Wednesday, January 14, 2026

विवाद-विभक्ती आणि संवाद-सलोखा

  

महाराष्ट्रातील २९ पालिका, महानगरपालिका निवडणूकांचा धुरळा येत्या १५ जानेवारीला उडणार असला तरी सगळ्यांना खरी उत्सुकता मुंबईत काय होणार हीच आहे. याचे एकमेव कारण म्हणजे मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात जनतेला काय वाटतय हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दिसून आलय आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू यांनी मुंबई मनपा मधील सत्ता अबाधित राखण्यासाठी पाच महिन्यांच्या मनोमिलन प्रवासाची सांगता म्हणून जाहीर केलेली युती !

 

वीस वर्षांपूर्वी विभक्त झालेले हे बंधू ज्या मुद्द्यांवर एकत्र "आले" (एकत्र "झाले" म्हणणे धाडसाचे वाटतय) आहेत ते मुद्दे म्हणजे मुंबईत मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या "वर्चस्वाला" बसत असलेले धक्के अन् आता त्यांच्या "अस्तित्वाला" पोहोचत असलेली बाधा, त्यांचा होणारा अपमान त्याचप्रमाणे मराठी माणसांचे प्रश्न आssणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे षडयंत्र या दर पाच वर्षांनी नित्य नियमाने उगवणाऱ्या मुद्द्याला (काॅंग्रेस संगतीचा परिणाम म्हणून झालेल्या इन्फेक्शनमुळे) आता दिलेली अदानीच्या फोडणीची जोड !

 

या वरकरणी एकच वाटणाऱ्या पण अनेक पदर असणाऱ्या मुद्द्यांना एकत्रित करुन त्याला उफाळलेल्या बंधूप्रेमातून विकसित झालेल्या कौटुंबिक जिव्हाळ्याचे एक भावनिक वेष्टण गुंडाळत हे पॅकेज आकर्षक करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून या दोन्ही बंधूंचे प्रयत्न सुरु आहेत. सरासरी १८% वरुन खाली घसरलेली वोट बँक म्हणजे आख्खा महाराष्ट्र अशा समजुतीने वावरणाऱ्या संजय राऊतांना तसेच येताजाता हे "भाऊ-बंधन" नाट्य वारंवार उगाळणाऱ्या मिडियाला या नविन पॅकेजिंगमुळे "ठाकरे ब्रॅंड" पुन्हा प्रस्थापित झाल्याचा साक्षात्कार झालाय.‌

 

गेल्या पाच महिन्यात जमिनीवरील कार्यकर्त्यांमध्ये असणारा दुरावा कमी करणे आणि त्यांचेही मनोमिलन व्हावे म्हणून बहुतेक स्थानिक कार्यकर्ते प्रयत्नशील असावेत. मात्र जनमानसावर आजकाल ज्या सोशल‌ मिडियाचा प्रभाव आहे तेथे फक्त कौटुंबिक मनोमिलनाच्या बातम्या एखाद्या सोहळ्यासमान नटवून रंगवून दाखवल्या जात होत्या. कोण कोणाच्या घरी किती वेळा गेले या बातम्या दाखवण्यामागे एकेकाळी "आमच्यातील भांडणे" कशी होती हे जनतेने आता विसरावे हा उद्देश असावा. भळभळणाऱ्या जखमांवर यथावकाश खपली धरते आणि काही दिवसांनी राहतात ते केवळ व्रण ! पण जणू काहीच झाल नाही, ऑल इज वेल अस दाखवण्यासाठी मग त्या व्रणांवर एखादे क्रीम लावून ते झाकण्याचा प्रयत्न केला तर तो फक्त पहाणाऱ्याची फसगत करण्याचा प्रयत्न असतो आणि स्वतःसाठी आत्मवंचना !

 

यांच्या एकत्र येण्यामुळे एखादी जादूची कांडी फिरवावी तसा मराठी माणूस आणि भाषा यांना सन्मान प्राप्त होणार असल्याचा विश्वास मुंबईकरांत निर्माण करण्याचा प्रयत्न केविलवाणा  वाटतोय .... उंचावरुन खोल पाण्यात उडी मारल्यावर माणूस ज्या वेगाने खूप खोल पाण्यात अगदी तळाशी जातो त्यापेक्षा दुप्पट वेगाने तो उसळी घेऊन पुन्हा पृष्ठभागावर येतो. तद्वत हा "बंधू-मिलाप" अशीच किमया घडवून आणणार अशी चित्रे या बंधूप्रेमी मंडळींकडून माध्यमात रंगवली जात आहेत.‌ पण खरंच असं होईल ? वास्तव काय आहे ? सोळा तारखेला काय होईल ?

 

निमित्त झाले हिंदी भाषा सक्तीचे आणि त्याला‌ राज ठाकरे यांनी त्यांच्या आजवरच्या वाटचालीला पूरक वाटेल अशीच भूमिका घेतली. त्याला‌ नेहमीप्रमाणेच चांगली प्रसिद्धी मिळाली आणि मग तिकडे भाऊरायाला हाच मराठी मुद्दा आपल्या घसरत्या प्रतिमेला सावरेल, पुन्हा हात देईल अशी आशा वाटायला लागली. पण... संपलेल्या पक्षाशी कशी काय बुवा जवळीक साधायची ? लोक काय म्हणतील ? आणि मग नियतीने आणखी एक संधी प्रदान केली. महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी उच्चारलेले ते वाक्य ! "आमच्यातील भांडणापेक्षा, वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे." आता हा महाराष्ट्र वीस वर्षांपूर्वी छोटा होता का ? आणि आत्ता (अदानींमुळे) मोठ्ठा झाला का ? असे बालिश प्रश्न विचारायचे नसतात.‌

 

यानंतर उद्धव ठाकरे सातत्याने जाहीरपणे म्हणत रहातात कि "आम्ही एकत्र आलोय ते एकत्र रहाण्यासाठी" तर राज ठाकरे एकदा म्हणाले कि *"हिंदी सक्ती किंबहुना मराठी या मुद्द्यावर आम्ही एकत्र"* आलो आहोत.‌ यादरम्यान जेव्हा जेव्हा हे बंधू सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले तेव्हा तेव्हा उद्धव यांनीच कायम राजचा हात हातात घेणे, त्याला आलिंगन देणे ... वगैरे पहायला मिळाले जणू म्हणत असावेत "देर ना हो जाए कही देर ना हो जाए" आणि प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात हे "जनाब सहारा देने के लिये बेताब है" असे दिसत असल तरी राज मात्र सदैव सावध पवित्रा घेत आहेत हे लक्षात येत होते.

 

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, अर्ज दाखल करायचे दिवस जवळ आले तरी युतीची अधिकृत घोषणा होत नव्हती. शेवटच्या क्षणी ज्या पत्रकार परिषदेचा मोठा गाजावाजा केला ती चक्क १५ मिनिटांच्या आत संपली आणि त्यात राज ठाकरे यांनी "आम्ही युती केली आहे" हे जाहीर करण्यापलीकडे काहीच भाष्य केले नाही.‌ इतिहासात बसलेले चटके, धक्के मन लवकर विसरायला तयार होत नसाव..

 

या बंधूंचे हे "एकत्र येणे" ते "आम्ही युती केली आहे" असे जाहीर करणे या दरम्यान जो मोठा कालापव्यय झाला तो या बंधूंना दुर्दैवाने बराच महाग पडणार असे दिसते आहे.‌ "देर लगी आनेमें तुमको" पण हा उशीर पाच महिन्यांचा का पाच वर्षांचा ? कि एकत्र येणे ही मराठी माणसाची नविन फसगत ? याचे उत्तर येणारा काळच देईल.‌ राज ठाकरे यांचे शिवसेनेतून बाहेर पडणे यामागे महाराष्ट्र, मराठी माणूस यांचे हित रक्षण करणे हे मुद्दे नव्हतेच. बाळासाहेब राजना नाशिक देत होते आणि त्यांना मुंबई पण हवी‌ होती.‌ शिवसेनेची धुरा पुढे वहाण्याची सुप्त महत्वाकांक्षाही त्यामागे लपून राहिलेलेली नव्हती.

 

त्यामुळे मनसे स्थापने नंतर महाराष्ट्राविषयी किंबहुना मुंबईविषयी या दोघांच्या मनात असलेल्या विचारांमध्ये, संकल्पनांमध्ये मुलभूत अंतर आहे हे स्पष्ट होत गेले. बाळासाहेबांनी शिवसेनेची घडी बसवताना मराठी हाच मुद्दा घेतला होता. आठवा ती घोषणा .. "बजाव पुंगी हटाव लुंगी" .. कायम बाळासाहेबांची सोबत करणाऱ्या राजनी मनसे स्थापनेपासून मग तोच कित्ता नव्या स्वरूपात गिरवतांना स्पष्ट भुमिका घेतली कि मुंबईत येणारे परप्रांतीय घोळके यांनी मुंबईचे प्रश्न अधिक वाढवले असून त्यामुळे मराठी माणसांवर अन्याय होतोय.‌ या भूमिकेत आजही त्यात बदल नाही. परप्रांतीय इथे रोजगारासाठी येतात आणि आपली मतपेढी तयार करतात हा स्पष्ट आरोप राज ठाकरे यांचा आहे.‌ पण बाळासाहेबांनी काळानुरूप भुमिका बदलल्या.‌ एखाद्या धुरंधर राजकारण्याप्रमाणे आपला राजकीय प्रवासात त्यांच्यावर हिंदुहृदयसम्राट या बिरुदावली श्री मोहोर उमटवली गेली. मात्र राज ठाकरेंचा मात्र हा प्रवास फसला आणि हा हिंदू जननायक रील्स आणि टीकेचा धनी बनला.

 

तर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा आल्यानंतर त्यांनी मुंबई मनपाची सत्ता राबवताना सत्ताकारण आणि अर्थकारण यांचा मेळ घातला. किंबहुना सत्ता हे कमाईचे एक माध्यम आहे आणि मुंबई मनपा हे त्यांचे एक एटीएम आहे असे मानत त्यांनी कारभार केला. मात्र या दरम्यान संघटना बांधणी कडे दुर्लक्ष झाले. त्यांचे कारभारी नियमितपणे सोन्याची अंडी देत होते त्यात समाधान न मानता त्यांना सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापायची इच्छा झाली आणि ते मुख्यमंत्री बनले. संवैधानिक पदावर पक्षप्रमुखाला बसवले कि एकचालकानुवर्ती असलेला पक्ष खिळखिळा होतो हे शरद पवार या धुर्त आणि अनुभवी राजकारण्याला ठाऊक असल्यामुळे त्यांनी फेकलेल्या मुख्यमंत्री पदाच्या जाळ्यात उद्धव ठाकरे अडकले. परिणामी नंतर पक्षाची झालेली वाताहत हा ताजा इतिहास आहे.

 

असो.. सांगायचा मुद्दा हा कि राजकारणाकडे बघण्याचा दोन्ही भावांच्या दृष्टीकोनात जमिन आसमानाचा फरक आहे. युतीत पंचवीस वर्षे सडली म्हणत सत्तेसाठी काॅंग्रेस बरोबर केलेला घरोबा त्यांच्या सहकाऱ्यांनाच नव्हे तर मतदारांनाही तो रुचलेला नाही हे वास्तव हा माणूस आजही स्वीकारायला तयार नाही.‌ हिंदुत्वाची आपली व्याख्या भाजपच्या हिंदुत्वापेक्षा कशी अधिक चांगली हे सांगताना मुस्लिम मतांसाठी करत असलेले लांगुलचालन हे मतदारांच्या पचनी पडत नाही हे कटू वास्तव उबाठा लक्षात घेत नाही हे पक्षाचे दुर्दैव !

