Saturday, August 19, 2017

सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची नवी गोष्ट

सोन्याचे अंडे देण्याऱ्या कोंबडीची नवी गोष्ट  

रोज एक सोन्याच अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकली आहे. सगळी सोन्याची अंडी एकदम मिळावी म्हणून एक दिवस मालक कोंबडीच्या पोटावरुन सुरी फिरवतो. कोंबडी मरते आणि एकदम खूप सोन्याची अंडी मिळणे सोडा, रोज एक मिळणारे अंडे मिळणे बंद होते.  

पण ही गोष्टी आता जुनी झाली. आता या नव्या गोष्टीतला मालक रोज कोंबड्यांच्या खुराड्यात यायचा, कोंबड्यांना खाऊ घालायचा. जातांना अंडी गोळा करुन निघून जायचा. ही अंडी विकून चार पैसे मिळवायचे असा गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा हा जीवनक्रम सुरु होता. एकंदरित कुटूंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालु होता. कुक्कुटपालनाच्या या व्यवसायाचा पसारा खूप मोठा होता. भांडवल म्हणून अनेक नातेवाइक, मित्रमंडळींनी त्याच्या व्यवसायात पैसा गुंतविला होता कारण या गुंतवणुकीवर परतावा चांगला मिळत होता.  

वर्षांमागून वर्षे सरली, महागाइ वाढू लागली तसे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न अपुरे पडू लागले. तज्ञांचा सल्ला घेतला - व्यवसाय वाढवणे, खर्च कमी करणे यासारखे पुस्तकी सल्ले मिळाले ! पण यासारख्या उपाययोजनांमुळे तात्पुरता दिलासा मिळत होता. खर्चात किती आणि कुठे कपात करायची ? किमान खर्च तर टाळू शकत नाही. मित्र, नातेवाईक यांना त्यांच्या गुंतवलेल्या पैशावर व्याज तर द्यायलाच पाहिजे. व्यवसायवाढीलाही तीव्र स्पर्धेमुळे मर्यादा होत्या.  

मग आमच्या मालकाने नामी शक्कल लढविली.   खर्चात कपात करायची म्हणून त्याने कोंबड्याच्या खाद्यात भेसळ करायला सुरुवात केली. १०% भेसळ केल्यानंतर असे लक्षात आले कि रोज मिळणाऱ्या अंड्यांच्या संख्येत फरक पडत नाही आहे. पण खाद्यावरील खर्चात झालेल्या कपातीमुळे उत्पन्नात मात्र वाढ होते आहे. यशाचा मार्ग सापडल्यामुळे मालक आनंदात होता.

पण काही ब्रँडेड व खाजगी व्यावसायिक यांच्यामुळे आता स्पर्धा दिवसेंदिवस जीवघेणी होऊ लागली होती. जो सशक्त,ताकदवान तोच या खेळात टिकणार बाकीच्यांनी गाशा गुंडाळायचा किंवा वेगळा व्यवसाय निवडायचा. आमच्या मालकानी व्यवसायात टिकून रहायचा दृढ़संकल्प केला होता, नव्हे करावाच लागला होता, नाहीतर असंख्य नातेवाइक मित्रमंडळींचे ठेव म्हणून स्वीकारलेले पैसे परत द्यावे लागले असते.  

खाद्यातील भेसळीचे प्रमाण वाढले कि उत्पन्न वाढते हे सूत्र डोक्यात बसले होते. स्पर्धेत टिकूनही रहायचे आणि नफाही कमवायचा त्यामुळे कोंबड्यांच्या खाद्यान्नातली भेसळ आता प्रमाणाबाहेर वाढली होती. नित्य नियमाने अंडी गोळा करतांना मालकाला आजकाल रोज एखादी कोंबडी मेलेली आढळून येऊ लागली होती. त्याच कारण कळत होते पण व्यवसाय आता अशा टोकाला येऊन पोहोचला होता कि प्राप्त परिस्थितीत सुधारणा करणे अवघड होऊन बसले होते.   

आर्थिक स्थिती चांगली असतांना नित्य नियमाने बाजूला काढून ठेवलेली पुंजी संपत आली होती, उधारीवर विक्री केलेल्यांकडून वसूली होत नव्हती, काहींनी तर दिवाळे काढल्यात जमा होते त्यामुळे ती उधारी बुडल्यात जमा होती. बुडित देणेकऱ्यांची संख्या वाढू लागल्याने धंदा करायचा कसा हा प्रश्न सतावत होताच शिवाय मित्र आणि नातेवाईकांनी गुंतवलेल्या भांडवलावर नियमित परतावा देण्याच दडपण होते ते वेगळच !  

मला आठवले १९७० च्या दशकातले बँकिंग. ठेवी असो वा कर्ज, व्याजदर ठरलेले असायचे. वर्षातून एखादा "बचत पंधरवडा" किंवा "डिपाॅझिट मोबिलायझेशन विक" साजरा करायचा. बँकेकडे चालून येणारी कर्ज प्रकरणे विचारात घ्यायची, कर्जावर दर तीन महिन्यांनी व्याजआकारणी करायची. वार्षिक हिशोब जुळणी झाली कि विषय संपला. सगळ्याच बँका नफ्यात असायच्या. रोजच्या रोज अंडी विकून कुटूंबाचा चरितार्थ चालवणाऱ्या मालकासारखे त्या काळात बँकाचे बरे चालले होते.  

