Sunday, November 12, 2017

आरोग्य अनारोग्य - समज गैरसमज

फेसबुकवरील मूळ पोस्ट !

*आरोग्याचे मोफत अति ज्ञान !!*

हल्ली सगळीकडे आरोग्यज्ञानाचे मोफत वाटप सुरू असते. कुणी विचारो, वा ना विचारो, व्हाट्सअॅपवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रांमध्ये रोज काही ना काही लिहून येतच असते आणि कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. ह्या आरोग्य सल्ल्यांमुळे माणूस प्रत्येक घास संशयानेच खायला लागलाय!!!

मला लहानपणी अजिबात आठवत नाहीये माझ्या आईबाबांना कार्ब्स, फॅट्स, पाणी किती प्यावं वगैरे चर्चा करताना...  रोज सकाळी फायबर असलेला वगैरे नाश्ता कधीच नसायचा, पण गरम गरम तूपमेतकूटभात किंवा गरम गरम तेल लावून केलेली घडीची पोळी!! पोहे, उपमा म्हणजे रविवारचा नाश्ता!! दुपारी साधेच पण पोळी, भाजी, आमटी, भात असे जेवण, मधल्यावेळी चिवडा, दूधपोहे, दहीपोहे असं काहीतरी आणि रात्री खूपदा फक्त आमटी भात, खिचडी!!  मुख्य म्हणजे हे सगळं कधीही बोअर झालं नाही, की कधी रात्री रोज भात खाऊन काय होईल वगैरे भीतीही वाटली नाही. कदाचित म्हणूनच सगळ्या सणावारांना गोडाच्या पदार्थांवर आम्ही व्यवस्थित ताव मारायचो आणि तरीही खाताना फॅट्स, कार्ब्स हे शब्दही मनात आले नाहीत!! खरं तर घरात ही चर्चाच नसायची कधी!! 

त्यामुळे मनात तो पदार्थ खाताना कोणताही संदेह नसायचा!! आजकाल काय होतंय की पदार्थ समोर आला तरी खाऊ की नको, हे आत्ता खाल्लं तर माझ्या किती कॅलरीज वाढतील... मग किती exercise वाढवावा हे विचार सुरू होतात! मला नेहमी वाटतं की अज्ञानात कधी कधी सुख असतं!!
अति ज्ञानाचा त्रासच होतो!!

"सकाळ पेपर" मधली फॅमिली डॉक्टर ही पुरवणी मी आधी वाचायचे. त्यात काही काही रोगांची लक्षणे दिलेली असतात. खरं तर बऱ्याच जणांना त्यातलं काही ना काही होतंच असतं. पण ते वाचलं आणि कधी चुकून पायाला मुंग्या वगैरे आल्या की त्यातले एकेक रोग आठवू लागतात आणि मानसिकच काय काय व्हायला लागतं. सरळ बंद करून टाकलं ती पुरवणी वाचणं!
फेसबुक आणि व्हाटसअॅपवरच्या आरोग्यपोस्ट म्हणजे खरंच जीव नको करतात अगदी!!  कुणी सांगतं - ओट्स खा, तूप खाऊ नका, केळं खाऊ नका ... हे वाचून  होतंय तोच त्या ऋजुता दिवेकरची पोस्ट वाचायला मिळते की पोहे खा, भात खा, तूप गूळ पोळी खा... झालं ... डोक्यात नुसता गोंधळ!! काय बरोबर नि काय चूक!!

बऱ्याच पोस्टमध्ये अमुक एक केल्याने कॅन्सर होतो असं लिहिलेलं असतं ... परवा एका आयुर्वेदआचार्यांचा लेख वाचायला मिळाला होता. त्यात लिहिलेले होते की, अति पाणी पिऊ नये. त्यामुळे किडनीला त्रास होतो.. त्याचवेळी दिवसातून १०-१२ ग्लास पाणी प्यावं अशी पोस्ट कुठूनतरी येते !!
सध्या शेवग्याच्या शेंगेची पोस्ट फिरतेय...  काही दिवसांनी लाल भोपळ्याच्या फायद्यांची पोस्ट सुरू होईल... पोळीमधल्या ग्लुटेनमुळे त्रास होतो, असं सध्या वाचायला मिळतंय..  रोज भाकऱ्या करणे तर शक्य नाही.. अगदी केल्या तरी मुलांना डब्यात रोज भाकरी आवडत नाही .... मला खरंच कधी कधी असं वाटतं की आरोग्य ह्या विषयाचा अतिरेक होतोय. भूक लागली की, जे समोर असेल ते जेवावं आणि झोप आली की झोपावं, एवढं साधं तत्व पाळलं जायचं पूर्वी ! तेव्हा खरचंच माणसे आरोग्यसंपन्न होती!! आता मात्र भूक लागली की किती कॅलरीज खाव्यात हे मोजत बसलयीत माणसे !!  ह्या आरोग्याच्या लेखांमुळे, अति माहितीमुळे खाण्यातील आनंद हरवून बसणार आहोत आपण !!

--यशश्री मनोज भिडे
(FB वरून साभार पोस्ट.)

*वरील पोस्टचे विश्लेषण करणारा माझा लेख*

*आरोग्य-अनारोग्य समज व गैरसमज*

आरोग्याचे मोफत अतिज्ञान ही यशश्री मनोज भिडे यांची फेसबुक पोस्ट वाचण्यात आली. आरोग्य चांगल रहाणे हे जणू केवळ खाण्यापिण्याशीच संबंधित आहे हा आशय या पोस्ट लिहिण्यामागील असावा असे वाटते.
ही पोस्ट वाचत असतांना पोस्टमधील प्रत्येक वाक्य मनाला भावते व पटतेही कारण कुठेतरी आपण लहानपणीच्या जुन्या आठवणींशी कनेक्ट होतो. आजकाल कॅलरी, कार्ब, पाणी पिण्याचे प्रमाण, फायबर, फॅट्स यासारख्या शब्दांचा भडिमार होतोय हे खरच आहे व संपूर्ण पोस्टमधे त्याचा संदर्भ अतिशय चपखलपणे आलाय.

"काल व आज" याच्या तुलनेत बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी, अन्नपदार्थातील घटत गेलेल जीवनसत्वाचे प्रमाण इ. इ. यासारख्या गोष्टींचा अभाव या पोस्टमधे आढळल्याने पोस्टमधील मजकूर एककल्ली किंवा एकतर्फी झाल्यासारखा वाटतोय. म्हणून आजच्या बदललेल्या दुनियेत वास्तवातील दुसरी बाजू लक्षात घ्यायला हवी.

पूर्वी शारिरिक हालचाली, श्रम यांचे प्रमाण  भरपूर होते कारण दळणवळणाची साधने कमी होती, मर्यादित होती. माहिती तंत्रज्ञान अतिप्रगतावस्थेत नव्हते. एखाद्याला निरोप द्यायचा म्हटले तरी सायकल किवा पायी जाणे याला पर्याय नव्हता. दरडोई आहार प्रतिवर्ष २०० किलो इतका होता. वर्षातून शेतीमधे एकदा पीक घेेतले जायचे व तेही सेंद्रिय पद्धतीने, त्यामुळे अन्नपदार्थ कसदार होते, त्यात पोषणमुल्ये भरपूर होती. म्हणजे खाणे पौष्टिक असायचे व भरपूर शारिरिक हालचाली असल्यामुळे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम असायचे !

आज ......... आज ग्लोबलाइजेशन व अतिप्रगत माहिती तंत्रज्ञान यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण बसल्याजागेवरुन संपर्क करु शकतो. परिणामी श्रम, हालचालींवर मर्यादा आल्या आहेत मात्र दरडोई आहारात वाढ होऊन तो ३०० कि प्रतिवर्ष झालाय. शेतीतून वर्षाला दोन तर कधी तीन पिके घेतली जातात. त्यासाठी केमिकल मिश्रित खते यांचा अतिवापर होतोय. गव्हातील घातक ग्लुटेन या घटकाचे नाव आताच का कानावर पडते आहे ? या प्रश्नाच उत्तर वेगळ द्यायची गरज नाही.

आपल्या जावनशैलीवर पाश्चिमात्य जीवनशैलीची नकळत छाप पडायला सुरुवात झाली. कधी काळी क्वचित पहायला मिळणारा कोकाकोला आज डझनभर स्पर्धकांसोबत खेडोपाडी पोहोचलाय. ब्रेड म्हणजे शहरी व उच्चभ्रू मंडळींचे चोचले व गोऱ्यांचा आहार ! त्यामुळे आपली न्याहारी ही पारंपरिक असायची. सकाळी पोटभर न्याहारी करुन तो जिरविण्याइतके श्रम पूर्वी आपोआप व्हायचे. आता न्याहारी तीच आहे मात्र श्रम नाहीत त्यामुळे भरपेट न्याहारीतून मिळणारी उर्जा वापरलीच जात नाही. त्याचे ज्वलन न झाल्याने या उर्जेच फॅट्समधे रुपांतर होतय व परिणामी आज स्थूलता व त्याचे सरासरी प्रमाण यात वाढ झालेली दिसते आहे.

सहज म्हणून किंवा बदल म्हणून या खाण्यापिण्याची सवयी आज आपले दैनंदिन जीवन बनले अन् उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर व ह्रदयरोग माणसांना चाळीशीतच गाठू लागले. मग हे सगळ का घडतय याचा अभ्यास करता लक्षात आल कि हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे. ज्या खाण्यापिण्याच्या सवयींमळे हे दुष्परिणाम होतायत त्यातल्या घटक पदार्थांचा अभ्यास सुरु झाला. केवळ आहारशास्त्रच नव्हे तर शास्त्राच्या सगळ्याच शाखात सदैव संशोधन हे सुरु असते व नवनविन माहिती दररोज पुढे येत असते. म्हणूनच आज कॅलरीज्, कार्बन, फायबर, फॅट या संकल्पना सर्वमुखी झाल्या आहेत.

आज "इलनेस" ही एक मोठी इंडस्ट्री बनली आहे. याच कारण बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव व खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी. याचाच परिणाम म्हणून "वेलनेस" इंडस्ट्री नावारुपाला आली आहे. शाळेत फक्त चौरस आहार, जीवनसत्वे हे शिकवले पण आज चाळिशीत गाठणाऱ्या विविध आजारपणामुळे या कार्ब, फॅट्स, फायबर वगैरे संकल्पनांचे शास्त्रीय महत्व अभ्यासातून कळायला लागलय. तरुण पिढी "वेलनेस"साठी फिटनेसकडे अधिकाधिक आकर्षित होते आहे. पहाटे, सकाळी वाॅकला किंवा टेकड्यांवर जाणाऱ्यात तरुणाईचे प्रमाण लक्षणीय आहे, जिम्सची वार्षिक सदस्यता घेणारे व पर्सनल ट्रेनर घेणारेही खूप आहेत.

पण हे सगळे फिटनेससाठी करायच व आहारात कोक, पिझ्झा, फास्ट फूड ... हा विरोधाभास दिसतोय. त्यामुळेच हेल्दी असणे व फिट असणे या दोन परस्परांशी संबंधित परंतु स्वतंत्र संकल्पना आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. आदर्श जीवनशैली म्हणजे २०% व्यायाम व ८०% आहार व या आहारात ४०% कार्ब+३०%आवश्यक फॅट्स+३०%प्रथिने असे मिश्रण फलदायी ठरते. हे खऱ्या अर्थाने "वेलनेस" आहे, अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

काहीही खाल्ले तर ते पचविण्याची क्षमता बदलत्या जीवनशैलीमुळे नष्ट झाली आहे तसेच आजच्या खाद्य पदार्थातील पोषणमुल्यांचे प्रमाण घटले आहे हे लक्षात घेता आहारशास्त्राने संशोधित केलेल्या कार्ब, प्रोटीन, फायबर, फॅट या संकल्पना हे आपल्या वास्तविक दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनविल्यास हेल्थ व फिटनेस हे दोन्ही साधले जाऊन खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य जगता येईल.

तेव्हा आरोग्याचे मोफत अतिज्ञान तपासावे, त्यातील विरोधाभास लक्षात घ्यावा पण त्याकडे दुर्लक्ष करु नये. व्यक्ति तितक्या प्रकृती या उक्तीनुसार आपल्यासाठी योग्य काय याचा निर्णय घ्यावा प्रसंगी न्युट्रीशन तज्ञांचा सल्ला घ्यावा. खाण्यापिण्याता एकच नियम सगळ्यांनाच सरसकट लागू होईल असे नाही मात्र २४ तासातील १ तास स्वतःच्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी हवा हे सगळ्यांना लागू आहे यात दुमत नसावे.

बिंदुमाधव भुरे, पुणे

Thursday, November 9, 2017

१७ नोव्हेंबर - धडक मोर्चा - चलो दिल्ली

१७ नोव्हेंबर – धडक मोर्चा – चलो दिल्ली !  

भाजप सरकार व भारतीय मजदूर संघ !  

२०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार बहुमताने स्थापन झाले आणि विरोधकांच्या टीकेत वारंवार संघ व संघ परिवारातील संघटनांचा उल्लेख येऊ लागला. शिक्षण पद्धतीपासून ते सामाजिक जीवनातील प्रत्येक अंगाचे भगवीकरण सुरु असल्याचा आरोप होऊ लागला. अगदी भारतीय संघराज्यपद्धतीचा ढाचा व घटना विशेषतः आरक्षण बदलण्याची खेळी संघ भाजपच्या आडून खेळत असल्याचा गाजावाजा काही निवडणुकीत प्रचारा दरम्यान केला गेला. अर्थात, कालांतराने हा प्रचार मिथ्या सिद्ध झाला.  

देशाच्या उन्नतीसाठी, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचावीत म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी धडपडत असतो. “समाजातील वंचित घटकाचा विकास” हे ध्येय बाळगून किंबहुना “विकास” हा केंद्रबिंदू मानून हे पक्ष आपआपली ध्येयधोरणे ठरवत असतात. या राजकीय वाटचालीत जरी विरोधी पक्षांसह समाजातील सगळ्या घटकांचे सहकार्य अपेक्षित असले तरी ही वाटचाल अडचणींचा सामना करणारी असते कारण विचारसरणीतून आलेल्या विरोधाला राजकीय विरोधाची किनारही असते. "भारतीय मजदूर संघ" म्हणजे "संघ परिवारातील संघटना" म्हणजेच "भाजपची सहयोगी" ! त्यामुळे भारतीय मजदूर संघ हा भाजपा सरकारच्या विरोधात जात नाही असा एक गैरसमज कामगार क्षेत्रातील सगळ्या संघटनांनी करुन घेतला आहे अर्थात मिडियानेही त्याला वेळोवेळी यथाशक्ति हातभार लावला आहे.    

भारतीय मजदूर संघाची भूमिका व वाटचाल    

परंतु वस्तुस्थिति जाणून घेण्यासाठी भारतीय मजदूर संघाची स्थापना व नंतरची वाटचाल याकडे बारकाइने पाहिले पाहिजे. पूर्ण वेळ संघ प्रचारक असलेले एक स्वयंसेवक स्व. दत्तोपंत ठेंगडीजीं यांनी २३ जुलै १९५५ रोजी भारतीय मजदूर संघाची स्थापना केल्याची घोषणा केली. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले कि भारतीय मजदूर संघ ही राजकारणापासून अलिप्त व कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेली एक विशुद्ध कामगार संघटना राहील. कामगारांच्या हितांचे रक्षण करतांना संघटना सदैव राष्ट्रहिताच्या चौकटीत राहून विचार करेल. तसेच उद्योगाचे हित जपतांना कामगारांच्या हक्कांबाबाद मात्र कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.    

भारतीय मजदूर संघाने राजकारण व राजकीय पक्षापासून अलिप्त रहाण्याची भूमिका सदैव प्रामाणिकपणाने निभावली. भाजपने पूर्व पंतप्रधान मा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील अनेक पक्षांच्या सहकार्याने एनडीए सरकार स्थापन होऊन या देशाने एक वेगळ वळण राजकीय पटलावर घेतलेल सगळ्यांनी पाहिले, अनुभवले. आज अनेक विरोधी पक्ष भाजपच्या पूर्ण बहुमतातील सरकारवर टीका करतांना मा अटलजींचा संदर्भ निघतो तेव्हा त्यांचा उल्लेख अतिशय आदराने करतात हे लक्षात घेतल पाहिजे. परंतु याच मा अटलजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर भारतीय मजदूर संघाने स्पष्ट शब्दात टीका केली होती. आर्थिक धोरणात बदल न करणाऱ्या किंबहुना चुकीच्या अर्थनीतिच्या व कामगारहितविरोधी धोरणांच्या विरोधात या एनडीए सरकारवर केवळ टीका करुन न थांबता स्व. दत्तोपंत ठेंगडींनी त्यावेळी भारतीय मजदूर संघाच्या २ लाख सदस्यांचा ऐतिहासिक धडक मोर्चा दिल्लीत काढला होता. या मोर्चाला संबोधित करतांना स्व. दत्तोपंतांनी सरकारवर कठोर टीका केली होती हे विसरता येणार नाही.  

देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतांना त्या चौकटी अंतर्गत उद्योगहित व मजदूरहित जपत राजकारण व राजकीय पक्षापासून अलिप्त रहाण्याच्या भुमिकेशी भारतीय मजदूर संघ सदैव प्रामाणिक राहिला आहे. वर्ल्ड बँक, डब्ल्यूटीओ यांच्या दबाववाली व त्यांना अनूकूल अशा आखलेल्या आर्थिक व कामगार विषयक धोरणांना विरोध करतांना स्व दत्तोपंत ठेंगडींच्या मार्गदर्शनाखाली असंख्य आंदोलने उभी करण्याचा निर्णय घेतांना “सरकार कोणाचे” हा मुद्दा भारतीय मजदूर संघासाठी कधीच अडचणीचा बनला नाही.  

धडक मोर्चा का ?  

आज पुनः एकदा भारतीय मजदूर संघ आंदोलनाचा पवित्रा घेऊन सज्ज झाला आहे. विविध राज्यांमध्ये अनेक सरकारी निमसरकारी पदे रिक्त आहेत ती तातडीने भरण्याची आवशक्यता आहे. उद्योग क्षेत्रामध्ये समान काम समान वेतन धोरण न राबविले गेल्यामुळे वेतनातील असमानता ही कामगारांच्या असंतोषाचे प्रमुख कारण बनते आहे.  सार्वजनिक उद्योगातील हिस्सा विक्रीमुळे हे उद्योग खाजगी उद्योगांच्या हातात जाण्याची भीती असून त्यामुळे कामगार कपातीचा धोका आहे. ही निर्गुंतवणूक प्रक्रिया तातडीने थांबवून हे सार्वजनिक उद्योग सक्षम व कार्यक्षम कसे होतील याबाबद भारतीय मजदूर संघाशी धोरणात्मक चर्चा व्हावी. नीती आयोगाने कामगारहितविरोधी केलेल्या शिफारशींचा निषेध भारतीय मजदूर संघाने यापूर्वीच नोंदविला होता. परिणामस्वरूप, समान काम समान वेतन कायद्यातील घातक तरतुदी तसेच भविष्य निर्वाह निधीविषयक बदल, शेतीउत्पन्नावर कर यासारख्या घातक तरतुदी त्वरित मागे घेतल्या जाव्यात.  कामगार कायद्यात होणार्या एकतर्फी बदलामुळे कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुळात कंत्राटी कामगार ही प्रथाच बंद करण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी आहे. कारण या कामगारांची पिळवणूक करत असतांना त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षितता, वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. खाणकामगार, महिला कामगार, असंघटीत कामगार यांच्या बाबतीतही हेच प्रश्न आंदोलनाचा विषय बनू पहात आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला बँकिंग उद्योग तर अत्यंत धोकादायक वळणावर आज उभा आहे. थकीत व बुडीत कर्जांमुळे बँकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असतांना केवळ बँकांचे विलीनीकरण करून बँकांना अधिक भांडवल पुरविणे यासारखे उपाय योजली जात आहेत. पण आज खरी गरज आहे ती थकित कर्जविषयक कायद्यांमध्ये बदल करून या समस्येच्या मुळाला हात घालण्याची जेणे करून ही समस्या वारंवार उद्भवणार नाही.  

संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांची शिकवण !  

असे अनेक विषय घेऊन दि १७ नोव्हेंबर रोजी भाजपच्या या पूर्ण बहुमतातील सरकारच्या कानावर कामगारांची संवेदना पोहोचविण्यासाठी भारतीय मजदूर संघाने ५ लाख सदस्यांच्या विशाल मोर्चा आयोजित केला आहे. आज दि १० नोव्हेंबर, स्व दत्तोपंत ठेंगडींचा जन्मदिवस ! त्यांची शिकवण, त्यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे याबरहुकूम वाटचाल करतांना भारतीय मजदूर संघ दि १७ नोव्हेंबरच्या मोर्चाद्वारे भारतीय कामगार क्षेत्राच्या इतिहासात एक नविन अध्याय रचण्यास  सिद्ध झाला आहे. देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या या लाखो सदस्यांच्या भावना सरकारच्या कानावर पडून अपेक्षित बदल भविष्यात घडून आल्यास तो एक प्रकारे या दृष्ट्या कामगार नेत्याने मांडलेल्या विचारांचा विजय ठरेल. अर्थात सरकार कोणाचेही असो राष्ट्रहित, उद्योघीत व त्यांतर्गत कामगारहित या चौकटीत राहून भारतीय मजदूर संघाची वाटचाल सुरु असून त्या वाटचालीत येणारा दि १७ नोव्हेंबरचा हा धडक मोर्चा ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही.  

बिंदुमाधव भुरे, पुणे  

Shared with https://goo.gl/9IgP7

सेना गुजरातमधे ४० जागा लढविणार !

हणम्या : गण्या, लेका ऐकला का तू. आर, शेना गुजरातमंदी ४० जागा लडवनार म्हने. आयला लै खास, कसला भारी शीन होनाराय माल तर आत्ताच वाटायलय .... गेला, बीजेपीचा शेपच गेला आता.

गण्या : आर हणम्या लेका हे तर काइच नाय. लै शिळी झालीया बातमी. तुला ठाव हाय का फुरली गंमत. लेका उरलेल्या समद्या जागा मनशे लडवनार हाय.

हणम्या : म्हंजे शेनामनशे युतीच सरकार येनार म्हनायच तर गुजरातमंदी. पन् म्या काय म्हंतोय म्हाराष्ट्रात न्हाइ तर जाऊं दे गुजरातमंदी होतीय तर हुंद्या युती ! फकस्त येकच सांगाव हाय. त्यांला म्हनाव लेकांनू तिकड जाऊन भांडू नगा.

गण्या : व्हय, भांडलात तर आमची म्हाराष्ट्राची इज्जत जाईल म्हनाव. आर, पर भांडतील कशापाई ?

हणम्या : आर ती मम्ता लेका.. मलाबी घ्या तुमच्यात म्हनून बळच घुसली तर काय घ्या.

गण्या : मंग त्यात काय येवड ! दोगांनीबी थोड्या थोड्या जागा सोडायच्या. लेका बाई मानसाणी रीक्केष्ट केल्यावर मराठी मानूस कायबी करनार.

हणम्या : आन् समजा लेका वादावादी झालीच ! दोगबी म्हनले नाय देत टाळी तर ? येक बेश आयड्या सांगू का ? आर वाद सोडवायला दिल्लीस्न दोग बोलून घ्यायचे.

गण्या : दिल्लीस्न ? ते आनी कोन म्हनायच ? अमित शा आन् मोदी का ?

हणम्या : आर हाट लेका. केजरीवाल आनी शिसोद्या म्हनतोय मी.

गण्या : आयला म्हंजे शेनामनशे युतीच सरकार आलच म्हनायच आता ! म्हंजी बुलेट टरेन डबल फास्ष्ट धावनार म्हना की.

हणम्या : म्हंजी काय, डायरेक्ट नाशकाला यनार.

गण्या : लय भारी ! गुजरातमदल पब्लिक आता म्हन्नार "शेनामनशे ... मने आवडे छे"

बिंदुमाधव भुरे, पुणे

Friday, November 3, 2017

नोटबंदीच्या १ वर्षानंतर मनोगत !

नोटबंदीच्या १ वर्षानंतर मनोगत !

२०१५ साली बेबी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता.  चित्रपटाच्या मध्यावरचा एक प्रसंग आठवतोय ? देशविघातक व अतिरेकी कारवाया करणाऱ्यांविरोधात लढणारा एक जांबाज अधिकारी अक्षयकुमार व त्याच्यामागे ठामपणे उभा असलेला त्याचा बाॅस डॅनी हे दोघे जण मंत्री महोदयांना भेटायला जातात. बिलाल या अतिरेक्याला पकडण्याचा प्लान मंत्री महोदयांना समजावून सांगतात. बिलाल हाती लागला तर मोठ्या अतिरेकी कारवायांचा छडा लागून देशाला संकटातून वाचविणे शक्य होणार होते. 

सगळे काही ऐकून घेतल्यावर मंत्री महोदय या योजनेत यश मिळण्याची शक्यता किती ?” असा प्रश्न विचारतात. अक्षयकुमार म्हणतो पाच टक्के”. मंत्री महोदय आश्चर्यचकित होतात पण अक्षयकुमार सांगतो मी एक टक्का यशाची शक्यता असेल तरी काम करायला तयार असतो”. बिलाल सौदी अरेबिया मध्ये आहे कळल्यानंतर मा़त्र हा धोका पत्करण्यास मंत्री महोदय ठाम नकार देतात. तेव्हा डॅनी सांगतो कि जर हा म्हणजे अक्षयकुमार या मोहिमेत पकडला गेला तर आम्ही जबाबदारी झटकून याला ओळखत नाही असे सांगू”. हे सगळे अक्षयकुमार समोर घडत असल्यामुळे मंत्री महोदय अस्वस्थ होत डॅनीला खाजगी संभाषणाची विनंती करतातअक्षयकुमार त्याचा रोख ओळखून लगेच बाहेर पडतो. 

मंत्री महोदय डॅनीला विचारतात कि जेव्हा तू याच्या समोर सारखे सांगतोस कि जर ही कामगिरी अयशस्वी झाली व हा पकडला गेला तर आम्ही जबाबदारी झटकून टाकू या तुझ्या बोलण्यात किती तथ्य आहे ?” डॅनी सांगतो कि “हे पूर्णपणे खर आहे”. पुढे तो म्हणतो कि आम्हाला असे काही पागल आणि अडेल अधिकारी फार क्वचित मिळतात. यांच्या डोक्यात फक्त देशभक्ती व देशाचाच विचार सदैव सुरु असतो. हे देशासाठी मरायला नव्हे तर जगायला तयार असतात. कारण यांना शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सुरक्षा करायची असते.” 

दि ८ नोव्हेंबरला नोटबंदीला वर्ष झाले. काळ्या पैशावर आधारित समांतर अर्थव्यवस्थेमुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. चलनात असलेली एकूण रोकड केवळ दहा वर्षात दुप्पट होऊन ती १५.५० लाख कोटी इतकी झाली होती. भारतीय अर्थसंकल्प हा वीस लाख कोटींचा आहे तर बँकिंग व्यवसाय हा १७५ लाख कोटींचा आहे. रोख चलनातील रक्कम जरी केवळ १५.५० लाख कोटी असली तरी या रोख चलनाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात किती काळा व बेहिशोबी पैसा निर्माण झाला असेल याचा अंदाज अर्थसंकल्प व बँकिंग व्यवसायाचे महाकाय आकडे पाहिले कि करता येईल. त्यामुळे या रोख चलनरुपी बिलालवर कारवाई करण्याचा धाडसी निर्णय पं मोदींनी घेतला. डॅनी म्हणाला ते वाक्य आठवत मी मनाशी म्हणालो कि असे (अडेलपागल व म्हणूनच) देशभक्ति व देशप्रेमाने भारलेले निडर पंतप्रधान क्वचितच लाभतात.

चित्रपट कथानकात हा बिलाल ठार झाल्यामुळे अतिरेकी कारवाया १००% बंद होतील अशी बिलकुल शक्यता नव्हती परतू या कारवाया करणाऱ्यांना एक जबरदस्त चपराक बसणार होती. या मोहिमेतून अतिरेकी कारवायांचे जाळे व त्यांचा ठावठिकाणा उद्ध्वस्त होण्याची शक्यता अधिक होती. किमान त्याच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाया व त्यामुळे होणारी हानी काही प्रमाणात टळणार होती. तसेच नोटबंदीमुळे संपूर्ण काळा पैसा उघडकीस येणार होता असे नाही पण या कारवाइमुळे  काळ्या व बेहिशोबी पैशाची निर्मिती ज्या रोख चलनातून होते त्याच्या मुळावर घाव घातला जाणार होता हे नक्की तसेच यात गुंतलेल्या तमाम मंडळींना तो इशाराही होता. 

चित्रपटात जेव्हा या धाडसी मोहिमेची सुरुवात सौदीमध्ये गेल्यावर होते तेव्हा या कारवाईत बिलाल मारला जातो. मोहीम फत्ते होत असतांनाअनपेक्षितपणे या कारवायांच्या मागील  मुळ सूत्रधार व म्होरक्या मौलाना या टीमच्या हाती लागतो. नोटबंदी करतांना व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या का हा नोटबंदीवर टीका करणाऱ्यांकडून विचारला जाणारा मजेदार प्रश्न ! या नोटबंदीचा परिणाम म्हणून अचानक आयकर रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या वाढलीडिजिटल पेमेंट पद्धतीमुळे बेहिशोबी व्यवहारांची संख्या घटली. चलनातील ९९% नोटा परत आल्यामुळे सरकारने पुढच्या टप्प्यातली आपली धडक कारवाइ सुरु केली. परिणामी प्राथमिक तपासणीतून सुमारे ३ लाख बोगस कंपन्या उघड झाल्या. यापैकी आजमितीस केवळ ५००० कंपन्यांच्या छाननीतून ४००० कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. आज टीका करणारे म्हणतात... “पण नोटबंदी करतांना ही उद्दिष्टे जाहीर केली नव्हती”. बिलालला मारण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर मंत्री महोदय अगर बाॅस डॅनीने अक्षयकुमारला असे काही म्हटल्याचे दिसत नाहे कि “बिलाल संपला ते ठिक आहे पण  मौलानाला पकडण्याबाबद आधी काही ठरले नव्हते व तुम्ही तसे काही बोलला नव्हतात”. 

