Wednesday, October 29, 2025

स्व. श्रीपादराव देशपांडे - २५ वा स्मृती दिन



 

स्व. श्रीपादराव देशपांडे - २५ वा स्मृती दिन

६ ऑक्टोबरचा दिवस, साधारण रात्री ८ ची वेळ... घरी यायला नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला होता. रात्री आमची जेवणाची वेळ ९ - ९।। दरम्यानची.. मात्र त्यादिवशी जेवायला लवकर वाढले होते.. मनाला हे थोड विचित्र वाटत होत.. पण त्यांचे स्वरुप सांगता येत नव्हत.  जेवण झाल्यावर पत्नीने बातमी सांगितली.."श्रीपादराव गेले".. मनातल्या उमटत असलेल्या त्या विचित्र भावनांचा उलगडा झाला होता..

१८५, शनिवार पेठेतील संघटनेचे कार्यालय, निळ्या रंगाचे बॅक कव्हर असलेली लाकडी खुर्ची, डाव्या हाताला टायपिंग मशीन, उजव्या हाताला कागदपत्रांचे भेंडोळे, समोर बसलेले अनेक कार्यकर्ते... मी १९८४ ला पुण्यात आल्यावर कार्यालयात पहिल्यांदा पाय ठेवला तेव्हाचे हे चित्र ! आजही ते तसेच आहे.. मनावर कोरलेले आहे...श्रीपादरावांच एकिकडे डिक्टेशन सुरु असायच.. मधूनच फोन वाजायचा, समोर कार्यकर्त्यांच्या चर्चेत त्यांच्या खास शैलीत हुंकार भरत दाद देत तर कधी मान डोलावून दिलखुलासपणे हसून कोतुक करत... अष्टावधानी म्हणजे काय याचा वस्तुपाठ देत... त्यांचे काम अखंडपणे सुरू असायचे..‌

श्रीपादरावांशी पुण्यात एन ओ बी डब्ल्यू च्या अधिवेशनादरम्यान परिचय झाला होता.‌ नंतर १९८४ ला मी पुण्यात बदली घेऊन आल्यावर या परिचयाचे पुढे एका दृढ नात्यात रुपांतर होणार आहे याची मला तेव्हा कल्पना नव्हती. एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्या असंख्य मंडळींवर त्यांचे बारीक लक्ष असावे... परिपक्व नेतृत्वाचा हा एक गुण... कार्यकर्त्यांमधील गुणांची पारख करणारा हा माणूस मला तेव्हा प्रथमदर्शनी मनापासून भावला. 

परिचयातून भेटीगाठी अन् मग सहवासाची वारंवारिता वाढते आणि त्यातून मग संवाद सुरु होतो... त्यामुळे पुणे बॅंक वर्कर्स, महाराष्ट्र प्रदेश बॅंक वर्कर्सच्या कामात त्यांच्यामुळे मी नकळत ओढला गेलो होतो. वरचेवर होणाऱ्या भेटीमध्ये निवांत क्षणी अनेकविध विषयांवर आमच्या चर्चा व्हायच्या. 

अशा चर्चांना शेवटी एक निर्णायक वळण किंवा आकार यावा म्हणून ते चर्चेचा समारोप करताना शेवटी म्हणायचे कि 

"बिंदूजी, आजचा हा सगळा विषय जरा संपूर्ण लिहून काढाल का ?" 

लिहून झालेले कागद त्यांच्या हाती सुपूर्द केले कि मग त्यांना त्यांच्या कागदपत्रांच्या भेंडोळ्यात मानाचे स्थान मिळायचे...(आम्ही त्या भेंडोळ्याचे "चोंबाळं" असे नामकरण केलं होतं.) त्यांनी तेव्हा लावलेल्या लिखाणाच्या सवयीचा फायदा मला आजही जाणवतोय. 

मी रहायला तेव्हा दत्तवाडीतच होतो. श्रीपादरावांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर ! हे त्यांना एकदा कळाले.. मग काय .. रात्री कधी कधी १० वाजता फोन यायचा आणि मग कधी त्यांच्या घराच्या अंगणात तर कधी सारस बागेजवळ वीर सावरकरांच्या पुतळ्याखाली चर्चासत्र रंगात येत असत.. कधी बॅंक सुटल्यानंतर रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीन मध्ये स्पेशल ऑमलेटचा आस्वाद घेत तर कधी एखाद्या हाॅटेलमध्ये वडा सांबार खात खात चर्चा व्हायच्या ! 

प्रसंगानुरूप विशेष भाषण त्यांना जेव्हा करायचे असेल तर त्या भाषणाचा लिखित ड्राफ्ट त्यांच्याकडे तयार असायचा.. तो वाचून मी त्यावर मत प्रदर्शित करावे असा त्यांचा आग्रह असायचा. आपला परफाॅरमन्स हा सदैव सर्वोत्तम असायला हवा हा त्यांचा अट्टाहास असायचा. यासाठी आपले भाषण एका सामान्य बॅंक कर्मीला कसे वाटेल ? हे जाणून घेण्यासाठीचा हा त्यांचा अनोखा प्रयोग होता !! 

अर्थात, त्यांना सूचना देणे किंवा काही बदल करायला सांगणे म्हणजे काजव्याने सूर्याला उजेड दाखवण्याचा प्रयत्न ! त्यामुळे मी या फंदात सहसा पडत नसे.. मात्र कधी काही सुचवलेच तर ते मनापासून कौतुक करायचे.. श्रद्धेय पंताची एखाद्या नविन कार्कर्त्याच्या पाठीवर "शाबासकीची थाप" पडली तर त्याचा जो "अर्थ" असायचा ना तोच "अर्थ" या कौतुकात दडलेला असायचा हे कालांतराने मला उमगले.. परिपक्व नेतृत्वाचा हा पण एक गुण !! 

आमच्या बॅंक ऑफ बरोडातील एक अतिशय हुशार व बुध्दिमान नेते स्व. अशोक भिडे यांना लोकल प्रवासात अपघात झाला असता त्यांचे वापी येथे होणाऱ्या अभ्यास वर्गात येणे रद्द झाले. ऐनवेळी हक्काचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला सोबत नेले इतकेच नव्हे तर प्रश्नोत्तरांचे एक सत्र मी सांभाळावे असा त्यांनी आदेश दिला. अर्थात, पाठीशी मी आहे, काळजी करु नका हे एव्हाना सांगण्याचीही आवश्यकता राहिलेली नव्हती इतका त्यांचा माझ्यावर विश्वास एव्हाना बसला असावा... 

अशा अनेक आठवणी श्रीपादराव हे नाव घेताच मनाच्या हळूवार कप्प्यातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करत असतात.. आणि... या आठवणी जेव्हा केव्हा बाहेर डोकावताना तेव्हा डोळ्यांच्या पापण्या नकळत ओलावत असतात. 

एकंदरीतच श्रीपादरावांचे व्यक्तिमत्त्व हे मला मनमिळाऊ, कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे, कार्यकर्त्यांमधील नेतृत्व गुणांना वाव देत त्यांना फुलवणारे भासले. आणखी काही वर्षे ते आपल्यात हवे होते ही हळहळ कायमच मनात घर करुन आहे. शेवटचा श्वास त्यांनी संघटनेच्या कार्यालयात घेतला ही नियतीची योजना किती विलक्षण होती ना

असो !! काळ कोणासाठी थांबत नाही.. कालचक्राचा हा प्रवास अव्याहतपणे सुरु असतो.. या प्रवासात सामील कधी अन् कुठे व्हायचे आणि या प्रवासात नेमके कुठे थांबायचे हे आपल्या हातात नसते.. 

काही मंडळींचा हा प्रवास प्रदीर्घ असतो तर काहींचा अल्प !! या प्रवासात आपल्याला अनेक सहप्रवासी भेटतात कारण ती एक स्वाभाविक क्रिया असते.. मात्र या प्रवासात "आपण स्वतःहून किती जणांना भेटतो ?" हे माझ्या मते जास्त महत्वाचे आहे. 

अशा भेटण्यामागे माणसे जोडण्याची प्रेरणा असते. या प्रेरणेमागे काही विशिष्ट हेतू अर्थातच असतो त्याशिवाय हे घडत नाही.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत संस्कारित झालेल्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात या हेतू विषयी सुस्पष्टता ही कायमच असते. 

चारित्र्यवान व्यक्ती घडविण्याच्या सातत्यपूर्ण अन् निस्वार्थ साधनेतून व्यक्तींमध्ये "राष्ट्र प्रथम" ही भावना आकाराला येत असते. अशा घडलेल्या व्यक्तींच्या समुहातून तयार होणारा समाज हा राष्ट्राला पुनर्वैभव मिळावे यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील काही वेळ समाजकार्यासाठी देत असतो..

संघाने संस्कारित केलेल्या अशा असंख्य स्वयंसेवकांचे, व्यक्तींचे कार्य समाजाच्या विविध क्षेत्रात अव्याहतपणे सुरु आहे. अशा  व्यक्तींमध्ये स्व. श्रीपादराव देशपांडे यांचे नाव हे आम्हा भारतीय मजदूर संघ आणि बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या एन ओ बी डब्ल्यू संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात कायमस्वरूपी कोरलेले आहे. 

एन ओ बी डब्ल्यू च्या कार्याचा पाया बॅंक ऑफ महाराष्ट्रमधे रचल्या नंतर ते पुढे अधिक जोमाने वाढविण्यासाठी ज्यांनी अपरंपार कष्ट घेतले त्यात श्रीपादरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.... वर उल्लेख केल्याप्रमाणे "आपण स्वतःहून प्रवासात किती जणांना भेटतो" हे महत्त्वाचे असते. श्रीपादरावांना याची नक्की जाण होती कारण आपल्या संघटन कार्यातील या प्रवासात त्यांनी असंख्य लोकांच्या गाठीभेटी  घेतल्या. 

माणूस ओळखण्याची कला त्यांना अवगत होती म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. संघटनेत सभासद जोडून घेणे.. त्यांच्याशी वारंवार संपर्क ठेवणे.. त्यांच्यातील गुणांची पारख करुन त्यांना कार्यकर्ता म्हणून घडविणे यात त्यांचा हातखंडा होता. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या "कार्यकर्ता" या पुस्तकात कार्यकर्ता म्हणून आवश्यक असलेल्या साऱ्या गुणांच्या वर्णनांचा उल्लेख आहे.. श्रीपादरावांमध्ये ते सारे गुण सहजसुलभ होते. 

अशा गुणवान कार्यकर्त्यातून अनेक चांगले नेते बॅंकिंग क्षेत्रात काम करताना संघटनेला देण्याचे काम श्रीपादरावांनी केले. बॅंकिंग क्षेत्रात मजदूर संघाच्या कामाचा विस्तार होत होता. श्रीपादरावांनी आपल्या कर्तृत्वाने आपली आणि अर्थातच एन ओ बी डब्ल्यू... नोबो संघटनांची कार्यकक्षा वाढवत ती बॅंक ऑफ महाराष्ट्र ओलांडून अनेक बॅंका, विविध राज्ये आणि मग देशपातळीवर नेली. 

जे करायचे ते भव्य हा त्यांचा अट्टाहास असायचा कारण त्यामागे असलेला त्यांचा विचार... बलाढ्य अशा डाव्या विचारांच्या संघटनेसमोर आपल्याला नेटाने उभे रहायचे आहे या गोष्टीचे त्यांना पूर्ण भान होते. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रेरित होऊन काम केले पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद असे. 

त्यांच्या सहवासात १५-२० मिनिटे व्यतित केल्यावर नव्या जोमाने, नव्या जोशाने काम करण्याची प्रेरणा मिळायची.. त्यांच्या भाषणातूनही हा परिणाम साधला जात असे. बलाढ्य संघटनेसमोर उभे ठाकायचे तर मनात न्यूनगंडाचा भाव कणभरही असता काम नये किंबहुना पुरेपूर आत्मविश्वास असला पाहिजे याची त्यांना जाणीव होती हेच यातून स्पष्ट होते. 

आजकाल शाईचे पेन कोणी वापरत नाही त्यामुळे टीप कागद काय असतो हे नविन पिढीला ठाऊक नसेल. शाई पेनने लिहिलेले पटकन वाळावे यासाठी अशा टीपकागदाचा वापर पूर्वी करत असत.. मनुष्य प्राण्यांत अशा  टीप कागदांचा गुणधर्म असला असता तर श्रीपादरावांच्या नेतृत्वातील विविध गुण किती सहजपणे टीपता आले असते ना

मुंग्यांची रांग आपण पाहिली आहे. एका मागोमाग एक त्या चालत असतात. समोरुन  येणाऱ्या काही मुंग्या या रांगेतील जवळपास प्रत्येक मुंगीपाशी काही क्षणाचे हितगुज करत असतात. विरुद्ध दिशेने येणाऱ्या या मुंग्या संख्येने कमी असल्या तरी रांगेतील प्रत्येक मुंगीला भेटायचा त्यांचा प्रयत्न असतो ... त्या काय संवाद साधत असतील ...देव जाणे.. कदाचित "प्रवासात आपण स्वतःहून किती जणांना भेटतो ?" हेच सूत्र तर त्यामागे नसेल

पण एक मात्र नक्की आहे की....

भेटीतून संवाद, संवादातून संपर्क, संपर्कातून एकता आणि एकतेतून एकात्मिक भावनेने ध्येयाकडे वाटचाल हे सूत्र अशा भेटींमागे असते ! संघटनेमध्ये काम करताना सगळ्या प्रवृत्तीच्या, स्वभावाच्या लोकांना सोबत घेऊन वाटचाल करावी लागत असते.. प्रत्येकाच्या क्षमता पातळीमध्ये फरक असतो....

या पार्श्वभूमीवर एक संस्कृत श्लोक या ठिकाणी नमूद करावासा वाटतो...

असज्जनः सज्जन सङ्गिसङ्गात् करोति दुःसाध्यम् अपीह साध्यम् । 

पुष्पाश्रयात् शम्भु शिरोधिरूढा पिपीलिका चुम्बति चन्द्रबिम्बम् ॥ 

म्हणजे... 

एखादी सामान्य व्यक्ती ही सज्जन व्यक्तीच्या संगतीत राहून असाध्य असे कार्य सहजपणे करु शकते.. जसे एक मुंगी फुलाचा आधार घेत शंकराच्या माथ्यावरील चंद्रापर्यंत पोहोचू शकते.. 

 

श्रीपादराव हे आपल्यासारख्यांसाठी असे फुलांचा आधार देणारे होते..

विरुद्ध दिशेने येणाऱ्या प्रत्येक मुंगीच्या मनात जशी विचारांची स्पष्टता असते ... तशी ती श्रीपाद रावांच्या विचारात होती..  शंकराच्या माथ्यावरील चंद्र म्हणजे अर्थातच राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त होईपर्यंत कार्यरत रहाणे.. आणि त्यासाठी श्रीपादरावांसारख्या एखाद्या फुलाचा आधार घेत वाटचाल करणे म्हणजे ... आपल्या सगळ्यांचे जीवन हे एकप्रकारे अशा मुंगी सारखेच आहे.

आज २५ व्या स्मृति दिनाच्या दिवशी त्यांना हृदय पूर्वक वंदन !!! 

बिंदुमाधव भुरे..

Thursday, October 23, 2025

राळेगणसिद्धी भेट

 

राळेगणसिद्धी भेट – एक अविस्मरणीय दिवस

 

१५ सप्टेंबरचा दिवस.. आमचा शालेय मित्र मिलिंद चौगुलेचा फोन आला.. 

"पुण्यात आहेस कि मुंबईत ?" नेहमीप्रमाणे प्रश्न..

"सध्या तरी पुण्यातच आहे" ... मी

पुढचा प्रश्न

"४ ऑक्टोबरला फ्री आहेस का ?"

मिलिंद गुगल्या टाकण्यात पटाईत त्यामुळे प्रश्न आला कि उत्तर देताना काळजीपूर्वक बोलावं लागतं..

मी सावधपणे..

"का रे ? काही कार्यक्रम आहे का ?"

मिलिंद..

"डॉक्टर...  एक दिवसाची राळेगणसिद्धी भेट अरेंज करतोय..बाकी डिटेल्स नंतर सांगतो."

डॉक्टर म्हणजे आपला हृदय मित्र जगदीश हिरेमठ...

चितळे म्हटल कि बाकरवडी... बाटलीबंद पाणी म्हटल कि बिसलरी... तसं राळेगणसिद्धी म्हटलं कि आण्णा हजारेंच नाव डोळ्यांपुढे येतं...

 

आण्णा गेल्या ८-१० वर्षांपासून प्रकाशझोतात नाहीत.. पण नाव‌ घेताच आजही दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलन आठवते.. तिरंगा फडकवत वंदे मातरम् आणि इंकिलाब झिंदाबादच्या घोषणा देणारे आण्णा, वृत्तपत्रे आणि वाहिन्या प्रतिनिधींना आपल्या मराठमोळ्या हिंदीत ठामपणे सामोरे जाणारे आण्णा, प्रचंड उत्साहाचा खळखळता वाहणारा झरा असलेले आण्णा...


मनात हे चित्र तरळले तसं क्षणाचाही विलंब न करता मी हो म्हणून मोकळा झालो. मला ही संधी दवडायची नव्हती कारण आण्णांची भेट होईल, त्यांना निदान पहाता येईल हा विचार एकिकडे जसा मनात होता तसा आणखी एक मॅग्नेटिक फोर्स होता अन् तो म्हणजे एक आख्खा दिवस शाळेतल्या मित्रांसोबत घालवता येणार होता.. आणि त्यातही सामाजिक, वैचारिक, वैद्यकीय आणि अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या असामान्य कामगिरीने, कर्तृत्वाने एक असाधारण "उंची गाठलेला" डॉ जगदीश हिरेमठ हा पूर्ण दिवस आमच्या सोबत असणार होता..

 

४ तारीख उजाडली.. सकाळी ७.४५ .. बस निघायची वेळ.. आम्ही बारा जण होतो.. लकी ट्वेल्व मध्ये मी आहे याचा आनंद वेगळाच होता..‌ अन्यथा कसल्याही लकी ड्रॉ मध्ये कधीच आपला नंबर लागत नसतो हे माझे ठाम मत ! कर्म करा.. फुक्कट काही मिळत नसत..

 

वाटेत ब्रेकफास्ट कुठे ? किती वाजता ? राळेगणसिद्धी जवळ आल्यावर आम्हाला वाटाड्या मार्गदर्शक म्हणून कोणीतरी येणार.....  वगैरे कार्यक्रमाचा तपशील डॉक्टरने बसमध्ये सांगितला.. संपूर्ण दिवसभरात सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, काय हव नको याची विचारपूस करणारा आमच्या टीमचा कॅप्टन म्हणा किंवा आमचा माॅनिटर म्हणून मिलिंद आपले काम चोख बजावत होता.‌



ब्रेकफास्टला मिसळ, भेळ, भजी असा जबरदस्त टेस्टी मेनू आपला प्रभाव दाखवत होता.. ब्रेकफास्ट नंतर मंडळी जराशी सुस्तावली होती..


  



एका शाळेच्या आवारात जीप थांबली.. मागोमाग बसही .. वाटाड्या आणि त्याचा चक्रधर सारथी सोबती यांच्याशी परिचय झाला. पानघट हे लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यावर पूर्णतया आण्णांच्या कार्याला वाहून घेतलेले आण्णांचे एक निष्ठावान सेवक ! राळेगणसिद्धी मधील आण्णांच्या कार्याची खडानखडा माहिती असलेले, आण्णांची दिनचर्या सांभाळणारे, त्यांना काय हवे नको त्याची इत्यंभूत माहिती असणारे हे पानघट... यांच्या बोलण्यातून आण्णांविषयी असलेला आदर शब्दा शब्दांत जाणवत होता.. माहिती सांगताना मधूनच हसत हसत...




"मी जरा जास्तच बोलतो"  अस म्हणायचे.. आणि हे वाक्य सवयीने पेरलेल असावं असं अगदी या माणसाला पहिल्यांदा ऐकतांनाही कळत होत..

 

मला हा माणूस म्हणजे राम रुपी आण्णांचा हनुमान असल्याचा भास एक क्षण झाला..

 

पानघट यांचेच नातेवाईक म्हणजे चक्रधर सारथी सोबती श्री.‌बाळासाहेब गट ! हे गृहस्थ डॉ जगदीशच्या पाया पडले आणि सांगू लागला कि "माझा हा पुनर्जन्म आहे आणि मृत्यूच्या दारातून मला डॉक्टरने परत आणलय... डॉ हिरेमठ म्हणजे माझ्यासाठी देव आहे.." वगैरे बरेच काही...

 

ऐकताना अंग शहारून गेल.. जगदीशचे हे रुप ऐकून होतो पण आज ते आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो.. डॉ जगदीशचे असे किती तरी पेशंट असतील पण त्यात असा एखादा भक्त विरळाच ! त्यानेच डॉक्टरला घरी या असे आग्रही निमंत्रण अनेकदा दिले होते आणि मग हा भेटीचा सोहळा प्रत्यक्षात आला होता..

 

आण्णांच्या कल्पनेतून आकाराला आलेली शाळा, त्याचे विस्तारीत बांधकाम, यादवबाबा मंदिर वगैरे पाहून झाल्यावर आम्ही संग्रहालयाच्या आवारात पोहोचलो.. एव्हाना पानघटांनी आण्णांपर्यत आमच्या आगमनाचा निरोप पाठवायची व्यवस्था केली‌ होती.

 

संग्रहालयात काय पहायला मिळणार ? मनात उमटलेला प्रश्न..

हे स्किप करुन थेट आण्णांना भेटूया.. अधीर मनाची अवस्था..


    

  


एखाद्या शाळेच्या मोठ्या वर्गाएवढी खोली.. चारही भिंतींवर शोकेसमध्ये मांडलेल्या होत्या ट्राॅफीज्, पदके, स्मृती चिन्हे.. प्रत्येकावरील लिहिलेला मजकूर वाचावा म्हटले तर दिवस‌ अपूरा पडेल. 




एका दालनात चित्र प्रदर्शिनी.. आण्णांच्या तरुण वयातील लष्करी वेषातील फोटोपासून, विविध आंदोलनातील प्रसंग, अनेक नामवंत मंडळींनी राळेगणसिद्धीला दिलेल्या भेटी, आण्णांनी राळेगणसिद्धीत राबविलेले उपक्रम आणि उपलब्धी.. वगैरे बरेच काही..

 

   

आज १०-१२ दिवसांनंतर लिहिताना अनेक प्रसंग, घटना नमूद करायच्या राहिल्या असतीलही मात्र एका बाबतीत आश्चर्य व्यक्त करावे का ? हा प्रश्न मनात येतोच आणि ते म्हणजे... आण्णांनी आजवर केलेल्या आंदोलनातील पत्रव्यवहार, पेपर मधील बारीकसारीक बातम्यांची कात्रणे या सगळ्या पेपर्सचे लॅमिनेशन करून त्याची केलेली अप्रतिम मांडणी .... हे नेमके कोणाला आणि कधी सुचले असावे ?



असो...एक आदरणीय व्यक्तीमत्व अशी सकाळी निघताना मनात असलेली प्रतिमा एव्हाना बदलत चालली होती. देशभक्तीच्या यज्ञात जीवनाच्या प्रत्येक क्षणाची आहूती समिधा म्हणून अर्पण करणाऱ्या आण्णांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वासमोर बसण्याची तरी आपली पात्रता आहे का ? संग्रहालय आणि चित्र प्रदर्शन पाहिल्यानंतर अंतर्मुख होत असतांनाच मनात उमटलेला स्वाभाविक प्रश्न !

 

श्री. पानघट आणि श्री.‌ बाळासाहेब यांच्या सोबत आण्णा हळूहळू चालत येत असल्याचे लांबून दिसले‌. पानघट यांनी

"आण्णांना प्रश्न विचारा बर का ?"

असे आधीच बजावले होते. असंख्य प्रेक्षकांसमोर उभे राहिल्यावर एखादा वक्ता ब्लॅंक होतो. आज एका उत्तुंग व्यक्तिमत्वासमोर बसल्यावर आम्ही ब्लॅंक झालो होतो..., काय प्रश्न विचारायचे ?



  



       


पण डॉ जगदीश सोबत असल्यामुळे मनाला दिलासा होता.. कडक उन्हात एका वृक्षाच्या छायेचा आधार मनाला दिलासा देतो तसेच काहीसे.. श्री.‌पानघट यांनी ओळख करुन देण्याचे सोपस्कार पार पाडले. जगदीशने आमच्या सगळ्यांच्या वतीने आण्णांना पुष्पगुच्छ दिला..     निशब्द वातावरणातील ताण हलका होत होता..

   

        


जगदीशने एका मागोमाग प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि आण्णा बोलत होते.... आण्णांचे विचार, त्यांनी आयुष्यभर जोपासलेली मूल्ये त्यांच्या उत्तरातून शब्दांचे आकार घेत बाहेर पडत होती.


.


https://youtu.be/DcUEV2DFsXo

तो आवाज कानात साठवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न सुरु होता. आण्णांच्या बोलण्यात एक आत्मीयता होती, आपलेपणा होता..

त्यामुळे भीड चेपली जात होती. आमच्यातील एक एक जण प्रश्न विचारायला पुढे येत होता.




  


श्री.‌ पानघट हे गेली दोन दशके आण्णांना सोबत करत आहेत. त्यांच्या जीवनपटावर ते सविस्तर बोलतात. त्यांची भेट झाल्यापासून आण्णांबद्दल ते भरभरून बोलत होते..

मला ते एका क्षणी श्री. दासगणू वाटले. श्रीगजानन विजय ग्रंथात महाराजांच्या कार्याचे, त्यांच्या लीलांचे वर्णन श्री दासगणू करतात तसेच काहीसे...



श्री. पानघट यांच्या कार्याचे कौतुक करायचे म्हणून मी उठलो आणि आण्णांच्या शेजारील खुर्चीत जाऊन बसलो... मनात आलेला हा विचार सांगितला तसे त्यांनी मंद स्मित केले. आण्णांचे तपस्वी जीवन पाहिल्यावर आठवलेले एक पद्य

"दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चालता है"

त्यांना वाचून दाखवले...

ही तीन चार मिनिटे म्हणजे आपल्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे हे मला आज अधिक ठळकपणे जाणवतय.

 


https://youtu.be/p18cGJnMpTU


१५-२० मिनिटांच्या भेटीनंतर आम्ही पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे भोजनासाठी मार्गस्थ झालो. श्री. पानघट यांच्याकडे लिंबाचे सरबत झाले आणि श्री. बाळासाहेबांकडे भोजन ! या दोघांच्याही आदरातिथ्याचे वर्णन करायला शब्द अपुरे आहेत. भारतीय संस्कृतीत असणारा पाहुणचार आम्ही आता टिपीकल "पुणेरी" असणारे सगळे जण नव्याने अनुभवत होतो. आपली मूळ..roots आणि मूल्ये..values हे अद्यापही शाबूत आहे याची खात्री कुटुंबियांनी दिलेल्या सन्मानाने झाली. परतीच्या प्रवासाला पाच वाजता सुरुवात झाली..

 

ध्यानीमनी नसतांना आज राळेगणसिद्धी आणि आण्णांची भेटीचा योग जुळून आला आणि याच श्रेय केवळ आणि केवळ जगदीशला बहाल करायला हवंय..

 

प्रश्नोत्तराच्या दरम्यान एका उत्तरात आण्णा म्हणाले कि "माणसाने जीवनातून "मी" काढून टाकला कि मग बाकी मागे काही उरत नाही... माझ्या हातून हे कार्य करवून घेणारी शक्ती वेगळी आहे... मी केवळ माध्यम !"

 

दिवसभराच्या प्रवासातील दमणूक झाल्यावर पाठ टेकतांना मनात विचार आला की...     "माझ्यात मी पणा नाही" असे वाटणे म्हणजे एक प्रकारे माझ्यात "मी" पणा असणे आहे का ?

 

परंतु हा विचार मी क्षणात मनातून काढून टाकला.. आण्णांच्या बाबतीत अशा प्रश्नांना मनात स्थान नाही.. जसे आण्णांच्या आंदोलनाचा इतिहास मांडणाऱ्या चित्रप्रदर्शनात कुठेही अरविंद केजरीवाल नाहीत !!

 

डोळे मिटले तेव्हा "दिव्य ध्येय कि ओर तपस्वी जीवनभर अविचल चलता है" या ओळीच मनात घोळत होत्या..

 

श्री. बिंदुमाधव भुरे.

१४ ऑक्टोबर २०२५. 

Monday, September 15, 2025

लवासातील गेट टूगेदर

लवासातील गेट टूगेदर


गुगलवर लवासा अस टाईप केल्यावर याला आता "घोस्ट सिटी" म्हणतात हे नव्याने कळाल असल तरी गेल्या आठवड्यात प्रत्यक्षात लवासात फिरलो त्यावेळी तेथील अर्धवट, अपूर्ण घरांचे सांगाडे, त्या घरांवर साचलेले शेवाळ्याचे थर, लोखंडी कंपाऊंड किंवा पिलर्स मधून बाहेर डोकावण्याऱ्या स्टीलवर चढलेला गंज तर काही ठिकाणी जमिनीत खचलेला बांधकाम सांगाडा अगर कललेल आख्खच्या आख्ख घर ... आमची वाहने खडबडीत रस्त्यावरून पुढे जशी जात होती तसे हे दृष्य डोळ्यापुढे सरकताना मनात एक प्रश्न डोकावून गेला कि या ओसाड गावावर "कोणत्या भुताने" आपली जादू चालवली ? 






वाटेत काही घरे बांधून पूर्ण झालेली दिसत होती अन् तिथे रहाणारी माणसे पाहून मनात डोकावणाऱ्या या प्रश्नाच्या भितीची सावली छेदली जात होती. पण अशी घरे कमीच होती. बऱ्याचश्या बांधून पूर्ण झालेल्या घरांवरील कुलूपे मालकांच्या प्रतिक्षेत असावीत... कदाचित शनिवार रविवार मंडळी येत असतीलही. आमचा प्रवास सोमवारी सुरु असल्यामुळे आम्हाला कुलूपबंद घरांचे दर्शन होत होते.  




पुण्यातून ८ सप्टेंबरला दुपारी माॅडर्न हायस्कूल १९७३ बॅचचे आम्ही बारा तरणेबांड म्हातारे लवासाच्या दिशेने निघालो होतो. निमित्त ??? छे !!! शाळेच्या मित्रांना एकत्र येण्यासाठी निमित्त कशाला लागतय ???




"वय काहीही असो.. तुम्ही मनाने चिरतरुण आणि सदैव प्रफुल्लित असायला हवे.." 


वाचायला सोपे वाटतय ना ? जगातील समस्त सिनियर सिटीझन्स जमातीला सतावणाऱ्या या प्रश्नाला आम्ही माॅडर्नवाले मात्र निवांतपणे सामोरे जात असतो.. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना मोहिंदर अमरनाथ जितक्या सहजतेने फास्ट बाॅलिंगला सामोरे जायचा ना तसेच काहीसे.. 




आयुष्यात सुख दुःख दोन्ही आहेच आणि अस असल तरी "जिंदगी कैसी है पहेली" हा प्रश्न सतावत असतोच ना ? पण याला "कभी ये हसाए कभी ये रुलाए" अशी मनाची समजूत घालत जीवन आनंदाने जगतांना "जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही" हे तत्वज्ञान आपल्या पिढीला माहिती आहे. मात्र रोजच्या धकाधकीत त्याचा विसर पडल्यासारखं झाल कि मग त्याला असा रिफ्रेशिंग डोस द्यायचा.. पुढचे काही महिने मस्त जातात.. 




लवासात आमचा चड्डी मित्र गौतम पाषाणकरच्या घरी आम्ही त्यासाठीच चाललो होतो. पाऊस थांबला होता पण पावसाळी दिवस आहेत याची जाणीव करुन देणार मस्त वातावरण ! टेमघर धरणाच्या पायथ्याशी समर्थचा गरमागरम वडापाव आणि चहा याने मस्त मूड बनला होता.. धरण काठोकाठ भरलेले.. कोणीतरी गच्च भरलेल्या भांड्याला धक्का लावल्यावर पाणी सांडावे तसे धरणाच्या सांडव्यावरुन वहाणारे पाणी पहाताना धरणाच्या भिंतीला उंदीरांनी पोखरल्याच्या गंमतीशीर बातमीची आठवण मनात उगाचच ताजी झाली.




गौतमने केलेले स्वागत आणि केलेली सोय म्हणजे त्याला "beyond star" असेच म्हणावे लागेल. या वन स्टार ते सेवन स्टार मिरवणाऱ्यांच्या सोयी या गौतमच्या अरेंजमेंटपुढे फिक्या पडाव्यात अशाच होत्या. स्वागतपर चहापान झाले आणि रस्त्यावरील खडी डोकावणाऱ्या टोकदार रस्त्यावरुन आमचा फेरफटका झाला.‌ पुन्हा एकदा भग्न अवस्थेतील घरांचे दर्शन ... पण आता नजर सरावली होती.. कदाचित सभोवतालच्या अदृश्य भुतांनी आम्हाला प्रेमाने स्वीकारले असावे..‌





"सेवन कोर्स" डिनरच्या मेनूचा स्वाद घेता घेता गप्पांचा फड रंगत चालला होता. आमच्यासाठी "समयका ये पल थमसा गया है" अशी स्थिती होती.‌. सकाळीही ब्रेकफास्टला पोहे, डोसा, उत्तप्पा याच्या बरोबरीने फळे.. गौतमच्या अरेंजमेंटपुढे अक्षरशः नतमस्तक !! 




आजच्या काळातही कृष्ण सुदामा मैत्रीच्या गोष्टींचे दाखले दिले जातात. काळ लोटला आहे, आज सुदामा सुस्थितीत आहे पण मैत्र भावना मात्र तीच आणि तशीच आहे.. अशा विलक्षण मैत्र भावनेचा अनुभव गौतमने दिला होता. "आऊटसोर्सिंग" च्या जमान्यात सगळ्या व्यवस्था स्वतः लक्ष घालून अन् मन लावून त्याने केल्या आहेत याचे खूप अप्रूप वाटले. 




निरोपसमयी मैत्रीचा सुगंध सतत दरवळत रहावा म्हणून दिलेली भेटवस्तू यालाही "कौटुंबिक टच" होता.. या घोस्टसिटीत कधीही न विसरणारा प्रेमाचा अविस्मरणीय असा स्नेहानुभव दिल्याबद्दल गौतम... तुला या तुझ्या चड्डी मित्रांकडून मनःपूर्वक धन्यवाद !! या रिफ्रेशिंग डोसचा इफेक्ट दीर्घ काळ टिकेल यात शंका नाही.. अन्यथा असेच केव्हातरी पुन्हा भेटू..


बिंदुमाधव भुरे..

Monday, June 30, 2025

"बाॅब वारी २०२५"



 

 "बाॅब वारी २०२५" चा कार्यक्रम जाहीर झाला आणि सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येने बघता बघता साठी पार केली. बाॅब वारीच्या दशकपूर्ती नंतर यशस्वी आयोजनातील सातत्याची किर्ती बाॅब निवृत्तांच्या विविध कळपात पोहोचत असल्याची ही पावतीच जणू ! 


श्री. चव्हाण साहेबांनी अनेक वर्षांपासून व्यक्त केलेल्या एका इच्छेची पूर्तता नुकतीच झाली होती आणि बाॅब निवृत्तांच्या अर्धागिनींचा एक समूह छान पैकी आकाराला आला होता. या महिला वर्गाचा सहभाग हे या वारी २०२५ चे वेगळेपण म्हणावे लागेल. खरतर वारीतील‌ सहभाग हा निवृत्त बाॅब परिवारापुरताच मर्यादित हा आपला नियम ! मात्र या वर्षापुरता त्याला अपवाद करत बाॅब निवृत्तांच्या परिचयातील दोन तीन जणांचा समावेश यंदा केला‌ गेला. 


रथाचे चार अश्व आणि त्याचे कुशल नेपथ्य हे समीकरण रथात स्वार असलेल्यांना निश्चिंत बनवते. रविवारी दि २२ जूनला या वारीसाठीचा पाहणी दौरा आम्ही पूर्ण केला. अर्थातच कुशल नेपथ्य प्रकाश जहागीरदार यांचे नेहमीच असते.. जोडीचे चार अश्व अनेकदा बदलते असतात. तसे यावेळी ते मी, नरेंद्र मुजुमदार, अजित नंदर्गीकर आणि रहाळकरजी हे होतो. 


पाहणी दौऱ्यात ठिकठिकाणी थांबणे, न्याहारी तसेच प्रसाधन गृह वगैरेंची नेटकी व्यवस्था आहे की नाही हे पहाणे तसेच प्रवासाचा मार्ग, त्यावरील टप्प्यांची नोंद ठेवणे वगैरे विषय होते. अर्थात, नेमके पायी चालणे किती असेल‌ ? हा महत्वाचा आणि उत्सुकतेचा विषय होता आणि त्यातच वारीचा खरा आनंद मिळणार होता. मात्र या प्रश्नाचे उत्तर वारीच्या दिवशीच मिळणार होते ! साधारण ८-९ तासांचा हा पाहणी दौरा पार पडला आणि मग वारीचा अंतिम आराखडा / कार्यक्रम आकाराला आला.‌


सहभागी वारकरी माऊलींची संख्येने साठी ओलांडल्याचे सुरवातीलाच मी नमूद केल होत. यात सत्तरी पार‌ केलेल्या मंडळींची संख्या लक्षणीय होती. जास्तीत जास्त १५ ते २० किमी चालावे लागेल हे माहिती असूनही यातील एकही जण डगमगला नाही हे विशेष.. "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती हे या स्थितीत लागू न पडणारे गीत" उगाचच माझ्या मनात तरळून गेले.. 


नेहमीप्रमाणे सुखकर प्रवास व्हावा‌ म्हणून दोन उत्तम बस सकाळी ६.३० वाजता आमच्या हाॅटेल समुद्र अड्ड्यावर तयार होत्या. दोन्ही बसना "बाॅब वारकरी"चे बॅनर अडकले.. सगळ्यांना गंध टिळा लावायचा कार्यक्रम रंगला, गृप फोटोची लगबग आवरती घेतली. वारकऱ्यांना सदिच्छा निरोप द्यायला आलेल्या मंडळींनी प्रवासासाठी सोबत प्रेमाने दिलेल्या तहान लाडू भूक लाडूचा सहर्ष स्वीकार झाला. आणि माऊलींच्या जयजयकाराच्या  उद्घोषात बस नियोजित वेळेत रवाना झाल्या.



वाटेत रामकृष्ण मठ, संतोष हाॅल व वडगाव पुल असे थांबे बस घेत होती. येथे प्रतीक्षा करत असलेल्या वारकरी माऊली आम्हाला जाॅइन झाल्या. आणि मग बस मार्गस्थ झाली. वाटेत श्री पोतनीस साहेबांनी दिलेल्या हरिपाठ  पुस्तिकेचे वितरण झाल होतच..त्याच्या लयबद्ध पठणाने भक्तिमय वातावरण तयार झाले. अनेकांनी "वारी २०२५" गृप वर पाठवलेले अभंग, बासरीवादन बसच्या ब्ल्यू टूथ स्पीकर माध्यमातून ऐकवले गेले. 


नियोजित वेळेप्रमाणे ८.४५ ला हाॅटेल आशीर्वाद येथे चहापान, न्याहारीसाठी पहिला थांबा आम्ही घेतला. मस्त ढगाळ वातावरण, प्रदूषण मुक्त मोकळी हिरवा, निसर्गाने विणलेली हिरवाई...‌हा माहोल आणि वाफाळणारे गरमागरम पोहे, उप्पीट मिसळ याचा मनमुराद आनंद वारकरी मंडळींनी लुटला. फोटोसाठी मोबाईल सरसावले नसते तरच नवल ! या क्षणाच्या आठवणी टिपण्यात सगळे मग्न होते.. वेळ कमी पडत होता मात्र घडाळ्याचा काटा आपल्या वेगाने पुढे चालत राहिल्याने बस प्रवास पुढे सुरु करणे भाग पडले.‌ 



आणि हो एक खास उल्लेख कि जो आवर्जून करायलाच हवा... न्याहारीचे बील‌ अदा करायची गडबड करु नकोस असा प्रेमळ दम मला‌ श्री आठल्येंनी भरला आणि सगळ्यांचा न्याहारी खर्च आठल्ये दांपत्यांनी उचलून एक सुखद धक्का सगळ्यांना दिला. 


 

पालखी तरडगाव येथून सकाळीच फलटणच्या दिशेने रवाना झाली‌ होती.‌ रस्त्यांवर किती गर्दी असेल ? तरडगाव पासून आपल्या बस किती अंतर पालखीच्या दिशेने पुढे जाऊ शकतील ? रस्ते बंद तर नसतील ना ? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला तरडगाव पर्यंत पोहोचल्यानंतरच सापडणार होती. सगळ्या वारकरी माऊलींची मानसिक तयारी १५ किमी चालण्याची होतीच. साधारण ११ वाजता तरडगाव येथे पोहोचलो आणि मग रस्त्यांवर दुतर्फा माऊलींची वाढती वर्दळ रस्त्यावर दिसू लागली. सर्वत्र भगवे ध्वज दिसत होते, कानावर टाळ मृदंगाच्या गजरात अभंग तर कधी माऊलींच्या नावाचा उद्घोष कानांना सुखावत होता.‌ बसचा वेग आता धीमा झाला होता.‌ 



यादरम्यान बस बऱ्यापैकी पुढे आली होती. साधारण ११.३० च्या सुमारास आम्ही मंडळी सुरवडी गावाच्या जवळपास पोहोचलो आणि मग आम्ही थांबायचा निर्णय घेतला. आता  पायी चालण्याचे अंतर १५ किमी वरुन ६ किमी इतके कमी झाले‌ होते. अंतर तर कमी झाले पण आता उन्हाळा असल्यासारखे उन जाणवत होते. चालताना गटागटाने चालावे, दोन गटात फार अंतर पडणार नाही याची काळजी घ्यावी वगैरे सूचना पुन्हा एकदा दिल्या गेल्या आणि माऊलींचा गजर करत वारीत आमच्या पायी चालण्याला आरंभ झाला.. 


वाटेत निरीक्षण करताना भक्तीने भारलेल्या वातावरणात वारकरी माऊलींची विविध रुपे पहाणे, फोटो काढणे असे सुरु होते. काळज गावाच्या जवळ आम्ही जसे आलो तशी वारकऱ्यांची गर्दी दाट होत चालल्याचे लक्षात आले आणि इथेच माऊलींच्या पालखीचा विसावा असल्याचे दिसले. आतपर्यंत जाऊन दर्शन ? छे ! त्या गर्दीत शिरण्याचे धाडस होत नव्हते. मनात विचार आला.. लक्षावधी वारकरी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात आणि कळसाचे दर्शन घेऊन परततात. शेवटी भक्तीभाव मनात असला कि देव भेटतो.. आम्ही लांबूनच दर्शन घेतले. 

 



वाटेत आमच्या गटाने एक गोल रिंगण करत विठ्ठल विठ्ठल असा सुरात जयघोष सुरु केला.. थोडा पायांना विश्राम आणि नविन उर्जा सामावून घेण्याचा तो भक्तिमय प्रयत्न ! मजल दर मजल करत आम्ही १.३० वाजता वडजल गावात पोहोचलो. येथे मीरा भोजनालय मध्ये सगळ्या वारकरी माऊलींची भोजन व्यवस्था केली होती. इथे पोहोचल्यावर लक्षात आल कि एक गट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालत होता. त्यामुळे त्यांना ना माऊलींच्या पालखीचे दर्शन झाले ना मीरा भोजनालयाची पाटी दिसली. ही मंडळी आणखीन पुढे चालत गेली होती.


प्रचंड गर्दीमुळे कोणाचेही फोन लागत नव्हते. शेवटी प्रकाश आणि नरेंद्र या जोडगोळीने त्यांना गाठले आणि मग मीरा भोजनालयला आमचा कोरम फुल झाला. गरमागरम घडीच्या पोळ्या, वांग्याची भाजी, रस्सा, वरण भात, चटणी पापड वगैरे खास मराठमोळा मेनू होता. मंडळी थकली असली तरी अद्यापही पायी वारी चालायची इच्छा होती. जेवणानंतर तेथेच गप्पांचे फड जमले. अचानक बाहेर रस्त्यावर गर्दी वाढली. माऊलींची पालखी पुढे रवाना होत होती. ज्या मंडळींचे दर्शन राहिले होते त्यांना दर्शनाचा खूप छान लाभ झाला.. "याच साठी केला होता अट्टाहास .." आणि मग "वारीला आल्याचे सार्थक झाले" ही समाधानाची भावना मनाला स्पर्श करती झाली. 



माऊलींची पालखी फलटणच्या दिशेने पुढे सरकत होती तशी रस्त्यावरची गर्दी थोडी कमी होत होती. अखेर साडेचारच्या दरम्यान आम्ही परतीच्या प्रवासाला आरंभ केला. येताना पुन्हा सारोळा गावात हाॅटेल आशीर्वादला चहापान झाले. पुन्हा एकदा फोटो सेशन, माऊलींचा गजर झाला. दोन्ही बसमधील वारकरी माऊलींनी इथेच परस्परांचा निरोप घेतला. साडे आठच्या सुमारास म्हणजे अगदी ठरल्या वेळेला आम्ही समुद्र हाॅटेल येथे परतलो. 


माऊलींच्या कृपेने सगळी वारी खूप आनंदात आणि समाधानात पार पडली. पुढचे काही दिवस या आठवणींची आणि फोटोंची उजळणी होत राहील..या वारीला प्रत्यक्ष सहभागी होऊ न शकलेले श्री प्रकाश होनप आणि श्री सुहास पाटील यांनी आर्थिक सहयोग राशी देऊन अप्रत्यक्षपणे वारीत सहभाग नोंदवला. "बाॅब वारकरी" नाव असलेल्या टोप्या, उपवासाचा चिवडा, शेंगदाणा चिक्कीचे बार, लाडू, साटोऱ्या, प्यायच्या पाण्याच्या बाटल्या वगैरे सहाय्य करत अनेकांनी वारीत आपला भक्तिमय सहभाग दिला. या सगळ्यांचा उल्लेख केल्याशिवाय हे "वारी पुराण" अपुरे ठरेल नाही का ? सहयोगाबद्दल‌आणि सहभागाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार ! 


बिंदुमाधव भुरे.