Saturday, February 20, 2021

बापाच काळीज

"बाबा, मी खेळायला जाऊ ?"
डिजिटल युगात टच स्क्रीनला चटावलेल्या पिढीतल एक निरागस पोर बापाला आर्जव करतय.  

समोरच्या लॅपीवर नजर रोखलेल्या अवस्थेत बाप नुसतच "हं" म्हणतो अन् पोरग .... ??? 
एकदाच वाचलेला धडा .. 
त्यावर गुरुजींनी विचारलेला प्रश्न ... 
टेंशन आलेल असतांना न अडखळता देता आलेल उत्तर ... 
आणि गुरुजींच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रीत मंद स्मित ...
हे पाहिल्यानंतर होणारा आनंद .‌.. 
आज बाबांनी "ह" म्हटल्यावर झालेल्या आनंदा एवढाच मोठ्ठा होता. 

आई मात्र किचन मधून ... 
"अरे, कशाला हो म्हटलं ? होमवर्क केवढा तरी राहिलाय त्याचा !"  .....
बहुतेक सगळ्या आया सेमच असतात नाही ? सेंचुरी ठोकलेल्या सचिन आऊट झाल्यानंतर "थोडा आणखी खेळायला हवा होता" म्हणणार ....  
१००% मार्क्स पडल्यावर ... आता हे टिकवून ठेवायचे बर का ? असे कौतुकाचे बोल आडवळणाने येणार ! .....
पोरगा खांदे उडवत बाबांकडे कटाक्ष टाकतो .. अन् डोळे मिचकावत त्यांना एक मिश्कीलपणे स्माईल देत बाहेर धूम ठोकतो.

चौथी आणि सातवीत स्काॅलरशिपला अट्टाहासाने बसवलेल असत ....  का ? तर १० वी चा पाया पक्का होतो म्हणे.....
पण मन कायम ओढ घेत असायच सोसायटीच्या आवारात पाट लावून उभा केलेला स्टंप, टेनिस बॉल, एकदम असली वाटेल अशी MRF CEAT वगैरेंचा स्टीकर लावलेली बॅट आणि फोर, सिक्स आऊटे या दंग्याकडे ... 

नववी संपतांना कळत कि यावर्षी मे महिन्याची सुटी  कुर्बान करायची.....
१० वीचा पाया आणखी पक्का करायचा असतो म्हणून ...
शाळेच्या उंबरठा पहिल्यांदा ओलांडला तेव्हा "मोठेपणी कोण होणार ?" घरी आलेल्या प्रत्येक आगंतुकाने विचारलेला प्रश्न ? ....
आणि चरकातून दहावेळा घातलेल्या उसाचा चिप्पाडा झाल्यागत दिलेल उत्तर .. "डाॅक्टर, इंजिनिअर, वकील !"
हे सगळ आजही कानात घुमतय ! 

खिन्न मन कायमच आक्रंदायच .....
"अरे, मला काय आवडते .. हे कधी कोणी विचारणार का ? 
एखाद्या वाढदिवसाला MRF स्टीकरवाली बॅट देत "जा बेटा, खेळ हवं तेव्हढ" असं कोणी म्हणेल ? ....्
पिक्चर संपतानाअमरीश पुरी तरी म्हणाला होता सिमरनला " जा बेटा, जी ले अपनी जिंदगी !" ...
नाही आपल्या नशिबी .... म्हणून तर बाबांनी त्याला आज "ह" म्हटलं नसेल ? 

या रेसमधे इच्छा नसली तरी माणूस ढकलला जातो, पायांचे तुकडे पडेपर्यंत धावत असतो.. बालपण आणि निरागसता कशाला म्हणतात हे तो जणू विसरुन गेलेला असतो. पण आज "बाबा, मी खेळायला जाऊ ?" यावर "ह" अस म्हणुन बाबा मूक संमती देतो तेव्हा त्या पोराच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद बाप तिरक्या नजरेने न्याहाळत स्वतःच बालपण तर त्यात शोधत तर नसेल ?

बापाने कायमच असल्या प्रश्नांचा कठोर सामना केलेला ! डोळ्यांच्या कडा पाणावल्या असे वाटायच्या आत 
"रडू नको मुलींसारख मुळुमुळू" 
म्हणुन करड्या शिस्तीचा बडगा उगारला जायचा. 
आज त्या आठवणींमुळे ओलावणाऱ्या कडा दिसू नयेत म्हणून तर आज "ह" असा प्रतिसाद बाहेर पडला नसेल ?

साॅफ्टवेअर इंजिनिअर होत त्यान बापाच स्वप्न पूर्ण तर केल पण त्यासाठी स्वतःच्या आयुष्यातले निसटलेले सुंदर क्षण मुलाच्या आयुष्यात देण्याचा प्रयत्न तो करत असावा.... 
वाळू मुठीत धरण्याचा केलेला प्रयत्न फसतो कारण वाळू निसटते. आयुष्यातील त्या क्षणांचेही असेच काहीसे असावे का ?  .....
त्यामुळे आता मुलाच्या आयुष्यातील असे क्षण ओंजळ धरुन जपण्याचा त्याचा प्रयत्न जणू काही .. 
एल आय सी च्या बॅनरवर "योगक्षेम वहाम्यहम" मधे ओंजळीने ज्योतीला सुरक्षित ठेवतात ... जणू तसा भासत होता ...

उतारवयात आधार असणारी हातातली काठीही हिसकावून घेणाऱ्या युगात पोरग आपली काठी बनून राहील ही अपेक्षा त्या "ह" मधे दडली तर नसेल ? 
बापाचे काळीज ... या काळजाला घरे पडली तरी याच्या मायेची पाखरण कधीच कळून येत नाही, उघड्या डोळ्यांना दिसत नाही .... 

पुष्पा, I hate tears म्हणणाऱ्या राजेश खन्नाच्या डोळ्यात तरंगणारे अश्रू पाहून शर्मिला त्याला प्रश्न विचारते तेव्हा नजर चुकवत तो सहज बोलून जातो "अरे ये आज बाहर कैसे आगए ?"  

पुरुष मंडळींच असंच असत काहीस !!! अव्यक्त अस अमरप्रेम ! 

(समस्त बाप जमातीला अर्पण)

©बिंदुमाधव भुरे, पुणे 
९४२३००७७६१/८६९८७४९९९०
bnbhure@rediffmail.com

Saturday, February 6, 2021

संस्मरणीय अकलूज

अकलूज ट्रीपचा विषय खरे तर श्री चव्हाण साहेबांनी लावून धरला होता आणि त्यातून या ट्रीपला सपत्नीक यावे हा त्यांचा आग्रह होता. एखादा निर्णय घेतला कि तो पूर्णत्वास कसा न्यायचा याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्री चव्हाण साहेबांनी *"ठरविली आणि प्रत्यक्षात आणली"* अशी ही *अकलूज ट्रीप !* अर्थात *श्री वाघोलेंचे निमंत्रण व जबरदस्त इच्छाशक्ती* यामागे एखाद्या चुंबकाप्रमाणे कार्यरत होती हे काय वेगळे सांगायला हव ? 

*"हमारे आदमी"* चारो तरफ फैले हुए है हा खास फिल्मी डायलॉग ! निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी *श्री प्रकाश जहागिरदार* हा असाच एक *"खास आदमी"* ! एक कुशल संघटक म्हणून अनेक गुण त्यांच्यात उपजत सामावले असल्याचे त्याने अनेकदा सिद्ध केले आहे. बस ठरविणे, कार्यक्रमाची रुपरेषा आखणे, माहितीचे आदानप्रदान यासाठी स्वतंत्र व्हाॅटस अप गृप करणे, त्यावर वेळोवेळी सूचना टाकणे, एकूण खर्चाचा अचूक अंदाज मांडणे, चोख हिशोब ठेवणे आणि "असू दे, राहू दे, नको नको" असे सांगूनही पैसे रिफंड करणे ... हे सगळे म्हणजे *प्रकाश के लिये बाये हाथका खेल !* 

या ट्रीप चे मला आणखी जाणवलेले वेगळेपण म्हणजे *वेळेचे काटेकोर अन् अचूक प्लॅनिंग !* रेल्वे क्राॅसिंगला फाटक उघडे पर्यंत वहानांना वाट पहायला लागते. काही वेळा रेल्वे लेट असते तर काही वेळा आपण लवकर आलेलो असतो. पण रेल्वे जावी, फाटक उघडावे आणि आपल्याला कणभरही वेटिंग न करावे लागणे. अशावेळी जो आनंद होतो तोच अनुभव काल प्रत्येक पिक-अप पाॅइंटला आम्ही घेतला. तीच बाब पुढील प्रत्येक टप्प्याची ! ब्रेकफास्ट, अकलूजला पोहोचण्याची वेळ, साइट सिइंग च्या वेळा, जेवणाची वेळ, परत निघण्याची व पुण्यात पोहोचण्याची वेळ ... *टायमिंगची इतकी परफेक्ट  किमया* साधली गेली कि त्याची तुलना सचिनने अफलातून मारलेल्या देखण्या स्ट्रेट-ड्राइव्हच्या टायमिंगशी व्हावी ! 

अकलूज आणि लावणी महोत्सव यांचे नाते सर्वश्रूत आहे. त्यामुळे कि काय या शहरा बाबद अनेकांच्या मनात वेगळीच अशी प्रतिमा अकारण तयार झाली होती. अकलाई देवी व श्री गणेश मंदिर आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिवसृष्टी या स्थळांच्या भेटीने अकलूजची मनात असलेली प्रतिमा बदलली. एक आदर्श पर्यटन स्थळ किंवा must visit destination अशी गणना अकलूज ची केली जावी असे मला वाटते.  एखाद्या गावाचा सांस्कृतिक वारसा, तेथील परंपरा, चालीरीती, माणूसकीचा प्रवास वगैरे जाणून घ्यायचे असेल तर माणसाने त्या गावाने जपलेल्या, विकसित केलेल्या अशा ऐतिहासिक खाणाखूणांचा अभ्यास करावा असे मला उगाच वाटून गेले.

श्री वाघोले कुटूंबियांनी प्रेमाच्या व आपुलकीच्या भावनेने केलेले स्वागत, आदरातिथ्य, पाहूणचार हे सारे काही जणू *"यही तो है इस मिट्टी की खूषबू"* असे सांगून गेल्या.  त्या गावाची परंपरा जणू त्या सगळ्यांनी अलगद उलगडून दाखविली. त्यांचे आभार मानण्याची औपचारिकता करावी का असा प्रश्न मनात घोळत राहिला. मित्रांनो, आपल्या गृपच्या भविष्यात अनेक ट्रीप्स होतील, आपल्यातील कौटूंबिक नात्यांचे बंध नव्याने विकसित होतील, मैत्रीच्या नात्याला फुललेली पालवी नव्याने बहरेल पण *अकलूज ट्रीपची छबी मनाच्या एका कोपऱ्यात सदैव टवटवीत राहील ... अगदी परततांना श्री वाघोले कुटूंबियांनी भेटीदाखल दिलेल्या रोपट्यासारखी ..  हे मात्र नक्की !* 

टीप : वरील विवेचन तसेच शशांक व इतरांनी लिहिलेलया कमेंट्स वाचल्यानंतर आपण खूप काही मिस केले असे वाटणाऱ्यांनी पुढची ट्रीप चुकवू नये. 

श्री बिंदुमाधव भुरे. 
५ फेब्रुवारी २०२१