जरी नोटबंदी करतांना ही उद्दिष्टे सांगितली नसली तरी आज या मौलानारुपी बोगस कंपन्या सापडल्यामुळे त्याच्या छाननीतून आणखी किती आणि कोणती गुपिते बाहेर पडतील व प्राॅपर्टीसोन यासारख्या माध्यमातून दडलेला किती काळा पैसा बाहेर येईल हे येणारा काळच ठरवेल. ९९% रक्कम बँकेत परत आली नसती तर रोख चलनाव्यतिरिक्त अन्य बेहिशोबी व काळे धन बाहेर कधीच आले नसते. म्हणूनच नोटबंदीचा निर्णय जाहीर करतांना “जो हेतू सांगीतला होता तो कोठे साध्य झाला” हा प्रश्न गैरलागू ठरतो. आज एक वर्षानंतर चलनातील रोकड ही पूर्वीच्या तुलनेत ७५% आहे पण वैध व्यवहारांच्या संख्येत मात्र वाढ होतांना दिसते आहे. एक वर्षात अर्थव्यवस्था मुळ पदावर परत येतांना दिसत आहे. ज्या क्षेत्रात उदा. घर बांधणी क्षेत्र, येथे मात्र मंदीची स्थिती आहे कारण या क्षेत्रात अनधिकृत व्यवहार व काळ्या पैशाचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर होता.  

आज व्यापारी वर्गाची नाराजी व ओरड सुरु आहे याचे कारण जीएसटी कायदा. या कायद्यामुळे आर्थिक व्यवहार लपविणे अवघड झाले आहे व रिटर्न भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. अर्थात, सरकारने कायदा लागू करताना दर ३ महिन्यांनी पुनरावलोकन करून सुटसुटीतपणा आणण्याची ग्वाही दिली आहे. काळा पैशाविरुद्ध कारवाइ करतांना भले तो रोख चलन स्वरूपात सापडला नसेल पण या रोख चलनाचा वापर करून स्थापन झालेल्या अनेक बोगस कंपन्या सापडल्या, त्याद्वारे भ्रष्टाचार उघडकीस आला व येतोय, वैध व्यवहारांची संख्यावाढतेय तसेच रिटर्न भरणार्यांची संख्या वाढल्यामुळे सरकारी महसूल वाढतोय. जरी ही उद्दिष्ट नोटबंदी जाहीर करतांना सांगितली नसली तरी या नोटबंदी व त्यानंतरच्या कारवाई प्रक्रियेत स्वाभाविकपणे साध्य झालेला तो एक टप्पा होता. बिलाल सापडलाच पण या कारवाइ दरम्यान मौलाना व त्याच्या कारवाया सापडल्या तर आनंद का मानू नये ? चित्रपटात अतिरेक्याविरुद्धच्या कारवाईचा हा प्रकल्प मर्यादित काळासाठी होता म्हणून या प्रकल्पाला “बेबी” नाव दिले होते पण लढा सतत सुरूच राहणार कारण तो देशहितासाठी अत्यावश्यक आहे. तद्वत नोटबंदीची कारवाईही ५० दिवसांची “बेबी” (मर्यादित कालावधी) कारवाई होती व देशहितासाठी काळ्या पैशाविरुद्ध ही मोहीम सदैव सुरूच रहावी. त्यासाठी देशप्रेमाने प्रेरित होऊन निरपेक्षपणे, एकही सुटी न घेता अव्याहतपणे काम करणाऱ्या पंतप्रधान नव्हे प्रधान सेवकास माझ्यासारख्या कोटी कोटी देशवासीयांच्या मनापासून शुभेच्छा !

बिंदुमाधव भुरे, पुणे