Wednesday, April 21, 2021

श्रीराम नामाची श्रेष्ठता !

श्रीराम नामाची श्रेष्ठता

।। श्रीराम जय राम जय जय राम ।। 

श्रीराम नामाचा महिमा अपार आहे. हिंदू धर्मामधे चार वेद आधारभूत मानले गेले आहेत. या चारही वेदांचे सार महाभारतात आले आहे अशी मान्यता आहे.  म्हणूनच महाभारताला पंचमवेद असे मानले गेले आहे. भगवद्गीता ही श्रीकृष्णमुखातून उद्धृत झाली आणि भीष्माचार्य जाणत होते कि श्रीकृष्ण म्हणजे साक्षात श्रीविष्णूंचा अवतार आहे ! इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या भीष्माचार्यांनी शरपंजरी असतांनाच त्या अखेरच्या क्षणांमध्ये श्रीविष्णू सहस्त्रनामाचा जप सुरु केला होता असे म्हणतात. 

श्री रामरक्षा स्तोत्र म्हणताना त्यातील अंतिम श्लोक आहे 

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे 
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने 

श्रीरामाचे एक नाम घेतल्यामुळे  सहस्त्रनाम जपण्याइतके पुण्य पदरी पडते. अर्थात, विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत भाषेत आहे. तेव्हा प्रत्येकालाच त्याचा जप करणे शक्य होईल असे नाही. मात्र या श्रीरामनामाच्या जपाने विष्णू सहस्त्रनामाचे फल प्राप्त होते, महापातकांचाही नाश होतो. 

एकैकं अक्षरम् पुसां महापातक नाशनम् 
असा उल्लेख श्री रामरक्षा स्तोत्रामधे आला आहे. 

श्रीरामाचे नाम म्हणजे "ॐकाराचा अनुकल्प"अशी उपमा पू. स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी दिली आहे. काही गोष्टी ग्रहण करतांना त्यांची दाहकता सौम्य करण्याची आवश्यकता असते. तद्वत, ॐकाराचे सौम्य, साधे, सोपे व सरलरुप म्हणजे श्रीरामाचे नाम ! "बहु साजिरे स्वल्प सोपे फुकाचे"असे श्रीराम नामाचे वैशिष्ट्य श्री समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केले आहे. त्यामुळे श्रीराम नामाचा जप करताना उच्चारण चुकले किंवा नियम, आसन, ध्यान वगैरेंचे पालन न झाले तरी त्याची काळजी नको. जसे जमिनीत बीज पेरतांना ते उलटे आहे कि सुलटे आहे हे तपासून बघण्याची आवश्यकता नसते, त्याची फलप्राप्ती होणे हे निश्चित असते तसेच श्रीराम नामजपाचे आहे.        

स्वामीजी म्हणतात कि श्रीराम नामात "अग्निबीजाचा र, सूर्यबीजाचा अ आणि चंद्रबीजाचा म" यांचा समावेश आहे. त्यामुळे याचा जप हा सर्व पापांचे क्षालन करुन शीतलता प्रदान करतो. श्रीराम म्हणजे साक्षात सगूण साकार ! पण मग निर्गुण निराकार ?? .. तर यातही राम आहे आणि त्यालाच आपण आत्माराम म्हणतो. हे एक आत्मतत्त्व आहे म्हणजे स्वतःला विसरुन आत्मारामाशी एकरुप होणे. बाह्य समृद्धी व आतील आत्मशांती हे दोन्ही या नामजपाने साधले जाते. 

"देहली दीपन्याय" म्हणजे घरात असणारा एकमेव दिवा जर दोन खोल्यांच्या मधे ठेवला तर दोन्ही खोल्यांमध्ये प्रकाश मिळतो‌. तद्वत जिव्हा .. जी मध्यभागी असते, त्यावर सतत श्रीरामाचे नाम असेल तर त्यामुळे आतील शांती व बाह्य समृद्धी दोन्ही प्राप्त होईल. 

श्रीराम नामाची महती सांगणारी पुराणात एक कथा आहे. श्री रामरक्षा स्तोत्रामधे सुरवातीला श्लोक आहे. 

चरितम् रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् 

देव, दानव आणि मानव या तिघांनाही हे शतकोटी श्लोक हवे होते. पण त्याचे निष्पक्षपणे वाटप कोण करणार ? म्हणून हे तिघेही जण भोलेनाथांकडे गेले. भोलेनाथांनी प्रत्येकी ३३ कोटी असे वाटप केले. पण शेवटी १ कोटी उरले. मग त्याचे वाटप प्रत्येकी ३३ लाख असे केले. शेवटी १ लाख उरले. त्यांचे वाटप मग प्रत्येकी ३३ हजार असे झाले. पण शेवटी १ हजार उरले. मग भोलेनाथांनी त्याचे  नंतर प्रत्येकी ३३३ असे वाटप केल्यावर एक श्लोक उरला. आता यांचे वाटप कसे करावे ? अनुष्टूप छंदातील श्लोक असल्यामुळे यात ३२ अक्षरे होती. भोलेनाथांनी यांचे प्रत्येकी १० असे वाटप केले. शेवटी उरलेले दोन अक्षरे भोलेनाथांनी स्वतःकडे ठेवून घेतले. ती दोनअक्षरे म्हणजे "राम" ! 

साक्षात भोलेनाथांना ज्या रामनामाचा मोह झाला ते रामनाम सदैव ओठांवर असावे. 

जानकी जीवन स्मरण जय जय राम ! 

(संदर्भ आधार : पू. स्वामी गोविंद गिरी यांची प्रवचने)

©श्री बिंदुमाधव भुरे, पुणे 
श्रीराम नवमी, २१ एप्रिल २०२१

Tuesday, April 20, 2021

विरहातील आर्तता

विरहातील आर्तता 

अथांग नभात विखुरुन पडलेल्या तारकांचा लख्ख प्रकाश आता मंदावू लागला आहे. अशा किती रात्री उलटून गेल्या असतील बर ? अगदी रात्रीचा अंतिम प्रहर सरेपर्यंत मी कायम तुझी चातकासारखी वाट बघितली ! माझ्या उदास ... उद्विग्न मनाची अवस्था तुझ्या लक्षात ग कशी येत नाही ? किती वाट पहायची तुझी ? 

तू नसल्यामुळे हे मन खुप उदास आहे, दुःखी आहे. मला कायमचे विरहात लोटणार असशील ..... तर ... तर तसं सांग ! अगदी जड अंतःकरणाने मी सांगतो कि .... आता माझी त्यालाही तयारी आहे पण ... पण तस सांगण्यासाठी का होईना ... एकदा तरी येऊन जा. 

तुझ्यासाठी माझ्या हृदयात असणारी अपार प्रीती, प्रेमभाव .... हे सार काही आठव ना एकदा ! माझ्या हृदयात सदैव तूच असतेस आणि या ओठांवर तुझ्या प्रीतीचे गीत ! पण तुझ्या अभावी त्या गीतांना सूर नाही हे तुला कस बर समजत नाही. ते सूर बनण्यासाठी का होईना ... निदान एकदा तरी येशील का ? 

तुझ्या सहवासातील त्या धुंद क्षणांना आठवून मी कसेबसे दिवस कंठतो आहे. आपल्या त्या अमिट मिलनाच्या आठवणींचा तो मंद प्रकाश .... त्यात मी कायमच हरपून जात असतो ... त्या मंद प्रकाशाचा तो झरोका अगदी निष्ठूरपणे विजवून टाकणार असशील तरी माझी हरकत नाही पण ..... पण त्यासाठी तरी येशील ना ? 

या जीवनात मला जे जे काही हव होते ते सार काही नशिबाने मला मिळालय‌. पण अद्यापही काही अपूऱ्या क्षणांची पूर्तता होण्याची आस हे वेड मन बाळगून आहे. ते अपूरे क्षण बनून तू येशील ना ? 

मला माहिती आहे कि तू पण माझ्यावर वेड्यासारखे प्रेम करतेस कारण तू कधी ते प्रकट केल नाहीस पण तूला ते कधी लपवताही आल नाही ग ! आयुष्यात एकदा .... फक्त एकदा तरी तो प्रेमभाव मोकळेपणाने प्रकट करण्यासाठी येशील का ? मी तुझी शेवटच्या श्वासापर्यंतपर्यंत वाट बघत राहीन ! 

आयुष्याचा अखेरचा श्वास ...केव्हा व कधी घेतला जाईल ? काही सांगता येत नाही. पण एका क्षणासाठी का होईना, माझ्या आयुष्यात तू पुनः येणार असशील तर त्या अंतिम श्वासालाही मी थोपवेन, त्या मृत्यूलाही मी थांबण्यासाठी आर्जवे करेन आणि त्या एका अखेरच्या श्वासात माझ्या अपूऱ्या इच्छांची, अतृप्त भेटीची पूर्तता करेन. 

तू माझ्यापासून दूर निघून गेलीस.... का गेलीस ? या विरहाचे कारण मी कोणाला सांगू ? कस सांगू ? हा विरह आता मला सहन होत नाही. मी अनंतापर्यंत तुझी वाट पहात राहीन ! तू अगदी अनपेक्षितपणे, अगदी न सांगता आलीस तरी चालेल पण मग मात्र परत जाऊ नकोस.... कधीच परत जाऊ नकोस. 

                  @@##@@##@@

प्रियतमा, सखी, प्रेमिका हिच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या जीवाची घालमेल, आर्तता, उदासीनता, उद्विग्नता व्यक्त करणारी अनेक काव्ये, रचना साहित्यात आहेत. क्षणिक विरहाच्या आड असलेली सुखाची किनार कधी मृगजळासारखी तर कधी सावली सारखी भासमान असते. कधीतरी स्वप्नवत अशा मिलनाच्या आसेची तृप्ती प्रत्यक्षात येईल हा भाव प्रियकराच्या भावनातून प्रकट होत असतो. मात्र प्रेमभंगामुळे उद्ध्वस्त झालेल्या या कोमल विरही मनावर कशी बरे फुंकर मारावी ? त्याची कशी बरे समजूत काढावी.  

मराठी आणि उर्दू या दोन भाषात असलेल्या दोन अजरामर अशा काव्यरचना ... अगदी समांतर जाणाऱ्या ...... ! त्यातील साम्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न ! एक कडवे मराठीचे तर एक उर्दू काव्याचे .... असा क्रमाने स्वच्छंद अनुवाद, भावार्थ वर लिहिला आहे. पण दोनही काव्यरचनां मधील आशय भिन्न असूनही या भावार्थामधे एक कंटीन्यूटी भासते. एकात आशेचा किरण आहे, प्रियतमेबद्दल मनाला असणाऱ्या प्रेमभावात लपलेला एक आदर आहे, एक लाडिक तक्रार आहे. तर दुसऱ्या रचनेत मिलनाच्या क्षणांच्या अपेक्षा धूसर होत चालल्याचा उदास भाव, उद्विग्नता डोकावते आहे. 

एक सुधीर मोघेंची रचना ... गायक बाबूजी (पं. भीमसेन यांनी पण अप्रतिम गायिले आहे) ... काव्य आहे 
"सखी मंद झाल्या तारका .. आता तरी येशील का ?"
तर दूसरी रचना शायर अहमद फराज़ यांची ...
"रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आ" 
दोन्ही रचनांमधील भावनांची मांडणी गायकांनी अशा उत्कटतेने केली आहे कि दोन्ही रचना थेट हृदयाला भिडतात. गाण्यातला भाव बाबूजी तसेच मेहंदी हसन या महान गायकांनी नेमका प्रकट केल्यामुळे ही गाणी अजरामर झाली आहेत. 

या रचना खाली उद्धृत केल्या आहेत. प्रत्येक रचनेतील एक कडवे व नंतर वरील मुक्तछंदी भावार्थ असे वाचल्यास या रचनांचा आनंद घेता येईल. 

मराठी गीत - गीतकार सुधीर मोघे

सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का ?

मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशिल का ?

हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीत ही
ते प्रेमगाणे छेडणारा, सूर तू होशिल का ?

जे जे हवे ते जीवनी, ते सर्व आहे लाभले
तरी ही उरे काही उणे, तू पूर्तता होशिल का ?

बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तो ही पळभरी, पण सांग तू येशिल का ?

उर्दू गझल - रचनाकार - अहमद फराज

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही..

© बिंदुमाधव भुरे, पुणे.