Tuesday, February 7, 2017

मला समजलेला विकास

"विकास"म्हणजे हल्ली परवलीचा शब्द बनला आहे. पण "विकास" म्हणजे काय ? त्याची व्याख्या कशी करायची ? मला अस वाटते कि या प्रश्नांचे ऊत्तर "विकास कशाचा" ? या प्रश्नाच्या ऊत्तरावर अवलंबून आहे.


विकास कशाचा ... तर मुलांच्या बाबतीत  "बौद्धिक क्षमतेचा", खेळाडूंच्या बाबतीत "शारिरिक क्षमतेचा, तंदुरुस्तीचा", व्यावसायिक किंवा विक्रेता असेल तर "विक्रीकौशल्य, किंवा संभाषण चतुरता", पुढारी किंवा वक्ता असेल तर "वकृत्व- कौशल्य" वगैरे .... आता व्यक्ति तितक्या प्रवृत्ती त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या सोईप्रमाणे व आकलनाप्रमाणे "विकास" या शब्दाचा अर्थ लावणार, व्याख्या करणार व ते स्वाभाविक पण आहे.  


मात्र एखाद्या "गावाचा किंवा शहराचा विकास" म्हणजे नेमक काय ? याबद्दलची तुमच्या मनात व एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या मनात असलेली संकल्पना यात फरक का बर असावा ? हा एक तसा अनुत्तरित ( परंतु  प्रत्येकाला ऊत्तर माहित असलेला ) प्रश्न आहे. आपल्या अन् त्यांच्या  व्याख्येत असे ना का तफावत, पण "विकास" या शब्दाची "समान व्याख्या व एकसारखा अर्थ" लावू शकणारी मंडळी म्हणजे समस्त  "राजकारणी" !


मी अनेक वर्ष जे पाहिल त्यानुसार "विकास" शब्दाचा अर्थ अगदी सोपा आहे. म्हणजे पहा अस कि सगळ्यात प्रथम रस्ताच्या मधोमध दुभाजक बसवायचे, मग पादचारी मार्ग पेव्हिंग ब्लाॅक बसवून सजवायचे. हे झाल की रस्ता सिमेंटचा करायला घ्यायचा. (तिथल्या नागरिकांची मागणी नसतांना "विकासकाम" का सुरु केल विचारल तर ऊत्तर तयार असत .. "सिमेंट रस्ता १०-१५ वर्ष टिकतो व मेंटेनेंस फ्री असतो.")  सिमेंटचा रस्ता ऊंच झाल्यामुळे मग दुभाजकाची व पादचारी मार्गाची ऊंची कमी होते मग त्यामुळे पुनः दुभाजक व पादचारी मार्गाचे टेंडर काढायचे. या क्रमाने नियमित काम करत राहिल कि साधारण २-३ वर्ष संपतात. मग जवळपास ऊद्यान वगैरे असेल तर मग सिमेंटचे बाक (माननीय अमुक अमुक यांच्या सौजन्याने असे लिहून) बसवायचे. (मध्यंतरी काही रस्त्यांच्या कडेचे पादचारी मार्ग सायकल ट्रॅक म्हणुन बनविले गेले, त्या खर्चाच व त्या सगळ्याच ट्रॅकच काय झाल हे प्लिज विचारु नका)  


सगळे नीट छान झाल कि मग नविन आयडिया... ड्रेनेज लाईन किंवा पाण्याची मोठी लाईन टाकायची म्हणुन १०-१५ वर्ष टिकणारे या सबबीखाली केलेले रस्ते पुनः खोदायचे.  हे सगळे सुरु असतांना आपला हात जोडून " दिलगिरी व्यक्त करणारा बॅनर लावायचा. बॅनरवरच लक्षवेधी वाक्य म्हणजे ".... यांचा एकच ध्यास, आपल्या वाॅर्डचा विकास" वगैरे वगैरे.


हे अस करेपर्यंत ४-४॥ वर्ष संपतात. मग विकासाच प्रगतीपुस्तक घेऊन पक्षश्रेष्ठींकडे खेट्या मारायच्या, पुढच्या निवडणुकीसाठी तिकिट पक्क करायला ! पक्षाच्या दृष्टिने गेल्या ५ वर्षात संबंधित माननीयांनी मतदारांची, वाॅर्डची सेवा करत किती माया कमविली (कृपया गैरसमज नसावा, मतदारांचे प्रेम या अर्थाने माया शब्दप्रयोग आहे) व पक्षाची "स्थिती" किती "मजबूत" केली याला महत्व असते. 


संपूर्ण शहरातील महत्वाचे रस्ते एकदा सिमेंटचे झाले कि मग खर चॅलेंज ऊभ रहात. आपल्या शहराची निवड "स्मार्ट सिटी" साठी झाली आहे ना मग आता समान पाणीपुरवठा योजना, बीआरटी, मेट्रो इ. इ. सगळे काही येणार मग हजारो कोटी खर्च करुन बनविलेले सगळे रस्ते परत खणायचे कारण समान पाणीपुरवठ्यासाठी भूमिगत पाईपलाईन्स टाकाव्या लागणार ना ! मेट्रो भुमिगत न्यायची म्हणजे तिथलाही नुकताच झालेला सिमेंटच्या रस्त्याचा खर्च पाण्यात ! बीआरटीचा खेळ गेली ८-१० वर्ष सुरुच ! त्यांच्या मते प्रत्येक घरात मीटरद्वारे पाणीपुरवठा केला म्हणजे सगळ्यांना समान पाणी मिळणार, धरणातल्या पाणीसाठ्याचा, सदोष यंत्रणेचा किंवा पाणीगळतीचा त्याच्याशी काय संबंध ? आम्ही तर बुवा यालाच खरा विकास म्हणतो. 


कचऱ्याचे ढीग, वाहतूक समस्या, प्रदूषण, सार्वजनिक ऊद्याने, क्रिडांगणे वगैरे ...  यासारख्या प्रश्नांवर विचार करुन नियोजन पूर्वक खर्च करणे म्हणजे "विकास" अस काही हुषार व चाणाक्ष करदात्यांचे मत असल्याच कानावर आलय. पण त्याला काहीच अर्थ नसतो, त्यांनी फक्त कर भरावा अन् करवाढ केली तर आरडाओरडा करावा. असो... ! 


गावाचा किंवा शहराचा विकास यावर लोक काहीही बरळत असतात. त्यांना कळतच नाही कि विकास करायचा असतो, पण तो "कशाचा" ? यापेक्षा "कोणाचा" ? हे जास्त महत्वाच नाही का ? तुम्हाला काय वाटत ?

बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment