Wednesday, March 25, 2020

शिवरंजनीच्या निमित्ताने

चॅनल सर्फिंग करता करता झी क्लासिकवर येऊन थबकलो, "मेरा नाम जोकर" नुकताच सुरु झाला होता. रिलिज  झाला तेव्हा अपेक्षेइतका चालला नाही, किंबहुना पिक्चर तेव्हा तिकिटबारीवर साॅलिड आपटला होता अस म्हटल तरी चालेल. राजकपूरचा हा खुप महत्वाकांक्षी चित्रपट होता कारण त्याच्या रियल लाईफवर आधारित होता अस म्हणतात. त्यासुमाराला लता बरोबर बिनसलेल होत त्यामुळे या पिक्चरमधे एकही गाणी लताच्या आवाजात नव्हत असही तेव्हा कानावर आल होत. समोर पिक्चरच टायटल सुरु होत आणि मनात क्षणिक आलेले हे सगळे विचार काही सेकंदात जुन्या आठवणींमधे घेऊन गेले त्यामुळे खुप वर्षांनंतर पुनः एकदा हा पिक्चर पहायचा मूड आपोआप बनून गेला. 

या पिक्चरच्या सर्व गाण्यांवर तर फिदा पहिल्यापासुन होतोच. "ए भाय जरा देखके चलो" त्याकाळी खुप गाजल होत तरी माझ्या आवडीची खास म्हणजे आशाच "मोहे अंग लग जा बालमा", आशा व मुकेशच "आग ना लग जाए" आणि मुकेशच "जाने कहा गए वो दिन" ! पिक्चर त्याकाळात का पडला समजल नाही, पण म्हणे इतका पडला कि राजकपूर यापायी प्रचंड कर्जबाजारी झाला. 

राजचा बोलका चेहेरा, निळे डोळे यातून त्याच निरागस आणि "बिच्चारा" अस व्यक्तिमत्व  छान ऊभ रहायच. अगदी आवारा, श्री ४२०, जागते रहो, संगम, अनाड़ी असा कोणताही पिक्चर घ्या, एखादा सिन हा पठ्ठ्या असा देणार कि हमखास डोळ्यातून पाणी यायच. 

त्यामुळे कि काय माहीती नाही पण राजकपूर म्हटल कि मनाच्या कोपऱ्यात एक भोळाभाबडा, निष्पाप अशी विशिष्ट छबी कायम वसलेली असते. व त्यातून या पिक्चरमधे तिन्ही नायिका त्याचा शिडीसारखा वापर करतात अन् राजच त्यांच्यावरील प्रेम हे एकतर्फी होत हे त्याला कळत. 

या बॅगराऊंडवर जेव्हा शंकर जयकिशनने बांधलेली सुरवातीची अप्रतिम व आर्त सुरावट सुरु होते व मुकेशच्या धीरगंभीर अनुनासिक आवाजात "जाने कहा गए वो दिन" चे स्वर येतात, तेव्हा डोळ्यातले अश्रु दिसू नयेत म्हणुन काळा गाॅगल लाऊनही राजचे भरुन आलेले डोळे आपल्याला जाणवतात व नकळत आपणही डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा तेव्हा पुसतो. पिक्चर जेव्हां पहिल्यांदा पाहिला तेव्हा ह्रदयात झालेली कालवाकालव आजही होते इतकी ताकद या गाण्यात आहे, अर्थात चित्रिकरण प्रभावी आहे हे पण तेव्हढेच खर. त्यामुळेच या पिक्चरमधल हे गाण माझे सगळ्यात आवडत बनल. 

शास्त्रीय संगीतातल मला ओ कि ठो कळत नाही पण ह्रदय गलबलवून टाकणाऱ्या या गाण्याची सुरावट कोणत्याही रागाची असावी याचे कुतुहल तेव्हा निर्माण झाल होत. "शिवरंजनी" रागावर आधारित हे गाणी असल्याच माझ्या एका जाणकार दोस्ताने सांगितल. या रागातील सुरावटींनी जर आपल्या ह्रदयाचा कब्जा घेतला असेल तर याच रागातील अन्य गाणी पण साॅलिड असणार म्हणुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 

त्याकाळी ना काॅम्पुटर होता ना गुगल.  तेव्हा आमच्या दोस्तांपैकी जे सवाई गंधर्वला जायचे अन् काॅलेजमधे कट्ट्यावर दुसरे दिवशी ज्यांच्या गप्पा रंगायच्या तेथे मूक प्रेक्षक म्हणुन मी कायम हजेरी लावत असे. तेव्हा या माझ्या रागदारी जाणणाऱ्या मित्रांकडून मी संधी साधून माहिती काढण्याचा प्रयत्न नेहमीच करत असे.

