Tuesday, July 4, 2017

आठवणी

आठवणी ... निमित्त पावसाच !

वळवाचा पाऊस संपून आषाढात पडणाऱ्या मान्सूनची सुरु झालेली रिमझिम ! आसमंतात गर्दी करुन असलेले काळे ढग जणू वसुंधरेला प्रश्न करतायत "शांत झालीस कां ?" 

रविवारचा दिवस, कसलीही घाई नाही. हाफ कव्हर्ड टेरेसवर बसून गरमागरम अफ्रेशचे घोट घेत वर्तमानपत्र चाळत निवांत बसायच किंवा लांबवर असलेल्या नारळीच्या झाडाच्या फांद्यांमघून डोकावणारा आणि रिमझिम सरींमुळे धूसर दिसणारा  सिंहगडावरचा दूरदर्शनचा मनोरा पहायचा. रिटायरमेंट नंतर असे क्षण निवांतपणे एन्जाॅय करायचे हे स्वप्न ! आज ते प्रत्यक्षात अनुभवत असतांना एक वेगळात आनंद होत होता.

 

काय गंमत आहे पहा अशा वेळी  रिलॅक्स मूडमधे असतांना आपल मन अनेक विचार, ताणतणाव यापासून आपल्या नकळत निसर्गाशी एकरुप होण्याच्या प्रयत्न करत असते आणि म्हणून कि काय, मनात अन्य कसलेच विचार येत नाहीत. ग्रीष्मातली तप्तता, वातावरणातील धूरळा प्रदूषण सारे कसे हा पहिला पाऊस एका क्षणात दूर करुन वातावरणात टवटवीतपणा, प्रसन्नता घेऊन येतो. निसर्गाच हे रुप पहातांना मग मनाने तरी का बर आपली चंचलता, अवखळपणा सोडून शांत, स्थिर होऊ नये ?

 

एव्हाना पाऊस थांबला होता. टेरेसवरुन दिसणाऱ्या घरामागच्या पत्र्याच्या बैठ्या घरातून लहान मुलांचा गलका ऐकू येऊ लागला म्हणून खुर्चीतून टेरेसच्या कठड्यालगत येऊन पाहू लागलो. लहानपणीच्या आवडत्या खेळात मुले दंग होती. आजूबाजूला साठलेल्या पाण्यात त्यांचे कागदी होड्या बनवून सोडणे चालू होत. हे दृश्य पाहता क्षणी जगजितसिंग चित्रासिंग यांची मला आवडणारी एक गजल मनाच्या गाभाऱ्यात नकळत डोकावून गेली. 

 

"ये दौलत भी ले लो

ये शोहरत भी ले लो

भले छीन लो मुझसे मेरी जवानी

मगर मुझको लौटा दो

बचपन का सावन

वो कागज की कश्ती

वो बारीश का पानी"

 

गजल गातांना जगजित-चित्रा या दोघांच्याही स्वरातली आर्त व्याकूळता आपल्याला भूतकाळात नेते व बालपणातल्या रम्य आठवणीत मन तरंगू लागते. आपणही कधी ना कधी हा आनंद मनसोक्तपणे उपभोगलेला असतो. पण आज कितीही किंमत मोजली तरी ते दिवस परत नाही आणू शकत. नेमका हाच भाव जगजीत-चित्रा यांच्या मखमली स्वरातून थेट आपल्या ह्रदयाला भिडतो व नकळत पापण्या ओलावतात. का बरे या "आठवणी" याव्यात ?

 

"आठवणी",....विश्वनिर्मात्याने निर्माण केलेली सगळ्यात अद्भुत गोष्ट !

आपल्याच लहानपणीचे ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो पाहताना किवा मुलांना त्या आठवणी सांगतांना किती नोस्टॅल्जिक व्हायला होते ते वर्णन करून नाही सांगता येणार !  शाळेतला एखादा गॅदरिंग चा फोटो ! फोटोत फक्त त्यावेळीचा तो क्षण दिसत असतो पण फोटो पाहतांना मात्र मनात त्यावेळेच संपूर्ण गॅदरिंग जसेच्या तसे उभे राहते ना ? त्या वेळेचे मित्र, वर्ग शिक्षक, त्या वेळी केलेली धमाल किवा खाल्लेला मार ... काहीही !

आई वडील असोत व आजी आजोबा ! जर आज “फोटोत” असतील तर मन शांत करून त्यांच्या फोटोपुढे एकटक फक्त एक मिनिट बघत रहाव. जे काही या एक मिनिटात मनामध्ये येईल ते व्यक्त करता येईल का ?

हे सगळे असे प्रसंग मनात साठवायला आजच्या काॅम्पुटरच्या भाषेत  "किती जीबी" जागा लागेल ? नाही सांगता यायच ! पण अशा आठवणी जाग्या व्हायला "एक फोटो" म्हणा किवा "पाण्यात होडी" सोडायचा एक प्रसंगही पुरेसा ठरतो.

 

अशाच पावसात जर अचानक किशोरकुमारचे “रिमझिम गिरे सावन”चे ओले चिंब करून टाकणारे स्वर कानावर पडले तर मनात उठणारे तरंग आणी उत्कट भावना आठवणींच्या वेगळ्या विश्वात घेऊन जातात तर “याद पियाकी आये” चे सूर मग ते बडे गुलाम अलींचे असोत वा बेगम अख्तर अगर कौशिकी चक्रवर्ती चे ! मन घायाळ करणाऱ्या आठवणी या सुरांमुळे मनाच्या दडलेल्या कोपऱ्यातून उसळी मारून बाहेर येतात अन जुन्या आठवणींच्या जखमेवरची खपली अलगद निघून येते !

 

त्या न वाहणाऱ्या पाण्यात त्या मुलाच्या १०-१२ होड्या बनवून सोडणे झाले होते. बाजूच्या कचऱ्यात पडलेल्या ओल्या खराट्याच्या एका काडीने मुलांचा त्या होड्या चालविण्याचा प्रयत्न चालू होता तर काही जण त्याच्याच शेजारच्या बाजूला साठलेल्या पाण्याच्या डबक्यात उड्या मारून पाणी एकमेकावर उडवत धमाल एन्जाॅय करत होते.

तेव्हड्यात टेरेसच दार उघडल अन गरम वाफाळलेल्या कांदापोह्याचा खमंग वास दरवळला. हातात पोह्याचा ट्रे घेऊन सौ उभी होती अन मी आठवणीच्या फ्लॅशबॅकमधून मी बाहेर पडलो.

बिंदुमाधव भुरे

 

No comments:

Post a Comment