Friday, July 1, 2022

आम्ही वारकरी

बॅन्केतील निवृत्त मंडळींचा आमचा एक गट नित्य नियमाने वारीचा एक टप्पा काही वर्षे भक्तीभावाने करतो आहोत. मात्र गेली दोन वर्षे लाॅकडाऊनमुळे वारी बंद होती.‌ प्रतिकात्मक म्हणून आम्ही काही मोजकी मंडळी वारी मार्गावर काही पावले चालून परत येत होतो. यावर्षी माऊली कृपेने सगळी बंधने दूर झाली आणि आमचा उत्साह दुणावला. दरवर्षी १५ ते २० दरम्यान असणारी संख्या यावर्षी २६ झाली. 

तर असे हे "स्पेशल २६" वारकरी शनिवारी दि २५ जूनला सकाळी ६ वाजता नळ स्टाॅप चौकात जमायला सुरुवात झाली. सगळ्यांनी पांढरा झब्बा, डोक्यावर पांढरी टोपी असा वेष तर काहींच्या हातात टाळ दिसून येत होता. भाली टिळा लावण्याचा कार्यक्रम सुरु असतानाच बसचे आगमन झाले आणि आम्ही विठू माउलीचा जयघोष करत सासवड मार्गे जेजुरीला रवाना झालो. सासवडला पालखीचा मुक्काम होता, मनी विठ्ठलाचा भाव होता, त्यामुळे सगळ्यांनी भक्तीभावाने दुरुनच पालखीचे दर्शन घेतले. 

यावेळी जेजुरी ते वाल्हे असा टप्पा आयोजकांनी ठरवला होता. जेजुरीला उतरलो आणि वारीमार्गावर पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती आली. जणू एका अदृश्य लहरीच्या स्पर्शाने मनात खोलवर दडलेला भक्तीभाव अलगद, तरंगत वर मन:पटलावर यावा असे काहीसे वाटून गेले‌ आणि आम्ही वारकरी बनून गेलो. 

वारकऱ्यांसोबत पाय चालत होते, मुख विठ्ठल नाम घेत होते त्यामुळे थकवा जाणवला नाही. वारी मार्गाची धूळ आपल्या चरणांना लागते आहे ही भावना एक वेगळीच उर्जा, चैतन्य शरीरात निर्माण करते, एक वेगळे समाधान मनाला लाभते याचा पुनरानुभव आला, अन्य वेळी आपण सलग इतकी पायपीट करुच शकत नाही, खरय ना ? 

शरीरात असलेल्या मनात खोलवर दडलेला विठ्ठलाचा भक्तीभाव आपल्याला एक दिवसाचा वारकरी बनवतो आणि पुढच्या वारीची ओढ मनात रुजवतो. वारीत सहभागी होताना आपल्या मनात भक्तीभाव तर असतोच, पण त्याचबरोबरीने आपल्या मनात एका छोट्या सहलीचा उद्देशही असतो. जुन्या सहकाऱ्यांसोबत दिवसभराच्या सहवासाची ओढ आणि गत काळातील आठवणींना मिळणारा उजाळा यांचे आकर्षणही असते पण मनात भाव मात्र विठ्ठल भक्तीचाच असतो. 

नामाचे महत्त्व विषद करतांना जसे गोंदवलेकर महाराज सांगतात कि भोजनाचा स्वाद प्रत्येक घासा गणिक कौतुक करत घेणे काय किंवा भोजन पोट भरण्यासाठी करणे काय शेवटी ते योग्य स्थळी पोहोचून आपले काम करत असते. त्यामुळे मनात अन्य कोणत्याही विचारांची गर्दी असली तरी मुखी सदैव राम नाम घेत रहावे. कालांतराने मन स्थिरावेल आणि जीवन राममय होईल. तद्वत वारीत सहभागी होणे महत्त्वाचे !

हे उदाहरण आमच्या वारीलाही तंतोतंत लागू होईल. त्यामुळे याच उत्साहात पुढील वर्षी वारीत सामील होतांना वारी अधिक भक्तिमय करण्याचा प्रयत्न करुया, माऊली चरणी लीन होऊया. दरवर्षी वारीचे यशस्वी आयोजन करणारे वारकरी, वारी भक्तीमय करणारे गायक वारकरी आणि अन्य सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण हीच ओढ दरवर्षी या वारीकडे मला आकर्षित करत असते. यावर्षी माझा मुक्काम मुंबईत असूनही केवळ वारीसाठी एक दिवस मला यावेसे वाटणे आणि वारी घडविणे ही विठू माउलीचीच कृपा ! 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩

©बिंदुमाधव भुरे, पुणे