एकदा मग मला हवी ती माहिती म्हणजे शिवरंजनी रागावर आधारित गाणी कोणती याची लिस्ट मिळाली. जी माझ्या आठवणीत राहिली ती अशी होती ...

१. ओ मेरे सनम ओ मेरे सनम - लता - संगम
२. दिलके झरोखोंमे तुझको -रफी-ब्रम्हचारी
३. मेरे नैना सावन भादो - किशोर - मेहबूबा
४. बहारों फूल बरसाओ -रफी- सूरज
५. लागे ना मोरा जिया - लता - घूंघट 
६. बनाके क्यों बिगाडारे - लता - जंजीर 

अशी किती तरी छान गाणी या रागावर आधारित असतील. बहुतेक गाणी ही पिक्चरमधे गंभीर दृष्य असतांना चित्रित झालेली दिसतात अपवाद सूरज मधील बहारों फूल बरसाओ गाण्याचा. शंकर जयकिशन जोडीने केलेली गाणी, त्याच आॅरकेस्ट्रेशन हे केवळ अप्रतिम ! जाने कहा गए व दिलके झरोखोंमे या गाण्यांच्या आधीची वाद्यवृंदांची सुरावट आठवून पहा. नतमस्तक कोणाकोणापुढ व्हाव प्रश्नच पडतो, अर्थपूर्ण शब्दरचना करणारा गीतकार कि गाण्याचा भाव अचूक ओळखुन त्याला योग्य न्याय देत ते चालबद्ध करणारा संगीतकार कि आमचे कान तृप्त करणारे गायक ? 

या रागाचा सिनेसंगीतात शंकर जयकिशन इतकाच प्रभावी वापर आरडीनेही केला आहे. जेव्हां जेव्हां मी मेरे नैना सावन भादो हे मेहबूबा मधील किशोरच्या आवाजातल गाण ऐकतो तेव्हा तेव्हा मला हे प्रकर्षाने जाणवत. पाश्चात्य व भारतीय वाद्यांच्या सुरावटींचा मिलाफ या रागात करतांना किशोरकुमारचा लागलेला आवाज (कि जो खास राजेश खन्नासाठीच गायला जायचा, आठवा आराधना व दाग मधील गाणी) ऐकला कि मनोमन आरडीला सॅल्यूट मारला जातोच.

आता काॅम्प्युटरचा जमाना आहे. तुमच्या मनात बसलेल, खुप आवडणार गाण आठवा आणि विचारा गुगलला कि ते कोणत्याही रागावर आधारित आहे ? मग त्या रागात बांधलेल्या असंख्य गाण्यांची यादीच स्क्रीनवर येईल. त्यातली आवडती निवडक गाणी डाऊनलोड करुन ठेवा अन् हेडफोन लावून ऐका, मस्त वाटेल, मूड छान होईल आणि महत्वाचे म्हणजे एकटक कधीच वाटणार नाही !

बिंदुमाधव भुरे, पुणे.
१९ जानेवारी २०१७

Tuesday, March 24, 2020

स्ट्रिमिंग

*स्ट्रिमिंग*

तेव्हा *स्ट्रिमिंग* शब्दाचा तांत्रिक अर्थ मला कळत नव्हता. इंटरनेटद्वारे एखादी व्हिडीयो क्लिप पहात असतांना मधेच स्क्रीन स्तब्ध होतो, थांबतो आणि त्यावर एक लहानसे वर्तुळ गोल गोल फिरत असते. मला काही कळायच नाही हे गोल गोल काय फिरतय ते ! 

मग कोणीतरी सांगितल कि इंटरनेटचा स्पीड कमी असला कि स्क्रीनवर अस एक वर्तुळ गोल गोल फिरत रहात. इतका का वेळ लागतोय ? मनात प्रश्नचिन्ह मात्र कायम ! जाणकार सांगायचे काहीतरी तांत्रिक भाषेत पण ते काही डोक्यात घुसायच नाही. मग एकाने सांगितल कि आपण संगणकावर पाहू इच्छित असलेली माहिती हवेत असते व ती खाली उतरुन स्क्रीनवर यायला जो वेळ लागतो ते म्हणजे ते गोल गोल फिरण, त्याला *स्ट्रिमिंग* म्हणतात ! पटल होत लगेच ! 

हळूहळू तांत्रिक सज्ञांचा अर्थ बऱ्यापैकी कळू लागला. त्यातल्या त्यात *रिबूट, सिस्टिम हँग, फॉरमँट, कंट्रोल आल्ट डिलिट आणि रिस्टार्ट* यासारख्या शब्दांचा उच्चार दिवसभरात इतक्यावेळा व्हायचा कि कदाचित पुणेकरांच्या जिभेवर आयला शब्दपण इतक्यांदा येत नसेल.

कालांतराने हे गोलगोल फिरण बंद झाल. ८-१० मिनिटांची व्हिडीयो क्लिप सलग पाहता येऊ लागली. पण खर सांगू पूर्वी त्या *स्क्रीनवर गोल गोल फिरणाऱ्या वर्तुळाकडे पहातांना मनात उत्सुकता* असायची. आता जर अस काही स्ट्रिमिंग क्षणभरासाठी जरी झाल तर *सैरभैर व्हायला होत. आमचा पेशंस कमी होत चाललाय, मनाची अस्वस्थता वाढत चालली आहे. आम्हाला थांबायला वेळ नाही.* 

 स्पर्धेच युग सुरु झाले त्याला काळ लोटला. या स्पर्धेने नंतर वेग पकडला आणि *आज या वेगाचीच स्पर्धा सुरु झाली आहे.* व्यापारी उदारीकरण व इंटरनेटमुळे अवघ जग मुठीत सामावल गेलय. अगदी सगळ्यात वेगवान इंटरनेट आमचच सांगणारी जाहिरातही नको तेवढा वेळ दिसत असते. खरच इतका वेग मानवाला हवा आहे ? आजच्या युगात *एखाद्या देशाचा मानबिंदू हा वेग बनलाय व त्याची प्रगती मोजण्याचे एक परिमाणही !* 

उत्क्रांतीच्या वाटचालीत अनेक शोध मानवाने लावले. अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींचे निदान व आकडेमोड करुन अचूक निष्कर्ष देणारा संगणक त्याने शोधला. या शोधप्रक्रियेत निसर्ग नियमांचे कळत न कळत उल्लंघन करणाऱ्या मानवाला कधी त्सुनामी तर कधी अतिवृष्टी यासारख्या घटनांच्या रुपांनी वठणीवर आणण्याचा प्रयत्न *"त्याच्याकडून"* झाला. काही काळासाठी *"त्याने"* सिस्टीम हँग केली म्हणूया आपण ! ज्या ज्या वेळी आपल्याला शक्तीचा गर्व झाला त्या त्या वेळी *"त्याने"* आपल्याला आपली जागा दाखविली आहे. 

आज सुइच्या टोकावर लाखोच्या संख्येने मावतील असा सूक्ष्म विषाणू अवतरला आहे. संपूर्ण जगावर या विषाणूने जणू डोळे वटारले आहेत. स्वैर भरकटलेल्या, प्रगतीचे वारु चौखूर उधळलेल्या मानवाने नियमांच्या चौकटीत रहावे यासाठी त्याला घराच्या चार भिंतीत *"त्याने"* बंदिस्त केलय. सगळ स्तब्ध झालेल जग पाहून मला उगाचच वाटून गेल कि हे *"त्याचे" स्ट्रिमिंगच* सुरु आहे. पडद्यावर पुढचे चित्र येइपर्यंत सगळ काही *स्तब्ध झालय.* 

हे गोल गोल फिरण थांबून पुनः स्क्रीन चालू होईल ? कि नियमांच्या चौकटी ओलांडल्या गेल्या तर *"तो"* सिस्टीम रिबूट करेल ? सध्या तरी *"त्याने"* जागतिक व्यवस्था हँग केली आहे. अँटीव्हायरस प्रोग्राम रन करतो तेव्हा अनेक फाईल्स *क्वारंटाईन* होतातच ना ? *संगणकाच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय आपण शोधल ते आपल्यावरच लागू करायला काय हरकत आहे ?* आपण सगळेच क्वारंटाईन होऊया म्हणजे स्ट्रिमिंग संपल्यावर पुनः एकदा सुखद चलचित्राची अनुभूती मिळेल ! अगदी गोल फिरणाऱ्या वर्तुळ असल तरी चालेल !

गुढी पाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा !

*©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे*
*९४२३००७७६१*
*८६९८७४९९९०*
*bnbhure@rediffmail.com*

Sunday, March 22, 2020

चौदा तास आणि ती पाच मिनिटे

*चौदा तास आणि ती पाच मिनिटे*

जीवाचा धोका पत्करुन जनसेवा देणाऱ्यांचे कौतुक करतांना आज सलग पाच मिनिटे चालणाऱ्या थाळीनाद, घंटानाद व टाळ्यांच्या आवाजाने ऊर भरुन आला. काल तिन्हीसांजेला पाखरांची किलबील शांत झाल्यानंतर नीरव शांतता होती. रात्रीतून केव्हातरी येणारा ओला ऊबेर गाड्यांचा आवाज, एखाद्या मोटरसायकलचा हॉर्न किंवा कुत्र्यांचे बेसूर भुंकणे संपून पहाटेची लगबग कधी सुरु झाली ते जाणवल नाही त्यामुळे कि काय सुर्योदया दरम्यान पक्षांची किलबिल प्रकर्षाने जाणवली. 

