Wednesday, December 6, 2017

हिरा आणि गारगोटी

हिरा आणि गारगोटी

गेल्या काही दिवसात गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विविध चॅनल्सवर अनेक नेते, पक्षप्रवक्ते वेगवेगळ्या चर्चासत्रात, मुलाखतीत व वादविवादात दिसून आले. अगदी भाजप पक्षाध्यक्ष अमित शहापण मुलाखतीत दिसले. लोकसभेत भाषण करतांना चुकीची माफी मागणारे, चुकीचे ट्विट केल्याबद्दल माफी मागणारे, गुजरात  निवडणुक प्रचारात बेरोजगारांची प्रत्येक सभेत वेगळी आकडेवारी देणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी अशा मुलाखतीत, चर्चासत्रात कधी कधी दिसतायत त्याची मी वाट पहातोय.

कारण थेट वादविवादात, लाइव्ह मुलाखतीतच कळून येइल कि त्यांच्या चुकांचे प्रमाण कमी झालय कि काॅपी करतांना त्यांच्या अजूनही चुका होतायत ते. परदेशात विद्यार्थी वर्गासमोर त्यांनी दिलेली मुलाखत युट्यूबवर उपलब्ध आहे, ती बघावी. त्यात दिलेली उत्तरे पहाता नीट तयारी व्हावी म्हणून प्रश्नांची यादी आधीच त्यांना दिली असावी असे वाटते कारण जे विद्यार्थी थेट प्रश्न विचारु इच्छित होते त्यांना मनाई केली गेली. (कारण अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आला तर बिंग फुटण्याची भिती)

जर अशा लाइव्ह वादविवादात, मुलाखतीत ते सामील झाले तर सपोर्ट सिस्टमशिवाय त्यांच्या किती चुका होतात हे कळेल अन्यथा चुकीबद्दल त्यांनी मागितलेली माफी ही ट्विटर हॅन्डलर किंवा त्यांच्या सल्लागारांच्या चुकांची आहे हे सिद्ध होईल ! काँग्रेसजनांनी त्यांना कितीवेळा संभाळून घ्यायचे व त्यांच्या प्रगल्भतेला, बुद्धिमत्तेला किती काळ झाकून ठेवायचे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असला तरी जनता हे सगळ अवलोकन करुन आपले मत बनवत असते, मुल्यांकन करत असते हे विसरता कामा नये.

गुजरातमधे हार्दिक, अल्पेश व जिग्नेश यांना स्वबळावर आंदोलनाद्वारे काही करण्यावर स्वाभाविक मर्यादा असल्यामुळे त्यांनी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसचा आधार घेतला (दुसरा पर्यायही नव्हताच) तर राहूल यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसलाही अशा रेडिमेड आंदोलनकारी प्लॅटफॉर्मची गरज होती. या एकत्रिकरणामुळे भाजपा राजवटीविरोधात (तसेच अॅन्टी एन्कंबन्सी या घटकामुळे) आव्हान निर्माण झाल्याचा आभास होतोय व परिणामतः काँग्रेसचा परफाॅरमन्स किंचित सुधारला असे वाटेलही पण यातून गुजरातमधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील का ?

या प्रश्नाचे उत्तर सुजाण जनता पुनः भाजपाला कौल देऊन देतील असे वाटते कारण या एकत्रिकरणाचा पाया विकास नसून भाजपविरोध हा आहे आणि प्रत्येक घटकाच्या भाजपविरोधाचे कारण वेगळ असून त्यात परस्परविरोधही आहे. विकास ही निरंतर सुरुच रहाणारी प्रक्रिया असून या एकत्रिकरणात या विकासप्रक्रियेच्या प्रतिबिंबाचा तसेच तरुणाईच्या असंतोषावरील उपाययोजनांचा अभाव दिसतो आहे.

म्हणूनच काँग्रेस आज तरी गुजरात निवडणुकीकडे राहूल गांधीना नेता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी निकराचा प्रयत्न करण्याची प्रयोगशाळा म्हणून पहात आहे असे वाटते. या प्रयोगशाळेत हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांनी तापविलेल्या वातावरणाची तयार पार्श्वभूमि आहे व म्हणून यशाचा अंधूकसा कवडसा दिसतो आहे. अर्थात, या प्रयोगात खरा कस पक्षाचा लागणार आहे कारण त्यांना त्यांच्या नेत्याला सिद्ध करायच आहे. 

हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या गुजरात राज्याच्या निवडणुक-मंथनात ज्याला पैलू पाडायचा काँग्रेसजन व पक्ष कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत तो "अनमोल हिरा" म्हणून उदयास येईल कि "गारगोटीच" राहील हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल. अर्थात, अपयश आल्यास काँग्रेसजनांनी सवयीच्या अनुभवातून राहुलची कवचकुंडले म्हणून सोइस्करपणे त्याचा ठपका अल्पेश, जिग्नेश व हार्दिक यांच्यावर टाकण्याचा पर्याय खुला ठेवलेला असेल व यश आल्यास राज्याभिषेक ठरलेला आहेच !

बिंदुमाधव भुरे.

Monday, December 4, 2017

शट डाऊन अॅन्ड रिस्टार्ट

शट डाऊन अॅन्ड रिस्टार्ट

दुपारी ४.३० ची वेळ असेल, ढगाळलेला आसमंत, कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होईल अस वातावरण ! चहा व त्यासोबत गरमागरम कांदा भजी असा बेत आणि गप्पांचा फड रंगला होता. "मनसोक्त खिदळणे" नावाचा एक ठेवणीतला दागिना आज प्रत्येकाने आपल्या तिजोरीतून जणू बाहेर काढला होता. मलाच काय जमलेल्या प्रत्येकाला एकमेकांना अस खिदळतांना पाहिल्यावर हा प्रश्न पडला असणार "खरच आपण इतक मनमोकळ, दिलखुलास व मनसोक्त हसू शकतो ?" आमच्या १५-२० जणांच्या ग्रुपमधे २-३ सबग्रुप होते. मित्र सगळेच असतात पण त्यांच्यातही मैत्री काही जणांबरोबर खास असते. अगदी न ठरवता सगळे तशा ग्रुपने एकत्र बसलो होतो.

सोशल मिडियाच्या माध्यमातून सदैव "कनेक्टेड" रहाण हे आजकाल काही विशेष नाही, आमचा शाळेतल्या मित्रांचा हा ग्रुप असाच हरदम कनेक्टेड. वाढदिवस, नविन फ्लॅट, कार खरेदी, मुलांच अगदी नातवंडांचही यशापयश, कौतुक व याबरोबरच कौटुंबिक समस्यांचाही उहापोह हा ग्रुपवर ठरलेला. प्रत्यक्ष भेटी मात्र क्वचितच ! पण आज जवळजवळ पाच वर्षांच्या गॅपनंतर आम्ही १५-२० जण प्रत्यक्ष भेटलो होतो. पुण्यापासून जवळ दीड तासाच्या अंतरावर एका रेस्ट हाऊसमधे ! वेलकम हाय-टी, जेवण, एक रात्रीचा मुक्काम सकाळी चहा ब्रेकफास्ट करुन निघायच असा कार्यक्रम !  भरपूर गप्पा, जुन्या आठवणी खुप काहीस शेयरिंग ... खुप एक्साइटेड होतो सगळेजण !

अजय म्हणजे अज्या, याच तोंड एकदा सुटल कि हा गडी नाॅनस्टाॅप असतो .... लाईक अ लाफ्टर मशिन. प्रदीप म्हणजे पद्या, त्याच्या तोडीस तोड ! फरक एवढाच कि पद्याने तोंड उघडले कि बरेच जण कानात बोट घालून मराठीतील त्याच्या उच्च रचना असलेले व शब्दकोशात समाविष्ट करण्याची पात्रता नसलेले दुर्मिळ शब्द ऐकण्याचे टाळत असत. हे कानात बोट घालणारे दोस्त जरा वेगळ्या कॅटेगरीतले, अगदी शाळेत असल्यापासून यांच्या तोंडातून आयला किंवा तत्सम शब्दांच क्वचित् उच्चारण असायच. चुकून असले शब्द बाहेर आलेच तर जीभेवरच्या सरस्वतीची माफी मागत दोन्ही गालांवर हात उलट सुलट ठेवत नमस्कार करणार.

सुनिल म्हणजे सुन्या, माझ्या जरा जास्त जवळचा. त्याची सद्यस्थिती गेली काही वर्ष  मी अगदी जवळून पहात होतो, कायम तणावाखाली, चिंताग्रस्त ! पण आज त्याच्या खिदळण्याकडे मी अविश्वासाने पहात होतो कारण गेल्या ४-५ वर्षात त्याला इतक मोकळ, तणावमुक्त कधीच पाहिल नाही. घरात अंथरुणाला खिळलेली आजारी आई व त्यासाठी सतत होणारा खर्च, मुलीच्या लग्नाच जमत नव्हते, मुलगा इंजिनियर झाला पण अजून नोकरीचा पत्ता नव्हता आणि ४ महिन्यांनी स्वतःची रिटायरमेंट होती. दैव परीक्षा घेत असते हे ऐकल, पाहिल आणि बऱ्याचदा अनुभवलही होते. पण परीक्षेतले सगळे पेपर अवघड असणे हे सुनीलच्याच नशीबात का ? या पार्श्वभूमिवर आज त्याच हास्य विनोदात हे अस दिलखुलास हसणे व मनापासून सहभागी होणे म्हणूनच मला कोड्यात टाकून गेल.

परवा काम्प्युटरवर बसलो असतांना अचानक मशिन रुसले, कोणतच बटण, माऊस आॅपरेट होत नव्हते. लेख चांगला जमून आला होता पण तो सेव्ह होईल की सगळ परत पहिल्यापासून करावे लागेल ? काम्प्युटरची अाख्खी हार्ड डिस्क क्रॅश तर नाही ना होणार.... ? मनापासून आवडणारी, जीवापाड जपलेली  एखादी कॅसेट टेपरेकाॅर्डरमधे अडकली तर ..... ? सगळी कॅसेट खराब होईल कि एखादी गाण ? असा विचार मनाला स्पर्श करुन जाताच मनात उलघाल सुरु होते. गेली काही वर्ष सुन्याच्या मनातली उलघाल या प्रकारची असेल का ? मुलीच लग्न कधी जमेल ? आईची सुटका कधी होईल ? मुलाला बरी का होईना एखादी नोकरी कधी लागेल ? या सगळ्या प्रेशरमुळे, मानसिक ताण असह्य होऊन सुन्या हार्ड डिस्क सारखा क्रॅश तर नाही ना होणार ? बापरे .... नको ते अन् नसते विचार डोक्यात गर्दी करत होते अन् तो मनसोक्त खिदळत होता.

कपाटाला कप्पे असतात तसे मनाला असले असते तर किती बर झाल असत नाही ! सगळ्या चिंता एकेका कप्प्यात बंद करुन ठेवायच्या व आयुष्यात समोर दिसणाऱ्या आनंदाला कवेत घेऊन कपाटातल्या कप्प्यात बंद केलेल्या दुःखाला वाकूल्या दाखवायच्या. असल एखाद असंख्य कप्पे असलेल कपाट सुन्याला गवसल तर नसेल ? आज हा इतका बिनधास्त आणि टेंशन फ्री खिदळतोय कसा ? आत्ताचा लिहितोय तो लेख गेला तरी चालेल, परत लिहू पण हार्ड डिस्कचा सगळा डेटा वाचावा अशी मनोमन देवाला प्रार्थना करत मी कंट्रोल आल्ट डिलिट ही तिन्ही बटण एकदम दाबली अन् काॅम्प्युटर रिस्टार्ट केला.

माझा पीसी पुनः सुरु झाला. लेख सेव्ह झाला होता. हुश्श करत त्यावर मी पुनः एकदा नजर टाकली आणि शेवट करतांना खूप चांगली ट्विस्ट सुचली. मनोमन खुष झालो होतो. आयुष्यात असंख्य प्राॅब्लेम्सला आपण तोंड देत असतो. हे प्राॅब्लेम्स मग एक दिवस आपल्याला घेरतात आणि विचारांची गती मंदावत जाऊन एका भल्या मोठ्या प्रश्नचिन्हात आपण अडकून बसतो ...... अगदी लेख लिहितांना पीसी हँग झाला तस ! कंट्रोल आल्ट डिलिट बटण दाबायच किंवा सरळ शट डाऊन करुन रिस्टार्ट करायच हाच एकमेव मार्ग !

त्याने प्राॅब्लेम संपतील अस नाही पण त्याला नव्याने सामोरे जाण्यासाठी एक वेगळी उमेद येते. थोडी गॅप घेऊन जेव्हा त्याच प्राॅब्लेमकडे पहातो तेव्हा सोल्यूशन सापडते. पीसी हँग झाल्यावर हतबल होऊन बसून राहिले तर मार्ग निघत नसतो. सुन्याच खिदळण पाहून मी ठरवल होत कि सुन्याला गाठायच आणि विचारायच ......
लेका, शट डाऊन रिस्टार्ट केलस कि कंट्रोल आल्ट डिलिट ? कि अनेक कप्प्यांच कपाट सापडलय ? तो काय सांगेल याची उत्सुकता आहेच पण हँग झालेला काँम्प्युटरही आयुष्यातील प्राॅब्लेमकडे बघायचा नवा दृष्टिकोण देतो हे मात्र नक्की !

सुन्याने मला गदगद हलवल अन मी भानावर आलो. "शेवटचा एक एक तुकडा आहे कांदाभजीचा, संपव " म्हणाला. मी हसत प्लेटमधला तुकडा उचलून तोंडात टाकला.

बिंदुमाधव भुरे, पुणे.

Sunday, November 12, 2017

आरोग्य अनारोग्य - समज गैरसमज

फेसबुकवरील मूळ पोस्ट !

*आरोग्याचे मोफत अति ज्ञान !!*

हल्ली सगळीकडे आरोग्यज्ञानाचे मोफत वाटप सुरू असते. कुणी विचारो, वा ना विचारो, व्हाट्सअॅपवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रांमध्ये रोज काही ना काही लिहून येतच असते आणि कुणाचा कुणाला ताळमेळ नसतो. ह्या आरोग्य सल्ल्यांमुळे माणूस प्रत्येक घास संशयानेच खायला लागलाय!!!

मला लहानपणी अजिबात आठवत नाहीये माझ्या आईबाबांना कार्ब्स, फॅट्स, पाणी किती प्यावं वगैरे चर्चा करताना...  रोज सकाळी फायबर असलेला वगैरे नाश्ता कधीच नसायचा, पण गरम गरम तूपमेतकूटभात किंवा गरम गरम तेल लावून केलेली घडीची पोळी!! पोहे, उपमा म्हणजे रविवारचा नाश्ता!! दुपारी साधेच पण पोळी, भाजी, आमटी, भात असे जेवण, मधल्यावेळी चिवडा, दूधपोहे, दहीपोहे असं काहीतरी आणि रात्री खूपदा फक्त आमटी भात, खिचडी!!  मुख्य म्हणजे हे सगळं कधीही बोअर झालं नाही, की कधी रात्री रोज भात खाऊन काय होईल वगैरे भीतीही वाटली नाही. कदाचित म्हणूनच सगळ्या सणावारांना गोडाच्या पदार्थांवर आम्ही व्यवस्थित ताव मारायचो आणि तरीही खाताना फॅट्स, कार्ब्स हे शब्दही मनात आले नाहीत!! खरं तर घरात ही चर्चाच नसायची कधी!! 

त्यामुळे मनात तो पदार्थ खाताना कोणताही संदेह नसायचा!! आजकाल काय होतंय की पदार्थ समोर आला तरी खाऊ की नको, हे आत्ता खाल्लं तर माझ्या किती कॅलरीज वाढतील... मग किती exercise वाढवावा हे विचार सुरू होतात! मला नेहमी वाटतं की अज्ञानात कधी कधी सुख असतं!!
अति ज्ञानाचा त्रासच होतो!!

"सकाळ पेपर" मधली फॅमिली डॉक्टर ही पुरवणी मी आधी वाचायचे. त्यात काही काही रोगांची लक्षणे दिलेली असतात. खरं तर बऱ्याच जणांना त्यातलं काही ना काही होतंच असतं. पण ते वाचलं आणि कधी चुकून पायाला मुंग्या वगैरे आल्या की त्यातले एकेक रोग आठवू लागतात आणि मानसिकच काय काय व्हायला लागतं. सरळ बंद करून टाकलं ती पुरवणी वाचणं!
फेसबुक आणि व्हाटसअॅपवरच्या आरोग्यपोस्ट म्हणजे खरंच जीव नको करतात अगदी!!  कुणी सांगतं - ओट्स खा, तूप खाऊ नका, केळं खाऊ नका ... हे वाचून  होतंय तोच त्या ऋजुता दिवेकरची पोस्ट वाचायला मिळते की पोहे खा, भात खा, तूप गूळ पोळी खा... झालं ... डोक्यात नुसता गोंधळ!! काय बरोबर नि काय चूक!!

बऱ्याच पोस्टमध्ये अमुक एक केल्याने कॅन्सर होतो असं लिहिलेलं असतं ... परवा एका आयुर्वेदआचार्यांचा लेख वाचायला मिळाला होता. त्यात लिहिलेले होते की, अति पाणी पिऊ नये. त्यामुळे किडनीला त्रास होतो.. त्याचवेळी दिवसातून १०-१२ ग्लास पाणी प्यावं अशी पोस्ट कुठूनतरी येते !!
सध्या शेवग्याच्या शेंगेची पोस्ट फिरतेय...  काही दिवसांनी लाल भोपळ्याच्या फायद्यांची पोस्ट सुरू होईल... पोळीमधल्या ग्लुटेनमुळे त्रास होतो, असं सध्या वाचायला मिळतंय..  रोज भाकऱ्या करणे तर शक्य नाही.. अगदी केल्या तरी मुलांना डब्यात रोज भाकरी आवडत नाही .... मला खरंच कधी कधी असं वाटतं की आरोग्य ह्या विषयाचा अतिरेक होतोय. भूक लागली की, जे समोर असेल ते जेवावं आणि झोप आली की झोपावं, एवढं साधं तत्व पाळलं जायचं पूर्वी ! तेव्हा खरचंच माणसे आरोग्यसंपन्न होती!! आता मात्र भूक लागली की किती कॅलरीज खाव्यात हे मोजत बसलयीत माणसे !!  ह्या आरोग्याच्या लेखांमुळे, अति माहितीमुळे खाण्यातील आनंद हरवून बसणार आहोत आपण !!

--यशश्री मनोज भिडे
(FB वरून साभार पोस्ट.)

*वरील पोस्टचे विश्लेषण करणारा माझा लेख*

*आरोग्य-अनारोग्य समज व गैरसमज*

आरोग्याचे मोफत अतिज्ञान ही यशश्री मनोज भिडे यांची फेसबुक पोस्ट वाचण्यात आली. आरोग्य चांगल रहाणे हे जणू केवळ खाण्यापिण्याशीच संबंधित आहे हा आशय या पोस्ट लिहिण्यामागील असावा असे वाटते.
ही पोस्ट वाचत असतांना पोस्टमधील प्रत्येक वाक्य मनाला भावते व पटतेही कारण कुठेतरी आपण लहानपणीच्या जुन्या आठवणींशी कनेक्ट होतो. आजकाल कॅलरी, कार्ब, पाणी पिण्याचे प्रमाण, फायबर, फॅट्स यासारख्या शब्दांचा भडिमार होतोय हे खरच आहे व संपूर्ण पोस्टमधे त्याचा संदर्भ अतिशय चपखलपणे आलाय.

"काल व आज" याच्या तुलनेत बदलती जीवनशैली, बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी, अन्नपदार्थातील घटत गेलेल जीवनसत्वाचे प्रमाण इ. इ. यासारख्या गोष्टींचा अभाव या पोस्टमधे आढळल्याने पोस्टमधील मजकूर एककल्ली किंवा एकतर्फी झाल्यासारखा वाटतोय. म्हणून आजच्या बदललेल्या दुनियेत वास्तवातील दुसरी बाजू लक्षात घ्यायला हवी.

पूर्वी शारिरिक हालचाली, श्रम यांचे प्रमाण  भरपूर होते कारण दळणवळणाची साधने कमी होती, मर्यादित होती. माहिती तंत्रज्ञान अतिप्रगतावस्थेत नव्हते. एखाद्याला निरोप द्यायचा म्हटले तरी सायकल किवा पायी जाणे याला पर्याय नव्हता. दरडोई आहार प्रतिवर्ष २०० किलो इतका होता. वर्षातून शेतीमधे एकदा पीक घेेतले जायचे व तेही सेंद्रिय पद्धतीने, त्यामुळे अन्नपदार्थ कसदार होते, त्यात पोषणमुल्ये भरपूर होती. म्हणजे खाणे पौष्टिक असायचे व भरपूर शारिरिक हालचाली असल्यामुळे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम असायचे !

आज ......... आज ग्लोबलाइजेशन व अतिप्रगत माहिती तंत्रज्ञान यामुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण बसल्याजागेवरुन संपर्क करु शकतो. परिणामी श्रम, हालचालींवर मर्यादा आल्या आहेत मात्र दरडोई आहारात वाढ होऊन तो ३०० कि प्रतिवर्ष झालाय. शेतीतून वर्षाला दोन तर कधी तीन पिके घेतली जातात. त्यासाठी केमिकल मिश्रित खते यांचा अतिवापर होतोय. गव्हातील घातक ग्लुटेन या घटकाचे नाव आताच का कानावर पडते आहे ? या प्रश्नाच उत्तर वेगळ द्यायची गरज नाही.

आपल्या जावनशैलीवर पाश्चिमात्य जीवनशैलीची नकळत छाप पडायला सुरुवात झाली. कधी काळी क्वचित पहायला मिळणारा कोकाकोला आज डझनभर स्पर्धकांसोबत खेडोपाडी पोहोचलाय. ब्रेड म्हणजे शहरी व उच्चभ्रू मंडळींचे चोचले व गोऱ्यांचा आहार ! त्यामुळे आपली न्याहारी ही पारंपरिक असायची. सकाळी पोटभर न्याहारी करुन तो जिरविण्याइतके श्रम पूर्वी आपोआप व्हायचे. आता न्याहारी तीच आहे मात्र श्रम नाहीत त्यामुळे भरपेट न्याहारीतून मिळणारी उर्जा वापरलीच जात नाही. त्याचे ज्वलन न झाल्याने या उर्जेच फॅट्समधे रुपांतर होतय व परिणामी आज स्थूलता व त्याचे सरासरी प्रमाण यात वाढ झालेली दिसते आहे.

सहज म्हणून किंवा बदल म्हणून या खाण्यापिण्याची सवयी आज आपले दैनंदिन जीवन बनले अन् उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर व ह्रदयरोग माणसांना चाळीशीतच गाठू लागले. मग हे सगळ का घडतय याचा अभ्यास करता लक्षात आल कि हा बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे. ज्या खाण्यापिण्याच्या सवयींमळे हे दुष्परिणाम होतायत त्यातल्या घटक पदार्थांचा अभ्यास सुरु झाला. केवळ आहारशास्त्रच नव्हे तर शास्त्राच्या सगळ्याच शाखात सदैव संशोधन हे सुरु असते व नवनविन माहिती दररोज पुढे येत असते. म्हणूनच आज कॅलरीज्, कार्बन, फायबर, फॅट या संकल्पना सर्वमुखी झाल्या आहेत.

आज "इलनेस" ही एक मोठी इंडस्ट्री बनली आहे. याच कारण बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव व खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी. याचाच परिणाम म्हणून "वेलनेस" इंडस्ट्री नावारुपाला आली आहे. शाळेत फक्त चौरस आहार, जीवनसत्वे हे शिकवले पण आज चाळिशीत गाठणाऱ्या विविध आजारपणामुळे या कार्ब, फॅट्स, फायबर वगैरे संकल्पनांचे शास्त्रीय महत्व अभ्यासातून कळायला लागलय. तरुण पिढी "वेलनेस"साठी फिटनेसकडे अधिकाधिक आकर्षित होते आहे. पहाटे, सकाळी वाॅकला किंवा टेकड्यांवर जाणाऱ्यात तरुणाईचे प्रमाण लक्षणीय आहे, जिम्सची वार्षिक सदस्यता घेणारे व पर्सनल ट्रेनर घेणारेही खूप आहेत.

पण हे सगळे फिटनेससाठी करायच व आहारात कोक, पिझ्झा, फास्ट फूड ... हा विरोधाभास दिसतोय. त्यामुळेच हेल्दी असणे व फिट असणे या दोन परस्परांशी संबंधित परंतु स्वतंत्र संकल्पना आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. आदर्श जीवनशैली म्हणजे २०% व्यायाम व ८०% आहार व या आहारात ४०% कार्ब+३०%आवश्यक फॅट्स+३०%प्रथिने असे मिश्रण फलदायी ठरते. हे खऱ्या अर्थाने "वेलनेस" आहे, अर्थात हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

काहीही खाल्ले तर ते पचविण्याची क्षमता बदलत्या जीवनशैलीमुळे नष्ट झाली आहे तसेच आजच्या खाद्य पदार्थातील पोषणमुल्यांचे प्रमाण घटले आहे हे लक्षात घेता आहारशास्त्राने संशोधित केलेल्या कार्ब, प्रोटीन, फायबर, फॅट या संकल्पना हे आपल्या वास्तविक दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनविल्यास हेल्थ व फिटनेस हे दोन्ही साधले जाऊन खऱ्या अर्थाने निरोगी आयुष्य जगता येईल.

तेव्हा आरोग्याचे मोफत अतिज्ञान तपासावे, त्यातील विरोधाभास लक्षात घ्यावा पण त्याकडे दुर्लक्ष करु नये. व्यक्ति तितक्या प्रकृती या उक्तीनुसार आपल्यासाठी योग्य काय याचा निर्णय घ्यावा प्रसंगी न्युट्रीशन तज्ञांचा सल्ला घ्यावा. खाण्यापिण्याता एकच नियम सगळ्यांनाच सरसकट लागू होईल असे नाही मात्र २४ तासातील १ तास स्वतःच्या आरोग्यासाठी, फिटनेससाठी हवा हे सगळ्यांना लागू आहे यात दुमत नसावे.

बिंदुमाधव भुरे, पुणे

Thursday, November 9, 2017

१७ नोव्हेंबर - धडक मोर्चा - चलो दिल्ली

१७ नोव्हेंबर – धडक मोर्चा – चलो दिल्ली !  

भाजप सरकार व भारतीय मजदूर संघ !  

२०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार बहुमताने स्थापन झाले आणि विरोधकांच्या टीकेत वारंवार संघ व संघ परिवारातील संघटनांचा उल्लेख येऊ लागला. शिक्षण पद्धतीपासून ते सामाजिक जीवनातील प्रत्येक अंगाचे भगवीकरण सुरु असल्याचा आरोप होऊ लागला. अगदी भारतीय संघराज्यपद्धतीचा ढाचा व घटना विशेषतः आरक्षण बदलण्याची खेळी संघ भाजपच्या आडून खेळत असल्याचा गाजावाजा काही निवडणुकीत प्रचारा दरम्यान केला गेला. अर्थात, कालांतराने हा प्रचार मिथ्या सिद्ध झाला.  

देशाच्या उन्नतीसाठी, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची फळे पोहोचावीत म्हणून प्रत्येक राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी धडपडत असतो. “समाजातील वंचित घटकाचा विकास” हे ध्येय बाळगून किंबहुना “विकास” हा केंद्रबिंदू मानून हे पक्ष आपआपली ध्येयधोरणे ठरवत असतात. या राजकीय वाटचालीत जरी विरोधी पक्षांसह समाजातील सगळ्या घटकांचे सहकार्य अपेक्षित असले तरी ही वाटचाल अडचणींचा सामना करणारी असते कारण विचारसरणीतून आलेल्या विरोधाला राजकीय विरोधाची किनारही असते. "भारतीय मजदूर संघ" म्हणजे "संघ परिवारातील संघटना" म्हणजेच "भाजपची सहयोगी" ! त्यामुळे भारतीय मजदूर संघ हा भाजपा सरकारच्या विरोधात जात नाही असा एक गैरसमज कामगार क्षेत्रातील सगळ्या संघटनांनी करुन घेतला आहे अर्थात मिडियानेही त्याला वेळोवेळी यथाशक्ति हातभार लावला आहे.    

भारतीय मजदूर संघाची भूमिका व वाटचाल    

परंतु वस्तुस्थिति जाणून घेण्यासाठी भारतीय मजदूर संघाची स्थापना व नंतरची वाटचाल याकडे बारकाइने पाहिले पाहिजे. पूर्ण वेळ संघ प्रचारक असलेले एक स्वयंसेवक स्व. दत्तोपंत ठेंगडीजीं यांनी २३ जुलै १९५५ रोजी भारतीय मजदूर संघाची स्थापना केल्याची घोषणा केली. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले कि भारतीय मजदूर संघ ही राजकारणापासून अलिप्त व कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसलेली एक विशुद्ध कामगार संघटना राहील. कामगारांच्या हितांचे रक्षण करतांना संघटना सदैव राष्ट्रहिताच्या चौकटीत राहून विचार करेल. तसेच उद्योगाचे हित जपतांना कामगारांच्या हक्कांबाबाद मात्र कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.    

भारतीय मजदूर संघाने राजकारण व राजकीय पक्षापासून अलिप्त रहाण्याची भूमिका सदैव प्रामाणिकपणाने निभावली. भाजपने पूर्व पंतप्रधान मा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील अनेक पक्षांच्या सहकार्याने एनडीए सरकार स्थापन होऊन या देशाने एक वेगळ वळण राजकीय पटलावर घेतलेल सगळ्यांनी पाहिले, अनुभवले. आज अनेक विरोधी पक्ष भाजपच्या पूर्ण बहुमतातील सरकारवर टीका करतांना मा अटलजींचा संदर्भ निघतो तेव्हा त्यांचा उल्लेख अतिशय आदराने करतात हे लक्षात घेतल पाहिजे. परंतु याच मा अटलजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांवर भारतीय मजदूर संघाने स्पष्ट शब्दात टीका केली होती. आर्थिक धोरणात बदल न करणाऱ्या किंबहुना चुकीच्या अर्थनीतिच्या व कामगारहितविरोधी धोरणांच्या विरोधात या एनडीए सरकारवर केवळ टीका करुन न थांबता स्व. दत्तोपंत ठेंगडींनी त्यावेळी भारतीय मजदूर संघाच्या २ लाख सदस्यांचा ऐतिहासिक धडक मोर्चा दिल्लीत काढला होता. या मोर्चाला संबोधित करतांना स्व. दत्तोपंतांनी सरकारवर कठोर टीका केली होती हे विसरता येणार नाही.  

देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतांना त्या चौकटी अंतर्गत उद्योगहित व मजदूरहित जपत राजकारण व राजकीय पक्षापासून अलिप्त रहाण्याच्या भुमिकेशी भारतीय मजदूर संघ सदैव प्रामाणिक राहिला आहे. वर्ल्ड बँक, डब्ल्यूटीओ यांच्या दबाववाली व त्यांना अनूकूल अशा आखलेल्या आर्थिक व कामगार विषयक धोरणांना विरोध करतांना स्व दत्तोपंत ठेंगडींच्या मार्गदर्शनाखाली असंख्य आंदोलने उभी करण्याचा निर्णय घेतांना “सरकार कोणाचे” हा मुद्दा भारतीय मजदूर संघासाठी कधीच अडचणीचा बनला नाही.  

धडक मोर्चा का ?  

आज पुनः एकदा भारतीय मजदूर संघ आंदोलनाचा पवित्रा घेऊन सज्ज झाला आहे. विविध राज्यांमध्ये अनेक सरकारी निमसरकारी पदे रिक्त आहेत ती तातडीने भरण्याची आवशक्यता आहे. उद्योग क्षेत्रामध्ये समान काम समान वेतन धोरण न राबविले गेल्यामुळे वेतनातील असमानता ही कामगारांच्या असंतोषाचे प्रमुख कारण बनते आहे.  सार्वजनिक उद्योगातील हिस्सा विक्रीमुळे हे उद्योग खाजगी उद्योगांच्या हातात जाण्याची भीती असून त्यामुळे कामगार कपातीचा धोका आहे. ही निर्गुंतवणूक प्रक्रिया तातडीने थांबवून हे सार्वजनिक उद्योग सक्षम व कार्यक्षम कसे होतील याबाबद भारतीय मजदूर संघाशी धोरणात्मक चर्चा व्हावी. नीती आयोगाने कामगारहितविरोधी केलेल्या शिफारशींचा निषेध भारतीय मजदूर संघाने यापूर्वीच नोंदविला होता. परिणामस्वरूप, समान काम समान वेतन कायद्यातील घातक तरतुदी तसेच भविष्य निर्वाह निधीविषयक बदल, शेतीउत्पन्नावर कर यासारख्या घातक तरतुदी त्वरित मागे घेतल्या जाव्यात.  कामगार कायद्यात होणार्या एकतर्फी बदलामुळे कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुळात कंत्राटी कामगार ही प्रथाच बंद करण्याची भारतीय मजदूर संघाची मागणी आहे. कारण या कामगारांची पिळवणूक करत असतांना त्यांना कोणतीही सामाजिक सुरक्षितता, वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. खाणकामगार, महिला कामगार, असंघटीत कामगार यांच्या बाबतीतही हेच प्रश्न आंदोलनाचा विषय बनू पहात आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला बँकिंग उद्योग तर अत्यंत धोकादायक वळणावर आज उभा आहे. थकीत व बुडीत कर्जांमुळे बँकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली असतांना केवळ बँकांचे विलीनीकरण करून बँकांना अधिक भांडवल पुरविणे यासारखे उपाय योजली जात आहेत. पण आज खरी गरज आहे ती थकित कर्जविषयक कायद्यांमध्ये बदल करून या समस्येच्या मुळाला हात घालण्याची जेणे करून ही समस्या वारंवार उद्भवणार नाही.  

संस्थापक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांची शिकवण !  

असे अनेक विषय घेऊन दि १७ नोव्हेंबर रोजी भाजपच्या या पूर्ण बहुमतातील सरकारच्या कानावर कामगारांची संवेदना पोहोचविण्यासाठी भारतीय मजदूर संघाने ५ लाख सदस्यांच्या विशाल मोर्चा आयोजित केला आहे. आज दि १० नोव्हेंबर, स्व दत्तोपंत ठेंगडींचा जन्मदिवस ! त्यांची शिकवण, त्यांनी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे याबरहुकूम वाटचाल करतांना भारतीय मजदूर संघ दि १७ नोव्हेंबरच्या मोर्चाद्वारे भारतीय कामगार क्षेत्राच्या इतिहासात एक नविन अध्याय रचण्यास  सिद्ध झाला आहे. देशाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या या लाखो सदस्यांच्या भावना सरकारच्या कानावर पडून अपेक्षित बदल भविष्यात घडून आल्यास तो एक प्रकारे या दृष्ट्या कामगार नेत्याने मांडलेल्या विचारांचा विजय ठरेल. अर्थात सरकार कोणाचेही असो राष्ट्रहित, उद्योघीत व त्यांतर्गत कामगारहित या चौकटीत राहून भारतीय मजदूर संघाची वाटचाल सुरु असून त्या वाटचालीत येणारा दि १७ नोव्हेंबरचा हा धडक मोर्चा ऐतिहासिक ठरेल यात शंका नाही.  

बिंदुमाधव भुरे, पुणे  

Shared with https://goo.gl/9IgP7