Friday, February 15, 2019

आनंदी गोपाळ - एक कलाकृती

*आनंदी गोपाळ – एक कलाकृती*

 
एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते हे वाक्य कधी आणि कोणत्या प्रसंगामुळे जन्माला आले याची कल्पना नाही. पण भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान *“आनंदी गोपाळ जोशी”* यांना मिळाला. स्त्री शिक्षण म्हणजे स्वैराचार अशी समाजमानासाची धारणा असणाऱ्या काळात तिच्यामागे खंबीरपणे उभे राहणारे तिचे पती गोपाळराव यांची भूमिका यात तितकीच महत्वाची होती. आनंदीने शिकले पाहिजे या गोपाळरावांच्या टोकाच्या हट्टाचे रुपांतर एका ध्येयात होते व नंतर तिने डॉक्टर बनावे या ध्यासाने त्यांना झपाटून टाकले जाते. त्यांच्या या हट्टाने, ध्यासाने आनंदीत जिद्द निर्माण होते व तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येते. *टोकाचा अट्टाहास ते स्वप्नपूर्ती हा निग्रही खडतर प्रवास म्हणजे “आनंदी गोपाळ”!*

त्या काळातील प्रचलित प्रथेनुसार बालपणीच झालेल्या विवाहानंतर विक्षिप्तपणा हा स्वभावधर्म असणाऱ्या गोपाळरावांनी आनंदीने अभ्यास करावा, शिकावे म्हणून केलेला त्रागा, संताप अभिनेता ललित प्रभाकरने उत्तम प्रकारे प्रकट केला आहे. तिला अभ्यासावरून रागावतांना त्याने सदैव लावलेला टिपेचा सूर व त्यामुळे दबावाखाली, दडपणाखाली असलेली “आनंदी” अभिनेत्री भाग्यश्री मिलिंदने अतिशय समर्थपणे साकारली आहे. कर्मठ, सनातनी व रूढी परंपरांना कवटाळून बसलेल्या समाजातील ठेकेदारांच्या विरोधामुळे उद्विग्न होऊन धर्मांतराचा निर्णय घेणारे गोपाळराव व त्यांना संयमित पण ठाम विरोध करणारी आनंदी या प्रसंगातून *शिक्षणामुळे स्त्रीमध्ये आलेली वैचारिक प्रगल्भता दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सूचकपणे मांडली आहे.*  

 
आनंदी विदेश प्रवासाला अखेर एकटीच निघते त्यावेळी तिला निरोप देण्यासाठी चित्रित केलेल्या प्रसंगात गोपाळरावांचा नेहमीचा संतापी अन टिपेचा स्वर कातर होतो. त्यांच्या व्याकूळ स्वरातील भावुकता व हळवेपणा तसेच त्या प्रसंगी हृदयात होणारी कालवाकालव त्यांच्या चेहेऱ्यावर दिसून येते. डोळ्यात जमा झालेले पण बाहेर न पडणारे अश्रू त्यांच्या स्वभावातील ममतेची, हळूवारपणाची ओळख करून देतात तेव्हा नकळत आपल्याही पापण्या ओलावतात. शेवटच्या प्रसंगात आनंदीला डॉक्टर पदवी प्रदान होतांनाही गोपाळरावांना झालेला आनंद, आपली पत्नी आपल्यापेक्षाही जास्त शिक्षित झाल्याचा वाटणारा अभिमान, तिने घेतलेल्या परिश्रमाला मनापसून केलेले वंदन हे सारे काही त्यांच्या डोळ्यात जमा झालेले आनंदाश्रू व चेहेर्यावरील भाव व्यक्त करून जातात. हा प्रसंग पाहतांना भावूक होत पुन: एकदा आपली बोटे डोळ्यांच्या ओला कडा नकळत पुसत असतात. *चित्रपटातील हे दोन्ही प्रसंग लाजबाब व त्यासाठी दिग्दर्शकासह संपूर्ण टीमची कौतुक करावे तेव्हढे थोडेच !* यानिमित्ताने संवादलेखनासाठी लेखिका इरावती कर्णिक यांचे विशेष अभिनंदन कारण १९व्या शतकातील काळ दाखविण्याचे दडपण जाणवू न देता या संवादात आशयसंपन्नता व सहजसुलभता आहे.

 

चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा आनंदी हीच आहे. भेदरलेली, दडपणाखाली असलेली अबोल आनंदी, मिशनरी स्कूलमध्ये अन्यायाविरोधात भांडणारी आनंदी, धर्मांतराच्या निर्णयाला ठाम विरोध करणारी आनंदी, अशा विविध छटा भाग्यश्री मिलिंदने अप्रतिमपणे साकारल्या आहेत. पण जास्त लक्षात राहते ते ललित प्रभाकर याने साकारलेले गोपाळराव हे पात्र. सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील या व्यक्तिरेखांचे आपसातील पत्रव्यवहार याव्यतिरिक्त फारसे साहित्य उपलब्ध नसतांना त्या व्यक्तिरेखा अतिशय ताकदीने, समर्थपणे, प्रभावीपणे उभ्या करणे हे मोठे आव्हान होते. पण ते या दोन प्रमुख कलाकारांनी यशस्वीपणे पेलले आहे कारण या भूमिका साकारण्यासाठी त्यांनी या व्यक्तिरेखांचा केलेला अभ्यास ! *अशा व्यक्तिरेखांमध्ये सर्वस्व विसरून आकंठ बुडाल्याशिवाय त्याचे वास्तववादी प्रकटीकरण होऊच शकत नाही.* पं भीमसेनजींच्या स्वरात इंद्रायणी काठी हा अभंग ऐकणारा, पहाणारा काही क्षण स्वतःला विसरुन माऊलीच्या भक्तीत नकळत एकरुप होतो कारण इतकी स्वरार्तता त्या आवाजात आहे. तद्वत चित्रपट पाहतांना पडद्यावर आपण ललित प्रभाकर किंवा भाग्यश्री मिलिंद या कलाकारांना पहात आहोत याचा काही वेळाने विसर पडतो व आपण आनंदी व गोपाळ या व्यक्तिरेखांमध्ये हरवून जातो कारण ती उत्कटता त्यांच्या अभिनयात पुरेपूर उतरली आहे. अर्थात त्यासाठी अनुकूल वातावरण नेटकेपणे उभे करतांना निवडलेली लोकेशन्स, केलेली प्रकाश व्यवस्था व हे सगळे अप्रतिमपणे टिपणारा कँमेरा यांचे योगदान तेवढेच मोलाचे आहे. भारतीय इतिहासात विविध क्षेत्रे गाजविणाऱ्या महिलांची घेतलेली सन्मानपूर्वक चित्ररुप नोंद व त्याच्या कोलाजमधून साकारलेल्या आनंदीचे मूळ चित्र पडद्यावर शेवटी दिसते.

 
*हा करमणुकीसाठी असणारा चित्रपट नाही किवा प्रायोगीक अंगाने जाणारा चित्रपटही नाही तर ही एक रेखीव कलाकृती आहे कारण यामागे असंख्य मंडळींची दोन अडीच वर्षांपासूनची तपश्चर्या आहे आणि म्हणूनच “आनंदी गोपाळ” पाहणे हा एक समृद्ध व सुखद अनुभव आहे.*  

 ©बिंदुमाधव भुरे, पुणे.   

Wednesday, February 13, 2019

मी म्हणतो तेच खर

क्रिकेटचा सामना सुरु असतो. एलबीडब्ल्यू चे अपिल मान्य करत पंच फलंदाजाला बाद देतात. फलंदाज नाबाद असल्याचा दावा करतो व पंचाशी हुज्जत घालू लागतो. पंचांनी दिलेले स्पष्टीकरण फलंदाजाला अमान्य असल्यामुळे तिसऱ्या पंचाला विचारणा केली जाते. तिसरा पंचही रिप्ले बघून फलंदाज बाद असल्याचा निर्णय  योग्य असल्याचा निर्णय देतात.

गोलंदाजाने टाकलेला चेंडू मधल्या यष्टीवर सरळ रेषेत होता. फलंदाज बँकफूटवर होता. चेंडूला उंची नव्हती व चेंडूचा बँटला स्पर्षही झालेला दिसत नव्हता. चेंडू पायावर आदळला असल्यामुळे एलबीडब्ल्यूचा निर्णयावर संशय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मैदानावर व दूरचित्रवाणी संचावर सामना पहाणाऱ्या कोट्यावधी लोकांनाही हा निर्णय १००% बरोबर वाटत होता.

फलंदाजाने मग आरोप करण्यास प्रारंभ केला. तिसऱ्या पंचाने रिप्ले पाहून निर्णय दिला असला तरी ज्या कँमेऱ्याने हे चित्रित केल आहे ते कँमेरे सदोष होते, मी चेंडू बँटनेच अडवला होता, मी सरळ रेषेत उभा होतो पण मागच्या यष्टी चुकीच्या लावल्या होत्या, सदोष कँमेऱ्यामुळे चेंडू कमरेपर्यंत उसळलेला दिसून आला नाही, पंच पक्षपातीपणा मुद्दामहून करत आहेत वगैरे वगैरे.

पंच, तिसरा पंच, रिप्ले किंवा डीआरएस हे सगळे खोटे आहेत मी म्हणतो तेच बरोबर आहे असा फलंदाजाचा दावा जनतेने हास्यास्पद ठरवला होता. शालेय क्रिकेट, युनिवर्सिटी, जिल्हा, राज्य पातळीवर इतकेच नव्हे तर रणजी, इराणी, दुलिप करंडक यापैकी कोणत्याच स्तरावर न खेळता पिढीजात पुण्याईवर थेट राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूकडून वेगळी काय अपेक्षा असणार ?

सुप्रीम कोर्ट, लोकसभेतील स्पष्टीकरण, कँगचा अहवाल या सगळ्यांनी राफेलवर निर्णय देऊनही ते मान्य न करणाऱ्या राहूल गांधींशी या खेळाडुशी तुलना झाल्यास तो योगायोग समजावा.

©बिंदूमाधव भुरे, पुणे

Saturday, January 19, 2019

कमकुवत भिंत

*कमकुवत भिंत*

एका इमारतीची कंपाऊंड वॉल बांधण्याच काम सुरु असत. एका बाजूला विटांचा ढीगारा तर एकीकडे वाळू, बारीक खडी आणि सिमेंटची पोती.  गवंडी वाळूत थोडी बारीक खडी व थोड सिमेंट टाकतो. हे मिश्रण तयार करून त्यात आळे करुन मधे *पाणी* ओतून फावड्याने ते मिश्रण एकत्र लयबद्ध पद्धतीने कालवू लागतो.

त्या तयार मिश्रणाचा वापर आता विटांची भिंत उभी करतांना होणार होता. प्रत्येक वीट या मिश्रणामुळे एकमेकांना मजबूत करणार होती. नुसती वाळू किंवा नुसती खडी किंवा नुसते सिमेंट यांचा काय उपयोग होता ? *त्यांनी एकत्र येऊनही उपयोग नव्हता. जोपर्यंत आपापला गुणधर्म विसरुन ते एकत्र येत नाहीत तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नव्हता.*

*उद्या वाळू म्हणाली मला खडीबरोबर नाही रहायचे, ती टोचते मला. खडी म्हणाली कि वाळूलाच निसटून जायच असते, माणसाच्या मुठीत तरी कुठे टिकली आहे ती ! सिमेंटही तक्रार करेल, कि हे दोघेही एकत्र रहायला माझा वापर करुन घेतात.* पाणी हाच एक आम्हाला एकमेकांशी कायमचे जोडतो आणि आम्हाला विभक्त होऊ देत नाही. पण समजा पाण्याचा वापर नंतर केला तर ? म्हणजे वीट ठेवली कि त्यावर वाळू खडी सिमेंटच मिश्रण टाकायच व पुढची वीट ठेवायची. अस करत भिंत उभी झाली कि मग त्या भिंतीवर पाणी टाकायचे.

याप्रकारातही चार घटक एकत्र आलेतच ना ! पण, *पाणी मिश्रणात आधीच वापरले तर भिंत मजबूत बनते* आणि नंतर वापरायचे ठरवले तर ? एकतर *भिंत बनायच्या आधीच विटा कोसळतील किंवा भिंत कमकुवत राहून कधीही कोसळण्याची* भिती कायम राहील.

आज कोलकता येथे २२ घटक (पक्ष) एका मंचावर उपस्थित होते व त्यांनी एकत्र येऊन भक्कम भिंत उभी करायच ठरवलय. मिश्रण तयार झालय पण *पाण्याचे नंतर बघू* म्हणतायत. *भिंत कमकुवतच रहाणार किंवा उभी करतांनाच पडणार* हे नक्की कारण या २२ जणांच *आपसातला "स्व" विसरुन त्यांना भक्कम एकत्र ठेवणार पाणी कोणी व्हायच* हेच ठरलेल नाही.

पण आपल्याला तर पक्की भिंत नाही तर घरच हवय आणि त्याचा ठिकाणाही आपल्याला ठाऊक आहे !

©बिंदुमाधव भुरे, पुणे.

Tuesday, January 8, 2019

शिवभक्ताला पत्र

परमशिवभक्त दत्तात्रेय गोत्रोत्पन्न राहूल,

पक्षाचा उपाध्यक्ष होईपर्यंत माध्यमांसाठी विशेषतः सोशल मिडियावर तू चेष्टेचा विषय होतास. त्यामुळे तुला घडवणे हे पक्षासमोर एक आव्हान होत. चित्रपटामधे भूमिका साकारणाऱ्या नटाला अनेक तज्ञ मदतीला असतात. नृत्यदिग्दर्शक, फाईट मास्टर, पार्श्वगायक, मेकअपमन, ड्रेसडिझायनर वगैरे वगैरे. पण कितीही आटापिटा केला तरी अनिल धवन किंवा नविन निश्चल हे जितेंद्र कसे होतील ? तद्वत तुझ्या तैनातीला अनेकजण असायचे पण तरीही व्हायच्या त्या चूका व्हायच्याच. चित्रपट असेल तर एडिटींगमधे दुरुस्ती होऊ शकते पण स्टेजवर .... जेव्हा लाइव्ह परफॉरमन्स असतो तेव्हा किती संभाळणार आणि कस झाकणार ?

पक्षाच्या व्यासपीठावर अनेकदा तुझे विचार मांडण्याची नियोजने केली गेली. शाळेच्या गँदरींगला नाही का नाट्यछटा सादर करणाऱ्या मुलांची तयारी करुन घेतात आणि सादरीकरण झाल कि सगळे कौतुकाने टाळ्या वाजवतात. कितीही चुका झाल्या तरी त्याला शाबासकी देतात सगळेजण .... तस तुझ्या बाबतीत सुरु होत. पं. मनमोहनसिंग यांनी एकदा भाषणानंतर तुला कौतुकाने मिठी मारल्याच दृष्य आम्ही टीव्हीवर पाहिल आहे. एक महान अर्थशास्त्री, देशाचा पंतप्रधान यांची शाबासकी म्हणजे गोल्ड मेडलच की ! तूझे महान विचार समजून घेण्यात आम्हीच कमी पडलो, आमची बहुदा पात्रताच नसणार.

अर्थात याच पंतप्रधानांचा अध्यादेश तू पत्रकार परिषदेत फाडलास तेव्हा आम्हाला शंका आली कि खरच पं. मनमोहनसिंग इतके हुषार आहेत ?  एकदा एका स्टेडियममधे हजारो कार्यकर्त्यांसमोर भाषण करतांना एक कथा सांगून तू काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होतास. सारे काही समजल्याच्या आविर्भावात सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आमच्यासारख्या अनेकांना अद्यापही त्यातल ओ कि ठो कळालेल नाही. तूझे महान विचार समजून घेण्यात पुनः आम्हीच कमी पडलो, आमची बहुदा पात्रताच नसणार. असो ....

पण तरीही पक्षाने धाडसी निर्णय घेत तूला उपाध्यक्ष बनवले. सगळी टीम दिमतीला होती पण अपयशाचा शिक्का ठळक होत होता आणि पप्पूब्रँडही !  एकापाठोपाठ निवडणूका हरणे सुरुच होते. हरले कि इव्हीमवर खापर फोडायच. नापास झालेला मुलगा नाही का सबबी सांगत .. पेपर अवघड होता, यावेळी अवघड तपासले वगैरे. आमच्या बाळबोध बुद्धीनुसार खर तर नीट अभ्यास केलेला नसणे हेच कारण असायच. तीनचा पाढा म्हणतांना एक मुलगा सारखा चूक करायचा. तीन चोक पंधरा म्हणायचा आणि परीक्षक नापास करायचे. कोणी विचारले कि पालक कौतुकाने सांगायचे अहो पूर्वी तीन चोक सतरा म्हणायचा, बघा किती छान प्रगती केली आहे त्याने ते ! असो ....

तशात गुजरात, कर्नाटक निवडणूका आल्या. सलग चार पाच टर्न काँग्रेस सत्तेबाहेर होती. अगदी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवयुवकाने तर कधीच गैरभाजप शासन पाहिले नव्हते त्यामुळे या परीक्षेचा पेपर सोपा निघणार हे नक्की होत. त्यात हार्दिक, अल्पेश, जिग्नेश यांनी तुला कॉपी पुरवल्यामुळे थोडे गुण वाढले पण तरीही पुनः नापासच ! कर्नाटकातही खर तर सीट कमी झालेल्या पण दोन नापासांचे गुण एकत्र करुन पास झाल्याचा आनंदोत्सव साजरा झाला. या उत्सवात नापास होण्याची भिती वाटणारे सगळे एकत्र आले होते. स्टेजवरचे ते चित्र पाहून क्षणभर वाटल कि तू युनिव्हर्सिटीत डिस्टिंक्शन विथ गोल्ड मेडल मिळवल आहेस.

गुजरात, कर्नाटक निवडणूकीत तुझ श्रद्धाळू अन् देव देव करणार रुप आम्ही प्रथमच पाहिल. तुझी प्रगती न बघविणारे तुला नाव ठेवू लागले, मग तुझ्या हिंदुत्वावर शंका घेऊ लागले. बर झाल तू जानव दाखवून ब्राह्मण असल्याच उघड केलस ते. एक सल्ला देऊ का ? गणपतीची आणि शंकराची आरती पाठ करुन ठेव, या लोकांचा काही नेम नाही. तेलंगणात तुला मुस्लिम तुष्टीकरण करतांना बघितल्यामुळे तुझे हिंदुत्व खोटे म्हणून टीका करतील तेव्हा या पाठ केलेल्या आरत्या प्रेस कॉन्फरन्समधे म्हणून दाखव अन् सगळ्यांची तोंडे गप्प करुन टाक. हाय काय अन् नाय काय ! असच वर्ष दोन वर्ष सुरु ठेवलस ना तर विहिंप वाले राममंदिरासाठी तारणहार म्हणून तुझ्याकडेच झेपावतील बघ अगदी साधूसंत तुला भगवा करुन तुझ्या गळ्यात माळा घालायला यागेपुढे पहाणार नाहीत. असो....

नुकतीच सेमिफायनल झाली. निवडणूक कलचाचणी अंदाजानुसार तीन राज्यात काँग्रेसला यश मिळाले तर दोन राज्यात सुपडा साफ झाला. समस्त काँग्रेसजनांनी शिरस्त्याप्रमाणे तुझे कौतूक केले, धूर निघणेही बंद झालेल्या राखेत फुंकर मारुन मारुन त्यात धुगधूगी शिल्लक असल्याचा आनंद पाठिराख्यांना झाला. तीन चोक चौदा पर्यंत तुझी गाडी आल्याचा आनंद होता तो !

असेल दोन वर्ष गेहलोत, पायलट, कमलनाथ, सिंदीया यांनी केलेली मेहनत. पण विजयाच श्रेय तुझच बर का !   शेतकरी, बेकार युवा, नोटबंदी, जीएसटी व राफेल या पाच मुद्द्यांभोवती फिरणारा प्रचार तेलंगण, मिझोराम या दोन राज्यातही केला होतास पण तेलंगणात नायडूमुळे पराभव झाला अस आमच स्पष्ट मत आहे आणि मिझोरामकडे लक्ष द्यायला तुला वेळच मिळाला नसणार ! एखाद्या पेपरमधे नापास व्हायची भिती वाटत असतांना त्यात वर्गात हाययेस्ट याव तस झारखंडमधे झाल नाही ? कोणालाच खर वाटत नाहीये तिथल्या निकालाच ! असो ....

देव देव करणारी श्रद्धाळू मंडळी सत्याची कास धरणारी असतात असा आमचा आपला एक समज आहे. तू अगदी हरिश्चंद्राचा अवतार नाही पण खोटेपणाची चीड येणारा असावास अस वाटत होत. परंतू वाढत्या मंदिरभेटी बरोबर तुझा खोटेपणा वाढत गेलाय रे ! गँदरींगमधल्या शोला टाळ्या वाजविल्यामुळे तू निर्ढावलास, तुला कोणी तुझ चुकतय अस सांगायचा प्रयत्नच कधी केला नाही किंबहूना तुझ्या चुकांवर पांघरुणच घालायचा प्रयत्न झाला. त्या चूका नसून तेच बरोबर आहे या अभिनिवेशात मग तू वागू लागलास. खोटेपणाने मुद्दे मांडण्यात तू आता इतका सरावला आहेस कि खरी बाजू पुढे आली तरी तूला ती कळेनाशी झाली आहे. लहानपणी हट्ट करणाऱ्या मुलांना शेवटी "बर बाबा तुझ खर" अस म्हटल कि ती गप्प तरी बसायची. पण आम्ही सांगू आता सुप्रीम कोर्टला कि म्हणा एकदा त्याला "बर बाबा तुझीच ..... ???

मध्यंतरी एका हिंदी चँनेलने सगळ्या जुन्या भाषणांचा अभ्यास करुन निष्कर्ष मांडला कि प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करु व दर वर्षी २ लाख नोकऱ्या देऊ अशी आश्वासने असणारे भाषणच अस्तित्वात नाही पण प्रत्येक ठिकाणी तू हे आरोप करतोच आहेस. तीच गोष्ट जीएसटीची. जीएसटी कौसिलमधे सारे निर्णय होत असतात केंद्रात नाही. हे माहित असूनही तू गब्बरसिंग टँक्स असा ओरडा करत असतोस. खरी कमाल तर राफेलवरुन केलीस. फ्रांसच्या अध्यक्षांनी स्पष्ट केल, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल, सिन्हा भूषण गप्प झाले, संसदेत जेटली, सीतारामन हे ३ तास बोलले तरी तुझ्या त्याच शंका व तेच आरोप सुरुच आहेत. होळीच्या दिवशी भांग प्यायलेली व्यक्ती नाही का तेच तेच पुनःपुनः बडबडत असते .... तस तर नाही ना झालय तुझ ?

अगदी खर सांग राफेलवर तू रोज रोज बेंबीच्या देठापासून इतका बोंबलतो आहेस पण तुझ्या सुरात किती राजकीय पक्षांनी सूर मिळवला रे ? शरद पवार एकदा बोलले. येचूरी, मायावती, अखिलेश, मायावती, ममता, देवेगौडा सगळेच शांत का ? बर आरोप करतोस ना ? मग तुमच्या कराराचे कागद तरी दाखव, अंबानीच्या खिशात तीस हजार कोटी घातले म्हणतोस ना ? मग त्याचा पुरावा म्हणून एखादा कागद दाखव, पंधरा उद्योगपतींचे तीन लाख कोटी माफ केले अस म्हणतोस ना ? मग त्यांची नावे जाहीर कर. नुसती टप्पल मारुन पळतोस आणि पळतांना दुसऱ्याला म्हणतोस "थांबा, पळू नका, हिंमत असेल तर माझ्याशी दोन हात करा."

गँदरींगच्या स्टेजवर काहीही केल तरी चालायच रे, सगळे टाळ्या वाजवत होते. पण आता तू मोठा झाला आहेस, जरा डोळ्यावरही नियंत्रण ठेवायला शिक आणि जबाबदारीने वाग. एकदा पशुपतीनाथाचे दर्शनाला जाऊन ये, अभिषेक वगैरे कर आणि खरच दत्तात्रेय गोत्र असेल तर खोट न बोलण्याचे त्याला वचन दे. त्याच्या दरबारी खोटे चालत नाही आणि जनतेच्या दरबारी टिकत नाही हे लक्षात घे. रात्रीची पूर्ण उतरली की ती मंडळीही एकदा खर बोलतात. बाकी तुझ्या हुषारीच्या आम्ही जवळपासही नाही, आमची तेव्हढी पात्रताही नाही तरीही या पत्राबद्दल क्षमस्व.

तुझ्याकडून नसत्या अपेक्षा बाळगणारे,
भारतीय मतदार

©बिंदुमाधव भुरे, पुणे.

Thursday, November 22, 2018

डॉ घाणेकर - एक चित्रपट

डॉ घाणेकर - एक चित्रपट

सोशल मिडिया व वाहिन्यांवर झालेल्या प्रोमोज् व प्रमोशन्समुळे डॉ काशिनाथ घाणेकर कधी प्रदर्शित होतोय व कधी पहातोय असे झाले होते. एखाद्या चित्रपटाविषयी गेल्या आठवड्यापर्यंत "काहीही माहिती नसणे" आणि आज "कधी पहातोय असे होणे" ही किमया आहे आजच्या प्रगत तंत्रज्ञानाची व आधुनिक प्रचार-प्रसार माध्यमांची. हा चित्रपट दुसऱ्या आठवड्यातही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवतोय, कदाचित आणखी एखाद दोन आठवडे चित्रपटगृहात टिकून राहिल.

ज्या कालखंडातला हा चित्रपट आहे त्या काळात एखादा चित्रपट तिकिटबारीवर किती चालणार किंवा रौप्यमहोत्सव करणार का हे एक दोन आठवड्यानंतर कळायचे. महिनाभरानंतर निवांतपणे जाणाऱ्या मंडळींची संख्या त्याकाळी मोठी असायची. आज मल्टीप्लेक्समुळे शोज् ची संख्या वाढली आहे, परिणामी २-३ आठवड्यात चित्रपटगृहावरील पोस्टर्स बदलेली दिसतात. अर्थात, चित्रपटांची वाढलेली संख्या, मल्टिप्लेक्समुळे वाढलेली शोज् ची संख्या, हाताळल्या जाणाऱ्या विषयात असणारे वैविध्य या घटकांचाही तो एक स्वाभाविक परिणाम म्हणता येईल.

चित्रपट स्रुष्टीतील अनेक कलाकार त्याच्या विक्षिप्तपणा, मूडी स्वभाव, सेटवरील भांडणे, ऊशीरा येणे, व्यसनाधीनता या सारख्या कारणांमुळे कायमच चर्चेत रहातात. जुन्या काळातील राजकुमार, किशोरकुमार, राजेश खन्ना ही वानगीदाखल काही नावे. अलिकडे संजयदत्त हा आधी त्याच्या व्यसनाधिनतेमुळे व नंतर अतिरेक्यांशी असलेल्या संबंधातून झालेल्या शिक्षेमुळे चर्चेत राहिला. यामुळे सर्वसामान्यांसाठी असे सेलिब्रेटीज व त्यांचे व्यक्तिगत आयुष्य हा कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे.

रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू यातील संभाजीला डॉ घाणेकरांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने एका विलक्षण उंचीवर नेऊन ठेवले होते.  अर्थात यात लेखकाचाही वाटा तेवढाच मोठा आहे हे नाकारता येणार नाही. अश्रूंची झाली फुले (याची लोकप्रियता बघून हिंदीत आसू बन गए फूल आला) व गारंबीचा बापू या आणखी काही लोकप्रिय ठरलेल्या कलाकृती ! मूलतः डॉ घाणेकर हे रंगमंच कलाकार व त्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा चित्रपट क्षेत्राला मोह झाला असे म्हणता येइल. परंतु त्यांच्या चित्रपटांनी इतिहास रचला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पाठलाग, मधूचंद्र, देवमाणूस व हा खेळ सावल्यांचा या त्यातल्या त्यात गाजलेल्या कलाकृती ! पण खरी लोकप्रियता त्यांना रंगमंचाने दिली.

डॉ घाणेकर हे त्यांच्या समकालीन कलाकारांच्या तुलनेत अधिक लोकप्रिय झाले ते त्यांच्या बंडखोर व्यक्तिमत्वामुळे व हा बंडखोरपणा त्यांनी साकारलेल्या संभाजीत पुरेपुर उतरला होता. किंबहूना संभाजीच्या व्यक्तीरेखेमुळे हा बंडखोरपणा त्यांच्या स्वभावात आला असेही धाडस करुन म्हणता येईल. संगीत नाटकांची चलती अन् कृष्णधवल चित्रपटांच्या साचेबद्धतेमुळे एकसूरी झालेल्या प्रेक्षकांना डॉ घाणेकरांनी ज्याची नेमकी व्याख्या करता येणार नाही असा हवा हवा असणारा बदल, पर्याय म्हणून दिला. आणि प्रेक्षकांनाही ते भावले, त्यांच्या व्यक्तिरेखां म्हणूनच डोक्यावर घेतल्या गेल्या.

पण असे असले तरी डॉ घाणेकर यांच्या जीवनावर चित्रपट निघावा इतके ते महान होते का ? हा प्रश्न चित्रपट पाहून झाल्यावर मनात येतोच. जुन्या पिढीने डॉ घाणेकरांना पाहिले आहे. समकालीन रमेशदेव, राजा गोसावी यासारख्या कलावंतांनाही पाहिले आहे. त्यामुळे या मंडळींनी उत्सुकतेने हा चित्रपट पहाणे स्वाभाविक होते. नव्या पिढीला सुबोध भावेने भुरळ घातली आहे कारण अर्थातच झीमराठी, बालगंधर्व, नटसम्राट वगैरे. त्यामुळे नेटवर डॉ घाणेकरांची माहिती घेऊन चित्रपट पहाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

या दोन्ही किंबहुना ज्या ज्या मंडळींनी हा चित्रपट पाहिला त्या त्या मंडळींच्या तोंडी होता तो सुबोध भावे व त्याच्या अभिनय. चित्रपटातील अन्य कलावंतांविषयी फारसा उल्लेख ऐकिवात आला नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनावर चित्रपट आहे ती व्यक्ती म्हणजे डॉ काशिनाथ घाणेकर हे नाव चित्रपट पाहून झाल्यानंतर प्रेक्षकांच्या फारसे चर्चेत नसणे हे चित्रपटाचे यश म्हणायचे कि अपयश ? आज दुसऱ्या आठवड्यात या अप्रतिम चित्रपटाचे कौतुक करत बाहेर पडलो तेव्हा हाही प्रश्न मनात आला.

©बिंदुमाधव भुरे, पुणे.