Wednesday, October 31, 2018

असेही एक मनोगत

असेही एक मनोगत !

(१) "आताच आत नेल आहे.  साधारण दोन तास लागतील ऑपरेशनला, तासभर रिकव्हरी रुममधे ! भूल उतरेपर्यंत आणखी एखादा तास ! पण आज शक्यतो कोणाला भेटू देऊ नका म्हणाले आहेत डॉक्टर !"

"नाही, ठीक आहे. कळाल्यावर अगदीच रहावल नाही म्हणून चौकशीला आलो. भेटाव बघाव अस वाटतच असत असे काही समजल्यावर ! पण काही मदत लागली तर हक्काने सांग, काळजी घे, धावपळीत स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष दे."

(२) "अजून किती दिवस असे काढायचे ? एक एक दिवस वाढतोय तसा खर्च वाढतोय. तात्यांची पुंजी तर कधीच संपली, वेळेवर निर्णय नाही घेतला तर आपण भिकेला लागू."
 
"अस बोलवत तरी कस तुला ? आईकडे बघ, तिच्या भकास चेहेऱ्यात अजूनही आशावाद दिसतोय रे ! आपण तिच्याशी बोलून ठरवूया न ! 

 "बस, पुरे आता. नका करु त्यांचे आणखी हाल. डॉक्टरांना म्हणाव काढा त्या नळ्या आता. अन् तुम्ही त्यांच्या पुढ्यात उभ राहून एकदा सांगा त्यांना कि "आईची नका काळजी करु, आम्ही आहोत, संभाळू आम्ही तिला." म्हणजे सुटतील ते यातनातून आणि ..... आणि ...... तो कावळा मग वेळेत शिवेल पिंडाला "

 
(३) "काय रे ? काय झाल ? कोण आजारी आहे ? कि भेटायला कोणाला ?" 

"अरे काही नाही. आमच्या हिला अँडमिट केलय काल. टिपिकल गायनिक प्रॉब्लेम. स्कोपी करणार आहेत, काही विशेष नसेल तर सोडतील उद्या. नाहीतर पिशवी काढतील. छोटस ऑपरेशन अन् परवा डिस्चार्ज ! तू कोणासाठी आला आहेस ?"

"अरे एक मित्र आहे, कालच बायपास झाली. घरी दुसरे कोणी नाही. दोन्ही मुले युएसला. एक निघाला आहे यायला. त्याच्या बायकोला मी म्हणालो कि नका एकट्या दगदग करु. मी थांबेन रात्रीला त्याच्याजवळ, तुम्ही घरी जा, थोडी विश्रांती घ्या."

 

(४) “काही नाही रे, नुसते लुटायचा धंदा ! अँडमिट करतानाच विचारणार “इन्शुरन्स आहे का ?” आपण हो म्हटले कि यांचे मीटर सुरु. परवाच फेसबुक वर एक क्लिप पहिली. भांडूप का मुलुंड मधल्या एका हॉस्पिटलची. सुपर स्पेशियालीटी हॉस्पिटल. गरीब दिसत होती फँमिली बिचारी. आधीच विचारले खर्च किती होईल ? त्यांनी अडीच लाख एस्टिमेट दिले. प्रेग्नंट बाई, तिला डेंगू झालेला. पोटातल पोर गेल, आदल्या दिवशी धावपळ करून पस्तीस हजार भरले. दुसरे दिवशी यांची मागणी किती असावी ?”

“ किती ?”

“ अरे, तीन लाख भरा म्हणे अजून, त्याशिवाय डिस्चार्ज देत नाही म्हणाले”

“ मग ? भरले का शेवटी? “

“ छे ! कुठून भरणार ? दोन दिवस पायपीट करत होते नातेवाईक. मग एकाने सुचविले कि भेटा इथल्या नगरसेवकाला ! आली मग त्यांची पाच सात माणसे. जाब विचारला व प्रत्येक बिल न् बिल तपासतो म्हणाले. अडीच लाखाचे साडेसहा लाख कसे झाले ते दाखवा नाहीतर एक पैसा न भरता पेशंट घेऊन जातो, काय करता बघू असा दम भरला “

“मग काय, राडा  झाला असेल नाही ?”

“ छे छे. अरे ते भरलेले पस्तीस हजारही परत केले अन निमुटपणे डिस्चार्ज दिला”

 

(५) “ हलो ! आत्ताच झाली डिलिवरी ! मुलगी आहे, वजन साडे सहा पौंड आहे. छान गोरी आहे अन जावळ भरपूर आहे. एक नर्स घाईघाईत बाहेर येऊन सांगून गेली. तसा लगेच फोन करतोय तुला.  अजून मी पाहिलेल नाही. आई, तु लगेच ये ना ग ! डबा वगैरेच्या भानगडीत नको पडू, मी खाइन इकडेच काहीतरी.  तू येईपर्यंत मी इथे बसल्या बसल्या काही फोन करतो आणि आपल्या नातेवाइकांच्या ग्रुप वर मेसेजेस टाकतो."

या मजल्यावरच्या कॉरीडॉरमध्ये माझ्या बरोबरीने आणखी चार जण आहेत. अनेक प्रकारची, भिन्न भिन्न स्वभावाची मंडळी येथे येतात, त्यांच्या सुख द:खांचे आम्हीच साक्षीदार ! त्यागाची मूर्तिमंत उदाहरणे पाहिली, जीव ओवाळून टाकावा अशी मित्रताही अनुभवली. कट्टर हेवेदावे, एकमेकांची उणीदुणी काढणारे, गडगंज पैसा बाळगणारे परंतु बीलाचे पैसे भरायची वेळ येताच उफाळून येणारा त्यांच्यातील दरिद्री स्वभावाचे, मनोव्रुत्तीचे वेगळेच रुप पाहिले. समानतेच्या युगात मुलगी झाल्यावर आनंद ओसंडून जातांना पाहिलाय तसेच परत मुलगीच झाल्याचे समजल्यावर दोन दोन दिवस न फिरकणारी उलट्या काळजाची मंडळीही पाहिली !

हॉस्पिटल म्हटले कि दु:खच जास्त. बरा होऊन जाणारा पेशंट असेल तर मंडळी आनंदात पण दिवसभरातून एखादा तरी दगावतो तेव्हा त्यांचा टाहो हृदय हेलावून टाकणारा असतो. रात्रपाळीचे लोक कामावर असतात तेव्हा त्यांच्या खाजगी आयुष्यातील घडामोडी जशा कानावर पडतात तेव्हा बऱ्याचदा कानावर हात ठेवतो तर हॉस्पिटलमध्ये चालणाऱ्या नको त्या गडबडी कळतात तेव्हा कान टवकारुन ऐकतो. खरच काही काही घटना पाहतांना वाटत रहाते कि माझा आतला आवाज, मनाची होणारी घुसमट मांडायची सोय असली असती तर ... ?

असो .... गेली अनेक वर्षे आम्ही इथे आहोत. एका आमदाराची कृपा. स्वत:चे नाव टाकून पेशंटच्या सोयीसाठी म्हणून आम्हाला इथे बसवले आहे. आमदार निधीचा सदुपयोग आणि स्वतःची कार्यसम्राट म्हणून फुकट प्रसिध्दी ! दोन्हीही साधलय बेट्याने. वॉर्डबॉय फरशी पुसतांना रोज दोनदा तरी आमच्या पायांवर फडक मारतो पण कधी आम्हाला नीट पुसावं अस काही वाट नाही त्या बिचाऱ्याला ! आता झाली अनेक वर्षे, आमचीही वय झालीत आता. कधीतरी एक दिवस उजाडेल अन् भंगारात वाट लागलेली असेल आमची ! विचारलच कोणी तर सांगू कि पुढच्या जन्मी एखाद्या बागेत जागा द्या. कधी तरी तरुणाइच्या सान्निध्यात आनंद घेऊ तर कधी वृद्धांचा विसावा बनून त्यांना आनंद देऊ ! आम्हालाही अगदी सगळे नाही तर थोडेसे अच्छे दिन आले तर चालतील !

 
©बिंदुमाधव भुरे, पुणे.

Friday, October 19, 2018

परतफेड

श्री लक्ष्मणराव ढोबळे, वय ७०, डॉ समीरना नाव ओळखीचे वाटले. त्यांना बसण्याची खूण केली. पांढरे स्वच्छ धोतर, अंगात काळा कोट, डोक्यावर गांधी टोपी ! ३२ वर्षांपूर्वीचा तोच चेहरा, करारीपणा थोडा मावळला होता, वयोमानापरत्वे चाल मंदावली होती. उजव्या हातात आधारासाठीची काठी, पण ती नाईलाज म्हणून असे चेहरा सांगत असावा कि तोच एकमेव आधार याची सूचक होती ?

डॉ समीरने "कसे आहात ? काय होतंय ?" वगैरे चौकशीआर्जवीपणाने केली. लक्ष्मणरावानी चालताना दम लागणे वगैरे तक्रारी सांगितल्या व काही रिपोर्ट्सच्या आधारे फँमिली डॉ देशमुख यांनी बायपास करावी लागेल असे सांगत त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितले असे म्हणाले. समीरने रिपोर्ट्स पाहिले होते, डॉ देशमुख यांच्याशी फोनही झाला होता. त्यामुळे ऑपरेशन तातडीने करावे लागेल हे त्याच्या लक्षात आले होते.

“घरी कोण कोण आहे ?” समीरने प्रश्न केला. उजव्या हाताचे बोट उभे दाखवून “एकटाच” असे त्यांनी खुणेने सांगितले. “मग जेवणाचे काय ?” समीरचा एक साहजिक प्रश्न ! एव्हाना लक्ष्मणरावानाही मोकळेपणाने बोलावेसे वाटू लागले होते. “मुलगी व जावई यांच्याकडे राहतो. जावई भला माणूस हो ! खासगी नोकरी आहे, मुलगीही फावल्या वेळात घरगुती व्यवसाय करून संसाराला हातभार लावते. डॉक्टर, मी सत्तरी ओलांडली आहे, आता या वयात बायपासचा इतका मोठा खर्च कशाला ? मुलगी, जावई ओढाताण करुन पैसा उभा करतीलही पण ते मला नको आहे. तुम्ही काहीतरी औषधे द्या जेणे करुन त्रास कमी होईल व तब्येतीला काही दिवस आराम पडेल." 

डॉ समीरने सगळे काही शांतपणे ऐकून केलेले स्मितहास्य लक्ष्मणरावांना दिलासा देउन गेले. त्याने लक्ष्मणरावांकडून मुलीचा व जावयाचा फोन नंबर घेतला. सँपल आलेल्या औषधातून काही गोळ्या देत त्यांना "काळजी करु नका, सगळ काही ठीक होईल, निर्धास्त रहा" असा दिलासा दिला.  सगळे पेशंट तपासून झाले. समीरने घड्याळात पाहिले व श्री देसाईंसरांना फोन केला. श्री लक्ष्मणरावांच्या केसबद्दल कानावर घातले. "पैशाची फिकीर करू नकोस, ऑपरेशनची तयारी कर. गुरुजींच्या तब्येतीची काळजी माझ्याकडे लागली." देसाईंच बोलणे ऐकून समीर हसला व म्हणाला "सर, मी त्यासाठी नाही फोन केला. तुम्हाला कल्पना असावी म्हणून कानावर घातले इतकेच ! त्यांच्या मुलीशी व जावयाशी मी बोलतो आहे. ऑपरेशन झाले कि पुनः फोन करेन" असे म्हणून समीरने फोन ठेवला.

समीरचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला होता. वडिल गजानन, शिक्षण जेमतेम पदवीपर्यंतचे. शिक्षण पूर्ण करुन लवकरात लवकर नोकरी धरणे ही त्यांच्या घरातील परिस्थितीची मागणी. त्यामुळे एका खाजगी व्यावसायिकाकडे गजाननने नोकरी पत्करली व मोकळ्या वेळेत चौथी पर्यंतच्या मुला मुलींच्या शिकवण्या घेऊन घराचा चरितार्थ चालवला. आई थकलेली ! तिचा सारखा हेका सुरुच "गजा, आता लग्न कर, सुनबाई आण बाबा. माझाच्याने होत नाही आता."

आईच्याच लांबच्या नात्यातली एक मुलगी मामाने सुचविली, गजाने होकार दिला अन् फारसा गाजावाजा न करता अगदी साधेपणाने लग्न पार पडले. सुनबाई - वसुधा, गृहलक्ष्मी घरी आली, घराला घरपण आले. माऊली सुखावली. समीरचे - नातवंडाचे तोंडही तिने  पाहिले होते. आजारपण, अंथरुणाला खिळून रहाणे, सारखा दवाखाना वा हाॅस्पिटल यापायी सगळ्या घराच अर्थकारण न बिघडवता माऊलीने झोपेतच राम म्हणत पैलतीराच्या यात्रेचा प्रारंभ केला. 

ज्या सुखाची, समाधानाची व आनंदाची वाट पाहिली ते पदरी पडले, अनुभवले ! आता कशाल थांबायचे ? मुलाला व सुनेला वाटेल काही काळ कि अकाली गेली म्हातारी ! पण घरादाराला आजारी पाडून जाण्यापेक्षा अशी एक्झिट कितीतरी चांगली अशी स्वतःच्या मनाची व बायकोची गजाने समजूत घातली व दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला.

गजाची खाजगी नोकरी व जोडीला शिकवण्या सुरुच होत्या. समीरमधील बुद्धिमत्ता त्याच्यातल्या शिक्षकाने हेरली होती. शिक्षणाअभावी व परिस्थितिच्या रेट्यामुळे आपली जी आर्थिक स्थिती आहे त्याची सावली समीरवर पडू नये यासाठी त्याची धडपड सुरु होती. स्पर्धेच्या आणि दिखाऊपणाने भरलेल्या जगतात घरगुती शिकवण्या ऐवजी पालकांचा कल मुलांना हायफाय क्लासमधे टाकण्याकडे आता सुरु झाला होता. परिणामी शिकवण्यातून मिळणाऱ्या ऊत्पन्नात घसरण होऊ लागली. वसुधाने हे वेळीच ओळखले व संसाराचा सगळा व्यापक संभाळून छोटासा घरगुती केटरिंग व्यवसाय करु लागली.

समीरचा कल मेडिकलकडे होता. त्याच्या गुरूजनांनी ते कधीच ओळखल होत मग गजाननाच्या नजरेने ते हेरले नाही असे कसे बर म्हणता येइल ? सोंग साऱ्या गोष्टींची आणता येतील पण पैशाच कुठून आणणार ? अंथरुण पाहुन पाय पसरावे ही म्हण बाबा अक्षरशः जगतांना पहात पहात समीर लहानाचा मोठा झाला होता. घराच्या आर्थिक गणिताचा भार पेलण्याइतका नसला तरी ते कळण्याइतका तो मोठा झाला होता. 

रिझल्टचे पेढे गणरायासमोर गजा व वसुधाने ठेवले. समीर बोर्डात आला होता, चहुकडून कौतुकाचा वर्षाव सुरु होता, मिडियाचे कँमेरे व मुलाखती यांना सामोऱ्या जाणाऱ्या लेकाला पाहून त्या दोघांनाही आयुष्याचे सार्थक झाल्याची अनुभूती पदोपदी येत होती.
पेढे घेऊन समीर ढोबळे गुरूजींकडे निघाला होता. जातांना मनात असंख्य विचार घोळत होते.  पेढे देऊन त्याने ढोबळे गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांनी प्रश्न केला, "समीर, काय ठरवले आहेस पुढे ?" "सर, एखादा पार्टटाइम जॉब करावा किंवा आईला केटरिंगला मदत तरी करावी. इच्छा तर आहे मेडिकलला जायची पण, ते केवळ अशक्य आहे सर !" गुरुजी समीरची आर्थिक स्थिती जाणून होते पण समीरच्या गुणवत्तेवर त्यांचा कमालीचा विश्वास होता. "आपण बघूया काय करता येईल ते" असे धीराचे बोल व आशीर्वाद ढोबळेगुरुजींनी दिला.

समीर जाताच गुरुजींनी तडक देसाई इंडस्ट्रीजचे ऑफिस गाठले. श्री अभिजीत देसाई मिटींग संपवून आपल्या केबिनकडे निघाले होते. केबिनबाहेर सोफ्यावर श्री ढोबळेगुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला व हात धरुन केबिनमधे नेले. पाण्याचा घोट घेत गुरुजी म्हणाले "तुझा जास्त वेळ नाही घेणार अभिजीत ! थेट मुद्द्यालाच हात घालतो" असे म्हणून त्यांनी समीरची केस सांगितली व म्हणाले "अभिजीत, हा मुलगा डॉक्टर व्हायला हवा, याच्यातली गुणवत्ता अशी वाया जाता कामा नये. याच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी तू उचलावीस." गुरुजींच्यामुळेच आज देसाई इंडस्ट्रीज व अभिजीत देसाई यांना एक ओळख होती. "गुरुजी तुम्ही आज्ञा करा, तुमचा तो अधिकार आहे." अभिजीतच्या आश्वासनाने गुरुजींना भरुन पावल्यासारखे झाले.

ज्या ढोबळे गुरुजींमुळे समीर आज प्रख्यात डॉक्टर होता त्या ढोबळे गुरुजींनी अभिजीत देसाईंकडे शब्द टाकला नसता, किंवा देसाईंनी शिक्षणाचा खर्च केला नसता तर ? समीर या दोघांच्याही ऋणात राहू इच्छित होता. आज ढोबळे गुरुजी हे श्री लक्ष्मणराव ढोबळे, एक हार्ट पेशंट म्हणून समीरकडे आले होते. डॉ समीरने ऑपरेशन यशस्वी केल होत. मुलगा व जावई त्यांना हॉस्पिटलमधून घरी न्यायला आले होते. लक्ष्मणरावांनी लेकीला विचारले, "बाळांनो, बिलाचे पैसे कसे उभे केलेत ?" जावयाने त्यांचा हात हातात घेत सांगितले "बाबा, डॉ समीर यांनी फी लावली नाही तर देसाईंनी हॉस्पिटलचा खर्च उचलला. आणि हे दोघेही तुमचे विद्यार्थी आहेत."

डॉ समीर व अभिजीत दोघांनीही गुरुजींना वाकून नमस्कार केला. गुरुजींनी पाणावलेल्या डोळ्यांनी दोघांच्याही पाठीवर मायेने आशीर्वादाचा हात फिरवत प्रश्न केला "अरे, आधी काहीच का बर नाही बोललात दोघेही ?" "गुरुजी, मग तुम्ही ऑपरेशनला नकार दिला असता" डॉ समीरने समजावले. "तुमच्या ऋणात सदैव रहायला आवडेल आम्हाला गुरुजी कारण त्याची परतफेड करावी म्हटले तरी कशानेच होत नसते" अभिजीतच्या बोलण्यावर गुरुजींनी मान डोलावली व त्याच्या गाडीत बसतांना समीरला हात केला. गाडी वळणावर दिसेनाशी झाली अन् समीर हॉस्पिटलच्या केबिनमधे परतला.

© बिंदुमाधव भुरे, पुणे.