 

तर राज ठाकरेंच्या बाबतीत त्यांच्या इतिहासातील भुमिका त्यांच्या राजकारणातील अन्य पक्षांबरोबर युतीसाठी बाधा ठरत आहेत.‌ परप्रांतीय, अमराठी या मुद्द्यांमुळे स्वीकारार्हतेला आलेल्या मर्यादा तोडण्यासाठी हिंदू जननायक म्हणून प्रतिमा रुजविण्याचा प्रयत्न मात्र कुंभमेळ्या संदर्भात उडवलेली खिल्ली तर एकदा भाजपला बिनशर्त पाठिंबा देणे मग पुन्हा विरोधी भूमिका घेणे.. यांसारख्या घटनांमुळे "एक गोंधळलेला" हुषार राजकारणी वक्ता अशी प्रतिमा आज रुजत चालली आहे. पक्ष स्थापून दोन दशकांचा कालावधी लोटला पण अद्याप सत्तेची द्राक्षे आंबट अशी अवस्था आहे. कार्यकर्ते आणि दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांना किती दिवस स्वप्नात झुलवत ठेवायचे ?

 

त्यामुळे एकिकडे काॅंग्रेस सोबत केलेला घरोबा आता फसलाय आणि हिंदुत्ववादी प्रतिमा गोत्यात आली आहे तर दुसरीकडे भाजपने परतीचे दोर कापलेले आहेत अशा स्थितीत मुंबई मनपा हातची गेली तर उपासमारीची वेळ येईल हे नक्की शिवाय उरला सुरला पक्षही गुंडाळला जाण्याची भिती ! या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची झालेली आठवण गेम चेंजर ठरेल अशी भाबडी आशा उद्धव ठाकरे यांना आज आहे. राज ठाकरे यांनाही आपला पक्ष आणि जनाधार टिकविण्यासाठी बाकी पर्याय बंद झालेले असल्यामुळे पुन्हा एकदा मूळ धारेकडे परतणे योग्य वाटले असावे.‌

 

दोघांच्या स्वभावातील कंगोरे लक्षात घेता *कत्रितपणे वाटचाल करण्याची कसरत दोघांनाही यशस्वी करुन दाखवावी लागेल, भविष्यात ती टिकवून ठेवावी लागेल.. भूतकाळातील कटू अनुभव, आठवणी लक्षात घेता हे प्रत्यक्षात येणे स्वप्नवत वाटतय.‌

 

श्रीगजानन विजय ग्रंथातील एका ओवीचे स्मरण होते..

 

सारखाच मिळे सारख्याशी, पाणीच मिळे पाण्याशी ।

विजातीय द्रव्याशी, समरसता होणे नसे ।।

 

त्यामुळे दोन्ही भावांनी आपल्या एकत्र येण्याला मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे, मराठी माणूस आणि मराठी धोक्यात वगैरे घिसेपिटे मुद्दे मांडत मराठी माणसांना, मतदारांना भावनिक साद घातली आणि आता नाही तर कधीच नाही, तुम्ही संपाल वगैरे भिती घातली तरी त्याला मतदार भुलेल ? एकवेळ तुम्ही आज बिबट्यांची भिती घाला लोकांना खरे वाटेल. पण बिबट्यांच्या जमान्यात तुम्ही डायनासोरची भिती घातलीत तर कोण घाबरेल ? अहो गब्बरलाही पन्नास वर्षे होऊन गेली. आज मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान या मुद्द्यालाही पाच दशके उलटली.

 

या बंधूंचे राजकारणात हे निवडणूका केंद्रीत असते. लाखांच्या सभा भरवून प्रभाव पडेल आणि आपण जिंकू या भ्रमात हे रहातात.‌ सभेला तुफान गर्दी पण मतपेटी रिकामी ! संघटना बांधणी नाही, जनसंपर्क कायम रहावा‌ म्हणून कायमस्वरूपी सामाजिक उपक्रम नाही, जिल्हा स्तरावरील पक्षाच्या शाखा कार्यशील नाहीत हे वास्तव या दोन्ही पक्षांचे आहे. निवडणूक बिनविरोध कशी होते हा आक्षेप घेतला जातो पण तिथे द्यायला या पक्षांकडे उमेदवारच नाही ही वस्तुस्थिती हे भाऊ कधी स्वीकारणार ? पायाला भिंगरी लावल्यासारखे एकनाथ शिंदें, अजित पवार, शरद पवार, फडणवीस हे सतत फिरत असतात आणि त्या मेहनतीची फळे त्यांना मिळतात.

 

या पार्श्वभूमीवर, या दोघा भावांनी "एकत्र आलो आहोत ते एकत्र रहाण्यासाठी" हे येणाऱ्या काळात सकारात्मक राजकारण करत, पक्ष संघटना मजबूत करत दाखविलेत तर लोकांच्या मनात पुन्हा विश्वासाहर्ता निर्माण होईल. राजकारणात भुमिकेत ताठरपणा असून चालत नाही तर लवचिकता दाखवावी लागते कारण त्यामुळेच दाराशी आलेल्या संधीचे सोने करता येते .. हे बाळासाहेबांनी केले पण ही कला टीपकागदा सारखी टिपण्यात हे भाऊ कमी पडले. राजकारणात अहंकार तुमची प्रगतीला खीळ घालतो, माणूस सारासार विवेक हरवून बसतो. या अहंकारापोटीच या भावांना एकत्र यायला वीस वर्षे लागली तर याच अहंकारापोटी आलेल्या संवादाच्या अभावामुळे सोन्यासारखे चाळीस मावळे गमावले.‌

 

तुटे वाद संवाद तेथें करावा,

विविके अहंभाव हा पालटावा ॥

 

अहंकार हा मोठा दोष आहे आणि तोच बंधनाचे मूळ कारण असून ऱ्हासाला कारणीभूत ठरतो.‌ आणि जेथे अहंकार असतो तेथे योग्य अयोग्य ओळखण्याची शक्ती नष्ट‌ होते.

 

तेव्हा येत्या सोळा तारखेला तरी दोन्ही भावांचे प्रयत्न अयशस्वी ठरतील अशी शक्यता दिसते कदाचित एकनाथ शिंदें या दोन्ही भावांच्या एकत्रित जागांपेक्षा जास्त जागा निवडून आणू शकतील. अर्थात, हल्ली अनेक विश्लेषक पंडित, माध्यमे यांचे अंदाज, भाकिते यांना मतदारांनी धोबीपछाड देत खोटे ठरवलय; माझीही गत तीच झाल्यास नवल वाटणार नाही. 

 

मात्र दोन्ही भावांनी एकत्र "येण्यापेक्षा" एकत्र "होऊन" अहंकाराचा त्याग केला, राजकारणात आवश्यक ती लवचिकता आणत पुन्हा गेलेल्या सगळ्या मावळ्यांना परत घेत एक सर्वसमावेशक, हिंदुत्वाची कास धरणारा, महाराष्ट्र आणि मराठीचे हितसंवर्धन करणारा पक्ष बांधला तर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना समाधान लाभेल ! हे होईल का ? येणारा काळच हे ठरवेल.

 

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने राजकारणातील, पक्ष-पक्षातील  कटूता संपून सौहार्दाचे, सलोख्याचे  वातावरण पुन्हा प्रस्थापित व्हावे यासाठी शुभेच्छा !!

 

श्री. बिंदुमाधव भुरे, पुणे.*

Wednesday, October 29, 2025

स्व. श्रीपादराव देशपांडे - २५ वा स्मृती दिन



 

स्व. श्रीपादराव देशपांडे - २५ वा स्मृती दिन

६ ऑक्टोबरचा दिवस, साधारण रात्री ८ ची वेळ... घरी यायला नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला होता. रात्री आमची जेवणाची वेळ ९ - ९।। दरम्यानची.. मात्र त्यादिवशी जेवायला लवकर वाढले होते.. मनाला हे थोड विचित्र वाटत होत.. पण त्यांचे स्वरुप सांगता येत नव्हत.  जेवण झाल्यावर पत्नीने बातमी सांगितली.."श्रीपादराव गेले".. मनातल्या उमटत असलेल्या त्या विचित्र भावनांचा उलगडा झाला होता..

१८५, शनिवार पेठेतील संघटनेचे कार्यालय, निळ्या रंगाचे बॅक कव्हर असलेली लाकडी खुर्ची, डाव्या हाताला टायपिंग मशीन, उजव्या हाताला कागदपत्रांचे भेंडोळे, समोर बसलेले अनेक कार्यकर्ते... मी १९८४ ला पुण्यात आल्यावर कार्यालयात पहिल्यांदा पाय ठेवला तेव्हाचे हे चित्र ! आजही ते तसेच आहे.. मनावर कोरलेले आहे...श्रीपादरावांच एकिकडे डिक्टेशन सुरु असायच.. मधूनच फोन वाजायचा, समोर कार्यकर्त्यांच्या चर्चेत त्यांच्या खास शैलीत हुंकार भरत दाद देत तर कधी मान डोलावून दिलखुलासपणे हसून कोतुक करत... अष्टावधानी म्हणजे काय याचा वस्तुपाठ देत... त्यांचे काम अखंडपणे सुरू असायचे..‌

श्रीपादरावांशी पुण्यात एन ओ बी डब्ल्यू च्या अधिवेशनादरम्यान परिचय झाला होता.‌ नंतर १९८४ ला मी पुण्यात बदली घेऊन आल्यावर या परिचयाचे पुढे एका दृढ नात्यात रुपांतर होणार आहे याची मला तेव्हा कल्पना नव्हती. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या असंख्य मंडळींवर त्यांचे बारीक लक्ष असावे... परिपक्व नेतृत्वाचा हा एक गुण... कार्यकर्त्यांमधील गुणांची पारख करणारा हा माणूस मला तेव्हा प्रथमदर्शनी मनापासून भावला. 

परिचयातून भेटीगाठी अन् मग सहवासाची वारंवारिता वाढते आणि त्यातून मग संवाद सुरु होतो... त्यामुळे पुणे बॅंक वर्कर्स, महाराष्ट्र प्रदेश बॅंक वर्कर्सच्या कामात त्यांच्यामुळे मी नकळत ओढला गेलो होतो. वरचेवर होणाऱ्या भेटीमध्ये निवांत क्षणी अनेकविध विषयांवर आमच्या चर्चा व्हायच्या. 

अशा चर्चांना शेवटी एक निर्णायक वळण किंवा आकार यावा म्हणून ते चर्चेचा समारोप करताना शेवटी म्हणायचे कि 

"बिंदूजी, आजचा हा सगळा विषय जरा संपूर्ण लिहून काढाल का ?" 

लिहून झालेले कागद त्यांच्या हाती सुपूर्द केले कि मग त्यांना त्यांच्या कागदपत्रांच्या भेंडोळ्यात मानाचे स्थान मिळायचे...(आम्ही त्या भेंडोळ्याचे "चोंबाळं" असे नामकरण केलं होतं.) त्यांनी तेव्हा लावलेल्या लिखाणाच्या सवयीचा फायदा मला आजही जाणवतोय. 

मी रहायला तेव्हा दत्तवाडीतच होतो. श्रीपादरावांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर ! हे त्यांना एकदा कळाले.. मग काय .. रात्री कधी कधी १० वाजता फोन यायचा आणि मग कधी त्यांच्या घराच्या अंगणात तर कधी सारस बागेजवळ वीर सावरकरांच्या पुतळ्याखाली चर्चासत्र रंगात येत असत.. कधी बॅंक सुटल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये स्पेशल ऑमलेटचा आस्वाद घेत तर कधी एखाद्या हाॅटेलमध्ये वडा सांबार खात खात चर्चा व्हायच्या ! 

प्रसंगानुरूप विशेष भाषण त्यांना जेव्हा करायचे असेल तर त्या भाषणाचा लिखित ड्राफ्ट त्यांच्याकडे तयार असायचा.. तो वाचून मी त्यावर मत प्रदर्शित करावे असा त्यांचा आग्रह असायचा. आपला परफाॅरमन्स हा सदैव सर्वोत्तम असायला हवा हा त्यांचा अट्टाहास असायचा. यासाठी आपले भाषण एका सामान्य बॅंक कर्मीला कसे वाटेल ? हे जाणून घेण्यासाठीचा हा त्यांचा अनोखा प्रयोग होता !! 

अर्थात, त्यांना सूचना देणे किंवा काही बदल करायला सांगणे म्हणजे काजव्याने सूर्याला उजेड दाखवण्याचा प्रयत्न ! त्यामुळे मी या फंदात सहसा पडत नसे.. मात्र कधी काही सुचवलेच तर ते मनापासून कौतुक करायचे.. श्रद्धेय पंताची एखाद्या नविन कार्कर्त्याच्या पाठीवर "शाबासकीची थाप" पडली तर त्याचा जो "अर्थ" असायचा ना तोच "अर्थ" या कौतुकात दडलेला असायचा हे कालांतराने मला उमगले.. परिपक्व नेतृत्वाचा हा पण एक गुण !! 

आमच्या बॅंक ऑफ बरोडातील एक अतिशय हुशार व बुध्दिमान नेते स्व. अशोक भिडे यांना लोकल प्रवासात अपघात झाला असता त्यांचे वापी येथे होणाऱ्या अभ्यास वर्गात येणे रद्द झाले. ऐनवेळी हक्काचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला सोबत नेले इतकेच नव्हे तर प्रश्नोत्तरांचे एक सत्र मी सांभाळावे असा त्यांनी आदेश दिला. अर्थात, पाठीशी मी आहे, काळजी करु नका हे एव्हाना सांगण्याचीही आवश्यकता राहिलेली नव्हती इतका त्यांचा माझ्यावर विश्वास एव्हाना बसला असावा... 

अशा अनेक आठवणी श्रीपादराव हे नाव घेताच मनाच्या हळूवार कप्प्यातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करत असतात.. आणि... या आठवणी जेव्हा केव्हा बाहेर डोकावताना तेव्हा डोळ्यांच्या पापण्या नकळत ओलावत असतात. 

एकंदरीतच श्रीपादरावांचे व्यक्तिमत्त्व हे मला मनमिळाऊ, कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे, कार्यकर्त्यांमधील नेतृत्व गुणांना वाव देत त्यांना फुलवणारे भासले. आणखी काही वर्षे ते आपल्यात हवे होते ही हळहळ कायमच मनात घर करुन आहे. शेवटचा श्वास त्यांनी संघटनेच्या कार्यालयात घेतला ही नियतीची योजना किती विलक्षण होती ना

असो !! काळ कोणासाठी थांबत नाही.. कालचक्राचा हा प्रवास अव्याहतपणे सुरु असतो.. या प्रवासात सामील कधी अन् कुठे व्हायचे आणि या प्रवासात नेमके कुठे थांबायचे हे आपल्या हातात नसते.. 

काही मंडळींचा हा प्रवास प्रदीर्घ असतो तर काहींचा अल्प !! या प्रवासात आपल्याला अनेक सहप्रवासी भेटतात कारण ती एक स्वाभाविक क्रिया असते.. मात्र या प्रवासात "आपण स्वतःहून किती जणांना भेटतो ?" हे माझ्या मते जास्त महत्वाचे आहे. 

अशा भेटण्यामागे माणसे जोडण्याची प्रेरणा असते. या प्रेरणेमागे काही विशिष्ट हेतू अर्थातच असतो त्याशिवाय हे घडत नाही.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत संस्कारित झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात या हेतू विषयी सुस्पष्टता ही कायमच असते. 

चारित्र्यवान व्यक्ती घडविण्याच्या सातत्यपूर्ण अन् निस्वार्थ साधनेतून व्यक्तींमध्ये "राष्ट्र प्रथम" ही भावना आकाराला येत असते. अशा घडलेल्या व्यक्तींच्या समुहातून तयार होणारा समाज हा राष्ट्राला पुनर्वैभव मिळावे यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही वेळ समाजकार्यासाठी देत असतो..

संघाने संस्कारित केलेल्या अशा असंख्य स्वयंसेवकांचे, व्यक्तींचे कार्य समाजाच्या विविध क्षेत्रात अव्याहतपणे सुरु आहे. अशा  व्यक्तींमध्ये स्व. श्रीपादराव देशपांडे यांचे नाव हे आम्हा भारतीय मजदूर संघ आणि बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या एन ओ बी डब्ल्यू संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरलेले आहे. 

एन ओ बी डब्ल्यू च्या कार्याचा पाया बॅंक ऑफ महाराष्ट्रमधे रचल्या नंतर ते पुढे अधिक जोमाने वाढविण्यासाठी ज्यांनी अपरंपार कष्ट घेतले त्यात श्रीपादरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.... वर उल्लेख केल्याप्रमाणे "आपण स्वतःहून प्रवासात किती जणांना भेटतो" हे महत्त्वाचे असते. श्रीपादरावांना याची नक्की जाण होती कारण आपल्या संघटन कार्यातील या प्रवासात त्यांनी असंख्य लोकांच्या गाठीभेटी  घेतल्या. 

माणूस ओळखण्याची कला त्यांना अवगत होती म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. संघटनेत सभासद जोडून घेणे.. त्यांच्याशी वारंवार संपर्क ठेवणे.. त्यांच्यातील गुणांची पारख करुन त्यांना कार्यकर्ता म्हणून घडविणे यात त्यांचा हातखंडा होता. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या "कार्यकर्ता" या पुस्तकात कार्यकर्ता म्हणून आवश्यक असलेल्या साऱ्या गुणांच्या वर्णनांचा उल्लेख आहे.. श्रीपादरावांमध्ये ते सारे गुण सहजसुलभ होते. 

अशा गुणवान कार्यकर्त्यातून अनेक चांगले नेते बॅंकिंग क्षेत्रात काम करताना संघटनेला देण्याचे काम श्रीपादरावांनी केले. बॅंकिंग क्षेत्रात मजदूर संघाच्या कामाचा विस्तार होत होता. श्रीपादरावांनी आपल्या कर्तृत्वाने आपली आणि अर्थातच एन ओ बी डब्ल्यू... नोबो संघटनांची कार्यकक्षा वाढवत ती बॅंक ऑफ महाराष्ट्र ओलांडून अनेक बॅंका, विविध राज्ये आणि मग देशपातळीवर नेली. 

जे करायचे ते भव्य हा त्यांचा अट्टाहास असायचा कारण त्यामागे असलेला त्यांचा विचार... बलाढ्य अशा डाव्या विचारांच्या संघटनेसमोर आपल्याला नेटाने उभे रहायचे आहे या गोष्टीचे त्यांना पूर्ण भान होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रेरित होऊन काम केले पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद असे. 

त्यांच्या सहवासात १५-२० मिनिटे व्यतित केल्यावर नव्या जोमाने, नव्या जोशाने काम करण्याची प्रेरणा मिळायची.. त्यांच्या भाषणातूनही हा परिणाम साधला जात असे. बलाढ्य संघटनेसमोर उभे ठाकायचे तर मनात न्यूनगंडाचा भाव कणभरही असता काम नये किंबहुना पुरेपूर आत्मविश्वास असला पाहिजे याची त्यांना जाणीव होती हेच यातून स्पष्ट होते. 

आजकाल शाईचे पेन कोणी वापरत नाही त्यामुळे टीप कागद काय असतो हे नविन पिढीला ठाऊक नसेल. शाई पेनने लिहिलेले पटकन वाळावे यासाठी अशा टीपकागदाचा वापर पूर्वी करत असत.. मनुष्य प्राण्यांत अशा  टीप कागदांचा गुणधर्म असला असता तर श्रीपादरावांच्या नेतृत्वातील विविध गुण किती सहजपणे टीपता आले असते ना

मुंग्यांची रांग आपण पाहिली आहे. एका मागोमाग एक त्या चालत असतात. समोरुन  येणाऱ्या काही मुंग्या या रांगेतील जवळपास प्रत्येक मुंगीपाशी काही क्षणाचे हितगुज करत असतात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या या मुंग्या संख्येने कमी असल्या तरी रांगेतील प्रत्येक मुंगीला भेटायचा त्यांचा प्रयत्न असतो ... त्या काय संवाद साधत असतील ...देव जाणे.. कदाचित "प्रवासात आपण स्वतःहून किती जणांना भेटतो ?" हेच सूत्र तर त्यामागे नसेल

पण एक मात्र नक्की आहे की....

भेटीतून संवाद, संवादातून संपर्क, संपर्कातून एकता आणि एकतेतून एकात्मिक भावनेने ध्येयाकडे वाटचाल हे सूत्र अशा भेटींमागे असते ! संघटनेमध्ये काम करताना सगळ्या प्रवृत्तीच्या, स्वभावाच्या लोकांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागत असते.. प्रत्येकाच्या क्षमता पातळीमध्ये फरक असतो....

या पार्श्वभूमीवर एक संस्कृत श्लोक या ठिकाणी नमूद करावासा वाटतो...

असज्जनः सज्जन सङ्गिसङ्गात् करोति दुःसाध्यम् अपीह साध्यम् । 

पुष्पाश्रयात् शम्भु शिरोधिरूढा पिपीलिका चुम्बति चन्द्रबिम्बम् ॥ 

म्हणजे... 

एखादी सामान्य व्यक्ती ही सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहून असाध्य असे कार्य सहजपणे करु शकते.. जसे एक मुंगी फुलाचा आधार घेत शंकराच्या माथ्यावरील चंद्रापर्यंत पोहोचू शकते.. 

 

श्रीपादराव हे आपल्यासारख्यांसाठी असे फुलांचा आधार देणारे होते..

विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रत्येक मुंगीच्या मनात जशी विचारांची स्पष्टता असते ... तशी ती श्रीपाद रावांच्या विचारात होती..  शंकराच्या माथ्यावरील चंद्र म्हणजे अर्थातच राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त होईपर्यंत कार्यरत रहाणे.. आणि त्यासाठी श्रीपादरावांसारख्या एखाद्या फुलाचा आधार घेत वाटचाल करणे म्हणजे ... आपल्या सगळ्यांचे जीवन हे एकप्रकारे अशा मुंगी सारखेच आहे.

आज २५ व्या स्मृति दिनाच्या दिवशी त्यांना हृदय पूर्वक वंदन !!! 

बिंदुमाधव भुरे..

Thursday, October 23, 2025

राळेगणसिद्धी भेट

 

राळेगणसिद्धी भेट – एक अविस्मरणीय दिवस

 

१५ सप्टेंबरचा दिवस.. आमचा शालेय मित्र मिलिंद चौगुलेचा फोन आला.. 

"पुण्यात आहेस कि मुंबईत ?" नेहमीप्रमाणे प्रश्न..

"सध्या तरी पुण्यातच आहे" ... मी

पुढचा प्रश्न

"४ ऑक्टोबरला फ्री आहेस का ?"

मिलिंद गुगल्या टाकण्यात पटाईत त्यामुळे प्रश्न आला कि उत्तर देताना काळजीपूर्वक बोलावं लागतं..

मी सावधपणे..

"का रे ? काही कार्यक्रम आहे का ?"

मिलिंद..

"डॉक्टर...  एक दिवसाची राळेगणसिद्धी भेट अरेंज करतोय..बाकी डिटेल्स नंतर सांगतो."

डॉक्टर म्हणजे आपला हृदय मित्र जगदीश हिरेमठ...

चितळे म्हटल कि बाकरवडी... बाटलीबंद पाणी म्हटल कि बिसलरी... तसं राळेगणसिद्धी म्हटलं कि आण्णा हजारेंच नाव डोळ्यांपुढे येतं...

 

आण्णा गेल्या ८-१० वर्षांपासून प्रकाशझोतात नाहीत.. पण नाव‌ घेताच आजही दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलन आठवते.. तिरंगा फडकवत वंदे मातरम् आणि इंकिलाब झिंदाबादच्या घोषणा देणारे आण्णा, वृत्तपत्रे आणि वाहिन्या प्रतिनिधींना आपल्या मराठमोळ्या हिंदीत ठामपणे सामोरे जाणारे आण्णा, प्रचंड उत्साहाचा खळखळता वाहणारा झरा असलेले आण्णा...


मनात हे चित्र तरळले तसं क्षणाचाही विलंब न करता मी हो म्हणून मोकळा झालो. मला ही संधी दवडायची नव्हती कारण आण्णांची भेट होईल, त्यांना निदान पहाता येईल हा विचार एकिकडे जसा मनात होता तसा आणखी एक मॅग्नेटिक फोर्स होता अन् तो म्हणजे एक आख्खा दिवस शाळेतल्या मित्रांसोबत घालवता येणार होता.. आणि त्यातही सामाजिक, वैचारिक, वैद्यकीय आणि अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या असामान्य कामगिरीने, कर्तृत्वाने एक असाधारण "उंची गाठलेला" डॉ जगदीश हिरेमठ हा पूर्ण दिवस आमच्या सोबत असणार होता..

 

४ तारीख उजाडली.. सकाळी ७.४५ .. बस निघायची वेळ.. आम्ही बारा जण होतो.. लकी ट्वेल्व मध्ये मी आहे याचा आनंद वेगळाच होता..‌ अन्यथा कसल्याही लकी ड्रॉ मध्ये कधीच आपला नंबर लागत नसतो हे माझे ठाम मत ! कर्म करा.. फुक्कट काही मिळत नसत..

 

वाटेत ब्रेकफास्ट कुठे ? किती वाजता ? राळेगणसिद्धी जवळ आल्यावर आम्हाला वाटाड्या मार्गदर्शक म्हणून कोणीतरी येणार.....  वगैरे कार्यक्रमाचा तपशील डॉक्टरने बसमध्ये सांगितला.. संपूर्ण दिवसभरात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, काय हव नको याची विचारपूस करणारा आमच्या टीमचा कॅप्टन म्हणा किंवा आमचा माॅनिटर म्हणून मिलिंद आपले काम चोख बजावत होता.‌



ब्रेकफास्टला मिसळ, भेळ, भजी असा जबरदस्त टेस्टी मेनू आपला प्रभाव दाखवत होता.. ब्रेकफास्ट नंतर मंडळी जराशी सुस्तावली होती..


  



एका शाळेच्या आवारात जीप थांबली.. मागोमाग बसही .. वाटाड्या आणि त्याचा चक्रधर सारथी सोबती यांच्याशी परिचय झाला. पानघट हे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यावर पूर्णतया आण्णांच्या कार्याला वाहून घेतलेले आण्णांचे एक निष्ठावान सेवक ! राळेगणसिद्धी मधील आण्णांच्या कार्याची खडानखडा माहिती असलेले, आण्णांची दिनचर्या सांभाळणारे, त्यांना काय हवे नको त्याची इत्यंभूत माहिती असणारे हे पानघट... यांच्या बोलण्यातून आण्णांविषयी असलेला आदर शब्दा शब्दांत जाणवत होता.. माहिती सांगताना मधूनच हसत हसत...




"मी जरा जास्तच बोलतो"  अस म्हणायचे.. आणि हे वाक्य सवयीने पेरलेल असावं असं अगदी या माणसाला पहिल्यांदा ऐकतांनाही कळत होत..

 

मला हा माणूस म्हणजे राम रुपी आण्णांचा हनुमान असल्याचा भास एक क्षण झाला..

 

पानघट यांचेच नातेवाईक म्हणजे चक्रधर सारथी सोबती श्री.‌बाळासाहेब गट ! हे गृहस्थ डॉ जगदीशच्या पाया पडले आणि सांगू लागला कि "माझा हा पुनर्जन्म आहे आणि मृत्यूच्या दारातून मला डॉक्टरने परत आणलय... डॉ हिरेमठ म्हणजे माझ्यासाठी देव आहे.." वगैरे बरेच काही...

 

ऐकताना अंग शहारून गेल.. जगदीशचे हे रुप ऐकून होतो पण आज ते आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो.. डॉ जगदीशचे असे किती तरी पेशंट असतील पण त्यात असा एखादा भक्त विरळाच ! त्यानेच डॉक्टरला घरी या असे आग्रही निमंत्रण अनेकदा दिले होते आणि मग हा भेटीचा सोहळा प्रत्यक्षात आला होता..

 

आण्णांच्या कल्पनेतून आकाराला आलेली शाळा, त्याचे विस्तारीत बांधकाम, यादवबाबा मंदिर वगैरे पाहून झाल्यावर आम्ही संग्रहालयाच्या आवारात पोहोचलो.. एव्हाना पानघटांनी आण्णांपर्यत आमच्या आगमनाचा निरोप पाठवायची व्यवस्था केली‌ होती.

 

संग्रहालयात काय पहायला मिळणार ? मनात उमटलेला प्रश्न..

हे स्किप करुन थेट आण्णांना भेटूया.. अधीर मनाची अवस्था..


    

  


एखाद्या शाळेच्या मोठ्या वर्गाएवढी खोली.. चारही भिंतींवर शोकेसमध्ये मांडलेल्या होत्या ट्राॅफीज्, पदके, स्मृती चिन्हे.. प्रत्येकावरील लिहिलेला मजकूर वाचावा म्हटले तर दिवस‌ अपूरा पडेल. 




एका दालनात चित्र प्रदर्शिनी.. आण्णांच्या तरुण वयातील लष्करी वेषातील फोटोपासून, विविध आंदोलनातील प्रसंग, अनेक नामवंत मंडळींनी राळेगणसिद्धीला दिलेल्या भेटी, आण्णांनी राळेगणसिद्धीत राबविलेले उपक्रम आणि उपलब्धी.. वगैरे बरेच काही..

 

   

आज १०-१२ दिवसांनंतर लिहिताना अनेक प्रसंग, घटना नमूद करायच्या राहिल्या असतीलही मात्र एका बाबतीत आश्चर्य व्यक्त करावे का ? हा प्रश्न मनात येतोच आणि ते म्हणजे... आण्णांनी आजवर केलेल्या आंदोलनातील पत्रव्यवहार, पेपर मधील बारीकसारीक बातम्यांची कात्रणे या सगळ्या पेपर्सचे लॅमिनेशन करून त्याची केलेली अप्रतिम मांडणी .... हे नेमके कोणाला आणि कधी सुचले असावे ?



असो...एक आदरणीय व्यक्तीमत्व अशी सकाळी निघताना मनात असलेली प्रतिमा एव्हाना बदलत चालली होती. देशभक्तीच्या यज्ञात जीवनाच्या प्रत्येक क्षणाची आहूती समिधा म्हणून अर्पण करणाऱ्या आण्णांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वासमोर बसण्याची तरी आपली पात्रता आहे का ? संग्रहालय आणि चित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर अंतर्मुख होत असतांनाच मनात उमटलेला स्वाभाविक प्रश्न !

 

श्री. पानघट आणि श्री.‌ बाळासाहेब यांच्या सोबत आण्णा हळूहळू चालत येत असल्याचे लांबून दिसले‌. पानघट यांनी

"आण्णांना प्रश्न विचारा बर का ?"

असे आधीच बजावले होते. असंख्य प्रेक्षकांसमोर उभे राहिल्यावर एखादा वक्ता ब्लॅंक होतो. आज एका उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर बसल्यावर आम्ही ब्लॅंक झालो होतो..., काय प्रश्न विचारायचे ?



  



       


पण डॉ जगदीश सोबत असल्यामुळे मनाला दिलासा होता.. कडक उन्हात एका वृक्षाच्या छायेचा आधार मनाला दिलासा देतो तसेच काहीसे.. श्री.‌पानघट यांनी ओळख करुन देण्याचे सोपस्कार पार पाडले. जगदीशने आमच्या सगळ्यांच्या वतीने आण्णांना पुष्पगुच्छ दिला..     निशब्द वातावरणातील ताण हलका होत होता..

   

        


जगदीशने एका मागोमाग प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि आण्णा बोलत होते.... आण्णांचे विचार, त्यांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये त्यांच्या उत्तरातून शब्दांचे आकार घेत बाहेर पडत होती.


.


https://youtu.be/DcUEV2DFsXo

तो आवाज कानात साठवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न सुरु होता. आण्णांच्या बोलण्यात एक आत्मीयता होती, आपलेपणा होता..

त्यामुळे भीड चेपली जात होती. आमच्यातील एक एक जण प्रश्न विचारायला पुढे येत होता.




  


श्री.‌ पानघट हे गेली दोन दशके आण्णांना सोबत करत आहेत. त्यांच्या जीवनपटावर ते सविस्तर बोलतात. त्यांची भेट झाल्यापासून आण्णांबद्दल ते भरभरून बोलत होते..

मला ते एका क्षणी श्री. दासगणू वाटले. श्रीगजानन विजय ग्रंथात महाराजांच्या कार्याचे, त्यांच्या लीलांचे वर्णन श्री दासगणू करतात तसेच काहीसे...



श्री. पानघट यांच्या कार्याचे कौतुक करायचे म्हणून मी उठलो आणि आण्णांच्या शेजारील खुर्चीत जाऊन बसलो... मनात आलेला हा विचार सांगितला तसे त्यांनी मंद स्मित केले. आण्णांचे तपस्वी जीवन पाहिल्यावर आठवलेले एक पद्य

"दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चालता है"

त्यांना वाचून दाखवले...

ही तीन चार मिनिटे म्हणजे आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे हे मला आज अधिक ठळकपणे जाणवतय.

 


https://youtu.be/p18cGJnMpTU


१५-२० मिनिटांच्या भेटीनंतर आम्ही पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे भोजनासाठी मार्गस्थ झालो. श्री. पानघट यांच्याकडे लिंबाचे सरबत झाले आणि श्री. बाळासाहेबांकडे भोजन ! या दोघांच्याही आदरातिथ्याचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. भारतीय संस्कृतीत असणारा पाहुणचार आम्ही आता टिपीकल "पुणेरी" असणारे सगळे जण नव्याने अनुभवत होतो. आपली मूळ..roots आणि मूल्ये..values हे अद्यापही शाबूत आहे याची खात्री कुटुंबियांनी दिलेल्या सन्मानाने झाली. परतीच्या प्रवासाला पाच वाजता सुरुवात झाली..

 

ध्यानीमनी नसतांना आज राळेगणसिद्धी आणि आण्णांची भेटीचा योग जुळून आला आणि याच श्रेय केवळ आणि केवळ जगदीशला बहाल करायला हवंय..

 

प्रश्नोत्तराच्या दरम्यान एका उत्तरात आण्णा म्हणाले कि "माणसाने जीवनातून "मी" काढून टाकला कि मग बाकी मागे काही उरत नाही... माझ्या हातून हे कार्य करवून घेणारी शक्ती वेगळी आहे... मी केवळ माध्यम !"

 

दिवसभराच्या प्रवासातील दमणूक झाल्यावर पाठ टेकतांना मनात विचार आला की...     "माझ्यात मी पणा नाही" असे वाटणे म्हणजे एक प्रकारे माझ्यात "मी" पणा असणे आहे का ?

 

परंतु हा विचार मी क्षणात मनातून काढून टाकला.. आण्णांच्या बाबतीत अशा प्रश्नांना मनात स्थान नाही.. जसे आण्णांच्या आंदोलनाचा इतिहास मांडणाऱ्या चित्रप्रदर्शनात कुठेही अरविंद केजरीवाल नाहीत !!

 

डोळे मिटले तेव्हा "दिव्य ध्येय कि ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता है" या ओळीच मनात घोळत होत्या..

 

श्री. बिंदुमाधव भुरे.

१४ ऑक्टोबर २०२५.