Saturday, February 25, 2017

युद्ध कि भांडण ?

*युद्ध कि भांडण ?*

आपसात होत ते भांडण तर शत्रुशी होत ते युद्ध ! भांडण सहसा दोघात होते आणि ते कितीही विकोपाला गेले तरी त्याला युद्ध म्हणता येत नाही कारण युद्धात दोन सैन्य एकमेकांविरुद्ध उभी असतात. भांडणात शब्दांचा (आणि शिव्यांचाही) वापर होतो तर युद्धात शस्त्रांचा ! पण आजकाल भांडण हे युद्धात परिवर्तित होऊ लागल्याचे निवडणुकीच्या रणधुमाळीत पहायला मिळू लागले आहे. या युद्धात शस्र आहेत पण ती शब्दरुपी व सैन्य आहे ते कार्यकर्त्यांच्या रुपात !

युद्ध म्हणजे एक प्रकारे बुद्धिबळाचा डाव ! कोणते प्यादे केव्हा सरकवायचे व कोणती चाल केव्हा करायची हे प्रतिस्पर्ध्याची चाल लक्षात घेऊन ठरवावे लागते. युद्धात कूटनितीचा अवलंब कसा व केव्हा करायचा, मर्यादित सैन्यसंख्येचा वापर करतांना गनिमी काव्याने कसे लढायचे, तहाच्या बोलण्याची बतावणी करुन शत्रुला कसे झुलवत ठेवायचे, शत्रु बेसावध असतांना कसा वार करायचा, प्रसंग ओळखून व्यापक हिताचा विचार करता केव्हा माघार घ्यायची वगैरे ....

*हे शिवरायांनी लढलेल्या लढायांचा अभ्यासातून लक्षात येते. युद्धातले हे सगळे बारकावे शिवरायांना नुसते ज्ञात नव्हते तर त्याचा वापर त्यांनी वेळोवेळी मोठ्या चतुराईने केला होता.*

अफझलखानाचा वध असो वा शाहिस्तेखानाची बोटे छाटणे असो, शिवरायांच्या नुसत्या नावाने औरंगजेबाची झोप उडत असे. शिवरायांचे सल्लागार म्हणुन अष्टप्रधान मंडळाची भुमिकाही तेवढीच महत्वपूर्ण !  कारण जनतेशी थेट नाळ जुळलेली ही मंडळी होती. *महाराजांना रयतेचा राजा म्हणण्याचे हे पण एक महत्वाचे कारण असावे.*

हे सगळे विचार मनात डोकावण्याच कारण म्हणजे परवा महानगरपालिकांच्या निकालांचे विशेषतः मुंबईचे कल स्पष्ट होत असतांना शिवसेना ९३ व भाजप ७७ अशी स्थिती एकवेळ होती आणि सगळ्या चॅनलवर चर्चा करणाऱ्या चाणक्यांनी सेना बहुमतात येणार असा चर्चेचा सूर लावला होता. *या दरम्यान सेनेचे एक नेते, सल्लागार व रणनितीकार महाशयांनी "आम्ही शाहिस्तेखानाची बोट छाटली असे" विधान केले. गंमत वाटली ऐकतांना आणि कीवही करावीशी वाटली.*

शिवरायांचे नाव घेतले आणि त्यांच्या नावाने घोषणा दिल्या कि पक्षात, सैनिकात चैतन्य स्फुरणे स्वाभाविक आहे. पण म्हणुन पक्षातला प्रत्येक नेता स्वतःला शिवाजी समजू लागतो तेव्हा प्रश्न पडतो कि *शिवरायांचा वर उल्लेखिलेला कोणता गुण यांच्यात आहे म्हणुन यांना शाहिस्तेखानाची बोटे छाटल्याचा भास झाला.* विधानसभेच्या वेळी अफझलखानाच्या फौजा असा उल्लेख झाला होता व आज २॥ वर्षांनी त्याच मंडळींना शाहिस्तेखान उपमा दिली जाते आहे.

*आश्चर्य याच वाटते कि सेनेला वस्तुस्थितिचे व वास्तवाचे भान नाही व असले तरी ते स्वीकारण्याची अजुनही त्यांची तयारी नाही.* २५ वर्षांपासून आपला युतीमधील सहकारी, भागीदार हा आपला शत्रु आहे का ? याबाबदचा स्पष्ट व ठाम निर्णय नेतृत्वाला घेता येत नाही. कारण शत्रु म्हणुन निर्णय घेतला तर युद्ध करावे लागेल अन् अजुनही मित्र म्हणायचे झाल्यास जे सुरु होते ते भांडण असे म्हणुन कमीपणा घेत आजची परिस्थिति लक्षात घेतां तडजोडीला तयार रहावे लागेल.

*सेनेपुढे त्यामुळे हा प्रश्न आहे कि आपला शत्रु नेमका कोण ? काँग्रेस आघाडी कि भाजप ?* २०१२ चा विचार करता तेव्हा काँग्रेस आघाडी भक्कम होती व राज्यकर्ती पण होती सबब युतीचा समाईक विरोधक निर्विवादपणे काँग्रेस आघाडी होती. त्यामुळे मुंबईत २०१२ ला युती म्हणुन निवडणुकीला सामोरे जातांना भाजप ६५ पैकी ३२ व सेना १६२ पैकी ७३ अशी स्थिती या दोन्ही पक्षांची होती. त्यानंतर आला २०१४ चा महत्वपूर्ण टप्पा. भाजपचे यश हे डोळे दिपवून टाकणारे व अविश्वसनीय असे राहिले. आजही या धक्क्यातून काँग्रेस बाहेर पडू शकलेली नाही. 

ही घोडदौड महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या निवडणुकीतही कायम होती पण आपण ती रोखली अशी समजूत सेनेची झाली. युती तुटल्यावर एकहाती प्रचार करुन मोदींचा झंजावात रोखणे हे नक्कीच मोठे आव्हान होते. *परंतु बारकाईने विचार केला तर या निवडणुका हे एक प्रकारे काँग्रेसमुक्त अभियानाचा एक भाग होता व परिणामी काँग्रेस आघाडीची वाताहत होणे स्वाभाविक होते. ही वाताहत भाजपच्या जागा वाढण्यास कारणीभूत ठरली. यात सेनेची ताकद कमी होण्याचा प्रश्न नव्हता अर्थात संघटनेचे विस्तृत जाळे व भक्कम पाठबळ असुनही जागा वाढू शकल्या नाहीत हे लक्षात घेतले तर सेनेच हे एक प्रकारे अपयश होते असे म्हणावे लागेल.*

*गेल्या २॥ वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र मोदी लाटेतून बाहेर पडून देवेन्द्रच्या सावलीत येऊन निश्चिंत झाल्याचे सेनेने समजून घ्यायला हवे होते.* जिल्हा परिषदा, ग्राम पंचायतीच्या पहिल्या टप्प्याचे निकाल हेच सांगत होते. पण सेना नेतृत्वास हे कळले नाही कि सल्लागारांनी भ्रामक चित्र उभे करुन युती तोडण्याच्या निर्णयाची घोषणा करविली ? युती तुटली, आम्ही २५ वर्षे सडलो वगैरे भाषा वापरत सैनिकात जोश निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. परिणामतः प्रचारातून एक प्रकारे भाजप विरुद्ध युद्ध छेडल्याचा आभास निर्माण केला गेला.

दोन्ही पक्ष मुंबईत प्रथमच स्वबळावर २२७ जागा लढवित होते. अशा परिस्थितिमधे ज्या भाजपला चर्चेच्या फेऱ्यादरम्यान केवळ ६० जागा देऊ केल्या (म्हणजे तहाची बोलणी व वेळ फुकट घालविणे, बोलणी करण्यासाठी अयोग्य माणसे निवडणे, शत्रुचा अंदाज न घेणे) त्या भाजपला दुप्पट म्हणजे ६४+ जागा मिळणे म्हणजे सेनेने हे युद्ध एक प्रकारे हारणे होय. प्रत्यक्षात भाजपला ८२ जागा मिळाल्या, यावरुन युती तोडण्याचा निर्णय हा आत्मघातकी होता हे स्पष्ट होते.

अशा स्थितीत जेथे ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र पक्षाची पिछेहाट निकालातून स्पष्ट झाली असतांना आजही दावा केला जाते कि पुढचा मुख्यमंत्री आमचाच असेल. परंतु या दाव्याला ठोस आधारच नाही त्यामुळे तमाम जनतेला *हे पराभूत मानसिकतेत आणलेले उसने अवसान आहे असे स्वाभाविकपणे वाटू शकते.*

तेव्हा आता सेनेला आत्ममंथन करतांना हे किमान स्वतःशी तरी मान्य करावे लागेल कि हे युद्ध नव्हते त्यामुळे अफझलखानाच्या फौजा, शाहिस्तेखानाची बोटे छाटली असल्या उपमा देणे हा पोरकटपणा होता व जनतेनेही त्यांच्या कौलाद्वारे तो स्पष्ट केला आहे.

बदलत्या राजकीय परिस्थितित पक्षीय वर्चस्वासाठीचे हे एक भांडण होते व आहे व ते शाब्दिक चकमकींपुरते मर्यादित ठेवतांना प्रसंग ओळखून ते मिटवायचे कसे ही कला अवगत करण्याचे कसब अंगी बाणवून घ्यावे कारण *शिवरायांच्या इतिहासात योग्य वेळी तडजोड करुन व्यापक हितासाठी यशस्वी माघार घेतल्याची उदाहरणेही आहेत. त्यांच्या नावाने पक्ष चालवतांना त्यांच्या युद्धनितीतून काही धडे घेणार का हा प्रश्न पक्ष पुढील वाटचाल करतांना निर्णायक ठरु शकेल.*

बिंदुमाधव भुरे, पुणे.

No comments:

Post a Comment