Monday, December 11, 2023

चक्रव्यूह

१२ मार्च १९७१ ...या दिवशी आनंद पिक्चर रिलीज झाला होता. आपण सगळे ९ वी च्या वार्षिक परीक्षेच्या तयारीत असू. परीक्षा झाल्यानंतर केव्हातरी आपल्यापैकी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला असणार.... आणि नंतर तर अनेकदा ...

त्यातला शेवटचा सीन ! मृत्यूशय्येवर पडलेला राजेश खन्ना ... श्वास लागलेला असतो... आयुष्यातील उरलेले सगळे श्वास संपवण्याची जणू स्पर्धा चालू असावी... मॅरेथॉनच्या शेवटच्या पंधरा वीस मीटरच्या टप्प्यात जीवाच्या आकांताने धावत अंतिम रेषा पार करणारा स्पर्धकच जणू ! तिथे पदकासाठी संघर्ष तर इथे मृत्यूशी झुंज ! 

डॉक्टर असलेल्या बाबू मोशाय .... म्हणजे अमिताभ बच्चनला ती मृत्यूशी सुरु असणारी अपयशी झुंज पहावणार नाहीये म्हणून काहीतरी कारण काढून तो बाहेर पडलाय... आनंदला आता धाप लागलेली आहे ... त्याचा शेवटचा श्वास बाबू मोशायमधे अडकला असावा जणू ... डॉक्टर रमेश देव टेप सुरु करतो आणि बच्चनच्या आवाजात रेकॉर्ड केलेली कविता ऐकू येते.....

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है ....

बच्चनच्या धीर गंभीर आवाजातली कविता पुढे सरकत असते आणि मग त्यातली एक ओळ येते .... जिस्म जब खत्म हो और रुहको जब सास आए.. आणि ती ओळ पूर्ण होण्यापूर्वीच आनंद आयुष्यातील शेवटची आर्त हाक देतो... बाssबू मोशाssssय... श्वास थांबलाय... लढाई संपली आहे... मृत्यूचा विजय झालेलाय.. ...... आणि .... 

बच्चन धापा टाकत येतो पण सगळ काही शांत झालेल असत. त्याला जीवनाच अंतिम सत्य समोर दिसत असत. हताश हतबल बच्चन रडवेल्या चेहऱ्याने निश्चल झालेल्या आनंदकडे पहात असतानाच.. पुन्हा तो खर्जातला धीर गंभीर आवाज कानांवर पडतो...... "बाबू मोशाssय"  ....... टेपरेकॉर्डर सुरुच असतो. जीवन आणि मृत्यू .. या दरम्यान हेलकावे खाणाऱ्या प्रत्येकाच्या  जगण्यातील वास्तव बाबू मोशायच्या कानावर आदळत असतं.‌

जिंदगी और मौत तो ऊपर वाले के हाथ में है जहापनाह ...
उसे ना तो आप बदल सकते हैं ना हम...
हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वालों की उंगलियों में बंधी है....
कब कौन कैसे उठेगा ये कोई नही बता सकता ......
आणि शेवटी हा हा हा असे आनंदचे ते हास्य ! मृत्यूला बेडरपणे वाकुल्या दाखवणारं ... 

कितीही वेळा हा सिनेमा पाहिला तरी या दृश्याने आपल्या पापण्या ओलावतातच.... अलिकडे हा चित्रपट मी पुन्हा पाहिला आणि या शेवटच्या दृष्याने विचलित झालेल्या मनात विचारांची नव्याने झालेली गर्दी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू लागली. 

मृत्यू होताच आत्मा अनंतात विलिन झाला म्हणतात आणि आप्तजन अश्रू ढाळत असतात. मात्र इवलासा जीव जन्माला येताच रडतो आणि सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागतो. पण याला परमात्मा नविन रुप धारण करुन आला वगैरे असे काही कोणी म्हटल्याच ऐकिवात नाही ... अस का बर ? भगवतगीतेमधे श्रीकृष्णाने मृत्यू, पुनर्जन्म, शरीर, आत्मा वगैरे थियरी मांडली आहे. त्यात असाव का याच उत्तर ? जिस्म जब खत्म हो और रुहको जब सास आए या ओळीत त्याचा अर्थ दडला असेल का ?

राजेश खन्नाला वाटत असेल बापडा हा इहलोक एक रंगमंच ! पण याला युद्धभूमी का म्हणू नये ?  कारण ... जन्मापासूनच मानवाचा  जगण्यासाठीचा लढा सुरु होतो. लहानपणीचे भुकेसाठी रडणे हे मोठेपणी पोटासाठी लढणे होते. एखादी गोष्ट हवी म्हटल्यावर ती मिळवण्यासाठी लहान मूल जे काही करतं तो हट्ट ... मात्र मोठेपणी एखाद्याने तेच केल तर त्याला भांडण, तंटा, राजकारण यासारखी लेबलं का बरं लागतात ? नोकरीतल प्रमोशन काय किंवा व्यावसायिक यश .... त्यासाठी जे काही करायला लागतय ... ते काय असत ? धडपड, लढा कि युद्ध ? आजारपणातही माणूस आजाराशी लढतो तर डॉक्टर आजार बरा करण्यासाठी .....  ते काय असत ? लढा कि युद्ध ? आनंदची लढाई सुरु होती आणि बाबू मोशायची पण लढाईच सुरु होती ना ? 

बच्चन एका गाण्यात म्हणतो... 
जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकराएगी... मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी... 
आयुष्यभर चालणाऱ्या या लढ्यात जो जिंकतो तो सिकंदर... ! युद्धात अनेकजण फ्रंटवरुन लढा देतात तर काही सपोर्टिंग रोलमध्ये असतात. आनंद फ्रंटवरुन लढत होता तर बाबू मोशाय सपोर्टिंग म्हणून ... अस म्हणाव का ? .... कोणी कुठला रोल करायचा ते वरचा ठरवतो..... कारण ... डोर उपरवालेके हाथमे है ! 

जन्म मृत्यूचे चक्र अव्याहतपणे सुरु असते. "आनंद मरा नही आनंद मरते नहीं" या डायलॉगचा अर्थ तोच असेल का ? ती डोर तो जशी फिरवेल त्यावर ठरेल पुढचा जन्म कोणत्या रुपात दिला जाईल ते ! ... त्याने ठरवून दिलेला रोल साकारायचा आणि काम झाल की पडदा पडतोच. युद्धभूमीवर सुर्यास्ताला शंखनाद झाला की नाही का होत युद्धविराम ? तसंच काहीस .... बाssबू मोशाsssय अशी दिलेली आर्त हाक म्हणजे जणू शंखनादच.... 

द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. खूप उंचीवरुन पाहिले की या रचनेचा आकार चक्रासारखा आहे हे कळत. आजकाल अशा प्रकारची दृष्य टिपणाऱ्या कॅमेरांना म्हणूनच द्रोण कॅमेरा म्हणत असावे का ? या रचनेत प्रत्येक सैनिकाची भुमिका ठरलेली आहे. इंकिलाब चित्रपटात बच्चनसाठी म्हणून तर गीतकार म्हणतोय "अभिमन्यू चक्रव्यूहमे फस गया है तू  ... संभल सके तो संभल.. निकल सके तो निकल ... दुष्मनोंके जालसे... दोस्तोंके चालसे.."  

विधात्याने रचलेल्या या युद्धभूमीवरचं मी एक पात्र असेल तर मीच अभिमन्यू... मीच दुष्मन... आणि मीच दोस्त आहे ना ? या जन्म-मृत्यूच्या चक्रव्यूहात मी फसलोय... यात फसणे किंवा मुक्त होणे आपल्या हातात नाही. कारण ??? ..... कारण ..डोर उपरवालेके हाथमे है ! .... प्रसंगानुरूप माझी भुमिका बदलत रहाते... कारण ... डोर उपरवालेके हाथमे है..... 

गदिमा म्हणतात ... 
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ... जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे .... 
जन्म कोणताही मिळो ... कर्माचे फळ भोगावे लागणार... त्यापासून सुटका नाही.‌ 
every action has an equal opposite reaction हा प्रकृति नियम आहे ना ? 

एकदा हे नीट लक्षात घेतल की मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंना काय अर्थ उरतो ? हे षडरिपू मानवी कर्माचे कारक आहेत का ? याच कर्मावर आधारित जन्म पुनर्जन्म चक्र सुरु असते का ? सत्कर्म असो कि कुकर्म .... ते पण विधिलिखितच असते का ? 

 हम्म्म (सुस्कारा सोडत)  ... असो .... हा पण एक प्रकारे नुसत्या प्रश्नांचा चक्रव्यूह .... !  उत्तरांच्या शोधात या चक्रव्यूहात जो खोलवर शिरतो त्याला उत्तरं सापडत असतील ? मनात विचार येतो कि ... 
"गुरुविणा कोण दाखविल वाट ?" ...... 
योग्य गुरु मिळाला तर या प्रश्नांचा चक्रव्यूह भेदून तुम्ही मोक्षप्राप्ती करु शकाल अन्यथा प्रत्येकाचा अभिमन्यू होणे ठरलेल आहे .... आणि तेही विधिलिखित ! 

(थोडेसे स्मित करत) विचारांच्या या गर्दीत डोक्याच पार भज होतं नाही ? आपलं सगळ्यांच जगणं हे या अशा प्रश्नांसोबतच ....  आणि .... आयुष्याचा पडदा पडणे हे त्यांचे अंतिम उत्तर ! .... मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी..... 

त्यामुळे दोस्तांनो, फार डोकं खराब करुन घ्यायच नाही ... आनंदवर उतारा म्हणून मग पुन्हा एकदा मुकद्दर का सिकंदर टाकावा आणि सलाम एक इश्क मेरी जा या सिकंदर जोहराच्या गाण्यात मनमुराद डुबून जाव.... 

किंबहुना .... या गाण्यात जोहराच कडव झाल्यानंतर किशोरदाचा आलाप सुरु होतो.... ध्यान लावताना केलेल्या ओमकारात जशी तंद्री लागावी तसा फील येतो. त्यात मग एक ओळ येते एक एहसान कर अपने मेहमानपर...असे गातांना किशोरचा आवाज असा काही लागतो ना की त्यात आकंठ बुडायला होत .... काही क्षण आपल्याला सगळ काही विसरायला होतं..! अगदी गात असलेल्या सिकंदरकडे स्तब्ध होऊन एकटक बघत राहिलेल्या जोहरासारखच ..... !  ती नशा काही औरच ..... खरय ना ? तुम्हाला काय वाटतय ? 

बिंदुमाधव भुरे, पुणे.

वरील लेख Youtube वर ऐकण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. 

https://youtu.be/9FS7O38YaRk?si=SeM-q_3pDXwiGNzw

Friday, September 8, 2023

माझ्या मनातली शाळा

माझ्या मनातली शाळा 

दिनांक ६ सप्टेंबर २०२३, आमच्या माॅडर्न हायस्कूलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण व्हाॅटस् अप गृपवर आले आणि ....
मागोमाग मिलिंद एकबोटेचा फोन आला ! "पुण्यात आहेस ना ?" 
मी "हो" म्हटले. 
"कार्यक्रमाला ये, वाट बघतोय" ! 
मी "बssर, ठीक आहे, येतो" म्हणालो खर .. पण मनात थोडी चलबिचल झाली होती. 

हा पुरस्कार आमचे आवडते व्ही. एस्. देशपांडे सर यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने दिला जाणार होता अन् तोही आमच्याच वर्गातला आमचा सवंगडी डॉ जगदीश हिरेमठ याच्या हस्ते ! त्याच्या आवाजात व्हीएसडींच्या आठवणी ऐकण्यासाठी मनातून आतूर होतो.   या निमित्ताने अनेक मित्र पुन्हा भेटणार होते. "जुमानजी" सिनेमा आठवला  ... सोंगटी फिरवली आणि ५० वर्ष मागे गेलो. त्याच वास्तूत आज पुन्हा विशू, मिल्या, जाड्या, पम्या वगैरे गॅंग भेटणार होती. .. पण सिनियर सिटीझन म्हणून ! 

शाळा सोडल्यानंतर अनेक मित्र शाळेत किमान एकदा तरी जाऊन आले असणार पण त्या दिवशी मी मात्र बरोबर ५० वर्षे आणि ३ महिन्या नंतर शाळेत आलो होतो. खर म्हणजे १९९६ ते २००२ या काळात मी शाळेसमोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा शाखेत होतो. पण शाळेत जायचा धीर कधी झालाच नाही. कारण ....

शाळेची वास्तू, आपले दरवर्षीचे वर्ग, मुख्याध्यापकांचे ऑफिस, शाळेच्या मागच्या गेटमधून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला असणारे स्वच्छतागृह (त्यावेळी आपण मुतारी म्हणायचो), त्यामागे खडक आणि नंतर विस्तीर्ण असे क्रीडांगण, त्यालगत असलेली व्यायामशाळा वगैरे .... हे चित्र मन:पटलावरुन कधीच पुसले जाऊ नये असे मनोमन वाटायचे. त्यामुळे पाच सहा वर्षे समोर शाळा असूनही रस्ता ओलांडायचा धीर कधी झाला नाही. मनातल्या त्या चित्रावर अकारण रेघोट्या ओढल्या तर स्मृतीपटलावर असलेल्या मूळ चित्राला धक्का लागेल ही भिती मनात असायची. 

पण माझ हे वाटण फक्त शाळेपुरतेच मर्यादित होत का ? तर नाही. हा माझ्या स्वभावाचा एक भाग होता. शाळेत असताना कसबा पेठेत ज्या वाड्यात आम्ही रहात होतो तेथे नंतर अनेकदा गेलो पण आणखी एक जिना चढून रहात असणारे रहाते घर पहाण्याचा धीर कधी झाला नाही. त्या वास्तूत असलेल्या अनंत आठवणींना शब्द फुटले तर त्या आठवणींबरोबर संवाद कसा साधायचा या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसायचे. 

१९७७ ला मी चाळीसगाव येथे बॅंकेत रुजू झालो. प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या वडिलांच्या घरात भाडेकरु म्हणून राहिलो. नंतर बरोबर २५ वर्षांनी एका लग्नासाठी जाण्याचा योग आला. आपण आयुष्याची वाटचाल जिथून सुरु केली त्या घराला भेट देऊ म्हणजे जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल या विचाराने वेळात वेळ काढून मी त्या घराला भेट द्यायला गेलो खर मात्र त्या घराची अवस्था पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आज भानुविलास समोर काही क्षण उभे राहिलो की काहीसे तसेच होते.

तेव्हापासून मनाची ही ठेवण झाली असावी. पण मिलिंद एकबोटेचा आग्रही फोन आणि अनेक मित्र भेटतील म्हणून शाळेत येण्याचे धाडस केले. मागील गेटने स्कूटर आता आणली. वाॅचमन काहीतरी बोलत होता मला. शब्द कानावर पडत होते पण माझ लक्ष नव्हत, मी नुसते बर म्हणालो. मला मागे खडक दिसल्याचा भास होत होता. ...... 

खडकावर खडूने स्टंप कोरले होते आणि क्रिकेट सुरु होते तर पुढे ग्राऊंडवर काही मुले फुटबॉल खेळत होती तर अलिकडे काही मुले बास्केटबॉल प्रॅक्टिस करत होती. वाॅचमन पाठ वळवून केव्हाच निघून गेला होता आणि स्वागतासाठी उभ्या शिक्षिकेने अत्तर लावण्यासाठी हात पुढे केला. यंत्रवत अत्तर दुसऱ्या मनगटावर घासले. अत्तराचा मंद सुवास सुखावून गेला. शाळेच्या पॅसेजमधून चालत काही वर्ग मागे टाकले आणि कार्यक्रमाच्या हाॅलमधे प्रवेश केला. 

कार्यक्रम सुरु झाला होता. पाहुण्यांची ओळख, प्रास्ताविक, सत्कार, शाल, नारळ, गुच्छ वगैरे सोपस्कार पार पडले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाले. अनेक जण व्हीएसडींच्या स्मृतींना उजाळा देत होते. व्हीएसडींची कन्या बोलायला उभी राहिली. तोच तोंडावळा, काळ्या कडांची तशीच चष्म्याची फ्रेम ! कुठूनतरी अचानक व्हीएसडी येतील आणि एखाद्या इंग्रजी चित्रपटाची गोष्ट सांगायला सुरुवात करतील असे क्षणभर वाटून गेल. 

एव्हाना हृदयातील व्हीएसडींच्या आठवणींच्या कप्प्याचे दार सताड उघडले गेले होते. आणि डॉ जगदीशने माईकचा ताबा घेतला. गुरु शिष्य परंपरेत आम्हाला ठाऊक असलेला तो सर्वोत्तम शिष्य ! एव्हाना आम्हीच इतके भावूक झालो होतो तिथे त्यांची मनःस्थिती काय झाली असेल ? मेरा नाम जोकर मधे जाने कहा गए वो दिन गातांनाचा राजकपूर आठवतो. काळा गॉगल लावूनही त्याचे अश्रू स्पष्ट दिसायचे. डॉक्टर व्हीएसडींवर बोलता बोलता मध्येच थबकायचा, आवंढा गिळायला ... तेव्हा माझ्या नकळत एखादा अश्रू मनाचा आदेश धुडकावत बाहेर यायचा. कुणी पाहिल असत तर .... ? "अरे, ये आसू आज बाहर कैसे आ गए" राजेश खन्नाचा अमरप्रेम मधल वाक्य आठवून गेल. 

पसायदान डोळे मिटून ऐकल. बाहेर पडल्यावर काही क्षण मित्रांबरोबर घालवले. जातांना डॉक्टरला म्हटले एकदा साठलेल्या अश्रूंना मनसोक्त आणि मुक्त वाहून देण्यासाठी अशा आठवणी घेऊन कधीतरी सगळे मित्र भेटूया. पाहूया तो दिवस कधी येतो ते ! मी इकडे तिकडे न बघता स्कूटर सरळ गेट बाहेर काढली. आजही माझी शाळा माझ्या मनात होती तशीच आहे.

बिंदुमाधव भुरे. 

Tuesday, July 18, 2023

प्रबळ प्रादेशिक पक्ष - वर्चस्वासाठी लढाई

कोणाला पटो अगर न पटो पण मी २०१४ नंतर पासून एक मत मांडत आलो आहे कि एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष प्रबळ बनून राहू शकत नाहीत. राष्ट्रवादीला शिवसेनेला बाजूला सारल्याशिवाय ही स्पेस मिळणार नव्हती. आणि त्यासाठी भाजप पासून सेना विभक्त होणे (करणे) गरजेचे होते. २०१४ ला भाजपला एकतर्फी पाठिंबा देणे ही त्यासाठी राष्ट्रवादीची एक धूर्त चाल‌ होती. परिणामी शिवसेना नाके मुरडत का होईना तेव्हा सत्तेत सहभागी झाली.  मात्र २०१४-१९ या काळात सेना सत्तेत राहूनही विरोधात असल्यासारखे वागत राहिली. 

सेनेची दुखरी नस बरोबर हेरुन २०१९ ला राष्ट्रवादीने त्यांना भाजप पासून पूर्ण दूर केले. मुख्यमंत्री पद देऊन त्यांची पक्ष संघटनाही कमकुवत केली. शिवसेना दुभंगणे  हा त्याचा एक स्वाभाविक परिणाम होता. मग आपल्या कूटनीतीचे पुढचे पाऊल टाकताना  राष्ट्रवादी नुकतीच सत्तेत सहभागी झाली. मात्र राष्ट्रवादी पक्ष फुटला असे म्हणण्याचे धाडस आजही अनेक समीक्षक करायला धजावत / तयार नाहीत. 

कालांतराने पूर्ण राष्ट्रवादी सत्तेत आणि शिवसेना (कदाचित १६ आमदारांचे निमित्त) बाहेर हे चित्र भविष्यात दिसू शकते. २०१४ ला योजिल्यानुसार एकमेव प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी आता स्पेस व्यापू पहात आहे. यासाठी आणि येथून पुढे अजितदादा यांचे "आक्रमक नेतृत्व" हे कार्ड हुशारीने खेळले जात आहे. पवारांच्या राजकीय प्रेमात पडलेल्या संजयने उबाठाच्या नेतृत्वाला  धृतराष्ट्र बनवले आहे कारण राष्ट्रवादीचे प्रत्येक पाऊल हे उबाठाची प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली राजकीय स्पेस आक्रसून टाकत आहे. 

दोन्ही पक्षांच्या विभाजित घटकांना आपल्या चूका शोधणे किंवा आत्ममंथन करण्यापेक्षा भाजपला दूषणे देणे सोईचे आहे व ते पक्ष हे काम चोख पार पाडत आहेत. गंमत म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना टोकाचे शिव्याशाप देणे टाळत आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. मिंधे सरकार, खोके सरकार, घटनाबाह्य सरकार आणि आपल्याच लोकांना शिव्याशाप देणे हे उबाठा मंडळींनी गेले वर्षभर सुरु ठेवलय त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील "विसंवादातील (धूर्त) संवाद माधुर्य" उठून दिसते आहे. 

शिवसेनेला मागे टाकून राष्ट्रवादी प्रबळ आणि एकमेव प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे येईल का ? कि उबाठा पुन्हा एकसंध शिवसेना म्हणून गतवैभव पुन्हा मिळवेल ? वगैरे प्रश्नांची उत्तरे नजिकचा भविष्य काळ देईल. तोपर्यंत राजकारणाच्या या चिखलात कोणता पक्ष वेगळी काही भूमिका घेतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

©श्री. बिंदुमाधव भुरे, पुणे

Monday, March 20, 2023

नियती

नियती

 दैव, नशिब, नियती या सगळ्या गोष्टी मानण्यावर असल्या तरी भारतात बहुसंख्य जनता याला मानते. कोणी नवस बोलतो आणि फेडायला विसरतो, कोणी वचन देतो आणि पाळत नाही, कोणी दिलेला शब्द फिरवतो. अन् मग जेव्हा काही विपरित घडते तेव्हा हे भगवान, अरे देवा, ओह गाॅड किंवा या अल्ला यांचा पुकारा होतो आणि पहाणारा सहानुभूती दाखवत दैव, नशिब, नियती वगैरेंवर सगळे सोपवून मोकळा होतो. बुद्धीवंतांची श्रद्धा, अंधश्रद्धा यावर चर्चासत्र झडतात. कलियुगात असच घडायच म्हणे ! करावे तसे भरावे ही म्हण त्यामुळेच आली असावी का ?

आपल्या खाजगी जीवनात एखाद्याने आयुष्यभर जोपासलेली तत्वप्रणाली, केलेला निर्धार म्हणजे त्याची कठोर तपस्या ! त्या मार्गाने आपल्या मुलांनीही मार्गक्रमण करावे हा काही नियम नाही मात्र अपेक्षा असू शकते. मुले त्याचे आयुष्य स्वतंत्रपणे जगायला मोकळी असतात. त्यांचे आदर्श, त्यांची जीवनमूल्ये वेगळी असण्यात चूक काहीच नाही. आणि या वाटचालीत ती आपला स्वतंत्र ठसा उमटवू शकतात. "हा" अमूक अमूक यांचा मुलगा बर का ! किंवा ते अमूक अमूक "याचे" वडिल बर का ! ... समाजात आपली कशी ओळख निर्माण करायची हे तुमचे कतृत्व ठरवत असते. मात्र राजकीय जीवनातील गणिते वेगळी असतात. 

"आयुष्यात काॅंग्रेस सोबत कधीही जाणार नाही अन् तशीच वेळ आली तर हे दुकान बंद करेन." हा बाळासाहेबांनी व्यक्त केलेला निर्धार होता. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी शिवसेनेसाठी आखलेली ती तात्विक चौकट होती कारण काॅंग्रेसचा भोंदू सर्वधर्मसमभाव त्यांच्या हिंदुत्वाला कधीच मान्य नव्हता. पक्षाची सुत्रे मुलाकडे आली. आता याचे पालन मुलाने करायला हवे कारण बाळासाहेबांचा निर्धार ही काही खाजगी बाब नव्हती तर ती त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षासाठी आखलेली लक्ष्मणरेषा होती. कायद्याच्या भाषेत शिवसेना पक्षासाठी घालून दिलेली अलिखित घटनात्मक चौकट म्हणूया. 

आता वडिलांनी केलेला हा पण, निर्धार जगजाहीर होता मात्र मुलाने वडिलांना दिलेले वचन गुप्त होते, बंद खोलीतले होते.... "एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेन." वडिलांच्या पश्चात त्यांना दिलेल्या या वचनाचा उल्लेख सार्वजनिक व्हायला ६ वर्षे का लागली ? वडिलांनी केलेला ठाम निर्धार पायदळी तुडवून त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करणे याला काय म्हणावे ? मी खूप खूप श्रीमंत होईन असे वचन दिले आणि ते पाळायला गैरमार्गाचा अवलंब केला तर त्या वचनपूर्तीची किंमत ती काय ! हिंदुत्वाला न मानणारे, सावरकरांचा अपमान करणारे, पालघर साधू हत्याकांडात सत्ता असूनही तोंड न उघडणारे काॅंग्रेसजन बाळासाहेबांना जवळचे वाटले असते का ? आणि पवार जरी खास मित्र असले तरी ते त्यांच्यासाठी राजकीय शत्रूच होते हे बाळासाहेबांनी उघडपणे आणि जाहीरपणे सांगितले होते. 

पण राजकारणी मंडळींना सिलेक्टिव्ह मेमरीचे वरदान लाभलेले असते. सत्तेपुढे त्यांना मतलबाचे लक्षात रहाते आणि गैरसोयीचे आठवत नसते. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती केली आणि २५ वर्षे ती टिकली. याच युतीत शिवसेनेची २५ वर्षे सडली म्हणताना आपण बाळासाहेबांना चूक ठरवत असतो.‌ आणि दोन पाऊले पुढे टाकून बाळासाहेबांनी कठोर निर्भर्त्सना केलेल्या दोन्ही काँग्रेसशी आघाडी करत असतो तेव्हा वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या आणि त्यांनी आखलेल्या ध्येयधोरणांची चौकट आपण उध्वस्त करत असतो, पक्षाची तत्वे पायदळी तुडवत असतो. बाळासाहेबांचे विचार आणि भुमिका नको पण त्यांचे नावाचा वापर पुरेपूर हवा अशा प्रकारचे चित्र यातून उभे रहाते. "ध्येयवादी विचारांशी आणि तत्वांशी अशी प्रतारणा ही पतनाकडे नेणारी ठरते."

मविआ स्थापन होणे ही शिवसेनेची वैचारिक चौकट खिळखिळी होण्याची सुरुवात होती. भाजपशी मतभेद विकोपाला जात असतांनाही राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याची चाल खेळली आणि २०१४ ला सेना निमूटपणे भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाली. "एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष बलवान राहू शकत नाहीत" हे राष्ट्रवादी ओळखून होती. शिवसेनेची दुखरी नस त्यांनी बरोबर हेरली होती आणि आज बाळासाहेब नाहीत याचा फायदा घेत २०१९ च्या निकालानंतर फासे टाकले गेले. त्यात शिवसेनेचे नेतृत्व अडकले. सत्तातूर सल्लागार मंडळी भरीस टाकणारी होतीच. मविआ स्थापन झाली. शिवसेनेच्या वैचारिक चौकटीला हादरे बसण्याची ती सुरुवात होती. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख दोन्ही जबाबदाऱ्या पेलणे अशक्य होईल आणि पक्षाकडे ठाकरेंचे दुर्लक्ष होईल हा चाणक्याचा कयास अचूक ठरला. पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री बनवून घटनात्मक चौकटीत बंदिस्त करुन टाकले आणि पक्षसंघटनेपासून त्याची जणू नाळच तोडून टाकली.  

२०२२ ला पक्षाकडे सत्ता आणि मुख्यमंत्री पद असूनही चाळीस आमदार बाहेर पडले. राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करतोय हे या मंडळींचे म्हणणे होते. "एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष बलवान राहू शकत नाहीत" या तत्वावर राष्ट्रवादीचे काम सुरु होते. बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर चार हात लांब ठेवले त्यांचीच संगत अखेर भोवली. मतभेद होण्यासाठी मतांची देवाणघेवाण व्हावी लागते. पण तो रस्ता सेना नेतृत्वाने बंद ठेवला होता. आजकाल राजकारणात पक्षात विरोधी किंवा वेगळे मत मांडणाऱ्यांना पक्षात वाळीत टाकले जाते किंवा पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून निलंबित करण्यात येते. पक्षांतर्गत लोकशाही हा केवळ शब्दप्रयोग उरला आहे. 

घटस्फोट हा एका दिवसात होत नाही तर ती दीर्घ काळ चालणाऱ्या मतभेदांची परिणती असते. विसंवाद हा संवाद असेल तरच होतो पण येथे संवादाचाच अभाव असल्यामुळे पक्षात मतभेदांना चालना मिळत राहिली. आणि बघताबघता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असूनही चाळीस मंडळींनी वेगळी भूमिका घेतली. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या याच चाळीस मंडळींना गद्दार म्हणून हिणवले जात आहे. यातील अनेकांनी तर आयुष्याची तीस चाळीस वर्षे पक्ष वाढवण्यासाठी खर्ची घातली आहेत. बाळासाहेबांकडे माणसे जोडण्याची हातोटी विलक्षण होती. ती जादू हरपली, तत्व विसरली आणि पक्षाची दैना झाली. हा नियतीचा खेळ आहे का ? 

ठाकरे कंपूची सारी मदार आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आहे. सोळा आमदार अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे यात कोर्ट हस्तक्षेप करत नाही. ही पक्ष फूट नाही तर आम्हीच खरा पक्ष आहोत याचा हा वाद आहे. खरी शिवसेना कोणाची हे पण कोर्ट ठरवत नाही कारण तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाने पक्ष कोणाचा ? चिन्ह कोणाला ? यावर निर्णय देताच "त्यांनी शेण खाल्ले" असा उन्मत्त शेरा दिला गेला. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्यांनी त्यांच्या अधिकाराचा पक्षपाती वापर केला असा एक दावा सुनावणी दरम्यान केला गेला आहे.‌ कारण बहुमत सिद्ध करायला सांगितले नसते तर ही वेळ आली नसती अशी वकिलांनी बाजू मांडली. पण हे म्हणणे पश्चात बुद्धी आहे. उठसूट कोर्टाचे दार ठोठावणारांनी राज्यपालांच्या या निर्णयाला लगेचच कोर्टात आव्हान का दिले नाही ? उलटपक्षी आमदारांना अपात्र ठरविण्याची चालून आलेली नामी संधी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ठोकरली आणि स्वतःच्या हातानेच सगळा खेळ खल्लास का केला ? अशी बुद्धी होणे हा पण नियतीचा खेळ म्हणायचा का ? 

सत्याची बाजू नेहमीच वरचढ ठरते आणि न्यायाचे पारडे त्या बाजूलाच झुकते. नियतीच्या मनात काय असेल ? शिवसेनाप्रमुखांची भुमिका आणि हिंदुत्वाचा विचार यांच्याशी प्रतारणा हे पतनाकडे नेणारे ठरतय का ? या प्रश्नाचे उत्तर आज तरी होकारार्थी आहे. सिब्बल प्रभृतींनी दोन दिवस किल्ला जबरदस्त लढवला. मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरवणे शक्य नसते. त्यामुळेच कि काय त्यांच्या मुद्द्यांमध्ये कायद्यातील तरतुदींपेक्षा जास्त भर भावनिक आवाहनावर होता.‌ हरिष साळवे प्रभृतींनी मोजकाच युक्तीवाद केला पण तो परिणामकारक होता. सुनावणी दरम्यान जजनी काही प्रश्न विचारणे याचा अर्थ खुलासा घेणे असा होतो. पण त्यावरुन केसचा निकालाचा अंदाज बांधणे अवघड असते. नियतीच्या मनात काय आहे हे सांगता येणे कठीण आहे. पण आज तरी हा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागेल असे वाटते असे धाडसाने म्हणावे लागेल कारण "ध्येयवादी विचारांशी आणि तत्वांशी प्रतारणा ही पतनाकडे नेणारी ठरते" हे सूत्र आहे आणि नियतीचा नियम तसाच लागू होतो.

निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी उर्वरित गट पुन्हा एकदा अपिलात जाईल अर्थात तशी निकालात तरतूद असेल तरच ! पण जनहितासाठी हा पक्ष वाचविण्याचा लढा आहे वैयक्तिक अहंकाराचा नाही हे पक्षप्रमुखांनी लक्षात घेऊन चार पावले माघार घेत खेळी केल्यास पक्षाचे भवितव्य पुन्हा उजळून निघेल कारण परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यावर मात करण्याची नियती नेहमीच एक संधी देत असते. ती ओळखण्याची दृष्टी देव्हाऱ्यातील पूजेचा धनुष्य बाण देईल कि पुन्हा एकदा खुषमस्करे डाव साधतील ? नियतीच्या मनात काय असेल ? 
(सदर लेखातील मते ही व्यक्तिगत आहेत. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही)

© बिंदुमाधव भुरे, पुणे.‌
२० मार्च २०२३