Thursday, July 4, 2019

माझा वारीतला एक दिवस

*माझा वारीतला एक दिवस*

माउलींच्या पालखीचे आगमन पुण्यात झाले कि त्यांचा येथे एक दिवस मुक्काम ठरलेला. आगमनाचे दिवशी रात्री किंवा दुसरे दिवशी केव्हातरी पादुकांच्या दर्शनासाठी वडील मंडळी आम्हाला नेत असत. नंतर एक दोन वेळा फर्गसन कॉलेज रस्त्यावर गर्दीत दर्शन घेतल्याचे आठवतंय. त्यानंतर अनेक वर्ष बँक आटोपल्यावर घरी जातांना अनुभवलेला ट्राफिक जाम ! २०१७ साली माझा निवृत्त सहकारी प्रकाश बँकेत आला आणि सहजच वारीचा विषय निघाला तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ही सगळी दृश्य तरळली आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्याला म्हणून गेलो “यावर्षी मीही येणार !" त्यानेही आठवणीने वारीच्या पहिल्या मिटींगला मला बोलावले. वारीला जाण्याचा माझा जबरदस्त योग असावा कारण त्या मिटींगला जाण्याची बुद्धी मला झाली.

 

*वारीचे प्रचंड कुतूहल अनेक वर्षांपासून होत.* काही लाख वारकरी २०-२१ दिवस घरदार सोडून पंढरीच्या दिशेने पायी कसे जात असतील ? सतत २०-२१ दिवस पायी चालून त्यांना काही त्रास होत असेल का ? विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ म्हणजे नेमक काय ? आषाढीला पंढरपुरला जमणाऱ्या ८-१० लाख भाविकांपैकी प्रत्यक्ष मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन किती लोक घेत असतील ? वगैरे ... यासारख्या *अनेक प्रश्नांची उत्तरे मला वारीत मिळणार होती.* कोपऱ्यावरच्या किराणा दुकानातून काही सामान आणायचे झाले तर लहानपणी मला सायकल लागायची आता स्कूटर लागते. पण"पायी जा" असे सांगितले कि "वेळ वाचतो" हे माझे उत्तर ठरलेले. त्यामुळे *वारीबाबद सर्वाधिक कुतूहल होत ते सतत २०-२१ दिवस पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे आणि त्यांच्या दैनंदिनीचे !*

शिवाजीनगर ब्रँचला असतांना एकदा बँकेतून निघायला खूप उशीर होऊन गेला होता. स्कूटर सुरु होईना म्हणून मागे गावठाणात असणारा आमचा नेहमीचा बाळू मेकँनिक फोन करताच धावत आला. काहीतरी मेजर प्रॉब्लेम होता. उद्याच होईल दुरुस्त म्हणाला आणि स्कूटर घेऊन गेला. मी धोपटी उचलली व रिक्षाने जाऊ अशा विचारात रस्त्यावर आलो अन् लक्षात आले कि पैशाचे पाकीट आज घरीच विसरल आहे. *खिशात दमडा नाही त्यामुळे आपसूक मानसिक बळ आल असाव आणि म्हणूनच “जाऊ चालत” असा विचार मनात आला* अन् जे एम रोड वर चालू लागलो. दत्तवाडीत घरी पोहोचेपर्यंत एक तास लागला. *खूप खूप चालायचा एव्हढाच काय तो अनुभव ! पण बॉबच्या अनुभवी वारकरी टीमने पुणे - सासवड हे २८ किमी अंतर भक्तिमय वातावरणात कसे सहज पार होते हे रंगवून सांगितले असल्यामुळे मनात कुठेही भीती नव्हती, किंबहुना उत्सुकताच होती.*

 

पसायदान पूर्ण पाठ नाही ना त्याचा अर्थ नीटसा ठाऊक, ज्ञानेश्वरीतली एक ओवी, एक अभंग येत नाही, लहानपणी कानावर पडलेला ग्यानबा तुकारामचा जयघोष, टाळ चिपळीचे स्वर आणि मृदुंगाचा ठेका केवळ या आठवणींच्या शिदोरीवर वारीच्या मार्गावर मार्गस्थ होणार होतो. १८-२० जण सोबत होते पण मन मात्र स्वत:शी बोलत होते, डोळे सभोवतालचे निरीक्षण करत होते. खातांना हातातल बिस्कीट खाली पडल तर मुलांना ते धुळीत पडल्याने घाण झाले असे म्हणणारे आपण ... पण वारीच्या वाटेवर पहिले पाऊल टाकतांना त्याच *रस्त्याला वाकून नमन करायच आणि तिथली धूळ मस्तकी लावायची हा निरिक्षणातून मिळालेला पहिला धडा !*

माऊलींची पालखी या रस्त्याने जाणार म्हणून किंवा गेली म्हणून पवित्र झालेला हा रस्ता ही त्यामागील वारकऱ्यांची भावना असावी ! इतकी पवित्र भावना बाळगण्या इतका मोठा भाविक मी नक्कीच नव्हतो. त्यामुळे ज्या मार्गावर लक्षावधी श्रद्धाळू, भाविक, वारकरी यांच्या पाऊलखूणा उमटतात त्या पवित्र पाऊखुणांना आपला पदस्पर्श व्हावा व वारी केल्याचे आभासी पुण्य पदरात पडावे या नुसत्या विचारानेच *मनाच्या अडगळीत पडलेल्या भक्ती भावनेवर साचलेली धुळ क्षणात दूर झाली आणि माऊली म्हणून कोणीतरी आपल्याला हाक मारताच अंतर्मनात श्रद्धेचा भाव जागृत झाल्याची प्रचिती आली.*

मनात येणाऱ्या विचारांना थोपवण्याचे काही कारण नव्हते, त्यांचा मुक्त संचार मनात अनेक प्रश्नांचे तरंग उमटवत होता. *या प्रश्नांची उत्तरे शोधण्यास बुद्धी तोकडी पडावी कारण त्यांची उत्तरे "श्रद्धा" या एकाच शब्दात येतात.* शरीराला एखादा रोग झाला कि डॉक्टर सांगतात "इंफेक्शन" झालय किंवा "व्हायरल" आहे आणि मग "अँटिबायोटिक"चा एक डोस देतात. आयुर्वेदात शरीरशुद्धीसाठी पंचकर्माला महत्व ! दोष निर्मूलनासाठी वर्षातून एकदा पंचकर्म कराव. पण अनेक विचारांनी आणि विकारांनी ग्रस्त असलेल्या *मनाचे "इंफेक्शन" किंवा मनाचे "दोष निर्मूलन" केवळ आणि केवळ वारीतच होते. ही विठूमाऊलीच्या नामोच्चाराची किमया म्हणावी कि भक्तिमय, मंगलमय वातावरणाने भारलेल्या वातावरणाचा परिणाम ?*

कधी नापिकी तर कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी बाजारभाव नाही यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हे चित्र नित्याचेच ! पण घर कोसळू द्यायच नाही, सगळ दुःख मनात ठेवायच आणि संसाराचा गाडा हाकायचा हे कसब त्या त्या घरच्या माऊलींना साधावच लागत. अनवाणी पायाने वारीच्या गर्दीत वाट चालतांना तळपायांना बसणारे चटके, होणाऱ्या वेदना तर कधी पावसामुळे झालेला चिखल याची पर्वा न करता डोईवरच तुळशी वृंदावन लिलया संभाळण्याची कसरत करणाऱ्या माऊली पाहिल्या कि फाटलेल्या संसाराला ठिगळ लावून प्रपंच संभाळण्याच त्यांचे हे कौशल्य उपजत आहे कि  विठूमाऊलीचे नाम घेत केलेल्या वारीमुळे साधल गेलय ? याचे उत्तर वारीत मिळत. *एक बँकर म्हणून लेजर बँकिंगच्या काळातील "बँलंसिंग" शब्दाचा नवा अर्थ वारीत कळत होता.*

वारीचे माझे हे तिसरे वर्ष ! सुसंस्कृत व बुद्धिजीवी म्हणविणाऱ्या वर्गात मागच्या पिढीतली परंपरा पुढची पिढी संभाळतांना अभावानेच दिसते मग वारीची परंपरा पिढ्यान पिढ्या कशी संभाळली जात असेल ? या प्रश्नाचे उत्तर पुढच्या वर्षीच्या वारीत सापडेल कदाचित ! उच्च शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या बाजारात जेव्हा आजची तरुण पिढी प्रवेश करते तेव्हा त्यांच्या वयाची पंचविशी (नविन गणिताप्रमाणे - वीस पाच) उलटलेली असते. तर वयाच्या २१ व्या वर्षी अवतार कार्य संपले म्हणून समाधिस्थ होणारे ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतील रचनांचा अर्थ अजूनही लावला जातोय. पुढच्या वर्षीपर्यंत एका तरी ओवीचा अर्थ समजावून घ्यावा हा विचार पुण्यात परतत असतांना मनात दृढ झाला होता आणि वारीचे आयोजन नियोजन करणाऱ्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल मनोमन कृतज्ञतेचा भावही !

बिंदूमाधव भुरे, पुणे
९४२३००७७६१
८६९८७४९९९०


 

 

4 comments:

  1. खुपच छान सर्व प्रसंग समोरच घडताएत असे वाटतेय

    ReplyDelete
  2. वारी बरोबर एक दिवस आपलं मनोगत खुपच छान शब्दांंत वक्त केलंत..

    ReplyDelete
  3. खूप छान..मी पण गेल्या वर्षी पासून अनुभव घेत आहे
    🙏

    ReplyDelete