१९९१ नंतर हळूहळू स्पर्धा वाढू लागली,स्पर्धेचे नविन नियम आले. कागदोपत्री नफा आता चालणार नव्हता. कर्जदाराचा हप्ता, व्याज याची परतफेड थकली तर तेवढ्या रकमेची तरतूद करण्याच्या नियमामुळे नफ्याचे प्रमाण घटू लागले. कर्जबुडवेगिरीचे वाढते प्रकार, वाढती कोर्ट प्रकरणे व निकालांना लागणारा विलंब यामुळे बँकिंग यंत्रणेवर नफा कमाविण्यासाठी ताण वाढू लागला होता.   

लेजर फोलियो चार्जेस, चेक रिटर्न चार्जेस,इन्स्पेक्षन चार्जेस, रिव्ह्यू चार्जेस, हँडलिंग चार्जेस यासारख्या मार्गे मग उत्पन्न वाढवायचा प्रयत्न सुरु झाला. हे अतिरिक्त उत्पन्न म्हणजे एक प्रकारे कोंबड्यांच्या खाद्यान्नात भेसळ करुन नफा कमावण्यासारखे होते. त्याने सुरुवातिला १०% भेसळ करुन उत्पन्न वाढविले तर बँकांनी विविध प्रकारचे चार्जेसची आकारणीला सुरुवात करून ! कोंबड्या बिचाऱ्या चूपचाप अन्याय सहन करायच्या तद्वत् ग्राहकही ! भेसळ प्रमाणाबाहेर गेली तसे कोंबड्या मान टाकू लागल्या तर इकडे ग्राहक पासबुकात दिसणाऱ्या चार्जेसमुळे हवालदिल होऊन खाती बंद करु लागले.  

नफा कमवायचा तर कर्जाला मागणी वाढली पाहिजे म्हणून मग व्याजदरात कपात करण्यावाचून पर्याय नव्हता. पण थकित, बुडित कर्जाच्या वाढत्या प्रमाणामुळे उत्पन्न, नफा कमी होत होता. परिणामी, खर्चात कपात करायची म्हणून ठेवींचे व्याजदरात कपात होऊ लागली. एकिकडे भरमसाठ चार्जेस तर दुसऱ्या बाजूला व्याजाच्या मिळकतीत घट अशा कात्रीत सापडलेला बिचारा ग्राहक विचार करु लागला कि हे सगळे भोग कर्जबुडवेगिरी करणाऱ्या काही मंडळींमुळे नशीबी आले. त्यांची अवस्था त्या कोंबड्यांसारखीच - खाद्यान्नातली भेसळ निमुटपणे सहन करायची पण अंडी मात्र तेवढीच द्यायची.  

काय होणार याचा शेवट ? लहानपणी ऐकलेल्या गोष्टीत मालकाला हाव सुटल्यामुळे तो कोंबडी कापतो. पण या नव्या गोष्टीत आज काही उधारी बुडविणाऱ्या मंडळींमुळे खाद्यान्नातली अतिभेसळ, (म्हणजेच एका अर्थाने घटते व्याजदर व अव्वाच्या सव्वा चार्जेस तसेच) बुडित येणी यामुळे संपूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय, त्याचे मालक, ठेवीदार, मित्रमंडळी व असंख्य कोंबड्या हे सगळे काही कायमचा इतिहास बनून रहाणार अशी भीती निर्माण झाली आहे. कोंबड्यांच्या या नविन गोष्टीसारखी बँकिंगला लागलेली ही एनपीएची कीड, व्हायरस वेळीच आटोक्यात आला नाही तर ? काही बँकांचे एनपीए हे धोकादायक पातळीच्या पुढे कधीच गेले आहेत.   

या बँकांनी "हे राम" म्हणायच्या आधी कठोर पाऊल उचलले गेले पाहिजे. अर्थात कोंबड्यांच्या जर्जर झालेल्या २-४ खुराड्यांना एकत्र करुन हा व्यवसाय वाचविणे ही वरवरची मलमपट्टी ठरेल. तद्वत् बँकांचे मर्जिंग म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्यासारखे आहे. स्टेट बँक व सहयोगी बँकांच्या विलीनिकरणातून बँक तर मोठी झाली पण निर्माण झालेले प्रश्न त्याहीपेक्षा जास्त मोठे आहेत. एनपीएची वसूलीसाठी कायद्यात बदल व जाणीवपूर्वक कर्जबुडव्यांना कडक शासन ही काळाची गरज आहे, बँकांच्या मर्जिंगने काय साधणार ? नव्या कथेतून शासनाला बोध व्हावा ही माफक अपेक्षा !  

बिंदुमाधव भुरे, पुणे.  

Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment