Wednesday, January 31, 2024

धनुष्य आणि तीन बाण

 गुलाल उधळला गेला, जेसीबीतून पुष्पवृष्टी झाली आणि जरांगेंचा विराट ताफा आंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिज्ञा पूर्ण झाली. मराठा समाजाची स्वप्नपूर्ती झाली. "आनंदी आनंद गडे असा माहोल चोहीकडे" असे दृष्य याची देही याची डोळा उभ्या महाराष्ट्राला घरबसल्या छोट्या पडद्यावर दिसले. 

हे पहाताना मला बाहुबली २ मधला एक सीन आठवला.‌ राजवाड्यावर हल्ला झालाय आणि राजकुमारी निकराने लढतीये. अचानक मणिबंधम् बहिर्मुखम् अस काहीस बडबडत आपला हिरो अवतरतो.‌ एकाच वेळी धनुष्यातून तीन तीन बाण सोडत शत्रूचा नायनाट करतो. आमचा हिरो खरा तर एका राज्याचा राजकुमार पण आपली ओळख लपवून तो विजय मिळवून देतो... धनुष्य कोणाच ? तीन बाण कोणाला लागले ? विजयी कोण झाल ?

२०१४ ला फडणवीस मुख्यमंत्री झाले. एक ब्राह्मण मुख्यमंत्री ??? अनेकांचा पोटदुखी विकार उफाळून आला. पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात वगैरे डायलॉग ओठांवर आले. मराठा आरक्षण आणि सुरू झाले लाखांचे मोर्चे.... हा योगायोग की फडणवीसांच्या विरोधातली खेळी ? मात्र काहीही असो.. ही सगळी आंदोलन यशस्वीपणे हाताळली, शांतता टिकवून ठेवली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल शिवाय अनेक सोयी सवलतीही बहाल केल्या. खर तर सरकारी नोकऱ्यांचा दुष्काळ असताना या सवलतीच अधिक आवश्यक होत्या. वरकरणी अनेकांनी नाके मुरडली तरी फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय दिला हे कटू सत्य होते. परिणाम .. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ १०५ झाल... पोटदुखीचे रुग्ण आणखी वाढले. 

स्वबळावरील सत्तेची स्वप्नपूर्ती म्हणजे १४५+ जागा..  सुरुवातीला युती, आघाडी या कुबड्यांचा वापर केला जातो. ज्यापक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी, राजकीय दूरदृष्टी आणि संयम असतो ते नंतर कुरघोडी करतात. ज्यांच्याकडे कर्तृत्वाचा अभाव असतो मात्र महत्वाकांक्षा प्रबळ असते ते कुबड्या बनतात.  

मराठा, ओबीसी समाजात नेते अनेक, सत्तास्थाने अनेक ! सारा समाज आपल्या विशिष्ट नेत्यांमागे आणि पक्षांमध्ये विभागलेला ! ही मते आपल्यामागे एकवटणे आवश्यक आहे हे भाजपाने ओळखले होते.  मराठा आरक्षण मुद्द्याने चांगला‌ हात दिला‌ होता. पुढील पाच वर्षांच्या कारकिर्दीत या मुद्याच्या आधारे आणखीन चांगले काम करायचा मनसुबा होता.‌ पण २०१९ ला सेनेकडून दगाफटका झाला.  विरोधात बसाव लागल तरी १४५+ म्हणजे संपूर्ण बहुमत हे ध्येय भाजपाचे कायम राहिल.

श्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षेला नव्याने मित्र बनलेल्या जुन्या शत्रूकडूनच खतपाणी घातल गेल. मविआ सरकार आल मात्र याकाळात कोणतेही आंदोलन अगर मोर्चे यांचा दबाव नसतांना मविआला हे आरक्षण टिकवता आल नाही. फडणवीसांना श्रेय जाईल ही धास्ती होतीच.  मविआत हे श्रेय कोणी उपटायच या वादात .. ना तुला ना मला .... झाल आणि आरक्षण रद्द झाल. 

सेनेने खुपसलेला खंजीर आणि राष्ट्रवादीच्या साहेबांनी त्यासाठी पुरवलेली रसद ! त्यामुळे दोन बाण कोणावर सोडायचे हे ठरलेल... ! सेना आणि दोन्ही काॅंग्रेस यांची आघाडी म्हणजे तेल आणि पाणी ... एकजीव होणे अशक्य ! कतृत्वहीन महत्वाकांक्षा म्हणजे मविआचे मुख्यमंत्री ! ना सरकारकडे लक्ष ना पक्षाकडे ! २०२२ ला राज्यसभा निवडणुकीचे निमित्त आणि सेना दुभंगली ! तीनपैकी एक बाण वर्मी बसला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल. आता कतृत्व सिद्ध करायच होत आणि मराठा आरक्षण हा विषय होता.. पण तो थंड बस्त्यात !! 

मग मराठा समाजाचे इतकी वर्ष सुरु असणारे नेता विरहित आंदोलन, मोर्चे याला २०२३ मध्ये एक चेहेरा मिळतो. जरांगेंच्या नेतृत्वाचा उदय होतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समाज एकवटतो. केवळ सहा ते आठ महिन्यांच्या काळात संघर्षाची धार टप्प्या टप्प्याने तीव्र होत जाते. या आंदोलन काळात भाजपा, फडणवीस कधीच फ्रंटवर नसतात. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, कतृत्व सिद्ध करण्यासाठी सगळे काही जणू प्लॅन होत  असाव.‌ 

आता दुसरा बाण रोखलेला असतो तो सेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालणाऱ्यांच्या दिशेने... पाच वेळा उपमुख्यमंत्री पद मिळाल पण संधी असतांनाही मुख्यमंत्री बनू न दिल्याची सल दादांच्या मनात आहेच. कतृत्व आहे आणि महत्वाकांक्षा पण आहे. पण संधीसाठी काकांची मर्जी किती सांभाळायची ? आणि किती थांबायच ? या प्रश्नाचे उत्तर दादांनीच शोधल आणि आम्हीच खरा पक्ष असे म्हणत दादांच्या गटाने एकनाथ शिंदेंचीच री ओढली. 

येणाऱ्या निवडणुकात महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगणार. एकाकडे संख्याबळ तर दुसरीकडे उबाठा आणि साहेबांची भावनिक साद !  सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन किती दिवस रडगाणे सुरू ठेवायचं ? गद्दार आणि खोके याच्यापलिकडे जाऊन आता जनता पहाते आहे. एकनाथ शिंदेंचा संयम आणि परिश्रम वाखाणण्याजोगा आहे हे दिसून येत होत. कमी होती ती पारड्यात भरघोस यशाच माप पडायची. मराठा आरक्षण हा तिसरा बाण ! शिंदेंचा उदोउदो होण आणि मराठा समाज त्यांच्यामागे उभा राहण यासाठी मराठा आरक्षणाच्या बाणाने हे लक्ष्य बरोबर साधले. याचा अतिरिक्त लाभ दादांनाही मिळणारच. झाडाची फळे हा थेट लाभ तर सावली हा अतिरिक्त लाभ ! 

लक्षात घ्या या धामधुमीत भाजपाचे संख्याबळ सत्ता नसूनही टिकून राहिले, पक्ष एकसंध राहिला यातच सगळ काही आल. (शिवसेनेच्या) धनुष्यातून योग्य टायमिंग (घड्याळ) साधत सुटलेले तीन बाण ! एकाने शिवसेना तर दुसऱ्याने राष्ट्रवादीचा वेध घेतला आणि तिसऱ्याने मराठा आरक्षणाचे फळ पदरात पडले. अर्थात धनुर्धर कोण होता ? हे वेगळ सांगायची गरज नाही. बाहुबली २ मध्ये तो राजकुमार होता हे सांगाव लागल नाही. आता तराजूचे पारडे महायुतीकडे पूर्ण झुकलय. कार्यकर्त्याच संख्याबळ, संयम आणि राजकीय दूरदृष्टी असलेले भविष्यात १४५+ ला पोहोचतील तर उरलेले कुबड्या बनून रहातील. व्यक्तिकेंद्रित राजकारण कधीच मागे पडतय हे डोळे बंद केलेल्यांना (मग ते युतीत असोत कि आघाडीत) कधी समजणार ? 

© बिंदुमाधव भुरे, पुणे.

Monday, December 11, 2023

चक्रव्यूह

१२ मार्च १९७१ ...या दिवशी आनंद पिक्चर रिलीज झाला होता. आपण सगळे ९ वी च्या वार्षिक परीक्षेच्या तयारीत असू. परीक्षा झाल्यानंतर केव्हातरी आपल्यापैकी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला असणार.... आणि नंतर तर अनेकदा ...

त्यातला शेवटचा सीन ! मृत्यूशय्येवर पडलेला राजेश खन्ना ... श्वास लागलेला असतो... आयुष्यातील उरलेले सगळे श्वास संपवण्याची जणू स्पर्धा चालू असावी... मॅरेथॉनच्या शेवटच्या पंधरा वीस मीटरच्या टप्प्यात जीवाच्या आकांताने धावत अंतिम रेषा पार करणारा स्पर्धकच जणू ! तिथे पदकासाठी संघर्ष तर इथे मृत्यूशी झुंज ! 

डॉक्टर असलेल्या बाबू मोशाय .... म्हणजे अमिताभ बच्चनला ती मृत्यूशी सुरु असणारी अपयशी झुंज पहावणार नाहीये म्हणून काहीतरी कारण काढून तो बाहेर पडलाय... आनंदला आता धाप लागलेली आहे ... त्याचा शेवटचा श्वास बाबू मोशायमधे अडकला असावा जणू ... डॉक्टर रमेश देव टेप सुरु करतो आणि बच्चनच्या आवाजात रेकॉर्ड केलेली कविता ऐकू येते.....

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है ....

बच्चनच्या धीर गंभीर आवाजातली कविता पुढे सरकत असते आणि मग त्यातली एक ओळ येते .... जिस्म जब खत्म हो और रुहको जब सास आए.. आणि ती ओळ पूर्ण होण्यापूर्वीच आनंद आयुष्यातील शेवटची आर्त हाक देतो... बाssबू मोशाssssय... श्वास थांबलाय... लढाई संपली आहे... मृत्यूचा विजय झालेलाय.. ...... आणि .... 

बच्चन धापा टाकत येतो पण सगळ काही शांत झालेल असत. त्याला जीवनाच अंतिम सत्य समोर दिसत असत. हताश हतबल बच्चन रडवेल्या चेहऱ्याने निश्चल झालेल्या आनंदकडे पहात असतानाच.. पुन्हा तो खर्जातला धीर गंभीर आवाज कानांवर पडतो...... "बाबू मोशाssय"  ....... टेपरेकॉर्डर सुरुच असतो. जीवन आणि मृत्यू .. या दरम्यान हेलकावे खाणाऱ्या प्रत्येकाच्या  जगण्यातील वास्तव बाबू मोशायच्या कानावर आदळत असतं.‌

जिंदगी और मौत तो ऊपर वाले के हाथ में है जहापनाह ...
उसे ना तो आप बदल सकते हैं ना हम...
हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं जिनकी डोर ऊपर वालों की उंगलियों में बंधी है....
कब कौन कैसे उठेगा ये कोई नही बता सकता ......
आणि शेवटी हा हा हा असे आनंदचे ते हास्य ! मृत्यूला बेडरपणे वाकुल्या दाखवणारं ... 

कितीही वेळा हा सिनेमा पाहिला तरी या दृश्याने आपल्या पापण्या ओलावतातच.... अलिकडे हा चित्रपट मी पुन्हा पाहिला आणि या शेवटच्या दृष्याने विचलित झालेल्या मनात विचारांची नव्याने झालेली गर्दी अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू लागली. 

मृत्यू होताच आत्मा अनंतात विलिन झाला म्हणतात आणि आप्तजन अश्रू ढाळत असतात. मात्र इवलासा जीव जन्माला येताच रडतो आणि सगळ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागतो. पण याला परमात्मा नविन रुप धारण करुन आला वगैरे असे काही कोणी म्हटल्याच ऐकिवात नाही ... अस का बर ? भगवतगीतेमधे श्रीकृष्णाने मृत्यू, पुनर्जन्म, शरीर, आत्मा वगैरे थियरी मांडली आहे. त्यात असाव का याच उत्तर ? जिस्म जब खत्म हो और रुहको जब सास आए या ओळीत त्याचा अर्थ दडला असेल का ?

राजेश खन्नाला वाटत असेल बापडा हा इहलोक एक रंगमंच ! पण याला युद्धभूमी का म्हणू नये ?  कारण ... जन्मापासूनच मानवाचा  जगण्यासाठीचा लढा सुरु होतो. लहानपणीचे भुकेसाठी रडणे हे मोठेपणी पोटासाठी लढणे होते. एखादी गोष्ट हवी म्हटल्यावर ती मिळवण्यासाठी लहान मूल जे काही करतं तो हट्ट ... मात्र मोठेपणी एखाद्याने तेच केल तर त्याला भांडण, तंटा, राजकारण यासारखी लेबलं का बरं लागतात ? नोकरीतल प्रमोशन काय किंवा व्यावसायिक यश .... त्यासाठी जे काही करायला लागतय ... ते काय असत ? धडपड, लढा कि युद्ध ? आजारपणातही माणूस आजाराशी लढतो तर डॉक्टर आजार बरा करण्यासाठी .....  ते काय असत ? लढा कि युद्ध ? आनंदची लढाई सुरु होती आणि बाबू मोशायची पण लढाईच सुरु होती ना ? 

बच्चन एका गाण्यात म्हणतो... 
जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकराएगी... मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी... 
आयुष्यभर चालणाऱ्या या लढ्यात जो जिंकतो तो सिकंदर... ! युद्धात अनेकजण फ्रंटवरुन लढा देतात तर काही सपोर्टिंग रोलमध्ये असतात. आनंद फ्रंटवरुन लढत होता तर बाबू मोशाय सपोर्टिंग म्हणून ... अस म्हणाव का ? .... कोणी कुठला रोल करायचा ते वरचा ठरवतो..... कारण ... डोर उपरवालेके हाथमे है ! 

जन्म मृत्यूचे चक्र अव्याहतपणे सुरु असते. "आनंद मरा नही आनंद मरते नहीं" या डायलॉगचा अर्थ तोच असेल का ? ती डोर तो जशी फिरवेल त्यावर ठरेल पुढचा जन्म कोणत्या रुपात दिला जाईल ते ! ... त्याने ठरवून दिलेला रोल साकारायचा आणि काम झाल की पडदा पडतोच. युद्धभूमीवर सुर्यास्ताला शंखनाद झाला की नाही का होत युद्धविराम ? तसंच काहीस .... बाssबू मोशाsssय अशी दिलेली आर्त हाक म्हणजे जणू शंखनादच.... 

द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केली. खूप उंचीवरुन पाहिले की या रचनेचा आकार चक्रासारखा आहे हे कळत. आजकाल अशा प्रकारची दृष्य टिपणाऱ्या कॅमेरांना म्हणूनच द्रोण कॅमेरा म्हणत असावे का ? या रचनेत प्रत्येक सैनिकाची भुमिका ठरलेली आहे. इंकिलाब चित्रपटात बच्चनसाठी म्हणून तर गीतकार म्हणतोय "अभिमन्यू चक्रव्यूहमे फस गया है तू  ... संभल सके तो संभल.. निकल सके तो निकल ... दुष्मनोंके जालसे... दोस्तोंके चालसे.."  

विधात्याने रचलेल्या या युद्धभूमीवरचं मी एक पात्र असेल तर मीच अभिमन्यू... मीच दुष्मन... आणि मीच दोस्त आहे ना ? या जन्म-मृत्यूच्या चक्रव्यूहात मी फसलोय... यात फसणे किंवा मुक्त होणे आपल्या हातात नाही. कारण ??? ..... कारण ..डोर उपरवालेके हाथमे है ! .... प्रसंगानुरूप माझी भुमिका बदलत रहाते... कारण ... डोर उपरवालेके हाथमे है..... 

गदिमा म्हणतात ... 
एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ... जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे .... 
जन्म कोणताही मिळो ... कर्माचे फळ भोगावे लागणार... त्यापासून सुटका नाही.‌ 
every action has an equal opposite reaction हा प्रकृति नियम आहे ना ? 

एकदा हे नीट लक्षात घेतल की मग काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षडरिपूंना काय अर्थ उरतो ? हे षडरिपू मानवी कर्माचे कारक आहेत का ? याच कर्मावर आधारित जन्म पुनर्जन्म चक्र सुरु असते का ? सत्कर्म असो कि कुकर्म .... ते पण विधिलिखितच असते का ? 

 हम्म्म (सुस्कारा सोडत)  ... असो .... हा पण एक प्रकारे नुसत्या प्रश्नांचा चक्रव्यूह .... !  उत्तरांच्या शोधात या चक्रव्यूहात जो खोलवर शिरतो त्याला उत्तरं सापडत असतील ? मनात विचार येतो कि ... 
"गुरुविणा कोण दाखविल वाट ?" ...... 
योग्य गुरु मिळाला तर या प्रश्नांचा चक्रव्यूह भेदून तुम्ही मोक्षप्राप्ती करु शकाल अन्यथा प्रत्येकाचा अभिमन्यू होणे ठरलेल आहे .... आणि तेही विधिलिखित ! 

(थोडेसे स्मित करत) विचारांच्या या गर्दीत डोक्याच पार भज होतं नाही ? आपलं सगळ्यांच जगणं हे या अशा प्रश्नांसोबतच ....  आणि .... आयुष्याचा पडदा पडणे हे त्यांचे अंतिम उत्तर ! .... मौत मेहबूबा है अपने साथ लेकर जाएगी..... 

त्यामुळे दोस्तांनो, फार डोकं खराब करुन घ्यायच नाही ... आनंदवर उतारा म्हणून मग पुन्हा एकदा मुकद्दर का सिकंदर टाकावा आणि सलाम एक इश्क मेरी जा या सिकंदर जोहराच्या गाण्यात मनमुराद डुबून जाव.... 

किंबहुना .... या गाण्यात जोहराच कडव झाल्यानंतर किशोरदाचा आलाप सुरु होतो.... ध्यान लावताना केलेल्या ओमकारात जशी तंद्री लागावी तसा फील येतो. त्यात मग एक ओळ येते एक एहसान कर अपने मेहमानपर...असे गातांना किशोरचा आवाज असा काही लागतो ना की त्यात आकंठ बुडायला होत .... काही क्षण आपल्याला सगळ काही विसरायला होतं..! अगदी गात असलेल्या सिकंदरकडे स्तब्ध होऊन एकटक बघत राहिलेल्या जोहरासारखच ..... !  ती नशा काही औरच ..... खरय ना ? तुम्हाला काय वाटतय ? 

बिंदुमाधव भुरे, पुणे.

वरील लेख Youtube वर ऐकण्यासाठी खालील लिंकचा वापर करा. 

https://youtu.be/9FS7O38YaRk?si=SeM-q_3pDXwiGNzw

Friday, September 8, 2023

माझ्या मनातली शाळा

माझ्या मनातली शाळा 

दिनांक ६ सप्टेंबर २०२३, आमच्या माॅडर्न हायस्कूलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण व्हाॅटस् अप गृपवर आले आणि ....
मागोमाग मिलिंद एकबोटेचा फोन आला ! "पुण्यात आहेस ना ?" 
मी "हो" म्हटले. 
"कार्यक्रमाला ये, वाट बघतोय" ! 
मी "बssर, ठीक आहे, येतो" म्हणालो खर .. पण मनात थोडी चलबिचल झाली होती. 

हा पुरस्कार आमचे आवडते व्ही. एस्. देशपांडे सर यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने दिला जाणार होता अन् तोही आमच्याच वर्गातला आमचा सवंगडी डॉ जगदीश हिरेमठ याच्या हस्ते ! त्याच्या आवाजात व्हीएसडींच्या आठवणी ऐकण्यासाठी मनातून आतूर होतो.   या निमित्ताने अनेक मित्र पुन्हा भेटणार होते. "जुमानजी" सिनेमा आठवला  ... सोंगटी फिरवली आणि ५० वर्ष मागे गेलो. त्याच वास्तूत आज पुन्हा विशू, मिल्या, जाड्या, पम्या वगैरे गॅंग भेटणार होती. .. पण सिनियर सिटीझन म्हणून ! 

शाळा सोडल्यानंतर अनेक मित्र शाळेत किमान एकदा तरी जाऊन आले असणार पण त्या दिवशी मी मात्र बरोबर ५० वर्षे आणि ३ महिन्या नंतर शाळेत आलो होतो. खर म्हणजे १९९६ ते २००२ या काळात मी शाळेसमोर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा शाखेत होतो. पण शाळेत जायचा धीर कधी झालाच नाही. कारण ....

शाळेची वास्तू, आपले दरवर्षीचे वर्ग, मुख्याध्यापकांचे ऑफिस, शाळेच्या मागच्या गेटमधून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला असणारे स्वच्छतागृह (त्यावेळी आपण मुतारी म्हणायचो), त्यामागे खडक आणि नंतर विस्तीर्ण असे क्रीडांगण, त्यालगत असलेली व्यायामशाळा वगैरे .... हे चित्र मन:पटलावरुन कधीच पुसले जाऊ नये असे मनोमन वाटायचे. त्यामुळे पाच सहा वर्षे समोर शाळा असूनही रस्ता ओलांडायचा धीर कधी झाला नाही. मनातल्या त्या चित्रावर अकारण रेघोट्या ओढल्या तर स्मृतीपटलावर असलेल्या मूळ चित्राला धक्का लागेल ही भिती मनात असायची. 

पण माझ हे वाटण फक्त शाळेपुरतेच मर्यादित होत का ? तर नाही. हा माझ्या स्वभावाचा एक भाग होता. शाळेत असताना कसबा पेठेत ज्या वाड्यात आम्ही रहात होतो तेथे नंतर अनेकदा गेलो पण आणखी एक जिना चढून रहात असणारे रहाते घर पहाण्याचा धीर कधी झाला नाही. त्या वास्तूत असलेल्या अनंत आठवणींना शब्द फुटले तर त्या आठवणींबरोबर संवाद कसा साधायचा या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नसायचे. 

१९७७ ला मी चाळीसगाव येथे बॅंकेत रुजू झालो. प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांच्या वडिलांच्या घरात भाडेकरु म्हणून राहिलो. नंतर बरोबर २५ वर्षांनी एका लग्नासाठी जाण्याचा योग आला. आपण आयुष्याची वाटचाल जिथून सुरु केली त्या घराला भेट देऊ म्हणजे जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल या विचाराने वेळात वेळ काढून मी त्या घराला भेट द्यायला गेलो खर मात्र त्या घराची अवस्था पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या. आज भानुविलास समोर काही क्षण उभे राहिलो की काहीसे तसेच होते.

तेव्हापासून मनाची ही ठेवण झाली असावी. पण मिलिंद एकबोटेचा आग्रही फोन आणि अनेक मित्र भेटतील म्हणून शाळेत येण्याचे धाडस केले. मागील गेटने स्कूटर आता आणली. वाॅचमन काहीतरी बोलत होता मला. शब्द कानावर पडत होते पण माझ लक्ष नव्हत, मी नुसते बर म्हणालो. मला मागे खडक दिसल्याचा भास होत होता. ...... 

खडकावर खडूने स्टंप कोरले होते आणि क्रिकेट सुरु होते तर पुढे ग्राऊंडवर काही मुले फुटबॉल खेळत होती तर अलिकडे काही मुले बास्केटबॉल प्रॅक्टिस करत होती. वाॅचमन पाठ वळवून केव्हाच निघून गेला होता आणि स्वागतासाठी उभ्या शिक्षिकेने अत्तर लावण्यासाठी हात पुढे केला. यंत्रवत अत्तर दुसऱ्या मनगटावर घासले. अत्तराचा मंद सुवास सुखावून गेला. शाळेच्या पॅसेजमधून चालत काही वर्ग मागे टाकले आणि कार्यक्रमाच्या हाॅलमधे प्रवेश केला. 

कार्यक्रम सुरु झाला होता. पाहुण्यांची ओळख, प्रास्ताविक, सत्कार, शाल, नारळ, गुच्छ वगैरे सोपस्कार पार पडले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण झाले. अनेक जण व्हीएसडींच्या स्मृतींना उजाळा देत होते. व्हीएसडींची कन्या बोलायला उभी राहिली. तोच तोंडावळा, काळ्या कडांची तशीच चष्म्याची फ्रेम ! कुठूनतरी अचानक व्हीएसडी येतील आणि एखाद्या इंग्रजी चित्रपटाची गोष्ट सांगायला सुरुवात करतील असे क्षणभर वाटून गेल. 

एव्हाना हृदयातील व्हीएसडींच्या आठवणींच्या कप्प्याचे दार सताड उघडले गेले होते. आणि डॉ जगदीशने माईकचा ताबा घेतला. गुरु शिष्य परंपरेत आम्हाला ठाऊक असलेला तो सर्वोत्तम शिष्य ! एव्हाना आम्हीच इतके भावूक झालो होतो तिथे त्यांची मनःस्थिती काय झाली असेल ? मेरा नाम जोकर मधे जाने कहा गए वो दिन गातांनाचा राजकपूर आठवतो. काळा गॉगल लावूनही त्याचे अश्रू स्पष्ट दिसायचे. डॉक्टर व्हीएसडींवर बोलता बोलता मध्येच थबकायचा, आवंढा गिळायला ... तेव्हा माझ्या नकळत एखादा अश्रू मनाचा आदेश धुडकावत बाहेर यायचा. कुणी पाहिल असत तर .... ? "अरे, ये आसू आज बाहर कैसे आ गए" राजेश खन्नाचा अमरप्रेम मधल वाक्य आठवून गेल. 

पसायदान डोळे मिटून ऐकल. बाहेर पडल्यावर काही क्षण मित्रांबरोबर घालवले. जातांना डॉक्टरला म्हटले एकदा साठलेल्या अश्रूंना मनसोक्त आणि मुक्त वाहून देण्यासाठी अशा आठवणी घेऊन कधीतरी सगळे मित्र भेटूया. पाहूया तो दिवस कधी येतो ते ! मी इकडे तिकडे न बघता स्कूटर सरळ गेट बाहेर काढली. आजही माझी शाळा माझ्या मनात होती तशीच आहे.

बिंदुमाधव भुरे. 

Tuesday, July 18, 2023

प्रबळ प्रादेशिक पक्ष - वर्चस्वासाठी लढाई

कोणाला पटो अगर न पटो पण मी २०१४ नंतर पासून एक मत मांडत आलो आहे कि एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष प्रबळ बनून राहू शकत नाहीत. राष्ट्रवादीला शिवसेनेला बाजूला सारल्याशिवाय ही स्पेस मिळणार नव्हती. आणि त्यासाठी भाजप पासून सेना विभक्त होणे (करणे) गरजेचे होते. २०१४ ला भाजपला एकतर्फी पाठिंबा देणे ही त्यासाठी राष्ट्रवादीची एक धूर्त चाल‌ होती. परिणामी शिवसेना नाके मुरडत का होईना तेव्हा सत्तेत सहभागी झाली.  मात्र २०१४-१९ या काळात सेना सत्तेत राहूनही विरोधात असल्यासारखे वागत राहिली. 

सेनेची दुखरी नस बरोबर हेरुन २०१९ ला राष्ट्रवादीने त्यांना भाजप पासून पूर्ण दूर केले. मुख्यमंत्री पद देऊन त्यांची पक्ष संघटनाही कमकुवत केली. शिवसेना दुभंगणे  हा त्याचा एक स्वाभाविक परिणाम होता. मग आपल्या कूटनीतीचे पुढचे पाऊल टाकताना  राष्ट्रवादी नुकतीच सत्तेत सहभागी झाली. मात्र राष्ट्रवादी पक्ष फुटला असे म्हणण्याचे धाडस आजही अनेक समीक्षक करायला धजावत / तयार नाहीत. 

कालांतराने पूर्ण राष्ट्रवादी सत्तेत आणि शिवसेना (कदाचित १६ आमदारांचे निमित्त) बाहेर हे चित्र भविष्यात दिसू शकते. २०१४ ला योजिल्यानुसार एकमेव प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी आता स्पेस व्यापू पहात आहे. यासाठी आणि येथून पुढे अजितदादा यांचे "आक्रमक नेतृत्व" हे कार्ड हुशारीने खेळले जात आहे. पवारांच्या राजकीय प्रेमात पडलेल्या संजयने उबाठाच्या नेतृत्वाला  धृतराष्ट्र बनवले आहे कारण राष्ट्रवादीचे प्रत्येक पाऊल हे उबाठाची प्रबळ प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली राजकीय स्पेस आक्रसून टाकत आहे. 

दोन्ही पक्षांच्या विभाजित घटकांना आपल्या चूका शोधणे किंवा आत्ममंथन करण्यापेक्षा भाजपला दूषणे देणे सोईचे आहे व ते पक्ष हे काम चोख पार पाडत आहेत. गंमत म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना टोकाचे शिव्याशाप देणे टाळत आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. मिंधे सरकार, खोके सरकार, घटनाबाह्य सरकार आणि आपल्याच लोकांना शिव्याशाप देणे हे उबाठा मंडळींनी गेले वर्षभर सुरु ठेवलय त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील "विसंवादातील (धूर्त) संवाद माधुर्य" उठून दिसते आहे. 

शिवसेनेला मागे टाकून राष्ट्रवादी प्रबळ आणि एकमेव प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे येईल का ? कि उबाठा पुन्हा एकसंध शिवसेना म्हणून गतवैभव पुन्हा मिळवेल ? वगैरे प्रश्नांची उत्तरे नजिकचा भविष्य काळ देईल. तोपर्यंत राजकारणाच्या या चिखलात कोणता पक्ष वेगळी काही भूमिका घेतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

©श्री. बिंदुमाधव भुरे, पुणे

Monday, March 20, 2023

नियती

नियती

 दैव, नशिब, नियती या सगळ्या गोष्टी मानण्यावर असल्या तरी भारतात बहुसंख्य जनता याला मानते. कोणी नवस बोलतो आणि फेडायला विसरतो, कोणी वचन देतो आणि पाळत नाही, कोणी दिलेला शब्द फिरवतो. अन् मग जेव्हा काही विपरित घडते तेव्हा हे भगवान, अरे देवा, ओह गाॅड किंवा या अल्ला यांचा पुकारा होतो आणि पहाणारा सहानुभूती दाखवत दैव, नशिब, नियती वगैरेंवर सगळे सोपवून मोकळा होतो. बुद्धीवंतांची श्रद्धा, अंधश्रद्धा यावर चर्चासत्र झडतात. कलियुगात असच घडायच म्हणे ! करावे तसे भरावे ही म्हण त्यामुळेच आली असावी का ?

आपल्या खाजगी जीवनात एखाद्याने आयुष्यभर जोपासलेली तत्वप्रणाली, केलेला निर्धार म्हणजे त्याची कठोर तपस्या ! त्या मार्गाने आपल्या मुलांनीही मार्गक्रमण करावे हा काही नियम नाही मात्र अपेक्षा असू शकते. मुले त्याचे आयुष्य स्वतंत्रपणे जगायला मोकळी असतात. त्यांचे आदर्श, त्यांची जीवनमूल्ये वेगळी असण्यात चूक काहीच नाही. आणि या वाटचालीत ती आपला स्वतंत्र ठसा उमटवू शकतात. "हा" अमूक अमूक यांचा मुलगा बर का ! किंवा ते अमूक अमूक "याचे" वडिल बर का ! ... समाजात आपली कशी ओळख निर्माण करायची हे तुमचे कतृत्व ठरवत असते. मात्र राजकीय जीवनातील गणिते वेगळी असतात. 

"आयुष्यात काॅंग्रेस सोबत कधीही जाणार नाही अन् तशीच वेळ आली तर हे दुकान बंद करेन." हा बाळासाहेबांनी व्यक्त केलेला निर्धार होता. राजकीय पक्ष म्हणून त्यांनी शिवसेनेसाठी आखलेली ती तात्विक चौकट होती कारण काॅंग्रेसचा भोंदू सर्वधर्मसमभाव त्यांच्या हिंदुत्वाला कधीच मान्य नव्हता. पक्षाची सुत्रे मुलाकडे आली. आता याचे पालन मुलाने करायला हवे कारण बाळासाहेबांचा निर्धार ही काही खाजगी बाब नव्हती तर ती त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षासाठी आखलेली लक्ष्मणरेषा होती. कायद्याच्या भाषेत शिवसेना पक्षासाठी घालून दिलेली अलिखित घटनात्मक चौकट म्हणूया. 

आता वडिलांनी केलेला हा पण, निर्धार जगजाहीर होता मात्र मुलाने वडिलांना दिलेले वचन गुप्त होते, बंद खोलीतले होते.... "एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेन." वडिलांच्या पश्चात त्यांना दिलेल्या या वचनाचा उल्लेख सार्वजनिक व्हायला ६ वर्षे का लागली ? वडिलांनी केलेला ठाम निर्धार पायदळी तुडवून त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करणे याला काय म्हणावे ? मी खूप खूप श्रीमंत होईन असे वचन दिले आणि ते पाळायला गैरमार्गाचा अवलंब केला तर त्या वचनपूर्तीची किंमत ती काय ! हिंदुत्वाला न मानणारे, सावरकरांचा अपमान करणारे, पालघर साधू हत्याकांडात सत्ता असूनही तोंड न उघडणारे काॅंग्रेसजन बाळासाहेबांना जवळचे वाटले असते का ? आणि पवार जरी खास मित्र असले तरी ते त्यांच्यासाठी राजकीय शत्रूच होते हे बाळासाहेबांनी उघडपणे आणि जाहीरपणे सांगितले होते. 

पण राजकारणी मंडळींना सिलेक्टिव्ह मेमरीचे वरदान लाभलेले असते. सत्तेपुढे त्यांना मतलबाचे लक्षात रहाते आणि गैरसोयीचे आठवत नसते. बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती केली आणि २५ वर्षे ती टिकली. याच युतीत शिवसेनेची २५ वर्षे सडली म्हणताना आपण बाळासाहेबांना चूक ठरवत असतो.‌ आणि दोन पाऊले पुढे टाकून बाळासाहेबांनी कठोर निर्भर्त्सना केलेल्या दोन्ही काँग्रेसशी आघाडी करत असतो तेव्हा वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या आणि त्यांनी आखलेल्या ध्येयधोरणांची चौकट आपण उध्वस्त करत असतो, पक्षाची तत्वे पायदळी तुडवत असतो. बाळासाहेबांचे विचार आणि भुमिका नको पण त्यांचे नावाचा वापर पुरेपूर हवा अशा प्रकारचे चित्र यातून उभे रहाते. "ध्येयवादी विचारांशी आणि तत्वांशी अशी प्रतारणा ही पतनाकडे नेणारी ठरते."

मविआ स्थापन होणे ही शिवसेनेची वैचारिक चौकट खिळखिळी होण्याची सुरुवात होती. भाजपशी मतभेद विकोपाला जात असतांनाही राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याची चाल खेळली आणि २०१४ ला सेना निमूटपणे भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाली. "एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष बलवान राहू शकत नाहीत" हे राष्ट्रवादी ओळखून होती. शिवसेनेची दुखरी नस त्यांनी बरोबर हेरली होती आणि आज बाळासाहेब नाहीत याचा फायदा घेत २०१९ च्या निकालानंतर फासे टाकले गेले. त्यात शिवसेनेचे नेतृत्व अडकले. सत्तातूर सल्लागार मंडळी भरीस टाकणारी होतीच. मविआ स्थापन झाली. शिवसेनेच्या वैचारिक चौकटीला हादरे बसण्याची ती सुरुवात होती. मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख दोन्ही जबाबदाऱ्या पेलणे अशक्य होईल आणि पक्षाकडे ठाकरेंचे दुर्लक्ष होईल हा चाणक्याचा कयास अचूक ठरला. पक्षप्रमुखाला मुख्यमंत्री बनवून घटनात्मक चौकटीत बंदिस्त करुन टाकले आणि पक्षसंघटनेपासून त्याची जणू नाळच तोडून टाकली.  

२०२२ ला पक्षाकडे सत्ता आणि मुख्यमंत्री पद असूनही चाळीस आमदार बाहेर पडले. राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करतोय हे या मंडळींचे म्हणणे होते. "एका राज्यात दोन प्रादेशिक पक्ष बलवान राहू शकत नाहीत" या तत्वावर राष्ट्रवादीचे काम सुरु होते. बाळासाहेबांनी ज्यांना आयुष्यभर चार हात लांब ठेवले त्यांचीच संगत अखेर भोवली. मतभेद होण्यासाठी मतांची देवाणघेवाण व्हावी लागते. पण तो रस्ता सेना नेतृत्वाने बंद ठेवला होता. आजकाल राजकारणात पक्षात विरोधी किंवा वेगळे मत मांडणाऱ्यांना पक्षात वाळीत टाकले जाते किंवा पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून निलंबित करण्यात येते. पक्षांतर्गत लोकशाही हा केवळ शब्दप्रयोग उरला आहे. 

घटस्फोट हा एका दिवसात होत नाही तर ती दीर्घ काळ चालणाऱ्या मतभेदांची परिणती असते. विसंवाद हा संवाद असेल तरच होतो पण येथे संवादाचाच अभाव असल्यामुळे पक्षात मतभेदांना चालना मिळत राहिली. आणि बघताबघता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री असूनही चाळीस मंडळींनी वेगळी भूमिका घेतली. बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या याच चाळीस मंडळींना गद्दार म्हणून हिणवले जात आहे. यातील अनेकांनी तर आयुष्याची तीस चाळीस वर्षे पक्ष वाढवण्यासाठी खर्ची घातली आहेत. बाळासाहेबांकडे माणसे जोडण्याची हातोटी विलक्षण होती. ती जादू हरपली, तत्व विसरली आणि पक्षाची दैना झाली. हा नियतीचा खेळ आहे का ? 

ठाकरे कंपूची सारी मदार आता सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आहे. सोळा आमदार अपात्र ठरविण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे यात कोर्ट हस्तक्षेप करत नाही. ही पक्ष फूट नाही तर आम्हीच खरा पक्ष आहोत याचा हा वाद आहे. खरी शिवसेना कोणाची हे पण कोर्ट ठरवत नाही कारण तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. निवडणूक आयोगाने पक्ष कोणाचा ? चिन्ह कोणाला ? यावर निर्णय देताच "त्यांनी शेण खाल्ले" असा उन्मत्त शेरा दिला गेला. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे आणि त्यांनी त्यांच्या अधिकाराचा पक्षपाती वापर केला असा एक दावा सुनावणी दरम्यान केला गेला आहे.‌ कारण बहुमत सिद्ध करायला सांगितले नसते तर ही वेळ आली नसती अशी वकिलांनी बाजू मांडली. पण हे म्हणणे पश्चात बुद्धी आहे. उठसूट कोर्टाचे दार ठोठावणारांनी राज्यपालांच्या या निर्णयाला लगेचच कोर्टात आव्हान का दिले नाही ? उलटपक्षी आमदारांना अपात्र ठरविण्याची चालून आलेली नामी संधी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ठोकरली आणि स्वतःच्या हातानेच सगळा खेळ खल्लास का केला ? अशी बुद्धी होणे हा पण नियतीचा खेळ म्हणायचा का ? 

सत्याची बाजू नेहमीच वरचढ ठरते आणि न्यायाचे पारडे त्या बाजूलाच झुकते. नियतीच्या मनात काय असेल ? शिवसेनाप्रमुखांची भुमिका आणि हिंदुत्वाचा विचार यांच्याशी प्रतारणा हे पतनाकडे नेणारे ठरतय का ? या प्रश्नाचे उत्तर आज तरी होकारार्थी आहे. सिब्बल प्रभृतींनी दोन दिवस किल्ला जबरदस्त लढवला. मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरवणे शक्य नसते. त्यामुळेच कि काय त्यांच्या मुद्द्यांमध्ये कायद्यातील तरतुदींपेक्षा जास्त भर भावनिक आवाहनावर होता.‌ हरिष साळवे प्रभृतींनी मोजकाच युक्तीवाद केला पण तो परिणामकारक होता. सुनावणी दरम्यान जजनी काही प्रश्न विचारणे याचा अर्थ खुलासा घेणे असा होतो. पण त्यावरुन केसचा निकालाचा अंदाज बांधणे अवघड असते. नियतीच्या मनात काय आहे हे सांगता येणे कठीण आहे. पण आज तरी हा निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागेल असे वाटते असे धाडसाने म्हणावे लागेल कारण "ध्येयवादी विचारांशी आणि तत्वांशी प्रतारणा ही पतनाकडे नेणारी ठरते" हे सूत्र आहे आणि नियतीचा नियम तसाच लागू होतो.

निकाल कोणाच्याही बाजूने लागला तरी उर्वरित गट पुन्हा एकदा अपिलात जाईल अर्थात तशी निकालात तरतूद असेल तरच ! पण जनहितासाठी हा पक्ष वाचविण्याचा लढा आहे वैयक्तिक अहंकाराचा नाही हे पक्षप्रमुखांनी लक्षात घेऊन चार पावले माघार घेत खेळी केल्यास पक्षाचे भवितव्य पुन्हा उजळून निघेल कारण परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यावर मात करण्याची नियती नेहमीच एक संधी देत असते. ती ओळखण्याची दृष्टी देव्हाऱ्यातील पूजेचा धनुष्य बाण देईल कि पुन्हा एकदा खुषमस्करे डाव साधतील ? नियतीच्या मनात काय असेल ? 
(सदर लेखातील मते ही व्यक्तिगत आहेत. यातून कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही)

© बिंदुमाधव भुरे, पुणे.‌
२० मार्च २०२३


Friday, July 1, 2022

आम्ही वारकरी

बॅन्केतील निवृत्त मंडळींचा आमचा एक गट नित्य नियमाने वारीचा एक टप्पा काही वर्षे भक्तीभावाने करतो आहोत. मात्र गेली दोन वर्षे लाॅकडाऊनमुळे वारी बंद होती.‌ प्रतिकात्मक म्हणून आम्ही काही मोजकी मंडळी वारी मार्गावर काही पावले चालून परत येत होतो. यावर्षी माऊली कृपेने सगळी बंधने दूर झाली आणि आमचा उत्साह दुणावला. दरवर्षी १५ ते २० दरम्यान असणारी संख्या यावर्षी २६ झाली. 

तर असे हे "स्पेशल २६" वारकरी शनिवारी दि २५ जूनला सकाळी ६ वाजता नळ स्टाॅप चौकात जमायला सुरुवात झाली. सगळ्यांनी पांढरा झब्बा, डोक्यावर पांढरी टोपी असा वेष तर काहींच्या हातात टाळ दिसून येत होता. भाली टिळा लावण्याचा कार्यक्रम सुरु असतानाच बसचे आगमन झाले आणि आम्ही विठू माउलीचा जयघोष करत सासवड मार्गे जेजुरीला रवाना झालो. सासवडला पालखीचा मुक्काम होता, मनी विठ्ठलाचा भाव होता, त्यामुळे सगळ्यांनी भक्तीभावाने दुरुनच पालखीचे दर्शन घेतले. 

यावेळी जेजुरी ते वाल्हे असा टप्पा आयोजकांनी ठरवला होता. जेजुरीला उतरलो आणि वारीमार्गावर पाऊल ठेवताच एक वेगळीच अनुभूती आली. जणू एका अदृश्य लहरीच्या स्पर्शाने मनात खोलवर दडलेला भक्तीभाव अलगद, तरंगत वर मन:पटलावर यावा असे काहीसे वाटून गेले‌ आणि आम्ही वारकरी बनून गेलो. 

वारकऱ्यांसोबत पाय चालत होते, मुख विठ्ठल नाम घेत होते त्यामुळे थकवा जाणवला नाही. वारी मार्गाची धूळ आपल्या चरणांना लागते आहे ही भावना एक वेगळीच उर्जा, चैतन्य शरीरात निर्माण करते, एक वेगळे समाधान मनाला लाभते याचा पुनरानुभव आला, अन्य वेळी आपण सलग इतकी पायपीट करुच शकत नाही, खरय ना ? 

शरीरात असलेल्या मनात खोलवर दडलेला विठ्ठलाचा भक्तीभाव आपल्याला एक दिवसाचा वारकरी बनवतो आणि पुढच्या वारीची ओढ मनात रुजवतो. वारीत सहभागी होताना आपल्या मनात भक्तीभाव तर असतोच, पण त्याचबरोबरीने आपल्या मनात एका छोट्या सहलीचा उद्देशही असतो. जुन्या सहकाऱ्यांसोबत दिवसभराच्या सहवासाची ओढ आणि गत काळातील आठवणींना मिळणारा उजाळा यांचे आकर्षणही असते पण मनात भाव मात्र विठ्ठल भक्तीचाच असतो. 

नामाचे महत्त्व विषद करतांना जसे गोंदवलेकर महाराज सांगतात कि भोजनाचा स्वाद प्रत्येक घासा गणिक कौतुक करत घेणे काय किंवा भोजन पोट भरण्यासाठी करणे काय शेवटी ते योग्य स्थळी पोहोचून आपले काम करत असते. त्यामुळे मनात अन्य कोणत्याही विचारांची गर्दी असली तरी मुखी सदैव राम नाम घेत रहावे. कालांतराने मन स्थिरावेल आणि जीवन राममय होईल. तद्वत वारीत सहभागी होणे महत्त्वाचे !

हे उदाहरण आमच्या वारीलाही तंतोतंत लागू होईल. त्यामुळे याच उत्साहात पुढील वर्षी वारीत सामील होतांना वारी अधिक भक्तिमय करण्याचा प्रयत्न करुया, माऊली चरणी लीन होऊया. दरवर्षी वारीचे यशस्वी आयोजन करणारे वारकरी, वारी भक्तीमय करणारे गायक वारकरी आणि अन्य सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण हीच ओढ दरवर्षी या वारीकडे मला आकर्षित करत असते. यावर्षी माझा मुक्काम मुंबईत असूनही केवळ वारीसाठी एक दिवस मला यावेसे वाटणे आणि वारी घडविणे ही विठू माउलीचीच कृपा ! 

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩🚩

©बिंदुमाधव भुरे, पुणे

Wednesday, April 20, 2022

भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे ?

"भला उसकी कमीज मेरे कमीज से सफेद कैसे" ? असा एक प्रश्न विचारणारी गृहिणी खूप वर्षांपूर्वी घरच्या छोट्या पडद्यावर यायची. ती जाहिरात आठवते ना ? मग लगेच वीज कडाडत एक कपडे धुवायचा साबण पडद्यावर दिसायचा आणि एक डायलाॅग .. ये है सुपर रिनका कमाल ! वगैरे ..

पण ही खरी कमाल स्पर्धेचे चटके बसायला लागल्याची होती.‌ नाहीतर पूर्वी घरी बनवलेली वाॅशिंग पावडर, दगडी साबण अस काहीही खपायच. पण प्रत्येकाला आपल्या अधिकार क्षेत्रात घुसखोरी झाली कि असुरक्षितता जाणवायला लागते. मग असल्या क्लृप्त्या लढवून आपला ग्राहक जनाधार टिकवायचे प्रयत्न सुरु होतात.

विहिंपच्या राम जन्मभूमी आंदोलनापासून हिंदू समाज एकवटू लागला. या आंदोलनातील एका टप्प्यात बाबरी ढाचा कोसळला. "हे कृत्य जर माझ्या शिवसैनिकांनी केल असेल तर मला त्याच्या अभिमान आहे" असे तेव्हा बाळासाहेब ठाकरे उद्गारले होते. या घटनेनंतर शिवसेनेने आपल्या मराठी बाण्यावर चाणाक्षपणे हिंदुत्वाची झूल ओढून घेतली अन् "हिंदूह्रदयसम्राट" शब्दाचा उदय झाला. पेशवाईत "ध चा मा" सोईस्करपणे झाला होता. तसे बाळासाहेबांच्या वाक्यातील "जर" शब्द सोईस्करपणे कालांतराने गळून पडला आणि आम्हीच तो ढाचा पाडला अशी टिमकी वाजवणे सुरु राहिले ते कायमचेच. 

या आंदोलनात विहिंपने, संघ परिवाराने तमाम हिंदूंना एका धाग्यात गुंफण्याचा प्रयत्न केला. "भेदभाव विरहित हिंदू एकता" हे एक सातत्याने चालणारे कार्य आहे आणि या कार्याची मुहूर्तमेढ १९२५ साली रोवली गेली होती. या कार्याच्या वाटचालीतील रामजन्मभूमी आंदोलन हा केवळ एक टप्पा होता. बाबरी पतनाची घटना ही हिंदू समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाची आणि सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली तुष्टीकरणाच्या राजनितीच्या निषेधाची उमटलेली स्वाभाविक प्रतिक्रिया होती. मात्र या घटनेचे श्रेय एका रात्रीत घेण्याचा प्रयत्न झाला. आणि आजही पक्षीय घसरता आलेख सावरण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा, हिंदुत्व, अयोध्या या पालुपदाचा वापर सोइने चालू आहे.  

हिंदुत्वाच्या समान धाग्याने भाजप सेना युती २५ वर्षे टिकली. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. कारण त्यामागे होते त्यांचे कार्य, कर्तृत्व, रोखठोकपणा, निर्णयक्षमता, धाक, दरारा ! आणि या कमावलेल्या वश्याची पुण्याई वारसाहक्काने पुढील पिढीला मिळाली. मात्र अशी पुण्याई कायमस्वरूपी उपयोगी पडत नसते. 

भाजपला वाजपेयी,आडवाणी यांच्या नावाचा वापर फार काळ करावा लागला नाही. पक्षबांधणी आणि कार्यकर्ते जोडणीच्या आधारावर त्यांनी पक्षविस्तार केला, यश संपादन केले. सेनेच्या वारसदारांना नेमकं हेच जमल नाही. मात्र तरीही पूर्वपुण्याईवर मिळणारा आदर, मानमरातब आजही कायम रहावा ही अपेक्षा ते बाळगून होते. बाळासाहेबांनाही या नेतृत्वाची ही अकार्यक्षमता जाणवली असावी. अन्यथा शिवतीर्थावर त्यांच्या शेवटच्या दसरा मेळाव्यात "माझ्या उद्धव, आदित्यला संभाळून घ्या" अशी आर्जवे करायची वेळ आली नसती.

भाजप सेना युती तुटली, दुभंगली तरी हिंदुत्व कुणाचे यावरुन कधी रण पेटले नव्हते. परंतु, सेना नेतृत्वाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला तसे त्यांच्या कट्टर हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. जी सेना आयुष्यभर (?) हिंदुत्वासाठी लढली आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला प्राणपणाने विरोध केला त्यांच्याच वळचणीला भाजपशी फाटल म्हणून जाऊन बसावे हे न पटणारे होते. गेल्या दोन अडीच वर्षांत सेनेच्या हिंदुत्वातील भगवा रंग फिका पडत चाललाय ही धारणा जनमानसात रुजायला लागली होती. सेना जरी तोंडाने प्रखर आणि जहाल हिंदुत्वाची भाषा बोलत असली तरी कृती मात्र सर्वधर्मसमभावाकडे झुकणारी जाणवत होती. संगतीचा परिणाम कि अपरिहार्यता ? 

सेनेच्या पायाखालून हिंदुत्वाची जमिन सरकत चालली हे चाणाक्ष मनसे प्रमुख न ओळखते तरच नवल ! गेल्या एक दशकचा वनवास संपवून नव्याने प्रस्थापित होण्यासाठी यापेक्षा मोठी संधी पुन्हा चालून येणार नाही हे लक्षात घेऊन राज ठाकरेंनी "राजपटलावर" आपल्या फासे टाकले. पाडव्याच्या मुहूर्तावर हिंदुत्वाकडे इंजिनाची दिशा वळवली. रामनवमीला अंगावर भगवा परिधान केला. मशिदींवरील भोंगे आणि त्यावर होणारी अजान हा विषय घेऊन राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आणि शिवसेना या फेकलेल्या फास्यात अलगद अडकली, घेरली गेली. बाकी दोन्ही काँग्रेसला हिंदुत्वाशी कधीच घेणेदेणे नव्हते. पण गंमत म्हणजे आज त्यांच्या पक्षातील भलेभले भगवा लपेटून हनुमान चालीसा गुणगुणतायत. 

मुंबईतील सभा, पुण्यातील कार्यक्रम आणि आता लक्ष्य आहे औरंगाबाद ! मुंबई सोडल्यावर सेनेची दुसरी आणि सगळ्यात जुनी कर्मभूमी म्हणजे औरंगाबाद ! सेनेची हिंदुत्वाची जागा मनसे व्यापू पहातय. "भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे ?" मनसेमुळे आपल हिंदुत्व झाकोळतय ही अस्वस्थता सेनेच्या देहबोलीतून डोकवायला लागली. आणि आम्ही कसे कट्टर आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटू लागलाय. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा पुरस्कृत सर्वधर्मसमभावाने सेनेचा एक हात धरलाय आणि दुसऱ्या हातातल असलेल हिंदुत्व मनसे ओरबाडतय. 

पत्रकार परिषदेत राज ठाकरे अयोध्या भेटीची जूनमधील तारीख जाहीर करतात. आणि सेनेच्या गोटात खळबळ माजते. सेनेचा अयोध्या दौरा मे महिन्यात ठरवायची मातोश्रीवर खलबते सुरु होतात. "भला उसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसे ?"' आमच हिंदुत्व अस्सल आणि इतरांचे नकली हे कंठशोष करुन सांगताना पुन्हा बाळासाहेबांचे स्मरण ! गोवा, युपी निवडणुकीत अपयशी मुद्रा उमटविल्यावर आता अयोध्या भेट ..  आदित्य ठाकरेंना नेता म्हणून रुजविण्याची ही केविलवाणी धडपड काय संकेत देते ? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हा शेवटचा हुकूमी पत्ता आहे कि त्यांची अगतिकता आणि असमर्थता ? 

सेना मनसेतील कोणाची "कमीज अधिक सफेद" हे यथावकाश कळेलच.  दरम्यान, मनसेने फेकलेल्या भोंगा, हिंदुत्व या जाळ्यात न अडकण्याची आणि त्याच वेळी सेनेला नाराज न करण्याची कसरत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जमेल कि पुन्हा "जाणता चाणक्य पाॅवरगेम" करतील ? आपण महाराष्ट्राच्या प्रगतीवर टाळ्या वाजवाव्यात, वीज कपात झाली तर मेणबत्त्या लावाव्यात आणि मविआ चा नायक सगळी सुत्रे हातात घेऊन विकासाचा वारु कधी चौफेर उधळून लावेल याची आतुरतेने वाट बघावी. मात्र असा धुरळा उडालाच तर ... "अपनी कमीज मैली होनेसे बचाके रखना"

© बिंदुमाधव भुरे, पुणे