Wednesday, April 20, 2022

इंदौरचा संस्मरणीय लग्नसोहळा

इंदौरचा संस्मरणीय लग्नसोहळा

मला आठवतय एकदा दिल्लीला संघटनेचे अधिवेशन होते आणि मग आमच्या सगळ्यांच्या मुखी एकच नारा होता "चलो दिल्ली" ! या अधिवेशनाच्या निमित्ताने मग अनेक जुन्या सहकाऱ्यांना भेटायची, गप्पा मारायची संधी मिळायची. त्यामुळे असे अधिवेशन म्हणजे एक पर्वणीच असायची ! 

गेल्या महिन्यात इंदौरहून सौ ज्योतीचा फोन आला आणि प्रणवच्या लग्नाचे आग्रही निमंत्रण ! तेव्हाच ठरवून टाकल .. "चलो इंदौर" ! गेली दोन अडीच वर्ष कोरोनाने सगळ्यांना बंधनात जखडून ठेवले होते. नुकतेच सगळी बंधने हटली होती. त्यामुळे हा लग्नसोहळा म्हणजे सगळ्यांना खूप वर्षांनंतर भेटायची, गप्पा मारायची एक पर्वणीच होती. अनेक नातेवाईक कित्येक वर्षांनी एकत्र येणार होते. सगळेचजण एकमेकांना फोन करुन "इंदौरला भेटुन हं" असे बजावत होते आणि मग बघता बघता पुणे, नाशिक, मुंबई सगळीकडे "चलो इंदौर" वातावरण बनून गेल. 


इंदौरला आमचे आगमन जरा उशीराच झाले होते. त्यामुळे आम्ही थेट रिसेप्शन कार्यक्रमाला पोहोचलो. उन्हाचा चटका मावळून हवेत आल्हाददायक थंडावा आला होता.‌ लाॅनमधील दिव्यांच्या झगमगाटात पायाखाली असलेली हिरवळ म्हणजे निसर्गाने अंथरलेला गालिचाच जणू ! वातावरणात संगीताचे सूर निनादत होते. भव्य स्टेज नवपरिणीत दांपत्याच्या प्रतिक्षेत होते. लाॅनच्या कडेने आणि मध्यभागी खाण्यापिण्याचे बुफे स्टाॅल्स सजले होते. माझ्या काही मित्रांनी "इंदौरला गेलात कि खाऊ गल्लीला नक्की भेट द्या. खाण्याच्या पदार्थांची विविधता नाविन्य आणि चविष्टता जगात कुठेही अनुभवायला मिळणार नाही" असे छातीठोकपणे सांगितले होते. पण त्यांचा दावा फोल ठरावा इतकी खाद्यपदार्थांची रेलचेल आणि चंगळ इथे उपलब्ध होती. एका पोटात एकवेळ असंख्य गुपिते मावतील पण इतके खाद्यपदार्थ मावणे केवळ अशक्य ! 


पाहुणे मंडळींच्या आगमनापासून ते परतीपर्यंत सगळ्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था होती. लग्नकार्य होणार असलेले ठिकाण आणि निवास यादरम्यान जाण्या-येण्यासाठी कारसेवा जय्यत तयार होती. दुसरे दिवशी संपूर्ण कार्यक्रम हा एसी हाॅलमधे तर सकाळच्या न्याहारी पासून ते भोजन व सायंकाळचे चहापान यासाठी या हाॅललगतच एक भव्य मांडव सज्जता होती. मोठमोठे डेझर्ट कूलर्स बाहेरच्या तापमानाची आठवणही होऊ देत नव्हते. आदल्या दिवशीप्रमाणेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी केटरिंग सज्ज होते. हा इंदौरी पाहुणचार केवळ अविस्मरणीय ! 


या कार्याच्या तयारीसाठी अनेक हातांनी मदत केली असणार आणि ही तयारी अनेक दिवसांपासून सुरु असणार हे लक्षात येत होत. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे असे आपण नेहमीच म्हणतो आणि कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी त्याचे पूजन करतो. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव पाठीशी असतात हा विश्वास आपल्या मनात असतो. दोनही दिवस हा आशीर्वाद श्री. अरविंदकाका आणि श्री भैय्याजी या दोन ज्येष्ठ आणि वडिलधाऱ्यांच्या उपस्थितीने आम्हा सकल जनांना लाभला. त्यांना धन्यवाद द्यायलाच हवेत. 

हा संपूर्ण सोहळा अखंड स्मरणात राहील इतका नीटनेटका आणि देखणा झाला. त्याच्या आयोजनाचे शिल्पकार श्री उदय, सौ ज्योती, श्री तुषार, सौ. स्वाती तसेच श्री शिरिष यांचे मनापासून अभिनंदन ! सौ. सुवर्णाची भेट होऊ न शकल्याची रुखरुख मात्र सगळ्यांना लागली. या निमित्ताने अनेक जुन्या नातेवाईकांच्या नव्याने ओळखी झाल्या हे ही खरच ! परतल्यानंतर आठवले तसे आणि सुचले तसे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे अनावधानाने कोणाचा उल्लेख राहिला असल्यास क्षमस्व ! पुनः एकदा समस्त भौरस्कर आणि जोशी परिवाराला मनापासून धन्यवाद ! 

सौ शुभदा आणि श्री बिंदुमाधव भुरे, पुणे

No comments:

Post a Comment