिक स्वरूपात वारी चालण्याचा योग जुळून आला.

 

दिवे घाटमाथ्यावर श्री विठ्ठलाच्या भव्य पाषाणमूर्तीचे दर्शन घेऊन परत यायचे असा कार्यक्रम ठरवून आम्ही सहा मंडळीनी दिवे घाटातील सुरुवातीची माऊलींच्या पालखीची स्वागत कमान ओलांडली. पालखीच्या दिवसात वाहनांसाठी बंद असलेल्या या रस्त्यावर अखंड वहातुक आज सुरु होती. एखाद उत्साही तरुण जोडपे निसर्गाच्या रम्य वातावरणात सेल्फी घेत होते तर कुठे तरुण मुलांचा घोळका ग्रुप फोटो घेण्यात मश्गुल होता. लाँकडाऊन मधून मिळालेली सूट किती आनंद देऊन जाते हे त्यांच्या चेहेर्यावरील ओसंडून वाहणारा आनंद सागत होता.

 

पाय घाट चढत होते पण त्याला दर वर्षी असणारी हजारो वारकर्यांची सोबत नव्हती, ना टाळ-मृदंग अन झांजांच्या साथीत भक्तीरसात भिजलेले अभंग ! त्यामुळे कि काय जेमतेम २-३ कि.मी. अंतर पार होत नाहीत तोच पाय बोलू लागल्याचा भास व्हावा ? घाटाच्या कठड्याआडून काही अनोखी झाडांची पाने डोकावत होती. सभोवताली असणाऱ्या हिरव्या गार पानाची सोबत असूनही काही पाने वाळून गेलेली दिसली. ती पाने म्हणजे वारी रद्द झाल्याची रुखरुख लागून गेलेला वारकरी असल्याची उपमा उगाचच मनाला स्पर्शून गेली.

 

या विचारात चालता चालता श्री विठुरायाच्या भव्य मूर्तीचे लांबूनच दर्शन झाले. ढगाळ वातावरण व काळ्या मेघांची दाटी दूर सारण्याचा प्रयत्न करणारी सूर्य किरणे यामुळे मूर्ती अस्पष्ट दिसत होती. वर जाऊन चरणस्पर्श करायची सगळ्यांचीच इच्छा होती पण उत्साह अमाप असला तरी पावसाळ्यामुळे निसरड्या झालेल्या वाटेने चढून वर जाऊ नये याची प्रत्येकाचे वय आठवण करून देत होते. एका खाजगी मालमता असलेल्या जागेतून रस्ता होता. आज विठूरायाची विशेष कृपा म्हणायची ! तिथल्या वाँचमनने आम्हाला आत येण्याची परवानगी दिली. त्या भव्य मूर्तीच्या पायावर आम्ही माथा टेकला आणि मन भरून पावले. एका निवांत ठिकाणी पोटपूजा आटोपून आम्ही परतीचा रस्ता धरला तो वारीत खंड न पडल्याचे मनात एक समाधान घेऊन !  

 

श्री बिंदुमाधव भुरे

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

bnbhure@rediffmail.com

 

Saturday, June 13, 2020

निमित्त नवीन PPO चे

निमित्त नवीन PPO चे 


काल परवा नवीन PPO ची उलट सुलट चर्चा आणि गमती वाचल्यावर मला २००९-१० च्या आसपास मी सेनापती बापट रोड शाखेत UT म्हणून कार्यरत असतांनाचा एक मजेशीर किस्सा आठवला ! तो सोमवार होता, Branch ला पोहोचून मी ९.४५ ला मस्टरवर सही करत होतो अन् Accountant श्री राममूर्ती माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले

 

"भूरेजी, कँशमे बैठनेसे पहले आप उपर साहबसे मिल लेना, आपको उन्होने याद किया है"

 

ती Branch दुमजली आहे. Chief Manager ची केबिन व Advances Dept वरच्या मजल्यावर होते. मी मस्टरवर सही करून लगेच वर गेलो. साहेबांनी समोर इमेलचा प्रिंट ठेवला. मी कागद हातात घेऊन वाचला. रिजनल ऑफिसने शनिवारी दुपारी २.३० वा मेल पाठवून सांगितले होते कि कोणत्याही परिस्थितीत (without any excuse असा शब्द होता) सोमवारी BCC Br ला जाऊन आपल्या रिजनची Gold Coins collect करायची. झोनमधील सगळ्या रिजन्सला जे दिवस वाटून दिले होते त्यात पुणे रिजनला सोमवार दिला होता.

 

मी वाचून झाल्यावर साहेबांकडे नजर टाकली.

 

साहेब - "भुरेजी, आपको जाना है इस कामके लिए"

 

मी - "ओके, नो प्रॉब्लेम ! सर, लेकीन मुझे कुछ अरेंजमेंट करनेकेलिए आधा घंटा चाहिए उसके बाद मै निकल जाऊंगा"

 

साहेब - " Take your own time. Security van will be arriving by 10.30"

 

बायकोला फोन केला व कल्पना दिली कि आज घरी यायला उशीर होईल. युनियनचे २-३ फोन करायचे होते ते केले आणि Security van ची वाट पहात केबिनमध्ये साहेबांसमोर बसलो होतो.

 

मी – “ सर, एक बात पुछू ? आपने मुझेही क्यो इस कामके लिये चुना ? आजकल कँशमे बहोत ज्यादा workload है. अगर UT नही रहा तो customer services बहोत ज्यादा affect होती है.माझा थेट customers शी रोज संबंध येत असल्यामुळे आपल काम सोडून दुसऱ्या कामासाठी तात्पुरते बाहेर जातांना आपल्या department च कस होईल ही काळजी डोक्यात असतेच ना ?

 

साहेब – “भुरेजी, यह एक जिम्मेदारीवाला काम है, इसमे Risk भी involve है. और आपसे बेहतर इसे कोई नही संभल सकता. दुसरी बात आपको काम सौपनेके बाद मुझे किसीभी बातकी चिंता नही रहती.वगैरे ... अपेक्षित उत्तर कानावर पडले.

 

Executive मंडळींच एक बर असत. जबाबदारीचे काम पार पाडायला काही चांगली मंडळी हाताखाली असली कि ते निर्धास्त होत असतात. युनियनच्या कामासाठी, meetings साठी अनेकद RO, ZO जाण होत असे. चहुकडे नजर टाकली कि हमखास याची प्रचिती यायची. 

 

इतक्यात Security van आल्याची Armed Guard ने सूचना दिली. मी माझी धोपटी उचलली व निघालो. साहेबही माझ्याबरोबर Security van पर्यंत सोडायला आले. Gold Coin ही मोठी जोखीम होती त्यामुळे मी Security van check केली. लक्षात आल कि van च्या आत असलेल greel door चे lock defective होते, म्हणजे ते operate होतच नव्हते.

 

साहेब शेजारीच उभे होते त्यामुळे मी त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणून देत म्हटले कि

 

सर, यह Security van ही insecured है. हमे इसे बदलना पडेगा और दुसरी Security van बुलानी होगी.

 

साहेबांनी त्वरित रिजनल ओफिसला फोन लावला व security officer शी बोलणे करून दुसरी van  arrange करण्याबाबद सांगितले. Van जाणार, दुसरी येणार आणि traffic यात किती वेळ जाईल याचा विचार केला. साहेबांना म्हटले कि

 

"सर, मै इस van के साथही निकलता हू. दुसरी van मिलनेपर वहीसे सीधा मुंबईकेलिए निकल पडेंगे. फिरसे branch मे आनेका समय बचेगा और हम BCC समयपर पहुचेंगे."

 

साहेबांनी मंद स्मित करत मान डोलावली. हे असले निर्णय न सांगता घेण्याच्या माझ्या सवयीला दिलेली दाद त्या मंद स्मितात दडलेली असावी. 

 

स्टेट बँक कँप शाखा व ट्रेझरी ऑफिस या मधील भागात असलेल्या मोकळ्या प्रांगणात अनेक vans उभ्या होत्या.  गाडीचा driver armed guard १० मिनिटात आले व म्हणाले "साहेब, van मिळाली आहे, चेक करुन घ्या" Van एकदम चकाचक होती. आम्ही थेट मुंबईच्या दिशेने निघाल्याचे साहेबांना मोबाईलवर कळवले.

 

साधारण २.३० वाजता आम्ही BCC branch ला पोहोचलो. Branch मधे चौकशी करुन संबंधित Sr Manager च्या टेबलला पोहोचलो. त्यांचा lunch time झाला होता. जुने दिवस आठवले .. आपला नंबर यावा आणि खिडकीच्या आतून "तिकीट संपली"चा आवाज आणि पाठोपाठ हाऊसफुल्ल असा बोर्ड पुढे येत खिडकी बंद ! चिडून तरी काय करणार त्यामुळे मनातल्या मनात हसू आले. 

 

भूक लागली होती. साहेब येईपर्यंत पटकन् डबा खाऊन घ्यावा का ? असा मनात आलेला विचार झटकला. साहेब आल्या आल्या आपला नंबर लागावा म्हणून बसून रहायच ठरवल. दरम्यान reached BCC असा text message आमच्या साहेबांना केला. फार तिष्ठत नाही बसावे लागले. 

 

ते Sr Manager आले आणि खुर्चीत बसत त्यांनी माझ्याकडे पाहिल. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकल्याने मलाही बर वाटल. माझ्या branch ने मला दिलेल deputation चे लेटर त्यांच्यापुढे सरकवत मी माझी ओळख करुन दिली. 

 

"क्या लोगे, चाय ? कॉफी ?" असा प्रश्न माझे पत्र वाचता वाचता त्यांनी विचारला. मी हसत म्हटले "सर, चाय कॉफी मै कुछ नही लेता हू बस gold लेने आया हू वोही दे दो!" विनोद केल्याच्या थाटात मी हसलो.

 

साहेब - " अरे यार, किस पागलने बोला आपको gold coin आया है ? " या वाक्याच्या झटक्याने माझा विनोद क्षणभंगूर ठरला होता. मी त्यांना म्हणालो “सर, Chief Manager साहबने letter देकर भेजा है. और मेरी branch को RO से mail आया है.” असे म्हणत मी त्या mail ची झेरोक्स त्यांच्यासमोर ठेवली. त्यांनी ती mail वाचली. आणि थोडे ओशाळल्यासारखे हसले. या हसण्यात त्यांनी पागल शब्द वापरून केलेला प्रश्न त्यांना आठवला असावा असे मला उगाच वाटून गेले.

 

“Mr Bhure, we will inform you once we receive it. हमेही नही मिला तो हम कहासे देंगे ?” त्यानी असे म्हणताच मी उठलो व मला branch ने दिलेल्या deputation च्या पत्रावरच त्यानी remark लिहावा व सही शिका द्यावा अशी मी त्यांना विनंती केली. हो, उगाच उद्या कोणी म्हणायला नको कि तुम्ही BCC ला गेलाच नव्हता. मी केलेल्या विनंतीचा रोख त्यांच्या लक्षात आला असावा.

 

MR Bhure reported this branch @2.30 pm. At present no gold coins are in stock. We will inform you as & when we receive it”

 

खाली सही व branch चा stamp होता. त्यांना मी वेळही टाकण्याचे विनंती केली. पत्र खिशात ठेवले व मी बाहेर पडलो. Security van च्या दिशेने चालत असतांना फोनवर आमच्या साहेबांच्या कानावर सगळ्या घटना घातल्या. Security van मध्ये बसून डबा खाल्ला व परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळी ७.३० ला branch च्या दारात पोहोचलो. साहेब वाट बघत होते. त्यांना मग त्या Sr Manager ने विचारलेला प्रश्नाची गंमत सांगितली. त्यावर हसून ते म्हणाले

 

“यार, या तो मै पागल हु या RO ! हमनेही आपको भेजा था. घरी आल्यावर बायकोने विचारले “काय काय झाल ?” मी हसून सगळा किस्सा कथन केला व म्हणालो “आज डबा खायला मुंबईला गेलो होतो, तेही बँकेच्या खर्चाने !”

 

HO म्हणते PPO पाठवले आहेत, branches मधून collect करा. branches म्हणतात RO ला विचारा आणि RO म्हणते आमच्याकडेच अजून आले नाहीत. या खो खो वरून जुना किस्सा ठवला तो share केला.

 

बिंदुमाधव भुरे

bnbhure@rediffmail.com

8698749990/9423007761

 

Sunday, June 7, 2020

खरे सोने

खरे सोने !

 

लहानपणी लाकूडतोड्याची ऐकलेली गोष्ट आठवत असेल. बबलू रोज जंगलात जायचा, लाकूड तोडून त्याच्या विक्रीतून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवायचा ! गरीबीत जगणारा बबलू अतिशय स्वाभिमानी व हुशार होता. एकदात जंगलातून परत येताना एका विहिरीजवळ तो पाणी पिण्यासाठी थांबला असता त्याची कुऱ्हाड चुकून विहीरीत पडते. बिचारा रडकुंडीला येतो कारण या कुऱ्हाडीवरच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ अवलंबून होता. आता सगळ्यांना उपाशी राहावे लागणार या काळजीने तो दु:खी होतो. 

 

 

तो परमेश्वराची मनोमन प्रार्थना करतो. त्याची आर्त हाक ऐकून विहिरीतून देवी प्रकट होते व बबलूला प्रश्न करते कि बाबा रे का रडतो आहेस ? काय हवय तुला ? पाणी पिताना कुऱ्हाड चुकून विहिरीत कशी पडली याची कहाणी सांगत तो देवीला प्रार्थना करतो कि या कुऱ्हाडीवरच माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे तेव्हा मला माझी कुऱ्हाड परत आणून दे बाकी मला काही नको. 

 

 

देवीला वाटले कि या लाकूडतोड्याची परीक्षा घ्यावी. ती विहिरीतून एक सोन्याची कुऱ्हाड काढते व लाकूडतोड्याला देते. ती सोन्यानी चमकणारी कुऱ्हाड पाहिल्यावर देवीला वाटते कि लाकूडतोड्या खुश होईल, त्याला मोह होईल कि आता आयुष्यभर कष्ट करायची गरज नाही. परंतु, बबलूने हात जोडून देवीला सांगितले कि ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड काढून देते पण बबलू ती कुऱ्हाडही स्वीकारण्यास नकार देतो. 

 

 

मग त्याची खरी लोखंडी कुऱ्हाड काढून देवी त्याला दाखवते व विचारते कि ही तरी आहे का ? आपली हरवलेली कुऱ्हाड पाहून बबलूला परमानंद होतो व त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ती कुऱ्हाड स्वीकारत तो देवीला नमस्कार करतो.  देवी त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होत त्याला लोखंडी कुऱ्हाडी बरोबरच त्या दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस देते. जीवनात मेहनत करत राहिलास तर तुझी उन्नती होईल पण ज्या दिवशी या सोन्याचांदीचा मोह तुला होईल तुझ्या अधोगतीस सुरवात होईल असे बोलून देवी अंतर्धान पावली.

 

आता नंतर काय होत ?

 

बबलू घरी परत येतो व सोन्या चांदीच्या कुऱ्हाडीना एका पेटीत बंदिस्त करून ठेऊन देतो. गावात ही बातमी सगळ्यांना कळाली तशी त्याची किर्ती चहुकडे पसरु लागली. परमेश्वरावर श्रद्धा असलेला, प्रामाणिक, कष्टाळू व सच्च्या मनाचा हा लाकूडतोड्या वेळप्रसंगी मग पदरमोड करुन अडल्या नडलेल्यांना मदतीचा हात देऊ लागला. लोखंडी कुऱ्हाड ही मेहनतीचे प्रतीक होती. ती त्याच्या जवळ सदैव असल्यामुळे त्याला काही कमी पडत नसे. हळूहळू त्याच्याकडे येणाऱ्या मंडळींचा ओघ वाढू लागला. अंत्या, मन्या, दिव्या, नारू वगैरे त्याचा जिवलग मित्रपरिवार होता. त्याच्या माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे ही जिवलग मित्रमंडळी त्याच्या सांगण्या बरहुकूम समाजकार्यात सहभागी होऊ लागली. समाजामध्ये त्याच्या नावाला वलय प्राप्त होऊ लागले, गरीबांच्या हृदयातला तो ताईत बनला आणि समाजसेवक म्हणून नवी ओळख त्याला मिळाली.

