Saturday, December 7, 2024

क्या से क्या हो गया

क्या से क्या हो गया... 


मौजेवाडी किंवा तत्सम एक गाव, गावाचा पाटील आणि आपल्या सौंदर्याने, नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करणारी तमासगीर !! याभोवती फिरणारे टिपिकल कथानक... जोडीला कधी एखाद गूढ उलगडणारी कथा तर कधी एखादी सूडकथा.. मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या जमानातल्या या टिपीकल तमाशापटांनी कात टाकली आणि या चौकटी पलिकडे जात व्ही. शांताराम यांचा पिंजरा चित्रपट अवतरला.  


गावाच्या साक्षरतेचा ध्यास घेतलेले गुरुजी...  तत्वनिष्ठ जीवन जगणारा, सामान्य जनांच्या अडचणीत कायम धावून जाणारा, समाजहितासाठी तळमळणारा हा गुरुजी !  आपल्या साक्षरता वर्गातील रोडावलेल्या उपस्थितीमागे गावात आलेला तमाशा आहे हे कारण कळताच चिडतो आणि रागारागाने तमाशाचा तंबू उद्ध्वस्त करतो. संतापलेली तमासगीर सूड उगवण्याची निश्चय करते. "याच तमाशाच्या स्टेजवर एक दिवस या गुरुजीला नाही तुणतुणे धरुन उभा केला तर ... वगैरे !!!"  तिची वाटचाल या निर्धाराने सुरू होते. अखेर गुरुजी तमासगीर बाईच्या "मोहाच्या पिंजऱ्यात" अडकतात आणि त्यांच्या आयुष्याची धूळधाण उडते. "शिकारी खुद यहा शिकार हो गया" यासारखी काहीशी गत होत या सूडनाट्याच्या कथानकात शेवटी तमासगीर बाईपण उध्वस्त होते... 

 
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर "शिवसेना ऊबाठा" आणि "राकाॅ शरद पवार" या दोन्ही पक्षांची अक्षरशः वाताहत झाली आणि मला‌ पिंजरा चित्रपटातील गुरुजी आणि तमासगीर आठवले. आज राजकारणाच्या या तमाशापटात "शिवसेना ऊबाठा"चा गुरुजी झालाय आणि त्याची ही अवस्था करणार दुसर तिसर कोणी नसून ते आहेत "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार" !  (याठिकाणी उदाहरण देताना गुरुजी आणि तमासगीर ही प्रतिके पक्षांसाठी वापरली आहेत व्यक्तींसाठी नाही.)


या दोन्ही पक्षांच्या इतिहासात थोडे डोकावून पाहूया.. 


वीस‌ टक्के राजकारण आणि ऐशी टक्के समाजकारण हे तत्व घेऊन मराठी माणसांच्या हक्कासाठी ठामपणे उभी राहिलेली संघटना म्हणजे "शिवसेना" आणि हीच या पक्षाची मूळ पण आता हरवलेली ओळख ! बाबरी पतनानंतर बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट पदवी बहाल झाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत शिवसेना म्हणजे एक कट्टर, प्रखर, जहाल हिंदुत्ववादी पक्ष असे चित्र उभे करण्यात बाळासाहेबांना यश आले. मराठी माणसाच हित, हिंदुत्वाची जपणूक या तत्वाने "शिवसेना" काम करत होती. वाॅर्ड रचनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा, हिंदू हिताचे रक्षण करणारा शिवसैनिक हे आश्वासक चित्र तेव्हा होते. गुरुजींची गावकऱ्यांप्रती असणारी तत्वनिष्ठता अशीच काहीशी होती ना ? 


दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी काॅंग्रेस पासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वतंत्र मांडणी केली. पहिल्या प्रयत्नात खूप चांगले यश मिळाले. "सत्ताकेंद्राचा कायम सहवास" हे एकमेव तत्व असल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजवरच्या संपूर्ण वाटचालीत सतत बदलत्या आणि परस्पर विरोधी भूमिका घेत सत्तेभोवती कायम रहायचा प्रयत्न केला. (कधी मौजेवाडी तर कधी आणखी कुठ ! बरकत ओसरायच्या आत तमासगीर बाई नव गाव गाठणार !! कोणा एकाशी इमानदारी दाखवत बसल तर खाणार काय ?) 


शरद पवारांच्या पक्षाचे आव्हान शिवसेनेपुढे असल्याचे बाळासाहेबांनी वेळीच ओळखले होते. तर शिवसेना कमकुवत झाल्याशिवाय आपण महाराष्ट्रातील एकमेव प्रादेशिक पक्ष म्हणून उभे राहू शकणार नाही याची पवारांना जाणीव‌ होती. मात्र बाळासाहेबांच्या आक्रमकतेपुढे त्यांची मात्रा चालायची नाही. 


आपल्या हयातीत बाळासाहेबांनी ठाकरी भाषेत दोन्ही काॅंग्रेस पक्षांची विशेषतः पवारांची यथेच्छ धुलाई केली होती (मात्र मैत्री आणि राजकारण याची सरमिसळ कधी होऊ दिली नाही..) राजकारणात संधी मिळत असते मात्र योग्य वेळ येण्याची वाट पहाण्याचा संयम बाळगता यायला हवा आणि वेळीच राजकीय कुरघोडी करण्याची हातोटी अंगी हवी. शरद पवारांकडे हे दोन्ही गुण उपजतच होते. 


२०१२ ला बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी म्हणजे २००४-०५ च्या दरम्यान शिवसेनेची सुत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. २०१४ च्या राजकीय घडामोडीत भाजप सेना युती तुटली आणि मग सगळेच पक्ष विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढले. शिवसेनेला ६४ जागा मिळाल्या. अर्थात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जेमतेम दीड वर्षात झालेली ती निवडणूक असल्याने एक भावनात्मक मतदान शिवसेनेला झाले. "माझ्या उद्धवला, आदित्यला संभाळून घ्या" हे दसरा मेळाव्यातील शेवटचे शब्द मतदारांच्या स्मृती पटलावरुन तोपर्यंत धूसर झाले नव्हते. अन्यथा उद्धव ठाकरे नामक नेतृत्वाची झाकली मूठ खर तर तेव्हाच उघडी पडली असती..‌


२०१४ ला शरद पवारांनी पहिला डाव टाकला.  शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना अडकवायला पिंजरा तयार केला गेला. निकाल पूर्ण लागायच्या आत भाजपला बिनशर्त पाठिंबा देत त्यांनी शिवसेनेला धोबीपछाड दिला. शिवसेनेला भाजप पासून दूर करणे, ही युती तोडणे आणि शिवसेनेला कमकुवत करणे हे त्यांचे ध्येय होते. इतकी वर्षे संयम बाळगल्याचे फळ मिळण्याची शक्यता दिसताच शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी पवारांनी दवडली नाही. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवापुढे उद्धव ठाकरे म्हणजे बच्चा होते. 


चुरमुऱ्याच पोत पासून अनेक विशेषण वापरत बाळासाहेबांनी केलेला जाहीर अपमान, टीका शरद पवार लक्षात ठेऊन होतेच. त्यामुळे एक ना एक दिवस शिवसेनेला आपल्या दावणीला बांधण्याचा त्यांचा निर्धार होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुक निकालाच्या वेळी बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याचा पहिला डाव शरद पवार खेळले आणि शिवसेना निमूटपणे भाजप सोबत परत गेली मात्र मनात धुसफूस होतीच. 


आणि मग शिवसेनेची भाजप सोबत आलेल्या वितुष्टाची दरी अधिकाधिक रुंदावत राहील याची खबरदारी शरद पवार यांनी २०१४ नंतर सतत घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुक निकालानंतर शेवटची खेळी प्रत्यक्षात आली. मुख्यमंत्री पदाच्या जाळ्यात एव्हाना तत्वनिष्ठतेचा ऱ्हास झालेल्या शिवसेना पक्षाचा, उद्धवाचा "गुरुजी" करुन या पवारांनी त्याला "सत्तारुपी मोहाच्या पिंजऱ्यात" अडकवले. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री या संवैधानिक पदावर बसवत त्यांची पक्ष संघटना खिळखिळी करण्याची रणनीती कार्यरत झाली. शिवसेना पक्षात अस्वस्थता वाढत होती पण मुख्यमंत्री पदाच्या पिंजऱ्यातील पोपट मात्र सांगेल तशी पोपटपंची निमुटपणे करत होता.‌ 


आठवतेय ना तुम्हाला ... "तुम्ही जरा बाहेर थांबा" अस समोर हात जोडून उभ्या राहिलेल्या उद्धव ठाकरेंना शरद पवार बजावतानांची ती व्हायरल झालेली क्लिप ?  मुख्यमंत्री पदाच तुणतुणे हातात देऊन पवारांनी या उद्धव गुरुजीला होत्याचा नव्हता केला. कट्टर हिंदुत्ववादी असलेला हा माणूस औरंगजेब नावाचं गुणगान करु लागला. धर्मवेड्या मुस्लिमांना हिरवे साप असे जाहीरपणे संबोधणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रॅलीत हिरवे मुस्लिम झेंडे फडकू लागले. तमाशाचा तंबू उखडून टाकणारे गुरुजी जसे एकदिवस त्याच तमाशाच्या स्टेजवर तुणतुणे धरुन उभे राहिले तसे कट्टर हिंदुत्ववादी उद्धव ठाकरेंना हिंदू शब्दाची ॲलर्जी झाली अन् हा शब्दच भाषणात वापरणे त्यांनी बंद केले. बाळासाहेबांच्या हिंदुहृदयसम्राट या बिरुदावलीचे विस्मरण झाले म्हणून कि काय मुस्लिमांचे लांगुलचालन सुरु केले. 


अर्थात यानंतर "शिवसेना" घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि काही काळानंतर "राष्ट्रवादी" घेऊन अजितदादा पवार ! नंतरचा सगळा इतिहास ताजा आहे. लोकसभा निवडणूक निकालाने निर्माण केलेल्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाने "शिवसेना उबाठा" आणि "राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार" या दोन्ही पक्षांना पूर्ण उध्वस्त करुन टाकले. पिंजरा  चित्रपटातील गुरुजी अन् त्याला हवं तसं नाचवणारी तमासगीर हे पण शेवटी असेच उध्वस्त होतात.  


शरद पवार कळायला शंभर जन्म जावे लागतील म्हणणाऱ्यांना ते याच जन्मी विधानसभा निवडणुक निकालानंतर कळाले असतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा निवडणूक निकालानंतर एकमेकांशी अद्याप संवाद घडलाच नाही म्हणे... कदाचित दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल काहीसे असे भाव असतील का ? 

तेरे मेरे दिल के बीच अब तो
सदियों के फ़ासले हैं
यक़ीन होगा किसे कि हम तुम
इक राह संग चले हैं
होना है और क्या
बेवफ़ा तेरे प्यार में
क्या से क्या हो गया
बेवफा तेरे प्यार में
(चित्रपट.. गाईड)

आणि ....
तमाशाची सुपारी घेणे, निरोप पोहोचवणे, बोलणी करणे असली कामे नाच्या करत असतो. याही राजकीय फडात दोन्ही पक्षांशी बोलणी करणारा आणि सत्तेसाठी तुणतुणे वाजवीत हो ला हो करणारा एक नाच्या होता. सत्ता समीकरण जुळवतांना अखेर गुरुजी आणि बाई या दोघांचंही वाटोळ करणारा हा नाच्या कोण हे स्पष्ट करायची गरज आहे ?? 

©श्री. बिंदुमाधव भुरे, पुणे.

Friday, November 15, 2024

प्रतिडाव भाग २

 मित्रांनो,

येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकताच प्रसिद्ध झालेला माझा ब्लॉग  "प्रतिडाव  भाग १" आपण वाचलात. मला असंख्य प्रतिक्रिया आल्या. लेख आवडल्याचे नमूद करतांना बहुतेकांचा सूर .. "आमच्या मनातील भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या असाच होता." "महाराष्ट्राचे राजकारण हे खूपच खालच्या स्तरावर गेले आहे, सगळे जण एका माळेचे मणी आहेत"  तर अनेकजण अजितदादांना महायुतीत घेणे ही मोठी चूक होती असे अजूनही मानतात. पण फडणवीस म्हणतात तसे ती  "स्ट्रॅटेजिक अलायन्स" आहे हे अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही. असो !

मित्रांनो, राजकारणाचा स्तर खालावणे ही एक प्रक्रिया आहे. एका रात्रीत ते घडत नाही. दोन निवडणुकांमध्ये पाच वर्षांचा कालावधी असल्यामुळे या पाच वर्षांचा वापर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांना  शह काटशह देण्यात खर्च करतात. या प्रक्रियेत राजकारणाचा स्तर खालावत जातो आणि समाजकारण दुर्लक्षित होते. निवडणुकांची चाहूल लागते तसे मग सत्ताधारी जागे होतात. लोकप्रिय निर्णय घेण्याची घाई केली जाते आणि विरोधी पक्ष त्याच मुद्द्यांचे राजकारण करत स्वतःचा अजेंडा मांडत कुरघोडीचे राजकारण खेळतात. गेल्या पाच वर्षात याचा आपण चांगलाच अनुभव घेतला. खर म्हणजे येणाऱ्या पाच वर्षांत जनतेचा पैसा कोणी ओरबाडायचा  याचसाठी निवडणूका आहेत का ? असा प्रश्न काही वेळा उद्विग्न मनात डोकावत रहातो.‌

प्रतिडाव भाग १ या लेखात सत्तेच्या खुर्चीसाठी, स्वार्थासाठी केलेल्या विश्वासघाताचे आणि दगाबाजीचे राजकारण आणि त्याला दिले गेलेले प्रत्युत्तर यावर होता. तो भाग लिहित असतांनाच प्रतिडाव भाग २ चा विषय मनात आकाराला येत होता. त्या विषयाचा बाज वेगळा असल्याने तसेच त्यावर विस्ताराने भुमिका मांडता यावी म्हणून मुद्दाम हा वेगळा ब्लॉग लिहितोय.  

👇👇

२०२४ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात इंडी आघाडीच्या मंडळींनी "संविधान बचाव"चे एक नॅरेटिव्ह उघडपणे तर त्याच्या जोडीला मुस्लिम धर्माचे कार्डचा छुपा वापर केला. मुस्लिम धर्माचे कार्ड आजवर काॅंग्रेस पक्ष वापरत आला होता. गेल्या काही निवडणुकीत  विकासाच्या राजनीतीपुढे ते कार्ड निष्प्रभ झाले होते.  मात्र या निवडणुकीत हे कार्ड काॅंग्रेस पक्षाने नव्हे तर मुस्लिम समाजाने एकजूट दाखवत वापरले. अन्यथा संविधान बचाव आणि मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान यांचा आपसात काही संबंध नाही. पण मग तरीही मोदींचा "सबका साथ सबका विकास" हा मंत्र सोडून मुस्लिम मतदार भाजपच्या विरोधात एकवटला. 


वास्तविक काॅंग्रेस राजवटीच्या तुलनेत भाजपच्या राजवटीत हा वर्ग अनेक सोयी सुविधांचा, विविध योजनांचा लाभार्थी ठरला होता. मात्र तरीही अनेक मतदारसंघात मुस्लिमांनी एकगठ्ठा भाजप विरोधात मतदान केल. धुळे लोकसभा मतदार संघातील मालेगाव विधानसभा भागात झालेल्या मतदानाची आकडेवारी चित्र स्पष्ट करते.  लखनौ, वाराणसी, अयोध्या यासारख्या सुमारे ६० ते ७० मतदारसंघात असे एकगठ्ठा मतदान घडवून आणले गेले.  मुस्लिम समाजाने मग तो लाभार्थी असो नसो केवळ "भाजपला विरोध" या एकाच ध्येयाने एकगठ्ठा मतदान केले. म्हणूनच राजकीय परिभाषेत याला "व्होट जिहाद" अशी संज्ञा दिली गेली.

धार्मिक भेदभाव न करता "सबका साथ सबका विश्वास" हा मंत्र जागवत जनतेच्या जगण्याचा आणि जीवनाचा स्तर उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी गेली दहा वर्षे करत आहेत. मात्र आर्थिक अति मागासलेपण, अठरा विश्वे दारिद्रय असूनही दैनंदिन जीवनात धर्माला सर्वोच्च स्थान देणारा हा समाज "जन्नत" म्हणजे मरणोत्तर सुखाच्या कल्पनेने संपूर्ण आयुष्य हलाखीत (दोजखमध्ये) घालवतो. मुल्ला, मौलवी या धर्मगुरूंनी धर्मासाठी केलेल्या कोणत्याही आवाहनाला कोणतीही शहानिशा न करता प्रतिसाद देतो, जणू तो "त्या सर्वशक्तिमान"चा आदेश असावा. त्यामुळे दुःख, यातना सुसह्य करणारे जीवन देण्यासाठी झटणाऱ्या मोदींपेक्षा धार्मिक कार्ड खेळत समाजाचा व्होट बँक म्हणून वापर करणाऱ्या काॅंग्रेसकडे हा मुस्लिम समाज सहजपणे ओढला जातो हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले. "विकास कि धर्म ?" या प्रश्नावर त्या समाजाकडे कोणताही वैचारिक गोंधळ नाही. 

बेरोजगारी, गरीबी, महागाई वगैरे मुद्दे तर मुस्लिम समाजाला हिंदूंपेक्षाही अधिक तीव्रतेने जाणवणारे होते पण तरीही तो समाज सगळ्या योजनांचे लाभ कोणताही धार्मिक भेदभाव न करता मिळत असूनही धर्माच्या नावाखाली मतदान करताना एकजूट झाला. तीन तलाकवर बंदीची जखम अद्याप भरून निघालेली नसतांना श्रीराम जन्मभूमीचा निर्णय झाला, प्रत्यक्ष भव्य राममंदिर आकाराला आले, कलम ३७० गेल, आता वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक येतय. या सगळ्याना चोख उत्तर म्हणून मुस्लिम समाजाने केलेल्या एकगठ्ठा मतदानाकडे पहावे लागेल.‌ कारण तशा प्रकारची जागृती, छुपा प्रचार त्यांच्याकडे केला गेलाय आणि तो सातत्याने सुरु असतो. हिंदू मात्र बेरोजगारी, महागाई, गरीबी, आरक्षण यांसारख्या मुद्द्यावर हिंदू विविध पक्षात विभागला गेलाय.‌ हे चित्र अधिक भयावह आहे, भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना करायला पुरेस आहे. 

बाबरीचे पतन आणि त्यानंतर उसळलेल्या  धार्मिक दंगली  यांचा इतिहास फार जुना नाही. एक "हिंदुहृदयसम्राट" म्हणून बाळासाहेबांचा दरारा त्यानंतर विलक्षण वाढला. किंबहुना भाजपपेक्षाही अधिक कट्टर आणि कडवट हिंदुत्व आचरणात आणणारे म्हणून हिंदू समाज त्यांना आणि शिवसेनेला ओळखू लागला. पाकिस्तान मध्येही त्यांचा नावाची सुप्त दहशत होती. मात्र केवळ मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे हे कडवे हिंदुत्व काॅंग्रेसच्या दावणीला बांधले. धर्मांध मुस्लिमांना विरोध करणारा एक कडवट हिंदूंचा पक्ष म्हणून शिवसेनेची असलेली खरी  ओळख उद्धव ठाकरेंनी संपवली. आता हिंदुत्वाचा कैवार असणारा उरला केवळ भाजप. त्याच्या विरोधात धर्म म्हणून एकवटले कि काम फत्ते. याच विचारातून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा समाज अधिक आक्रमकतेने, अधिक एकजूटीने मग इंडी आघाडीच्या मागे उभे  राहिला.‌ आज मुस्लिम समाजाचे ठेकेदार उघडपणे मविआलाच मतदान करा असा फतवा जारी करत आहेत. त्यासाठी २५०+ मतदार संघाची यादीही त्यांनी जाहीर केली आहे. या समाजाच्या दोन अडीचशे संघटना मुस्लिम मतदार यादीसाठी काम करत होत्या आणि आजही कार्यरत आहेत. 

सलग दोन लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर काॅंग्रेसने "अभी नही तो कभी नहीं" या भावनेने २०२४ च्या निवडणुकीची तयारी केली होती. हिंदू मतविभाजनाची व्यूहरचना आखताना हिंदूंना जाती जनगणनेच्या सापळ्यात गुंगवून ठेवत समस्त हिंदूंना जातीपातीत विभागण्याचा डाव रचला. संविधान बचाव नारा बुलंद झाला. मागासवर्गीय, ओबीसी वर्ग बिथरला. या कपट, कूटनीतीमुळे काही प्रमाणात हा मतदार वर्ग भाजप पासून दूर गेला. आरक्षण,अडानी-अंबानी, बेरोजगारी, महागाई वगैरे मुद्दे शहरी निमशहरी हिंदू मतांची विभागणीसाठी वापरले गेले. याचा वापर आजही होतोय अन मतदारही त्या सापळ्यात अडकतोय. 

मात्र मुस्लिम मतदारांकडे वैचारिक संभ्रम नाही, ते एकजूट आहेत. त्यांना हिंदुत्ववादी भाजप नको आहे. त्यासाठी ते कोणाच्याही मागे उभे रहायला तयार आहेत. अगदी मनोज जरांगे पाटील यांच्याशीही त्यांची बोलणी झाली. वृत्तपत्रे, वाहिन्यांवर त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. या भेटीनंतर जरांगेनी "एकाच समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकता येत नाही असे सांगत" निवडणूक रिंगणातून माघार घेतली. आणि यानंतरच २५०+ मतदारसंघात मविआ उमेदवारांना पाठिंबा देणारे पत्रक मुस्लिम संघटनेने जारी केलय. हा योगायोग नाही तर ही "सोची समझी साझिश"आहे. जरांगेंनाही भाजपला पाडायचे आहे आणि मुस्लिमांनाही भाजप नकोय. एकाच कारण आरक्षण तर एकाच हिंदुत्वाला विरोध !

दर पाच वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीत येणारे मुद्दे सगळे तेच आहेत. इंदिरा गांधी यांनी "गरीबी हटाव" दिला त्याला चार दशके उलटली. राजीव गांधी हे पंण "हमे गरीबीसे लडना है" म्हणायचे. हा चुनावी जुमलाच होता ना ? कारण गरीबी आणि गरीब आहे तिथे आणि आहे तसेच आहेत. आज त्या "गरीबी हटाव" घोषणेच रिपॅकिंग झालय आणि त्याला लेबल लागलय "जाती जनगणना" या नावाचे ! 

यात आता हातात संविधान प्रत नाचवत जातवार वर्ग युद्धाची ठिणगी पाडायचा काॅंग्रेसचा डाव आहे. ध्येय एकच हिंदू मतांचे विभाजन ! हा देश एक शक्ती म्हणून उदयाला येऊ नये असे वाटणाऱ्या जगात अनेक ताकदी आहेत आणि त्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काॅंग्रेस पक्ष सोयीचा वाटतोय. काॅंग्रेस गेली दोन टर्म सत्तेबाहेर असल्यामुळे जागतिक पटलावर कार्यरत असणाऱ्या या शक्तींच्या खेळीतील एक प्यादे म्हणून सहज वापरला जाणारा पक्ष झालाय. प्रत्येक निवडणुक ही "अभी नही तो कभी नहीं" या त्वेषाने लढण्याचा प्रयत्न करणाऱ्या काॅंग्रेसला एकिकडे हिंदू मतांचे विभाजन करतांना धार्मिक ध्रुवीकरण घडवत मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान करवून घेण्यात लोकसभेत यश आले. 

"हिंदू विरोधात एकजूट होणारे मुस्लिम मतदार" ही खेळी आत्मघातकी आहे हे काॅंग्रेससह अनेक पक्षांना कळत असूनही वळत नाही. "एकपुस्तकी आदेश" प्राणा पलीकडे प्रिय  असणाऱ्या कडव्या धर्मांध मंडळींच्या मनात  "काफिर" कोण याबाबद स्पष्टता आहे. त्यामुळे भाजप आणि मोदी द्वेषाने आंधळ्या झालेल्या काॅंग्रेसला आणि हिंदुत्वाला विरोध म्हणून एकजूट होणाऱ्या मुस्लिम समाजाला दाखवून देण्यासाठी एक हिंदू म्हणून आपल्याला या चालीवर मात करणारी चाल रचावीच लागेल. या विधानसभा निवडणुकीत प्रचारात असंख्य मुद्दे असतील. पण माझ्या दृष्टीने आता फक्त एकच लक्ष्य. लोकसभेत झालेल्या मुस्लिम एकगठ्ठा मतदानाला सडेतोड उत्तर देणे. मित्रांनो, जशास तसे न्यायाने हिंदू पण वागू शकतो हा इशारा देण्यासाठी ही विधानसभा निवडणुक आहे. त्याला उत्तर देताना सगळे मुद्दे नंबर दोनवर ठेवायला लागतील आणि हिंदू म्हणून एकजूट दाखवत मतदान करतांना नव्हे प्रत्युत्तरादाखल हे करावेच लागेल.  

उद्योग पळवले, मराठी माणूस, शेतमालाला भाव, अडानीच्या घशात धारावी, बेरोजगारी, आरक्षण, वगैरे या प्रचार दरम्यान येणाऱ्या मुद्द्यांवर विचार करणाऱ्या हिंदू समाजाने आता मत विभाजनाच्या सापळ्यात अडकणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे. या विधानसभेत मी मतदान करणार ते केवळ एकच मुद्द्याला चोख उत्तर द्यायला... जर निवडणुकीत रास्त प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ धर्म म्हणून तुम्ही मुस्लिम एकगठ्ठा मतदान तिकडे करणार असाल तर मी हिंदू म्हणून हिंदुत्वासाठी, हिंदू राष्ट्रवादासाठी भाजपला मत देईनच पण ते मतदान एकगठ्ठा व्हावे यासाठी प्रयत्न करेन. इतिहासात घोरीशी लढताना पृथ्वीराज चौहान एकटा पडला होता. त्याच्या मदतीला अन्य हिंदू राजे धावून आले नाहीत. पण आज मात्र एकजूट होईल.‌ लक्षात ठेवा एखाद्या जातीय दंग्यात एखादा खान, कुरेशी, मोमीन मरतो तेव्हा तो फक्त मुस्लिम असतो तर जेव्हा एखादा हिंदू मरतो तेव्हा त्याला जातीचे लेबल लागते. 

तुम्ही डाव टाकला होता त्याला प्रतिडाव टाकून या विधानसभेत चोख प्रत्युत्तर द्यायचे आहे. जर हिंदू एकजूटीने रणांगणात उतरला तर काय होते हे दाखवून द्यायची हीच नामी संधी आहे. आपले प्रश्न तर आहेतच आणि ते अनेक निवडणुकीत होते अन राहतील पण आधी अस्तित्व महत्वाचे ! धर्म म्हणून ते एकजूट दाखवत आव्हान देत असतील तर त्याला प्रतिडाव रचून मुकाबला हा करावाच लागेल. मित्रांनो, येत्या २० तारखेला मतदानाला जातांना लक्षात ठेवा.  

© बिंदुमाधव भुरे

Monday, November 11, 2024

प्रतिडाव भाग १.

   

मित्रांनो, एक कट्टर भाजप समर्थक म्हणून हा लेख लिहितो आहे. वाचायचा नसेल तर स्किप किंवा डिलिट करायला सोपे म्हणून आधीच स्पष्ट करतो आहे.‌ भाजप समर्थकांनी वाचलाच पाहिजे आणि विरोधकांनी ?? 


प्रतिडाव भाग १. 


२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून झालेल्या दगाफटक्याचा, फसवणूकीचा, विश्वासघाताचा माझ्यासारख्या असंख्य भाजप समर्थकांना मनस्वी राग आला होता, चीड आली होती. वास्तविक भाजप सेना युतीला‌ स्पष्ट बहुमत आणि सरकार स्थापनेचा जनादेश प्राप्त झाला‌ होता. परंतु, "सरकार स्थापन करण्यासाठी आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत" असा अचानक पवित्रा शिवसेनेकडून घेतला गेला. या भूमिकेला पूरक ठरतील असे मग उद्धव ठाकरेंनी जे काहीबाही आरोप केले ते सगळे पश्चात बुद्धी... मुळात सरकार स्थापन करायचे यासाठी हा माणूस देवेंद्र फडणवीसांचा एकही फोन घ्यायला तयार नव्हता. एकही फोन न घेता, कोणतीही चर्चा न करता भाजपने फसवणूक केली असा आरोप कसा काय होऊ शकतो ?  


सतत मर्द, सैनिक, मावळा, गाडून टाका वगैरे मर्दूमकीची भाषणे ठोकणाऱ्या या माणसाने "आपण जरी युतीत लढलो असलो तरी आता आपल जमणार नाही कारण .... वगैरे वगैरे" अस भाजपला, फडणवीसांना स्पष्टपणे तोंडावर का नाही सुनावले ? मन खात होत का ? कि या मर्दाच्या छातीवर दडपण आल होत ? कि तस काही आश्वासन अमितभाईंनी कधी दिलच नव्हत ? २०१४ ला भाजपाने नाही का बोलणी फिसकटल्यावर युती मोडल्याची घोषणा चक्क पत्रकार परिषद घेऊन केली. तसे धाडस उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला का नाही दाखवले ? 


अमित शहा यांनी शब्द दिला होता या दाव्याबद्दल आता थोडस... 


उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले कि "बंद दाराच्याआड आणि शिवसेना प्रमुखांच्या फोटो समोर अमित शहा यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी शब्द दिला‌ होता‌." अमित शहा यांचा रोखठोक स्वभाव तर उद्धव ठाकरे यांचा कावेबाज, बेरकी अन् आतल्या गाठीचा स्वभाव लक्षात घेता मला तर उलटे वाटतय. अडीच अडीच वर्षाचा प्रस्ताव अमित शहा यांनी साफ ठोकरून लावला असावा. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी मग प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे अतिशय धूर्तपणे शांत राहिले, जाणीवपूर्वक मूग गिळून गप्प बसले. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सतत होणारा उल्लेख यावर उद्धव ठाकरे यांनी कधीच आक्षेप न घेणे म्हणजे अडीच अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारणे त्यांना मान्य आहे असा अर्थ अमित शहा यांनी घेतला असेल तर त्यात चूक ती काय ? उद्धव ठाकरेंचा कावेबाजपणाचा इतिहास हा राज ठाकरे, नारायण राणे वगैरेंनी अनेकदा कथन केला आहे. त्यामुळे अमित शहा यांनी फसवणूक केली हे जे उद्धव ठाकरे सांगतात त्याच्या नेमके उलटे वरील प्रमाणे घडले नसेल कशावरून ? शेवटी बंद दरवाज्याआड झालेल्या  गोष्टी आहेत. आपण फक्त कयासच बांधू शकतो. मात्र उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी जो कपटी डाव खेळला त्याला प्रतिडाव टाकून उत्तर हे भाजप कडून मिळणारच होते. 


सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरे यांनी पवारांबरोबर गुपचूप चर्चेच गुऱ्हाळ सुरु ठेवल.. तर पवारांनी सोनियांबरोबर ...!  याच पवारांनी साळसूद पणाचा आव आणत एकिकडे पत्रकार परिषद घेत सांगितल होत कि "जनतेने आम्हाला (आघाडीला) विरोधात बसण्याचा जनादेश दिलाय...." मग पवार साहेब, तुम्ही उद्धव ठाकरेंना तस पहिल्या फटक्यात स्पष्ट का नाही बजावलत हो ? उलटपक्षी त्यांना सत्तेच गाजर दाखवत झुलवताना दिल्ली वाऱ्या करत काॅंग्रेसला या आघाडीसाठी राजी केलत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी रचलेला विश्वासघाताचा डाव यशस्वी होण्यासाठी पवार साहेब तुम्ही सर्वात मोठी आणि महत्वाची भूमिका बजावलीत नव्हे तर तुमचीच फूस यामागे होती आणि तुमच्यामुळे भाजप सेना युतीला मिळालेला स्पष्ट जनादेश पायदळी तुडवत जनतेचा कौल नसलेली आघाडी आकाराला आली, सत्तेवर बसली‌. 


त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा काकणभर जास्त दोष पवार साहेबांचा आहे. अन्यथा, म्हणजे पवारांनी उद्धव ठाकरे यांना "आम्हाला विरोधात बसायचा कौल मतदारांनी दिला आहे" अस ठणकावून सांगितल असत तर पुन्हा एकदा नाईलाजाने का होईना युती धर्माचे पालन उद्धव ठाकरे यांना करावेच लागले असते. त्यामुळे भाजपचा एक समर्थक म्हणून मला पवारांचाही तितकाच किंबहुना उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त राग आणि चीड आहे. 


खर तर पवार साहेब हे महाधूर्त आणि आतल्या गाठीचे ! २०१४ ला निकाल लागताच भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यातून दोन गोष्टी साध्य होणार होत्या. सेनेला भाजप पासून दूर करणे आणि सत्तेत बाहेरून पाठिंबा देत सरकार आपल्या तालावर हव तस नाचवतांना फडणवीसांना आपल्या कह्यात आणि कायम दडपणाखाली ठेवणे. पण देवेंद्र फडणवीस यांनी पवारांची ही सत्तालोलुप चाल‌ ओळखली. पवारांच्या या खेळीने आपण सत्तेच्या बाहेर फेकले जाऊ या भितीने मग नाईलाजाने का होईना सेना सुतासारखी सरळ आली. मात्र २०१४-१९ या काळात सेनेची सत्तेत राहूनही धुसफूस सुरू होती आणि पवारांनीही ती आग पेटती राहील याची काळजी घेत २०१९ ला सत्तेसाठी उतावीळ झालेल्या, कासावीस झालेल्या उद्धव ठाकरे यांना घोड्यावर बसवत स्वत:ची पोळी भाजून घेतली. पवारांच्या या कुटील डावपेचांना भाजपने प्रतिडाव टाकून उत्तर देण्याची गरज होतीच. 


त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेला दगा आणि पवारांनी केलेल कावेबाज राजकारण पाहता, या दोघांच्या पक्षाची झालेली वाताहत म्हणजे त्यांनी जनादेशाचा घोर अपमान केल्याची नियतीने दिलेली जबरदस्त शिक्षा होय असे मी मानतो. करावे तसे भरावे. या फुटी मागे भाजप आहे या समजुतीने माझ्यासारख्या भाजप समर्थक त्यामुळे मनोमन सुखावला होता. असल्या कुटील कारस्थान आणि डावपेचांना प्रत्युत्तर न द्याल तर राजकारणात तुम्ही मागे पडाल किंबहुना तुम्हाला षंढ ठरवले जाईल. त्यामुळे भाजपने जे घडविले ते अतिशय योग्यच होते असे माझे स्पष्ट मत आहे. 


मित्रांनो, अनेक  भाजप समर्थकांना प्रश्न पडले होते.  "अजितदादांना घेण तुम्हाला शोभल का ? एकीकडे मोदी सत्तर हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करतात आणि दोन दिवसांनी दादांचा शपथविधी होतो...ही कुठली साधन शुचिता ? ही तत्वांशी प्रतारणा नाही का ?"  वगैरे वगैरे पण असले भंपक प्रश्न कट्टर भाजप समर्थक असूनही मला अजिबात पडले नाहीत... ठकास महाठक या न्यायानेच आज राजकारणात वागावेच लागेल.. तत्व, साधन शुचिता वगैरे वगैरे प्रसंगी गुंडाळून ठेवावी लागतील. प्रतिस्पर्धी तलवार घेऊन चालून येत असेल तर अहिंसेच तत्व बाजूला ठेवत मुकाबला करावाच लागेल. तुमचे अस्तित्वच उरले नाही तर तुमची तत्वे काय फ्रेम करुन भिंतीवर टांगायची का ?


सभ्यतेच्या राजकारणाचे दिवस गेले. "अडवानी वाजपेयी युगात असली परिस्थिती निर्माण झाली असती तर ?? वगैरे.." असला बिनबुडाचा प्रतिवाद कोणी करत असेल तर मी सांगेन कि तो काळ वनवास भोगणाऱ्या श्रीरामाचा होता.. मर्यादा पुरुषोत्तमाचा होता.. मर्यादांच्या चौकटीचा सन्मान करण्याचा होता... वाजपेयी यांचे केवळ एका मताने सरकार पडले. ते सहजपणे टिकवता आले असते, तरले असते... मात्र वाजपेयीजी तत्व, निष्ठा याच्याशी प्रामाणिक राहिले. पण ते दिवस आता मागे पडलेत.. आज धर्म रक्षणार्थ कूटनीतीने वागणाऱ्या श्रीकृष्णाचे तत्व आचरणात आणण्याचे दिवस आहेत.... त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना धडा शिकवला गेला ... तो दिलको बडा सुकून मिला अशी माझ्यासारख्या भाजप समर्थकांची अवस्था आहे... भाजप पाठिराख्यांनी, मतदारांनी विशेषत: अजित पवार या विषयावर अजिबात गिल्टी फील होण्याची गरज नाही, नाराज होण्याची गरज नाही.‌ "एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आमचा इमोशनल अलायन्स आहे तर अजित पवार यांच्या बरोबरचा अलायन्स हा स्ट्रॅटेजिक अलायन्स" .. देवेंद्र फडणवीस यांच्या या एका वाक्यात बरच मोठ स्पष्टीकरण दडलय ते आपण समजून घेण्याची गरज आहे. 


आपल्या डीएनए मधे प्रभू श्रीराम कायमच आहेत.. अहंकारी शत्रूचा पराभव होणारच.. या अहंकाराला कपट द्वेष आणि कूटनीतीची जोड मिळते तेव्हा भगवद्गीतेची शिकवण आचरणात आणण्याची कलाही आमच्या डीएनए मधे आहे हे आम्ही कायम लक्षात ठेवले तर शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या फूटीत भाजपची कणभरही चूक नाही हे मनोमन पटेल.


मित्रांनो, आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर भाजप वाढला. कधीकाळी दोन खासदार असलेल्या पक्षाला हे यश प्रबळ संघटन असल्यामुळेच शक्य झाल. सत्ता मिळाल्यावर त्याचा उपयोग लोककल्याणासाठी न करता स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी केला तर पक्ष संघटनेची वाताहत होते. त्याचा परिणाम सत्ता क्षेत्र आक्रसण्यात होतो. मात्र तस झाल्यावर भाजप आम्हाला संपवतोय असा ओरडा केला जातो. भाजप कोणाला संपविण्यासाठी काम करत नाही तर वैभवशाली, सामर्थ्यशाली राष्ट्र बनविण्यासाठी काम करतो. या वाटचालीत जे येतील त्यांना सोबत घेऊन जायचे काम भाजप करतो. पण उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ही सोबत सोडतात आणि त्याचा परिणाम स्वतःच्या पक्षाची वाताहत होण्यात झाल्यास त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. केवळ सत्तेभोवती फिरणाऱ्या आणि खुर्चीचे राजकारण करणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरे भाजप पासून दूर होत आहेत हे लक्षात येताच त्यांना साथ दिली आणि स्वतःच्या पक्षाची शकले करुन घेतली. every action has an opposite & equal reaction  हा नियतीचा नियम आहे. तुम्ही डाव टाकाल तर प्रतिस्पर्धी प्रतिडाव टाकणारच.‌


त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पवार ठाकरे यांचा "भावनांना हात घालण्याच्या खेळाला" आणि काॅंग्रेसच्या 'संविधान अन् जाती जनगणना" खेळीला बळी न पडता खंबीरपणे महायुतीच्या मागे उभे रहायच आहे. स्व. इंदिरा गांधी यांच्या काळात "गरिबी हटाव" घोषणा लोकप्रिय झाली होती. त्या घोषणेला आज "संविधान बचाव" आणि "जाती-जनगणना" या नवीन वेष्टनात गुंडाळून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय. 


२०१९ ला निकालानंतर झालेल्या खेळीला  कपट, कट कारस्थान, घातपातांना भाजपने प्रतिडाव रचून चोख उत्तर दिले नसते तर मग दुर्योधन  शिरजोर झाला असता आणि शकूनी अधिकच कावेबाज..! पण यामुळे "महाराष्ट्राचे नुकसान नाही का झाले ?" असले प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर उघडा डोळे बघा नीट असे म्हणावे लागेल. वर्गात दंगा करणाऱ्या दोन मुलांची कानउघाडणी करतांना इतर मुलांचाही वेळ वाया जातोच. त्यांची भरपाई करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते....लढाईत नुकसान होतच असते, त्याची झळ जनतेला सोसावी लागते पण... ते नुकसान सत्याचा विजय झाला कि भरून निघत असते अन् त्यासाठी भाजप शीषनेतृत्व समर्थ आहे. 


मित्रांनो, विकासाच्या मार्गावर मविआ पेरत असलेले काटे दूर करुन या वाटा निष्कंटक करण्यात २०१९ ते २०२४ मधील काही काळ गेला. मात्र आता येत्या २० तारखेला महायुतीच्या मागे भक्कमपणे उभे रहात मविआला चोख प्रत्युत्तर द्यायचा निर्धार करुया.  


© बिंदुमाधव भुरे, पुणे


Wednesday, January 31, 2024

धनुष्य आणि तीन बाण

 गुलाल उधळला गेला, जेसीबीतून पुष्पवृष्टी झाली आणि जरांगेंचा विराट ताफा आंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिज्ञा पूर्ण झाली. मराठा समाजाची स्वप्नपूर्ती झाली. "आनंदी आनंद गडे असा माहोल चोहीकडे" असे दृष्य याची देही याची डोळा उभ्या महाराष्ट्राला घरबसल्या छोट्या पडद्यावर दिसले. 

हे पहाताना मला बाहुबली २ मधला एक सीन आठवला.‌ राजवाड्यावर हल्ला झालाय आणि राजकुमारी निकराने लढतीये. अचानक मणिबंधम् बहिर्मुखम् अस काहीस बडबडत आपला हिरो अवतरतो.‌ एकाच वेळी धनुष्यातून तीन तीन बाण सोडत शत्रूचा नायनाट करतो. आमचा हिरो खरा तर एका राज्याचा राजकुमार पण आपली ओळख लपवून तो विजय मिळवून देतो... धनुष्य कोणाच ? तीन बाण कोणाला लागले ? विजयी कोण झाल ?

२०१४ ला फडणवीस मुख्यमंत्री झाले. एक ब्राह्मण मुख्यमंत्री ??? अनेकांचा पोटदुखी विकार उफाळून आला. पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात वगैरे डायलॉग ओठांवर आले. मराठा आरक्षण आणि सुरू झाले लाखांचे मोर्चे.... हा योगायोग की फडणवीसांच्या विरोधातली खेळी ? मात्र काहीही असो.. ही सगळी आंदोलन यशस्वीपणे हाताळली, शांतता टिकवून ठेवली. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल शिवाय अनेक सोयी सवलतीही बहाल केल्या. खर तर सरकारी नोकऱ्यांचा दुष्काळ असताना या सवलतीच अधिक आवश्यक होत्या. वरकरणी अनेकांनी नाके मुरडली तरी फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय दिला हे कटू सत्य होते. परिणाम .. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ १०५ झाल... पोटदुखीचे रुग्ण आणखी वाढले. 

स्वबळावरील सत्तेची स्वप्नपूर्ती म्हणजे १४५+ जागा..  सुरुवातीला युती, आघाडी या कुबड्यांचा वापर केला जातो. ज्यापक्षाकडे कार्यकर्त्यांची फळी, राजकीय दूरदृष्टी आणि संयम असतो ते नंतर कुरघोडी करतात. ज्यांच्याकडे कर्तृत्वाचा अभाव असतो मात्र महत्वाकांक्षा प्रबळ असते ते कुबड्या बनतात.  

मराठा, ओबीसी समाजात नेते अनेक, सत्तास्थाने अनेक ! सारा समाज आपल्या विशिष्ट नेत्यांमागे आणि पक्षांमध्ये विभागलेला ! ही मते आपल्यामागे एकवटणे आवश्यक आहे हे भाजपाने ओळखले होते.  मराठा आरक्षण मुद्द्याने चांगला‌ हात दिला‌ होता. पुढील पाच वर्षांच्या कारकिर्दीत या मुद्याच्या आधारे आणखीन चांगले काम करायचा मनसुबा होता.‌ पण २०१९ ला सेनेकडून दगाफटका झाला.  विरोधात बसाव लागल तरी १४५+ म्हणजे संपूर्ण बहुमत हे ध्येय भाजपाचे कायम राहिल.

श्री उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षेला नव्याने मित्र बनलेल्या जुन्या शत्रूकडूनच खतपाणी घातल गेल. मविआ सरकार आल मात्र याकाळात कोणतेही आंदोलन अगर मोर्चे यांचा दबाव नसतांना मविआला हे आरक्षण टिकवता आल नाही. फडणवीसांना श्रेय जाईल ही धास्ती होतीच.  मविआत हे श्रेय कोणी उपटायच या वादात .. ना तुला ना मला .... झाल आणि आरक्षण रद्द झाल. 

सेनेने खुपसलेला खंजीर आणि राष्ट्रवादीच्या साहेबांनी त्यासाठी पुरवलेली रसद ! त्यामुळे दोन बाण कोणावर सोडायचे हे ठरलेल... ! सेना आणि दोन्ही काॅंग्रेस यांची आघाडी म्हणजे तेल आणि पाणी ... एकजीव होणे अशक्य ! कतृत्वहीन महत्वाकांक्षा म्हणजे मविआचे मुख्यमंत्री ! ना सरकारकडे लक्ष ना पक्षाकडे ! २०२२ ला राज्यसभा निवडणुकीचे निमित्त आणि सेना दुभंगली ! तीनपैकी एक बाण वर्मी बसला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाल. आता कतृत्व सिद्ध करायच होत आणि मराठा आरक्षण हा विषय होता.. पण तो थंड बस्त्यात !! 

मग मराठा समाजाचे इतकी वर्ष सुरु असणारे नेता विरहित आंदोलन, मोर्चे याला २०२३ मध्ये एक चेहेरा मिळतो. जरांगेंच्या नेतृत्वाचा उदय होतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली समाज एकवटतो. केवळ सहा ते आठ महिन्यांच्या काळात संघर्षाची धार टप्प्या टप्प्याने तीव्र होत जाते. या आंदोलन काळात भाजपा, फडणवीस कधीच फ्रंटवर नसतात. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, कतृत्व सिद्ध करण्यासाठी सगळे काही जणू प्लॅन होत  असाव.‌ 

आता दुसरा बाण रोखलेला असतो तो सेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालणाऱ्यांच्या दिशेने... पाच वेळा उपमुख्यमंत्री पद मिळाल पण संधी असतांनाही मुख्यमंत्री बनू न दिल्याची सल दादांच्या मनात आहेच. कतृत्व आहे आणि महत्वाकांक्षा पण आहे. पण संधीसाठी काकांची मर्जी किती सांभाळायची ? आणि किती थांबायच ? या प्रश्नाचे उत्तर दादांनीच शोधल आणि आम्हीच खरा पक्ष असे म्हणत दादांच्या गटाने एकनाथ शिंदेंचीच री ओढली. 

येणाऱ्या निवडणुकात महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगणार. एकाकडे संख्याबळ तर दुसरीकडे उबाठा आणि साहेबांची भावनिक साद !  सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन किती दिवस रडगाणे सुरू ठेवायचं ? गद्दार आणि खोके याच्यापलिकडे जाऊन आता जनता पहाते आहे. एकनाथ शिंदेंचा संयम आणि परिश्रम वाखाणण्याजोगा आहे हे दिसून येत होत. कमी होती ती पारड्यात भरघोस यशाच माप पडायची. मराठा आरक्षण हा तिसरा बाण ! शिंदेंचा उदोउदो होण आणि मराठा समाज त्यांच्यामागे उभा राहण यासाठी मराठा आरक्षणाच्या बाणाने हे लक्ष्य बरोबर साधले. याचा अतिरिक्त लाभ दादांनाही मिळणारच. झाडाची फळे हा थेट लाभ तर सावली हा अतिरिक्त लाभ ! 

लक्षात घ्या या धामधुमीत भाजपाचे संख्याबळ सत्ता नसूनही टिकून राहिले, पक्ष एकसंध राहिला यातच सगळ काही आल. (शिवसेनेच्या) धनुष्यातून योग्य टायमिंग (घड्याळ) साधत सुटलेले तीन बाण ! एकाने शिवसेना तर दुसऱ्याने राष्ट्रवादीचा वेध घेतला आणि तिसऱ्याने मराठा आरक्षणाचे फळ पदरात पडले. अर्थात धनुर्धर कोण होता ? हे वेगळ सांगायची गरज नाही. बाहुबली २ मध्ये तो राजकुमार होता हे सांगाव लागल नाही. आता तराजूचे पारडे महायुतीकडे पूर्ण झुकलय. कार्यकर्त्याच संख्याबळ, संयम आणि राजकीय दूरदृष्टी असलेले भविष्यात १४५+ ला पोहोचतील तर उरलेले कुबड्या बनून रहातील. व्यक्तिकेंद्रित राजकारण कधीच मागे पडतय हे डोळे बंद केलेल्यांना (मग ते युतीत असोत कि आघाडीत) कधी समजणार ? 

© बिंदुमाधव भुरे, पुणे.