दिवसभर टीव्हीवर संपूर्ण देशाची हालहवाल दिसत होती. सुनसान रस्ते, सिमेंट काँक्रिटच्या जंगलातून गायब झालेले प्राणी, निर्मनुष्य रस्ते, हायवे, एसटीच्या डेपोत विसावलेल्या बसेस वगैरे. कधीकाळी दूरदर्शनवर रामायण सिरियल सुरु झाली कि रस्ते ओस पडायचे त्याची आठवण झाली. पण आज ही दृष्य पाहतांना मन धास्तावलेल होत. अनामिक भितीची झुळूक मनात स्पर्शून जाई तेव्हा नकळत अंग शहारुन जात होत.   

आज अस दृष्य दिसेल अस अगदी काल परवापर्यंत वाटत नव्हत. पं मोदींनी जनतेशी संवाद साधायच ठरवल आणि चौदा तास "जनता कर्फ्यू" च आवाहन केल. संपूर्ण बहुमत आहे, कायदा बनविण्याचे, राबविण्याचे स्वातंत्र्य आहे, यंत्रणा हातात आहे. मात्र हे सगळे मार्ग हातात असूनही हा माणूस जनतेच्या सहभागाचा मार्ग चोखाळायचे ठरवतो. ज्या रोगावर ईलाज नाही त्याला हरवण्याची शक्ती सामान्य जनतेमधेच आहे याची तो जनतेला जाणीव करुन देतो. 

केवळ ३०-३५ मिनिटांचे आवाहन ! जनतेच्या इच्छाशक्तीला केलेले आवाहन व त्यांंच्यावर व्यक्त केलेला विश्वास यातून आज "जनता कर्फ्यू"चे अविश्वसनीय चित्र निर्माण झाल होत. कोरोनाची दहशत असल्यामुळे लोकांनी घरी रहाणे पसंद केल याचे श्रेय मोदींना का ? असे बुद्धिवादी म्हणतीलही कदाचित् ! पण आजचा थाळीनाद, घंटानाद, टाळ्यांचा गजर हे देशभरातले दृष्य छोट्या पडद्यावर पाहिल्यावर हा परिणाम मोदींच्या आवाहनाचाच आहे हे मनोमन पटते. या पाच मिनिटांनी समस्त भारतीयांची मने सकारात्मक विचारांनी भारली होती. वाहिन्यांच्या पडद्यावर शरद पवारांसह अनेक नेत्यांना टाळ्यांच्या कौतुकसोहळ्यात सामील होतांना पाहून या माणसाच्या संघटन कौशल्य व नेतृत्व गुणांना पुनः एकदा मनोमन सलाम ठोकला. 

जनता कर्फ्यूचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता व कोरोनाच्या संभाव्य संसर्गाच्या व्याप्तीची दहशत लक्षात घेऊन कदाचित हा प्रयोग आणखी काही दिवस राबवला जाण्याचा निर्णय होईल. त्यातूनच या संकटावर मात केल्याचे चित्र भविष्यात दिसेल असा विश्वास बाळगूया. सरकार जे जे आवाहन करेल त्याला प्रतिसाद देऊया. एकजूटीने असाध्य ते साध्य होते हे जगाला दाखवून देऊया.

©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

Friday, March 20, 2020

२२ मार्च जनता कर्फ्यू

*२२ मार्च जनता कर्फ्यू*
*मी घरीच राहीन .....*
 🚷🚳🚷🚳🚷🚳🚷
*घराबाहेर पडलात तर*
*"तो" म्हणतो मी येईन !*

*इकडे तिकडे लावलात हात तर*
*"तो" म्हणतो मी येईन !*

*मास्क लाव, हात धू कारण ...*
*एकदा का "तो" शिरला आत तर*
*कसा बरे बाहेर जाईल ?* 

*नको टेंशन नको भिती* 
*पाळून जनता कर्फ्यू*
*होऊया सगळे क्वारंटाईन !*

*२२ मार्च ला १४ तास मी*
*घरीच राहीन, घरीच राहीन !*

*©बिंदुमाधव भुरे.* 
😊😊