 

त्याची वाढती लोकप्रियता पाहून शंकऱ्या, सुश्या, वश्या, शर्या, अंत्या वगैरे अनेक   राजकारणी मंडळी सावध झाली. बबलूच्या विरोधामध्ये कट-कारवाया, कारस्थाने करून तो बदनाम कसा होईल हे पाहू लागली. परंतु, आपल्या जिवलग सवंगड्यांच्या मदतीने या विरोधी कारवायांचा मुकाबला बबलू सहजपणे करू लागला. समाजकार्य करत असतांना अनेक क्षण मोहाचे आले तरी बबलूने चांदीच्या, सोन्याच्या कुऱ्हाडीला कधी स्पर्श केला नाही. त्याच्यासाठी ती मोहाची प्रतीके होती अर्थात लोखंडी कुऱ्हाडीवरील आपली पकडही त्याने कधीच सैल होऊ दिली नाही.

 

 

समाजसेवेतून सुरु झालेला हा प्रवास आता बबलूला राजकारणाकडे खुणाऊ लागला. अधिक चांगल्या प्रकारे समाजकार्य करायचे तर हातात काही निर्णय घेण्याचे अधिकार हवे, अन अधिकार हवे असतील तर सत्ता हवी ! या विचाराने त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने राजकारणात प्रवेश केला. जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्याचे समाजकार्य अधिक जोमाने  सुरु झाले. त्याच्या कार्याला आदर्श मानणारी मंडळी प्रत्येक गावात तयार होत होती, तसे फलक ठिकठिकाणी झळकू लागले होते. २०% राजकारणाच्या बळावर केलेले ८०% राजकारणाचे हे सूत्र जनतेला भावले होते. 

 

यशाची चढत्या कमानीसोबत विरोधकही आक्रमक होत होते. बलाढ्य शत्रूला थोपवायच होत, मात्र त्याला मात द्यायला आता स्वबळ कमी पडू लागल. मग शत्रूचा शत्रू तो मित्र नात्याने अन्य समविचारी मंडळी सपोर्टला पुढे आली. प्रम्या, गोप्या, नाथा वगैरे अनेक मंडळी हे त्याचे जुने मित्र होते. त्यांच्या साथीने लढा यशस्वी झाला, खुर्ची मिळाली. सत्ता आली तसा समाजकारण मधील काही प्रसंगी पुसट होऊ लागला होता. सत्तेबरोबर अहंकार, गुर्मी डोकावू लागली. सत्तेच्या राजकारणाची लागण घरातही झाली आणि सत्तासोपानाची स्पर्धा सुरु झाली. परिणाम व्हायचा तोच झाला, सत्ता गेली, खुर्ची गेली. 

 

 

अनेक वर्षे उलटली, बबलू आता थकला होता. आपल्या मुलगा उदय याने हे समाजकारण पुढे न्याव अस त्याला मनोमन वाटत होत. मुलाची इच्छा काहीही असली तरी लाकुडतोड्यावर जनमानसात असलेला एक प्रचंड विश्वास व राजकारणात त्याने बसवलेली घडी यांच्या रेट्यामुळे उदयला ही गादी पुढे चालवण भाग पडल. पण लोखंडी कुऱ्हाडीने करावी लागणारी मेहनत व कष्ट यासाठी त्याची मनापासून तयारी होती का ?

 

 

काळ बदलला होता, कार्यकर्ते बदलले होते, अन् त्यांचे विचारही !  कष्ट करायचे पण कंफरटेबली करायचे अन् कंफर्ट हवा म्हणजे साधने हवीत आणि साधन म्हणजे नगद नारायण ! अल्पावधीतच उदयला चांदीची कुऱ्हाड खुणावू लागली. त्याच्या मते ८०% समाजकारण म्हणजे लष्करच्या भाकऱ्या ! त्याच्या जोरावर २०% राजकारण करणे परवडणारे नव्हते. मग राजकारण व समाजकारण यांचे प्रमाण बदलले, फिफ्टी फिफ्टी झाले. लोखंडी कुऱ्हाडीचा वापर कमी झाला अन् चांदीची कुऱ्हाड आता चमकू लागली.

 

 

एकदा सत्तेची चटक लागली कि ती नशा उतरल्याचे उदाहरण अपवादानेच दिसते. सत्तेत वाटा प्रत्येकाला हवासा वाटत असतो. समाजकार्य सत्तेविना करता येत या वडिलांच्या कर्तृत्वाचा त्याला विसर पडला असला तरी त्यांच्या नावाचा आणि त्यांच्या वलयाचा वापर तो धूर्तपणे करून घेत होता. आता लोखंडी कुऱ्हाड अडगळीत पडली होती. मनात विचार आला कि चांदीच्या कुऱ्हाडीने किती दिवस राजकारण करणार सोन्याची चमक काही वेगळीच. आणि ती संधी अखेर मिळाली. शत्रूला थोपविण्यासाठी म्हणून ज्यांचा सपोर्ट घेतला त्या मित्रांना अंधारात ठेवत त्याने सत्तेसाठी थेट शत्रूशी संधान बांधले. कावेबाज शत्रूही मित्र बनायला तयार झाला कारण सत्ता सगळी गणिते उलटवून टाकत असते.  

 

 

सोन्याची कुऱ्हाड त्याला मिळाली पण आपल्या वडिलांना ज्या लोखंडी कुऱ्हाडीने नावलौकिक दिला, समाजात मान दिला, पत दिली, समाजकार्य करतांना अनेक जिवाभावाचे मित्र दिले दुर्दैवाने त्याच कुऱ्हाडीचा विसर त्याला पडला. आज त्याला सत्ता मिळाली पण कमावलेली प्रतिष्ठा आणि समाजातील स्थान याला धक्का लागला होता. देवीने परीक्षा बघण्यासाठी म्हणून वडिलांना दिलेली सोन्याची कुऱ्हाड ही मोहापासून चार हात दूर रहाण्याचे प्रतीक होती हेच तो विसरला. सोन्याच्या कुऱ्हाडीने मेहनत करता येत नाही तर ती विलास आणि भोगवादाला आकर्षित करते व परिणामी लोखंडी कुऱ्हाडीवरील पकड सैल होत जाते. २०% राजकारणाचा वाढत गेलेल्या या टक्क्याने ८०% समाजकारण संपवून टाकले होते, त्याच्या सत्तेचा पाया डळमळीत झाला होता.

 

उद्या सोन्याची चमक जाईल, सत्तेच्या खुर्चीवर दावा करायला कावेबाज धूर्त मित्र पुढे येतील. तेव्हा लोखंडी कुऱ्हाडीचे वैभव हेच खरे सोने आहे हे कळेल पण तोपर्यंत उशीर झालेला असेल का ? याचे उत्तर काळाच्या पोटात दडलेले आहे हे मात्र खरे.

 

बिंदुमाधव भुरे, पुणे

९४२३००७७६१ / ८६९८७४९९९०

bnbhure@rediffmail.com

 

 


Tuesday, May 5, 2020

आंतरराज्य प्रवास व दारुविक्री निर्णय


आंतरराज्य प्रवास व दारुविक्री निर्णय

दारुविक्री खुली करण्याच्या निर्णयावरुन सोशल मिडीयावर सध्या धमाल सुरु आहे. दुकानांसमोर लागणाऱ्या रांगा हे त्या समुहाच्या अस्वस्थ व बेचैन मानसिकतचे निर्देशक आहे. परराज्यातील कामगारांना पाठविण्याच्या निर्णयामुळे अशाच प्रकारची अनियंत्रित गर्दी वैद्यकीय प्रमाणपत्र व प्रवासाकरिता लागणारी परवानगी मिळवण्यासाठी उसळते आहे. या गर्दीकडे पाहिल्यास या समुहाचा असुरक्षिततेच्या भावनेतून नैराश्याकडे सुरु असलेला प्रवास लक्षात येतो. 

आर्थिक दृष्टाकोन व सरकारी महसूल याचा विचार करता आंतरराज्य वाहतूकीतून सरकारला महसूल न मिळता आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. अशा वाहतूकीच्या निर्णयामुळे कोरोना मात्र सगळीकडे पसरण्याचा मोठा धोका आहे. (जर आगामी २-३ आठवड्यात या कोरोनाने अक्राळविक्राळ रुप धारण केल तर ते या निर्णयामुळेच असा आरोप करत त्याच खापर मोदींच्या माथी मारायला किती जण दबा धरुन बसले असतील ?)

दारुविक्रीकडे मात्र केवळ महसूल या नजरेतुन पाहून टीका केली जात आहे. अर्थात, त्याची निकड अमान्य करण्याचा प्रश्न नाही.  (तो पेट्रोल विक्री खुली केली तरी मिळणार आहे) दारु ही सवय नसून ज्यांचे व्यसन आहे अशा मंडळींचा असंतोष सामूहिक रौद्ररुप धारण करु शकतो हे लक्षात घ्यावे लागेल. हिंसक जमावाला आवरायला पोलिसबळ अपुरे पडते हे दृष्य आपण पाहिले आहे. व्यसनमुक्ती केंद्रात ही मंडळी बंदिस्त नसून लॉकडाऊनमुळे बंदिस्त आहेत व त्यामुळे अशा समुहाला कायद्याने किती काळ नियंत्रित ठेवता येईल ? मेल कोंबड आगीला भित नाही याची प्रचिती घेणे म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखे आहे !

त्यामुळे रोग नियंत्रण व त्याचे समूळ उच्चाटन याला लागणारा दीर्घ वा अनिश्चित कालावधी ध्यानात घेता, रोग प्रसरणाची कमीतकमी किंमत मोजण्याची तयारी ठेवत व सामाजिक मानस-संतुलन टिकवण्यासाठी आंतरराज्य प्रवास व दारु विक्री या दोन निर्णयांकडे पहावे लागेल. 

पंतप्रधान सातत्याने विविध यंत्रणांशी व मुख्यमंत्र्यांशी संपर्कात असतात. त्यांना मिळालेल्या सूचना, सल्ले या आधारावर हा निर्णय सहमतीने झाला असावा असे वाटते. 

जी मंडळी "या" गटात नाहीत त्यांचा या प्रकाराला तीव्र विरोध असणे स्वाभाविक आहे पण परिणामांची चिंता न करता पुण्यात व अन्य शहरातही भाजी खरेदीसाठी उसळणारी गर्दी पाहता तळीराम शिस्तबद्ध आहेत का ? असा गंमतीशीर प्रश्न मनात डोकावतो. 

वरील मत माझे वैयक्तिक आहे. विविध माध्यमे, सोशल मिडीयावर यावर येणाऱ्या व दिसणाऱ्या बातम्या या आधारावर ते बनले आहे. 

टीप :  मी अन्य राज्यातला येथे अडकलेला व्यक्ती नाही व दारुला मी कधी स्पर्शही केलेला नाही.
😀😀

श्री बिंदुमाधव भुरे
९४२३००७७६१
८७९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

Saturday, April 11, 2020


उप्पीट / उपमा / सांजा 

 साहित्य : 
१।। वाटी जाड रवा, १ कांदा, १ टोमँटो, २ मिरच्या, कोथिंबीर, २ चमचे (२५ मिलि) शेंगदाणा/करडई तेल, मीठ,५ वाट्या पाणी

कृती : 
१. गँसवर एकीकडे बारीक गँसवर कढईत रवा टाकून मंद आचेवर ठेवावा व दुसऱ्या बाजूला ५वाट्या पाणी मंद आचेवर ठेवावे. 
२. दरम्यान कांदा, टोमँटो, कोथिंबीर हे बारीक चिरुन घ्यावे. चिरतांना अधूमधून रवा उलत्न्याने हलवत रहावे. ३. पांढरा स्वच्छ रवा किंचित तांबूस होईपर्यंत भाजावा. नंतर तो एका ताटलीत काढून ठेवावा. 
४. याच कढईत २५ मिलि तेल टाकावे. गँसची आच मध्यम ठेवावी व त्यात दोन बोटांच्या चिमटीत बसेल इतकी मोहरी २ वेळा टाकावी. मोहरी तडतडल्याचा आवाज येताच गँस पुनः मंद ठेवावा. त्यात मग मिरचीचे तुकडे टाकावे, त्यापाठोपाठ चिरलेला कांदा ! हे छान परतावे कांदा किंचित तांबूस झाला कि टोमँटो टाकावा. हे मिश्रण एक मिनिटभर हलवावे. 
५. बाजूला ठेवलेले ५ वाट्या पाणी एव्हाना उकळले असेल. त्यापैकी ४।। वाट्या पाणी आता कढईत ओतावे. ओततांना कढईच्या जवळ पाण्याचे भांडे न्यावे म्हणजे गरम पाणी अंगावर उडणार नाही. 
६. आता गँस मोठा करावा, आपण टाकलेले पाणी गरम असल्यामुळे ते लगेच ऊकळायला लागेल. पाणी उकळायला लागले कि आच पुनः मंद करावी. 
७. आता त्यात मीठ टाकायचे आहे. आपण सूप प्यायला वापरतो तो निम्मा चमचा मीठ त्या पाण्यात टाकावे व दोन चिमूट (मोहरी सारखी) साखर टाकावी. हे पाणी चांगले हलवावे म्हणजे मीठ, साखर विरघळेल. 
८. मीठ योग्य प्रमाणात पडलय ना याची खात्री करण्यासाठी एका छोट्या चमच्यात कढ ईतले ते पाणी घ्यावे. ते कोमट होईपर्यंत हळूवार फुंकावे व पिऊन पहावे.
९. प्रमाण योग्य आहे याची खात्री झाली कि मग भाजलेला रवा हळू हळू पाण्यात सोडावा. गँसची आच मंद आहे याची खात्री करावी अन्यथा अंगावर थेंब उडून भाजण्याची शक्यता !
१०. या पाण्यात रवा मिसळून त्याला घट्टपणा येईपर्यंत हालवत रहावे. घट्टसर झाला कि त्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ येऊ द्यावी. 
११. एक मिनिटानंतर पुनः एकदा चांगले हलवून उपमा कढईत वर खाली करावा. आवश्यक वाटल्यास ५ वाट्यांपैकी उरलेले पाणी उपम्याच्या भोवतीने सोडावे. उपमा परत एकदा हलवून त्यावर पुनः वाफ येण्याकरता एक मिनिट झाकण ठेवावे.
१२. एक मिनिटानंतर झाकण काढावे. उपमा एकदा हलवून बाऊलमधे सर्व्ह करावा. त्यावर आवडत असल्यास लिंबू पिळावा, थोडी बारीक शेव व कोथिंबीर टाकावी. 

बायकोला न विचारता, कोणाचीही मदत न घेता ही कृती समोर ठेऊन तुम्ही केलेला ऊपमा ... ही बायकोसाठी जगातील सर्वोत्कृष्ठ डिश असेल.  Just try & share the photos with your experience.  

बिंदुमाधव भुरे.

Saturday, April 4, 2020

नऊ मिनिटाचे आवाहन

 *नऊ मिनिटाचे आवाहन !*

बलाढ्य, कावेबाज, छुपा हल्ला करण्यात तरबेज अशा शत्रूशी दोन हात करतांना गनिमी काव्याचा वापर यशस्वी ठरल्याचे इतिहास सांगतो. गनिमी काव्याच्या वापरात शत्रू आपल्याला पाहू शकत नव्हता मात्र आपण शत्रूला पाहू शकत होतो. सावज टप्प्यात येइपर्यंत दबा धरुन बसण्यात शहाणपणा असायचा. युद्ध जिंकण्यासाठी गनिमी कावा हा युद्धतंत्राचा एक भाग होता. 

एकीकडे साधनसामग्रीची कमतरता पण स्वराज्यासाठी सर्वकाही अर्पण करण्याची प्रबळ भावना तर समोर विपुल शस्त्रसज्जता व सैन्याची प्रचंड मोठी संख्या ! मात्र केवळ "जय भवानी जय शिवाजी", "हर हर महादेव" यांचा उदघोष मनामनात चैतन्य जागृत करायचा, स्वराज्यप्रेमाचे स्फुलिंग प्रज्वलित करायचा, सर्वस्व विसरुन एकजूट निर्माण करायचा ! मावळ्याच्या अंगी या नुसत्या घोषणेने बारा हत्तींचे बळ संचारायच. स्वराज्याप्रती समर्पण भावना जागवली जायची आणि मुबलक शस्त्रसज्जता असलेल्या अफाट संख्येच्या शत्रूला मावळे पराजित करायचे. 

समर्पण भाव, स्वराज्याप्रती त्यागभावना, निष्ठा यांना एका माळेत गुंफले जायचे ! एकजूटीच्या संकल्पासाठी हर महादेवची घोषणा हे एक निमित्त, यामुळे माळेची गुंफण अधिक भक्कम व्हायची ! आज आपल्या पुढ्यात उभे ठाकलेल युद्ध मोठ विचित्र आहे. शत्रूचा गनिमी कावा सुरु आहे. आपण त्याला पाहू शकत नाही मात्र तो आपल्याला पाहू शकतो. तो स्वैर आहे, मोकाट आहे, सध्या त्याच्यावर कोणतेही अस्त्र-शस्त्र परिणाम करु शकत नाही. 

त्याच्याशी रणांगणावर दोन हात करायचे असते तर आपण सगळे जय भवानी, हर हर महादेव घोषणेने युद्धभुमिवर एकवटलो असतो. पण आज आपल्याला गनिमी काव्याचा वेगळाच डाव रचायचा आहे. शत्रूला पळू दे मोकाट ! आम्ही आमच्या चार भिंतीच्या खंदकात दडून राहू. दमछाक होईल आणि तो निघून जाईल ! त्याला चुकवण्यासाठी आम्ही आमच्या घरात किती काळ दडून बसतो ? आजच्या गनिमी काव्याची खरी मेख यातच आहे. This is battle of patience. इथे वेगळ सैन्य नाही आपण सारेच सैनिक ! अशा युद्धाची आपल्याला ना सवय ना सराव ! 

अशा एका निशस्त्र युद्धाच्या चाचपडवणाऱ्या अंधारात एक आश्वासक किरण प्रज्वलित करायचा आहे ! आज युद्धभुमिवर एकीचे बळ देणाऱ्या घोषणेची नव्हे तर घराघरात एकटेपण सोसणाऱ्या समाजमनाला एकत्र बांधणाऱ्या एका सामुहिक कृतीची गरज आहे. त्याकरिता जनसामान्यांच्या आंतरिक शक्तीला, तेजाला साद घालायची ती घराघरात दीप प्रज्वलित करुन ! आपल्याच घरात कोंडलेल्या, एकटेपणाने ग्रासलेल्या आपल्या बांधवांना या संकटाला धैर्याने आणि एकजूटीने सामोरे जाण्याचा दृढसंकल्प पुनः एकदा अधोरेखित करायचा आहे ! या एकजूटीची साद घालण्यासाठी "आज रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे अन् नऊ दिवे" हे माध्यम म्हणजे केवळ एक निमित्त ! 

© बिंदुमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१
८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

Wednesday, March 25, 2020

शिवरंजनीच्या निमित्ताने

चॅनल सर्फिंग करता करता झी क्लासिकवर येऊन थबकलो, "मेरा नाम जोकर" नुकताच सुरु झाला होता. रिलिज  झाला तेव्हा अपेक्षेइतका चालला नाही, किंबहुना पिक्चर तेव्हा तिकिटबारीवर साॅलिड आपटला होता अस म्हटल तरी चालेल. राजकपूरचा हा खुप महत्वाकांक्षी चित्रपट होता कारण त्याच्या रियल लाईफवर आधारित होता अस म्हणतात. त्यासुमाराला लता बरोबर बिनसलेल होत त्यामुळे या पिक्चरमधे एकही गाणी लताच्या आवाजात नव्हत असही तेव्हा कानावर आल होत. समोर पिक्चरच टायटल सुरु होत आणि मनात क्षणिक आलेले हे सगळे विचार काही सेकंदात जुन्या आठवणींमधे घेऊन गेले त्यामुळे खुप वर्षांनंतर पुनः एकदा हा पिक्चर पहायचा मूड आपोआप बनून गेला. 

या पिक्चरच्या सर्व गाण्यांवर तर फिदा पहिल्यापासुन होतोच. "ए भाय जरा देखके चलो" त्याकाळी खुप गाजल होत तरी माझ्या आवडीची खास म्हणजे आशाच "मोहे अंग लग जा बालमा", आशा व मुकेशच "आग ना लग जाए" आणि मुकेशच "जाने कहा गए वो दिन" ! पिक्चर त्याकाळात का पडला समजल नाही, पण म्हणे इतका पडला कि राजकपूर यापायी प्रचंड कर्जबाजारी झाला. 

राजचा बोलका चेहेरा, निळे डोळे यातून त्याच निरागस आणि "बिच्चारा" अस व्यक्तिमत्व  छान ऊभ रहायच. अगदी आवारा, श्री ४२०, जागते रहो, संगम, अनाड़ी असा कोणताही पिक्चर घ्या, एखादा सिन हा पठ्ठ्या असा देणार कि हमखास डोळ्यातून पाणी यायच. 

त्यामुळे कि काय माहीती नाही पण राजकपूर म्हटल कि मनाच्या कोपऱ्यात एक भोळाभाबडा, निष्पाप अशी विशिष्ट छबी कायम वसलेली असते. व त्यातून या पिक्चरमधे तिन्ही नायिका त्याचा शिडीसारखा वापर करतात अन् राजच त्यांच्यावरील प्रेम हे एकतर्फी होत हे त्याला कळत. 

या बॅगराऊंडवर जेव्हा शंकर जयकिशनने बांधलेली सुरवातीची अप्रतिम व आर्त सुरावट सुरु होते व मुकेशच्या धीरगंभीर अनुनासिक आवाजात "जाने कहा गए वो दिन" चे स्वर येतात, तेव्हा डोळ्यातले अश्रु दिसू नयेत म्हणुन काळा गाॅगल लाऊनही राजचे भरुन आलेले डोळे आपल्याला जाणवतात व नकळत आपणही डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा तेव्हा पुसतो. पिक्चर जेव्हां पहिल्यांदा पाहिला तेव्हा ह्रदयात झालेली कालवाकालव आजही होते इतकी ताकद या गाण्यात आहे, अर्थात चित्रिकरण प्रभावी आहे हे पण तेव्हढेच खर. त्यामुळेच या पिक्चरमधल हे गाण माझे सगळ्यात आवडत बनल. 

शास्त्रीय संगीतातल मला ओ कि ठो कळत नाही पण ह्रदय गलबलवून टाकणाऱ्या या गाण्याची सुरावट कोणत्याही रागाची असावी याचे कुतुहल तेव्हा निर्माण झाल होत. "शिवरंजनी" रागावर आधारित हे गाणी असल्याच माझ्या एका जाणकार दोस्ताने सांगितल. या रागातील सुरावटींनी जर आपल्या ह्रदयाचा कब्जा घेतला असेल तर याच रागातील अन्य गाणी पण साॅलिड असणार म्हणुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 

त्याकाळी ना काॅम्पुटर होता ना गुगल.  तेव्हा आमच्या दोस्तांपैकी जे सवाई गंधर्वला जायचे अन् काॅलेजमधे कट्ट्यावर दुसरे दिवशी ज्यांच्या गप्पा रंगायच्या तेथे मूक प्रेक्षक म्हणुन मी कायम हजेरी लावत असे. तेव्हा या माझ्या रागदारी जाणणाऱ्या मित्रांकडून मी संधी साधून माहिती काढण्याचा प्रयत्न नेहमीच करत असे.

एकदा मग मला हवी ती माहिती म्हणजे शिवरंजनी रागावर आधारित गाणी कोणती याची लिस्ट मिळाली. जी माझ्या आठवणीत राहिली ती अशी होती ...

१. ओ मेरे सनम ओ मेरे सनम - लता - संगम
२. दिलके झरोखोंमे तुझको -रफी-ब्रम्हचारी
३. मेरे नैना सावन भादो - किशोर - मेहबूबा
४. बहारों फूल बरसाओ -रफी- सूरज
५. लागे ना मोरा जिया - लता - घूंघट 
६. बनाके क्यों बिगाडारे - लता - जंजीर 

अशी किती तरी छान गाणी या रागावर आधारित असतील. बहुतेक गाणी ही पिक्चरमधे गंभीर दृष्य असतांना चित्रित झालेली दिसतात अपवाद सूरज मधील बहारों फूल बरसाओ गाण्याचा. शंकर जयकिशन जोडीने केलेली गाणी, त्याच आॅरकेस्ट्रेशन हे केवळ अप्रतिम ! जाने कहा गए व दिलके झरोखोंमे या गाण्यांच्या आधीची वाद्यवृंदांची सुरावट आठवून पहा. नतमस्तक कोणाकोणापुढ व्हाव प्रश्नच पडतो, अर्थपूर्ण शब्दरचना करणारा गीतकार कि गाण्याचा भाव अचूक ओळखुन त्याला योग्य न्याय देत ते चालबद्ध करणारा संगीतकार कि आमचे कान तृप्त करणारे गायक ? 

या रागाचा सिनेसंगीतात शंकर जयकिशन इतकाच प्रभावी वापर आरडीनेही केला आहे. जेव्हां जेव्हां मी मेरे नैना सावन भादो हे मेहबूबा मधील किशोरच्या आवाजातल गाण ऐकतो तेव्हा तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवत. पाश्चात्य व भारतीय वाद्यांच्या सुरावटींचा मिलाफ या रागात करतांना किशोरकुमारचा लागलेला आवाज (कि जो खास राजेश खन्नासाठीच गायला जायचा, आठवा आराधना व दाग मधील गाणी) ऐकला कि मनोमन आरडीला सॅल्यूट मारला जातोच.

आता काॅम्प्युटरचा जमाना आहे. तुमच्या मनात बसलेल, खुप आवडणार गाण आठवा आणि विचारा गुगलला कि ते कोणत्याही रागावर आधारित आहे ? मग त्या रागात बांधलेल्या असंख्य गाण्यांची यादीच स्क्रीनवर येईल. त्यातली आवडती निवडक गाणी डाऊनलोड करुन ठेवा अन् हेडफोन लावून ऐका, मस्त वाटेल, मूड छान होईल आणि महत्वाचे म्हणजे एकटक कधीच वाटणार नाही !

बिंदुमाधव भुरे, पुणे.
१९ जानेवारी २०१७

Tuesday, March 24, 2020

स्ट्रिमिंग

*स्ट्रिमिंग*

तेव्हा *स्ट्रिमिंग* शब्दाचा तांत्रिक अर्थ मला कळत नव्हता. इंटरनेटद्वारे एखादी व्हिडीयो क्लिप पहात असतांना मधेच स्क्रीन स्तब्ध होतो, थांबतो आणि त्यावर एक लहानसे वर्तुळ गोल गोल फिरत असते. मला काही कळायच नाही हे गोल गोल काय फिरतय ते ! 

मग कोणीतरी सांगितल कि इंटरनेटचा स्पीड कमी असला कि स्क्रीनवर अस एक वर्तुळ गोल गोल फिरत रहात. इतका का वेळ लागतोय ? मनात प्रश्नचिन्ह मात्र कायम ! जाणकार सांगायचे काहीतरी तांत्रिक भाषेत पण ते काही डोक्यात घुसायच नाही. मग एकाने सांगितल कि आपण संगणकावर पाहू इच्छित असलेली माहिती हवेत असते व ती खाली उतरुन स्क्रीनवर यायला जो वेळ लागतो ते म्हणजे ते गोल गोल फिरण, त्याला *स्ट्रिमिंग* म्हणतात ! पटल होत लगेच ! 

हळूहळू तांत्रिक सज्ञांचा अर्थ बऱ्यापैकी कळू लागला. त्यातल्या त्यात *रिबूट, सिस्टिम हँग, फॉरमँट, कंट्रोल आल्ट डिलिट आणि रिस्टार्ट* यासारख्या शब्दांचा उच्चार दिवसभरात इतक्यावेळा व्हायचा कि कदाचित पुणेकरांच्या जिभेवर आयला शब्दपण इतक्यांदा येत नसेल.

कालांतराने हे गोलगोल फिरण बंद झाल. ८-१० मिनिटांची व्हिडीयो क्लिप सलग पाहता येऊ लागली. पण खर सांगू पूर्वी त्या *स्क्रीनवर गोल गोल फिरणाऱ्या वर्तुळाकडे पहातांना मनात उत्सुकता* असायची. आता जर अस काही स्ट्रिमिंग क्षणभरासाठी जरी झाल तर *सैरभैर व्हायला होत. आमचा पेशंस कमी होत चाललाय, मनाची अस्वस्थता वाढत चालली आहे. आम्हाला थांबायला वेळ नाही.* 

 स्पर्धेच युग सुरु झाले त्याला काळ लोटला. या स्पर्धेने नंतर वेग पकडला आणि *आज या वेगाचीच स्पर्धा सुरु झाली आहे.* व्यापारी उदारीकरण व इंटरनेटमुळे अवघ जग मुठीत सामावल गेलय. अगदी सगळ्यात वेगवान इंटरनेट आमचच सांगणारी जाहिरातही नको तेवढा वेळ दिसत असते. खरच इतका वेग मानवाला हवा आहे ? आजच्या युगात *एखाद्या देशाचा मानबिंदू हा वेग बनलाय व त्याची प्रगती मोजण्याचे एक परिमाणही !* 

उत्क्रांतीच्या वाटचालीत अनेक शोध मानवाने लावले. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींचे निदान व आकडेमोड करुन अचूक निष्कर्ष देणारा संगणक त्याने शोधला. या शोधप्रक्रियेत निसर्ग नियमांचे कळत न कळत उल्लंघन करणाऱ्या मानवाला कधी त्सुनामी तर कधी अतिवृष्टी यासारख्या घटनांच्या रुपांनी वठणीवर आणण्याचा प्रयत्न *"त्याच्याकडून"* झाला. काही काळासाठी *"त्याने"* सिस्टीम हँग केली म्हणूया आपण ! ज्या ज्या वेळी आपल्याला शक्तीचा गर्व झाला त्या त्या वेळी *"त्याने"* आपल्याला आपली जागा दाखविली आहे. 

आज सुइच्या टोकावर लाखोच्या संख्येने मावतील असा सूक्ष्म विषाणू अवतरला आहे. संपूर्ण जगावर या विषाणूने जणू डोळे वटारले आहेत. स्वैर भरकटलेल्या, प्रगतीचे वारु चौखूर उधळलेल्या मानवाने नियमांच्या चौकटीत रहावे यासाठी त्याला घराच्या चार भिंतीत *"त्याने"* बंदिस्त केलय. सगळ स्तब्ध झालेल जग पाहून मला उगाचच वाटून गेल कि हे *"त्याचे" स्ट्रिमिंगच* सुरु आहे. पडद्यावर पुढचे चित्र येइपर्यंत सगळ काही *स्तब्ध झालय.* 

हे गोल गोल फिरण थांबून पुनः स्क्रीन चालू होईल ? कि नियमांच्या चौकटी ओलांडल्या गेल्या तर *"तो"* सिस्टीम रिबूट करेल ? सध्या तरी *"त्याने"* जागतिक व्यवस्था हँग केली आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम रन करतो तेव्हा अनेक फाईल्स *क्वारंटाईन* होतातच ना ? *संगणकाच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय आपण शोधल ते आपल्यावरच लागू करायला काय हरकत आहे ?* आपण सगळेच क्वारंटाईन होऊया म्हणजे स्ट्रिमिंग संपल्यावर पुनः एकदा सुखद चलचित्राची अनुभूती मिळेल ! अगदी गोल फिरणाऱ्या वर्तुळ असल तरी चालेल !

गुढी पाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा !

*©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे*
*९४२३००७७६१*
*८६९८७४९९९०*
*bnbhure@rediffmail.com*

Sunday, March 22, 2020

चौदा तास आणि ती पाच मिनिटे

*चौदा तास आणि ती पाच मिनिटे*

जीवाचा धोका पत्करुन जनसेवा देणाऱ्यांचे कौतुक करतांना आज सलग पाच मिनिटे चालणाऱ्या थाळीनाद, घंटानाद व टाळ्यांच्या आवाजाने ऊर भरुन आला. काल तिन्हीसांजेला पाखरांची किलबील शांत झाल्यानंतर नीरव शांतता होती. रात्रीतून केव्हातरी येणारा ओला ऊबेर गाड्यांचा आवाज, एखाद्या मोटरसायकलचा हॉर्न किंवा कुत्र्यांचे बेसूर भुंकणे संपून पहाटेची लगबग कधी सुरु झाली ते जाणवल नाही त्यामुळे कि काय सुर्योदया दरम्यान पक्षांची किलबिल प्रकर्षाने जाणवली. 

दिवसभर टीव्हीवर संपूर्ण देशाची हालहवाल दिसत होती. सुनसान रस्ते, सिमेंट काँक्रिटच्या जंगलातून गायब झालेले प्राणी, निर्मनुष्य रस्ते, हायवे, एसटीच्या डेपोत विसावलेल्या बसेस वगैरे. कधीकाळी दूरदर्शनवर रामायण सिरियल सुरु झाली कि रस्ते ओस पडायचे त्याची आठवण झाली. पण आज ही दृष्य पाहतांना मन धास्तावलेल होत. अनामिक भितीची झुळूक मनात स्पर्शून जाई तेव्हा नकळत अंग शहारुन जात होत.   

आज अस दृष्य दिसेल अस अगदी काल परवापर्यंत वाटत नव्हत. पं मोदींनी जनतेशी संवाद साधायच ठरवल आणि चौदा तास "जनता कर्फ्यू" च आवाहन केल. संपूर्ण बहुमत आहे, कायदा बनविण्याचे, राबविण्याचे स्वातंत्र्य आहे, यंत्रणा हातात आहे. मात्र हे सगळे मार्ग हातात असूनही हा माणूस जनतेच्या सहभागाचा मार्ग चोखाळायचे ठरवतो. ज्या रोगावर ईलाज नाही त्याला हरवण्याची शक्ती सामान्य जनतेमधेच आहे याची तो जनतेला जाणीव करुन देतो. 

केवळ ३०-३५ मिनिटांचे आवाहन ! जनतेच्या इच्छाशक्तीला केलेले आवाहन व त्यांंच्यावर व्यक्त केलेला विश्वास यातून आज "जनता कर्फ्यू"चे अविश्वसनीय चित्र निर्माण झाल होत. कोरोनाची दहशत असल्यामुळे लोकांनी घरी रहाणे पसंद केल याचे श्रेय मोदींना का ? असे बुद्धिवादी म्हणतीलही कदाचित् ! पण आजचा थाळीनाद, घंटानाद, टाळ्यांचा गजर हे देशभरातले दृष्य छोट्या पडद्यावर पाहिल्यावर हा परिणाम मोदींच्या आवाहनाचाच आहे हे मनोमन पटते. या पाच मिनिटांनी समस्त भारतीयांची मने सकारात्मक विचारांनी भारली होती. वाहिन्यांच्या पडद्यावर शरद पवारांसह अनेक नेत्यांना टाळ्यांच्या कौतुकसोहळ्यात सामील होतांना पाहून या माणसाच्या संघटन कौशल्य व नेतृत्व गुणांना पुनः एकदा मनोमन सलाम ठोकला. 

जनता कर्फ्यूचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता व कोरोनाच्या संभाव्य संसर्गाच्या व्याप्तीची दहशत लक्षात घेऊन कदाचित हा प्रयोग आणखी काही दिवस राबवला जाण्याचा निर्णय होईल. त्यातूनच या संकटावर मात केल्याचे चित्र भविष्यात दिसेल असा विश्वास बाळगूया. सरकार जे जे आवाहन करेल त्याला प्रतिसाद देऊया. एकजूटीने असाध्य ते साध्य होते हे जगाला दाखवून देऊया.

©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

Friday, March 20, 2020

२२ मार्च जनता कर्फ्यू

*२२ मार्च जनता कर्फ्यू*
*मी घरीच राहीन .....*
 🚷🚳🚷🚳🚷🚳🚷
*घराबाहेर पडलात तर*
*"तो" म्हणतो मी येईन !*

*इकडे तिकडे लावलात हात तर*
*"तो" म्हणतो मी येईन !*

*मास्क लाव, हात धू कारण ...*
*एकदा का "तो" शिरला आत तर*
*कसा बरे बाहेर जाईल ?* 

*नको टेंशन नको भिती* 
*पाळून जनता कर्फ्यू*
*होऊया सगळे क्वारंटाईन !*

*२२ मार्च ला १४ तास मी*
*घरीच राहीन, घरीच राहीन !*

*©बिंदुमाधव भुरे.* 
😊😊

Wednesday, February 12, 2020

दिल्ली गेल्ली

दिल्ली गेल्ली !

दोनही वेळा लोकसभा निवडणूका भाजपने विकासाच्या मुद्द्यावर जिंकल्या होत्या. आठवा मोदींची भाषणे ! सबका साथ सबका विकासला आता त्यांनी सबका विश्वास अशी जोड देऊन आणखी एक दमदार पाऊल त्यांनी पुढे टाकले होते. मात्र विधानसभा निवडणूकांमधे विकासाचा मुद्दा भाजपने जेव्हा जेव्हा सोडला तेव्हा तेव्हा त्यांच्या पदरी पराभव आला. 

भाजपला विकासाच्या मुद्द्यावरुन अन्य मुद्द्यांवर खेचायचे हे विरोधकांचे डावपेच भाजपने वेळीच लक्षात घ्यायला हवे होते. सुरवातीच्या काळात असा प्रयत्न अवॉर्ड वापसी सारखे विषय ऐरणीवर आणून करण्यात आला मात्र तेव्हा  भाजपने विकासमंत्र न त्यागता परिस्थिती यशस्वीपणे हाताळली होती. राज्यांच्या निवडणूकीत त्या त्या राज्यांचे विषय घेऊन मोदी प्रचारात उतरत तेव्हा राज्यांना विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठरविण्याचे त्यांचे वचन आश्वासक वाटत असे. 

विरोधक मात्र कधी त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर शिंतोडे उडव तर कधी संघ, मनूवाद या विषयांना प्रचारात ओढण्याचे प्रयत्न करायचे. परिणामी गेल्या काही निवडणूकांत विकासाच्या मुद्द्याला बगल देऊन राज्यांच्या निवडणूकीत राष्ट्रवादाचा मुद्दा ऐरणीवर आणायचा व त्याभोवती प्रचार फिरत ठेवायचा भाजपचा हा प्रयोग अपयशी ठरतोय कारण अशा प्रचारात विषय वहावत जाऊन भारत पाक, हिंदू मुस्लीम विषय चर्चेत येतात. 

राष्ट्रीय अभिमानाचे, प्रखर देशभक्तीचे मुद्दे मतदारांना विधानसभा निवडणूकीत नको असतात. केजरीवालांनी विकासावर प्रचार केंद्रित केला तर भाजपला राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर वहावत जायला शाहीनबाग निमित्त ठरले. हा सापळा २ महिन्यांपूर्वीच लागला होता. त्यात शेवटच्या १५ दिवसात भाजप अडकली हे दिल्ली निकालांनी सिद्ध होतय. काँग्रेसमुक्तचे धोरणही दिल्लीत महागात पडले कारण त्यामुळे मतविभाजनाचा फायदा भाजपला मिळालाच नाही. काश काँग्रेसने अच्छे नंबरसे वोट लिये होते असे भाजप धुरीणांना आतून वाटत असणार !

असे असले तरी आजही दिल्लीकरांना देशासाठी मोदीच हवे आहेत असा सर्व्हे सांगतोय मात्र दिल्लीसाठी त्यांना भाजप नकोय. भाजपला राष्ट्रवाद व ध्रुवीकरणाच्या सापळ्यात अडकवून त्यांचे विकासमंत्र हे प्रचाराचे सूत्र  विरोधक चाणाक्षपणे निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे भाजपने विकासमंत्रावरुन लक्ष विचलित न होऊ होता हे सूत्र अधिक कुशलतेने, हुषारीने वापरण्याची वेळ आली आहे. अर्थात, त्यासाठी विकासनीतीचा त्यांचा आराखडाही त्यांना मांडावा लागेल कारण जनतेसमोर तुलनेसाठी आता गुजरात ऐवजी दिल्ली मॉडेल आहे. 

©बिंदुमाधव भुरे, पुणे.
bnbhure@rediffmail.com
9423007761
8698749990

Sunday, January 5, 2020

धुरळा चित्रपटगृहात

*"धुरळा" चित्रपटगृहात !*

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरु असलेल निवडणूकीच वातावरण निवळतय. एक अनपेक्षित सत्तापालट होतांना उडालेला राजकीय धुरळा मतदारांनी पाहिला. सत्तास्थापना व त्यादरम्यानच्या मानापमान नाट्यातून राजकारणी मंडळी बाहेर पडून स्थिरावतील का ? जनतेच्या प्रश्नांकडे वळतील का ? या विवंचनेत असलेल्या जनतेसमोर *गावातील सरपंच पदाची निवडणूक व त्यातील राजकारण हा विषय घेऊन *"धुरळा"* हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात झळकला. मराठी चित्रपट विश्वात आपल्या नावाचा ब्रँड प्रेक्षकांच्या मनात रुजविणाऱ्या *"झी स्टुडियोज"*ने नविन वर्षाची धमाकेदार सुरुवात एका मल्टिस्टार भव्य चित्रपटाने मोठ्या दिमाखात केली आहे.*

गावच्या सरपंचाचा रुबाब काही और असतो. वर्षानुवर्षे सरपंच म्हणून मिरवणाऱ्या व्यक्तीच्या बरोबरीनेच त्याच्या कुट़ूंबातील सगळ्या सदस्यांना गावकऱ्यांकडून मान मिळत असतो तर सरपंचपदाच्या प्रत्येक निवडणूकीत त्या खुर्चीचे स्वप्न पहाणारा प्रतिस्पर्धी सदैव पराभवास सामोरा जात असतो. त्यामुळे योग्य संधीची वाट पहात कारवाया करणे, गुप्तपणे डावपेच रचणे हे उद्योग सुरु असतात. वय झालेल्या सरपंचाच्या मृत्यूची बातमी गावात पसरते अन् "हीच ती वेळ" असे मानून हा स्पर्धक आपल्या कारवायांना कशी गती देतो हे पडद्यावर पहाण्यात गंमत आहे. 

तीन मुले दोन सुना अशा परिवाराची जबाबदारी आईवर येऊन पडलेली आहे. कालपर्यंत कौटूंबिक चौकटीत बंदिस्त असलेली ही माय कोणाच्या तरी कारस्थानी भावनिक बोलण्याला भुलून घराचा उंबरा ओलांडत सरपंचाच्या खुर्चीकडे वाटचाल करु पाहतेय ! सरपंचाने पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करत गावाला पुढे नेण्याचे कर्तव्य आता आपल्याला पूर्ण करायचे ही थोरल्याची भावना आहे. त्यात त्याला त्याच्या सुविद्य व समंजस पत्नीची साथ आहे. मधला भाऊ खुशालचेंडू, शिक्षणात कमी व गावंढळ असला तरी त्याचे दादावर आणि आईवर नितांत प्रेम आहे. त्याची पत्नी मात्र शिक्षित अन् मॉडर्न विचारांची ! तर धाकट्याची चाल वेगळी. डोळ्यात मोठी स्वप्ने पण त्याची पूर्तता कशी करायची या विवंचनेत चाचपडत, अडखळत तो जीवनाची वाटचाल करतोय. 

*"सरपंचपदावर मी का नाही ?"* हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात अत्यंत धूर्तपणे पेरला जातो तसे प्रत्येकाच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागतात व कौटूंबिक नात्यात असलेल्या घट्ट वीणेचा एक एक टाका ऊसवू लागतो. परस्परातील प्रेम सामंजस्य हळूहळू लुप्त होत त्याची जागा सरपंच पदाची ईर्षा घेते. त्यामुळे आपसी नात्यामधे एक प्रकारची कटूता येऊ लागते. सरपंच पदाने कायम हुलकावणी दिलेला प्रतिस्पर्धी व अन्य मतलबी राजकारणी या कौटूंबिक कलहात तेल ओतून आपला मतलब साधण्याचे काम करतात. या सगळ्याची परिणती एका यादवीत होणार का ? *या प्रश्नाचे ऊत्तर शोधण्याचा प्रवास म्हणजे *"धुरळा" !*

विविध व्यक्तिरेखा व त्यांचे भावनिक पदर उलगडून दाखवतांना कथानक कुठेही कंटाळवाणे न होता ते धीम्या गतीने पुढे सरकत ठेवण्याचे कौशल्य दिग्दर्शक व लेखकाने साधलय. महिलांचा राजकारण वापर करणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीवर दिग्दर्शक शेलक्या भाषेत टीका करतांना आजचे राजकीय वास्तव अधोरेखित करतो. सात प्रमुख व्यक्तिरेखांच्या स्वभावात  *वाद आहे, संवाद आहे, विसंवाद आहे, आक्रमकता आहे, अगतिकता आहे, भोळेपणा आहे, चतुरता-धुर्तता आहे. प्रत्येक पात्राचे स्वभाव वैशिष्ठ्य जपत हा सतरंगी धुरळा आपल्यासमोर अवतरतो.*

रफटफ भुमिकांची छाप बसलेला *अंकूश* अगदी त्याच्या लूकपासून वेगळा भासतो. त्याने उभारलेला *दादा* हा वरकरणी शांत वाटणारा आहे पण प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक चालीला प्रत्युत्तर देतांना त्याच्यातील संयमी व विचारी व्यक्तिमत्वाची छटा त्याने प्रभावीपणे दाखविली आहे. *सिद्धार्थने* वरकरणी भोळा, प्रसंगी आक्रमक पण बायकोच्या धाकात असणारा मधला भाऊ छान साकारला आहे. विनोद़ाची पेरणी केलेल्या प्रसंगात तो टाळ्या  हमखास वसूल करतो. *अमेयला* धाकट्या भावाची भूमिका आली आहे ती त्याने कमाल साकारली आहे. *सोनालीचा* या चित्रपटातात वावर तिच्या लुकप्रमाणे सहजसुंदर ! 

*अलका कुबलना* अतिशय वेगळी परंतु खूप वाईड रेंज असलेली भूमिका मिळाली आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी त्या भूमिकेच सोन केलय. *प्रसाद ओक* खलनायकी रुपात हटके ! *ऊमेश कामत* चित्रपटात मोजून पाच मिनिटे असेल पण आपली छाप पाडून जातो. "जुल्मकी दुनियामे" आपला दरारा असणारा एखादा पॉलिश्ड व सुटाबुटातील खलनायक म्हणून भविष्यात त्याला पहायला आवडेल. 

*सई* या चित्रपटाचे सरप्राइज पँकेज आहे. तिची भूमिका नेहमीप्रमाणे अप्रतिम ! बोलका चेहरा व टपोरे डोळे हे तिचे स्ट्रॉँग पॉईंट्स आहेत हे ती पूर्णपणे जाणते व त्याचा प्रभावी वापर नेमकेपणाने करत ती बाजी मारते. चित्रपटगृहातून बाहेर पडतांना तिचा चेहरा दीर्घ काळ लक्षात रहातो. 

राजकारणामधे सत्तास्थानी विराजमान घराण्यातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर कुटूंबातील नातेसंबंधात निर्माण झालेला तणाव व दुरावा नष्ट होऊन पुनः सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरणारी घटना प्रेक्षकांनी जरी ओळखलेली असली तरी ती घटना *हा धुरळा कशाप्रकारे शमवते हे पडद्यावर पहाणे रंजक आहे.*  डबलसीट, टाईमप्लीज, आनंदी गोपाळ सारखे उत्तमोत्तम चित्रपट देणारे दिग्दर्शक समिर विद्वंस याचा *हा चित्रपट आवर्जून पहावा, पुनः पुनः पहावा असा नक्कीच बनला आहे.*

©बिंदुमाधव भुरे, पुणे
८६९८७४९९९०/९४२३००७७६१
bnbhure@rediffmail.com