Saturday, February 11, 2017

युद्ध

  युद्ध 

परवा इंग्लंड बरोबरची तिसरी व शेवटची ट्वेंटी २० मॅच अगदीच एकतर्फी झाली. चहलने ६ विकेट घेऊन चमत्कार घडविला व कोहली कंपनीला मॅच व सिरिज जिंकून देतांना कमाल केली. अशा मॅचेस जिंकल्या कि दुसरे दिवशी चहाच्या कट्टयावर गप्पांचा फड रंगतो. या रंगलेल्या गप्पात एकाचा डायलाग .... "चहलने अक्षरशः पानिपत केले".

 

का माहिती नाही पण "पानिपत" हा शब्द कानात मग बराच वेळ घुमत राहिला. शाळेत असतांना इतिहासाच्या पुस्तकात पानिपतची लढाई यावर धडा़ होता. पण परिक्षेत येणाऱ्या प्रश्नाचे ऊत्तर देण्यापुरताच तेव्हाचा अभ्यास ! नंतर “पानिपत” ही विश्वास पाटलांची कादंबरी वाचली, ती मनात अजुनही खोलवर रुजून बसलेली आहे. पण आज गप्पातला "पानिपत" हा शब्द मात्र अस्वस्थ का करत होता कळत नव्हते. अस म्हणतात कि मनात विचार आले कि त्यांना रोखू नये, वाट करुन द्यावी.

 

मग काय गुगलला टाकला सर्च ... "बॅटल ऑफ पानिपत."  रिझल्ट पाहिला तेव्हा कळले कि पानिपतची एकूण ३ युद्ध होती. आपण शाळेत असतांना इतिहासाच्या धड्यात होते ते पानिपतचे तिसरे युद्ध ! पहिले झाले होते सन १५२६ तर दुसरे सन १५५६ व शेवटचे झाले १७६१ मधे.

 

पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर बाबरने मुगल साम्राज्याच्या विजयाचा पाया रचला. पण यानिमित्ताने मिळालेली माहिती व त्यामुळे मनात आलेले विचार हे आजही कोठेतरी लागू पडणारे आहे म्हणुन ही विषय प्रस्तावना...

 

पानिपतच्या या पहिल्या युद्धानंतर पुढच्याच वर्षी सन १५२७ मधे आणखी एक मोठे युद्ध छेडले गेले होते. हे युद्ध बाबर व महाराणा संग्रामसिंह ऊर्फ राणा संग यांच्यात झाले.

 

त्या काळी युद्ध हे नियमानुसार म्हणजे सुर्योदय ते सुर्यास्त यादरम्यान लढले जात असे. सुर्यास्त झाला कि युद्धविराम,  मग दोन्ही बाजूचे सैनिक हे आपआपल्या राहुट्या, तंबू यात परत जात असत. जखमांवर मलमपट्टी करणे, जेवण, विश्रांती घेऊन पुनः दुसरे दिवशी युद्धाला सज्ज ! राजा, सेनापती वगैरे मंडळी जातीने सैनिकांची विचारपूस करणे तर कधी दुसऱ्या दिवशीच्या युद्धासाठीचे डावपेच, व्यूहरचना आखणे यात मग्न असत.

 

पहिल्याच दिवशीच्या युद्ध विरामानंतर बाबर आपल्या शिबिराबाहेर ऊभा राहून शत्रुपक्षाकडील पडावाची टेहळणी करत होता. राणा संगच्या सैन्य-शिबिरातून अनेक ठिकाणाहून धूर निघतांना पाहून बाबरला वाटले कि त्यांच्या शिबिरात आग लागली. त्याने ताबडतोब सेनापती मीर बांकी याला बोलावून घेतले व शत्रु पक्षांच्या छावण्यातून असंख्य ठिकाणहुन धूर का निघतो आहे याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

 

सेनापती मीर बांकीने त्वरित आपले गुप्तचर या कामगिरीवर रवाना केले. गुप्तचर काही वेळाने परतले व त्यांनी दिलेली माहिती सेनापतीने बाबराला कथन केली. तो म्हणाला

 

" हुजूर, राणा संगचे सर्व सैनिक हे हिंदू आहेत. पण ते सगळेजण एकत्रित बसून भोजन करत नाहीत कारण त्यांच्यात अनेक जाती, उपजातीचे गट आहेत. ते एकमेकांच्या हाताचे पाणीसुद्धा पित नाहीत मग भोजन तर दूरची बात. त्यामुळे प्रत्येक जातीचे गट आपआपले भोजन स्वतंत्रपणे बनवितात, प्रत्येक गटाची चूल वेगळी ! म्हणुन हुजूर, आपल्याला तेथील छावण्यातून इतक्या ठिकाणाहून धुर निघतांना दिसतो आहे."

 

 

हे ऐकल्यावर बाबर बराच वेळ जोरजोरात हसत राहिला. नंतर तो आपल्या सेनापतीला म्हणाला " मीर बांकी, तू आणलेल्या बातमीमुळे मी निश्चिंत झालो आहे. हे युद्ध आपणच जिंकणार हे मी तुला खात्रीने सांगू शकतो. अरे,  हे काय आपल्याशी लढणार ? जे सैन्य भोजनासाठी एकत्रित येऊ शकत नाही ते एकत्रित, एकदिलाने शत्रुशी काय मुकाबला करणार ?" अन् पुढच्या तीन दिवसात राणा संगच्या सेनेचा दारुण पराभव झाला व मुगल शासनाचा पाया अधिक  मजबूत होण्याकडे वाटचाल सुरु झाली.

 

मनात विचार येण सुरुच होत ...........

 

जातीपातीत अडकलेला हिंदू हा एकदिलाने एक राष्ट्र, एक देश म्हणुन ऊभा राहिला नाही व त्याचा या युद्धात पराभव झाला. मुगलांनी मग आपले बस्तान येथे बसविले. अर्थात, काही काळाने ही त्रुटी शिवाजी महाराजांनी दूर करण्याचा प्रयत्न केला तो हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन. अठरा पगड जातींना एकत्र करून  “आपण सारे हिंदू” व “आपले राष्ट्र” “हिंदवी स्वराज्य” ही भावना खऱ्या अर्थाने त्यांनी रुजवली, चेतवली. 

 

सुमारे ५०० वर्षांपुर्वीची हिंदूंची जी स्थिती होती तीच स्थिती दुर्दैवाने आजही आहे. जातीपातीच्या भीती दिवसेंदिवस उंच होतांना दिसत आहेत. आपसातील द्वेषाची भावना अधिक उग्र होताना आपण पहात आहोत. गटतट, जातीपाती यात आज आम्ही इतके अडकलो आहोत कि ........

ब्राम्हण, वैश्य, क्षत्रिय, जाट, दलित, मराठा, पाटिदार असा प्रत्येकजण आपआपल्या जातींचे महासम्मेलन, महामोर्चा यात आपल्या जातीच्या बांधवांच्या हिताच्या, प्रगतीच्या नावाखाली गुरफटत चालला आहे. “हिंदवी स्वराज्य” या शिवाजी महारांजांच्या संकल्पनेतील “हिंदवी”, ‘हिंदू’ हे शब्द आज उच्चारले कि त्याला जातीयवादी ठरवले जाते व हे ठरविण्यात फुले, शाहू आंबेडकर यांच्या नावाचा जप करुन स्वतःला पुरोगामी म्हणवणारे आघाडीवर असतात.

 

राष्ट्रीय भावना किंवा राष्ट्रीयत्व हे खरे कोणाचे यावरून वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. बोलण्याचे स्वातंत्र्य म्हणून कोणी राष्ट्र विरोधी, विघातक वक्तव्य केले तर त्याचा निषेध करायचा नाही.  का ? तर व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणे ! बाबरासारख्या शत्रूशी लढतांना ५०० वर्षांपूर्वी आम्ही सारे राष्ट्र भावनेने एक झालो नाही व युद्ध आणी स्वातंत्र्य गमावून बसलो. संकुचित भावना व स्वार्थ यांनी आज प्रत्येकामधील राष्ट्रीयत्वाच्या भावनेवर जणू आक्रमण केले आहे. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने समाज एक होऊ नये म्हणून काही शक्ती सदैव कार्यरत असतात. तेव्हा आज आमची लढाई आहे ती या शक्तींशी न कि कोणा बाह्य बाबराशी !

 

बिंदुमाधव भुरे, पुणे.

 

Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment